Friday, 29 August 2025
चला पैशांचे महत्व समजून घेऊया भाग 2
#चला_पैशांचे_महत्व_समजून_घेऊया_भाग_2
6. आर्थिक उद्दिष्टे आणि अंदाजपत्रक
तुमचे निर्धारित आर्थिक लक्ष विशिष्ट काळात पूर्ण करण्याचे धेय्य म्हणजे आर्थिक उद्दिष्ट. ते पूर्ण करण्यासाठी आधी ते नेमकं ठरवायला हवं आणि त्यादृष्टीने वाटचाल करायला हवी. आर्थिक भवितव्य सुकर करण्यासाठी खर्च नियंत्रणात असावेत त्याचं निश्चित नियोजन करायला हवं.
आपलं आर्थिक उद्दिष्ट SMART असावं म्हणजे-
S = Specific म्हणजे निश्चित
तुम्हाला नक्की काय हवंय ते निश्चित करा
मला पुढील वर्षी नातीच्या वाढदिवसासाठी पैसे बाजूला ठेवायला हवेत असा विचार न करता मला माझ्या नातीच्या 10 महिन्यानंतर येणाऱ्या वाढदिवसासाठी ₹1000/- वेगळे ठेवायला हवेत, असा निश्चित विचार करायला हवा.
M = Mesurable म्हणजे मोजता येणारे
ठरवलेले ध्येय मोजता आले पाहिजे.
मी क्रेडिट कार्डची थकबाकी लवकरच फेडन याऐवजी मी येत्या सहा महिन्यात क्रेडिट कार्डची थकबाकी पूर्णपणे भरेन असा मोजता येणाऱ्या कालावधीचा विचार करायला हवा.
A = Achievable म्हणजे शक्य असलेले
ध्येय पूर्ण करता येईल असे असावे.
मी बचत करेन ऐवजी येत्या 6 महिन्यात मला शक्य असलेले दरमहा ₹4000/- बचत करून ₹24000/- जमविन.
R = Realistic म्हणजे वास्तविक, खरेखुरे
आपले धेय्य उपलब्ध गोष्टींचा विचार करून निश्चित कालावधीत पूर्ण झाले पाहिजे.
मी नियमित बचत करून कोट्याधीश होईन. या ऐवजी मी नियमित बचत करून येत्या जानेवारीपर्यंत सर्व कर्ज फेडीन. यानंतर पुढील डिसेंबर पर्यंत आवश्यक असा 6 महिन्यांचा निश्चित खर्च भागवला जाईल एवढा राखीव निधी निर्माण करीन. असा नेमका वास्तविक विचार करणारे असावे.
T = Time bound म्हणजे विशिष्ट काळात पुरे होणारे असे असावे.
मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे जमविन याऐवजी मी दरवर्षी पन्नास हजार असे पुढील दहा वर्षे वाचविन असा कालावधीचा दृष्टिकोन असायला हवा.
अंदाजपत्रक
आपण खर्च कसा आणि कुठे करणार याची योजना तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे अंदाजपत्रक बनवणे. त्यामुळे आपल्याला मिळणारी रक्कम अपेक्षित खर्च, बचत, कर्जफेड, धेय्यपूर्ती कडील वाटचाल या सर्वांचा मागोवा घेता येतो.
7. तुमची निवृत्ती योजना बनवा
निवृत्ती योजना बनवण्याची सुरुवात आत्तापासूनच करा. त्यामुळे जेव्हा तुम्ही निवृत्त व्हाल तेव्हा तुमचे अस्तित्वात असलेले राहणीमान कायम ठेवू शकाल. वाढते खर्च आणि महागाई यांची चिंता तुम्हाला करावी लागणार नाही. निवृत्ती नियोजन योजनाच तुमची निवृत्तीनंतरची स्वप्ने पूर्ण करेल आणि भविष्य सुरक्षित बनवेल.
निवृत्ती योजना तयार करण्यास उपयुक्त युक्त्या-
●आधीपासूनच ठेवलेली शिल्लक निवृत्तीपर्यत चक्रवाढ गतीने वाढते त्यामुळे निवृत्तीच्या वेळी अपेक्षित असणारी मोठी रक्कम जमा होण्यास मदत होते.
●तुम्ही बाजूला जमा करत असणारी रक्कम एवढी मोठी असावी ज्यातून आपण अनपेक्षित खर्च आणि अन्य तातडीच्या गरजा पूर्ण करू शकाल. याशिवाय तुमचा आणि तुमच्या प्रियजनांची आर्थिक गरज भागवू शकेल एवढा जीवन विमा आणि वैद्यकीय विमा असल्यास जोखीम कमी होण्यास मोठी मदत होईल.
●जमा केलेली रक्कम एकाच मालमत्ता प्रकारात न ठेवता विविध मालमत्ता प्रकारात विभागली असता त्यातील एखादा प्रकार परतावा देऊ शकला नाही तर त्याची भरपाई दुसरीकडून झाल्याने जोखीम कमी होण्यास मदत होईल. सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नयेत असे म्हणतात ते यासाठीच.
●तुमचे निवृत्तीचे उद्दिष्ट आणि राहणीमान याचा विचार करून योजनेची निवड करावी. यासाठी मदत करणारे गणक सर्वत्र उपलब्ध आहेत.
आपली निवृत्ती नियोजन योजना बनवण्यासाठी तुम्ही नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता. असे सल्लागार तुम्हाला तुमच्या वैयक्तीक गरजेनुसार उपयुक्त असणारी निवृत्ती नियोजन योजना बनवून देऊ शकतील.
8. कर्ज घेण्यापूर्वी विचार करा
काही अत्यावश्यक गरजा, अनावश्यक इच्छाची पूर्तता करण्यासाठी तसेच आजारपण अपघात यासारख्या आणीबाणीच्या प्रसंगी, पुरेशी बचत नसल्याने कर्ज घेण्याची जरूरी पडते. जिथे जिथे शक्य असेल तेथे कर्ज घेणे शक्यतो टाळावे. कर्जाऊ रक्कम घेतल्याने फेडण्याची जोखीम वाढत असल्याने आर्थिक जबाबदारी वाढते.
बरेचदा बँका वेगवेगळ्या कारणांसाठी कर्ज देतात, ती तारणासह अथवा तारण विरहितही असू शकतात. तारणासह घेतलेल्या कर्जासाठी मालमत्ता गहाण ठेवावी लागते. कर्ज फेडू शकलो नाही तर त्या मालमत्तेची विक्री केली जाते. उदा वाहन कर्ज, गृह कर्ज. या उलट काही कर्जे विनातारण दिली जातात जसे वैयक्तिक कर्ज.
कर्ज घेण्यापूर्वी हे लक्षात घ्या
●कर्ज नेहमीच मान्यताप्राप्त, नोंदणीकृत धनकोकडून (बँक, बिगर बँकिंग अर्थसंस्था, पतपेढी) घ्यावं. अनोंदणीकृत व्यक्ती संस्था, खाजगी सावकार यांच्याकडून घेऊ नये.
●कर्जावरील व्याजाचा दर तपासून पाहावा. कमी व्याजदराने कर्ज देणाऱ्याकडून ते घ्यावे.
●धनकोकडून व्याजाची आकारणी कशी केली जाणार ते समजून घ्यावे. ती दोन पद्धतीने केली जाते. सरळव्याज - यात मूळ कर्ज रकमेवर पूर्ण व्याज आकारले जाते तर दुसऱ्या पद्धतीत जसजशी मुद्दल कमी होईल त्याप्रमाणे कमी व्याज घेतले जाते.
●तुमच्या नियमित खर्चावर परिमाण न करता परतफेडीची क्षमतेनुसार कर्जफेडीचा हप्ता आणि कालावधी ठरवून घ्यावा. हा कालावधी जितका कमी तेवढे कमी व्याज द्यावे लागते तर कालावधी अधिक असेल तर व्याज अधिक द्यावे लागते.
●कर्ज घेण्यापूर्वी काही छुपे खर्च असतील तर ते किती आणि कोणते यांची माहिती करून घ्यावी उदा प्रक्रिया फी, हप्ता भरल्यास उशीर झाल्यास पडणारा दंड, मुदतपूर्व कर्ज फेडल्यास द्यावी लागणारी अधिकची रक्कम इ.
कर्ज घेतल्यावर हे लक्षात ठेवा
●अधिकचे व्याज आणि दंड टाळण्यासाठी कर्जाचे हप्ते नियमित भरा.
●जास्त पैसे उपलब्ध असल्यास कर्ज मुद्दल अंशतः अथवा पूर्णपणे मुदतीपूर्वी फेडल्यास पडणारा दंड लक्षात ठेवून ते लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करावा.
●तुमच्या कर्ज खात्याचा नियमित आढावा घ्या.
●वेगवेगळी कर्जे घेण्यापूर्वी त्याचा अतिरिक्त आर्थिक बोजा आपल्यावर पडू नये म्हणून आपल्या परतफेडीच्या क्षमतेचा विचार करा.
9. विमा - अनपेक्षित संकटांपासून संरक्षण
आपण आणि आपल्या कुटुंबावर काही संकटे येऊ शकतात जसे कमावत्या व्यक्तीचा मृत्यू, अपघात, प्रदीर्घ आजारपण, चोरी, आग. याचा मोठा आर्थिक फटका आपल्याला बसू शकतो विम्यामुळे त्याची आर्थिक भरपाई होत असल्याने तीव्रता थोडी कमी होते.
विविध विमा प्रकार
●जीवन विमा - या विम्यामुळे कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा कुटूंबियांना एकरकमी भरपाई मिळत असल्याने आर्थिक आधार मिळतो.
●अपघात विमा- या विम्यामुळे कमावत्या व्यक्तीस अपघात झाला असता आर्थिक स्वरूपात एकरकमी अथवा टप्याटप्याने मदत मिळते
●आरोग्य विमा- यामुळे अपघात झाल्यास अथवा आजारी पडल्यास होणाऱ्या खर्चाची पूर्तता होते
●सर्वसाधारण विमा - जसे की वाहन विमा, प्रवास विमा, निवृत्ती विमा, मालमत्ता विमा या विम्यामुळे त्याच्याशी संबंधीत मालमत्तेतील आर्थिक जोखमीची तीव्रता कमी होते.
आपली नेमकी गरज ओळखून यापैकी जीवन विमा, अपघात विमा, आरोग्य विमा अथवा सर्वसाधारण विम्याची निवड करावी. यासाठी आपल्याला वर्गणी द्यावी लागते ती मासिक, त्रैमासिक, वार्षिक पद्धतीने भरता येते यातील काही विमा प्रकार विशिष्ट कालावधीसाठी एकरकमी वर्गणी भरूनही उपलब्ध आहेत..
विश्वासार्ह एजंट कडून याविषयी अधिकृत सविस्तर माहिती मिळवता येईल. तुमच्या गरजेनुसार ध्येय निश्चितीची मोजणी करणारे विमा योजनांची गणना करणारे गणक उपलब्ध आहेत.
10 मालमत्ता नियोजन
मालमत्तेमध्ये तुमचे घर, बचत, विमा, गुंतवणूक, ताबेकबजात असलेल्या गोष्टींचा समावेश होतो. मालमत्ता नियोजन म्हणजे तुमच्या पश्चात मालमत्ता किती आणि कशी विभागणी जावी यासंबंधीची निश्चित रचना.
मालमत्ता नियोजनाची गरज-
●मालमत्ता सुलभतेने वारसांकडे हस्तांतरित व्हावी म्हणजे त्यांना खरीखुरी गरज असताना त्याचा उपयोग होईल.
●मालमत्तेची वाटणी तुमच्या इच्छेनुसार आणि विनातंटा विभागली जाईल.
मालमत्ता नियोजनात तुमची मालमत्ता प्रियजन, कुटूंबीय यांच्यामध्ये विवाद न होता कशी वाटली जावी याचा विचार केला जातो. मालमत्ता नियोजन करण्यासाठी उपयुक्त गोष्टी खालीलप्रमाणे-
●इच्छापत्र- तुमच्या पश्चात मालमत्तेची वाटणी कशी व्हावी याची नोंद असते. जर मुले लहान असतील तर त्यांचा सांभाळ कोणी करावा याचा त्यात उल्लेख केलेला असतो. काही वेळेस इच्छापत्राची सत्यता सिध्द करण्यासाठी न्यायालयाकडून प्रमाणपत्र मिळवावे लागते त्यास प्रोबेट म्हणतात.
●अधिकारपत्र- यात मालमत्तेची देखभाल तुमच्या अनुपस्थितीत कुणी करावी, यासाठी विश्वासू व्यक्तीची नेमणूक करून त्यास कायदेशीर अधिकार दिले जातात.
●आढावा आणि पुनर्विचार- बदलती परिस्थिती आणि कायद्यातील बदल यांचा विचार करून इच्छापत्र आणि अधिकारपत्र यांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यात आवश्यक ते बदल करावे लागतात. यासाठी निष्णात विधिज्ञाची मदत घेता येईल.( संपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक आहेत)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 29 ऑगस्ट 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 22 August 2025
चला पैशाचे महत्व समजून घेऊया भाग 1
चला पैशांचे महत्व समजून घेऊया भाग 1
1. बचत
भविष्यातील आपल्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी उत्पन्नातील काही भाग बाजूला ठेवणे म्हणजे बचत होय. आपल्या उत्पन्नातून खर्च वजा करता राहिलेली शिल्लख म्हणजे बचत असे म्हणता येईल. तीची मांडणी खालील सूत्रात करता येईल.
बचत= उत्पन्न-खर्च
आपले आर्थिक भवितव्य सुनिश्चित करण्यासाठी, दीर्घकालीन इच्छांची पूर्तता करण्यासाठी, आर्थिक स्थेर्यता मिळण्यासाठी तिचा उपयोग होतो. त्यामुळे आपल्याला आंतरिक समाधान मिळत असते.
म्हणूनच,
उत्पन्नातून खर्चकरून झाल्यावर राहिलेली रक्कम शिल्लख ठेवून बचत करण्याऐवजी सुरुवातीपासून प्रथम बचत करून राहिलेल्या रकमेतून खर्च करण्याची सवय लावून घ्यावी.
बचत का करावी?
बचतीची सुरुवात नेमकी कधी करावी ते सांगता येणं कठीण असलं तरीही आपण ती जितक्या लवकरात लवकर करू ते अधिक चांगलं.
बचतीचे महत्व अधोरेखित करणारे काही मुद्दे असे-
●बचतीमुळे आपल्याकडे राखीव निधी (गंगाजळी) तयार होतो. त्यातून काही आकस्मित खर्च जसेकी आजारावरील उपचार, व्यवसायातील तोटा यांची भरपाई करू शकतो.
●आपली आर्थिक उद्दिष्टे जसे की घर, मुलांचे उच्च शिक्षण आपल्या निवृत्तीचे आर्थिक नियोजन करू शकतो.
म्हणूनच,
आज आत्तापासूनच बचतीची सवय लावून घेऊन आर्थिक स्वावलंबन आणि आत्मसमाधानाच्या दिशेने पहिले पाऊल पुढे टाकूया.
2. गरजा, इच्छा आणि आकांक्षा यामधील फरक
आपल्या खर्चाचे प्राधान्यक्रम ठरवून अधिकाधिक बचत करण्यासाठी गरजा, इच्छा आणि आकांक्षा यातील फरक जाणून घेणं गरजेचं आहे.
★गरजा- आपल्याला सर्वसाधारण जीवनमान जगण्यासाठी किमान आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजे गरजा, उदा अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, शिक्षण, आरोग्य सुविधा यावरील खर्च.
★इच्छा- या जगण्यासाठी आवश्यक नसल्या तरी त्यामुळे आपले जीवन समृद्ध होते. राहणीमान उंचावते उदा. मनोरंजन, हॉटेलिंग, पर्यटन.
★आकांक्षा- ज्यामुळे आपल्याला आपली स्वप्नपूर्ती झाली असे वाटते अशा तीव्र इच्छा म्हणजे आकांक्षा. महागडी गाडी, बाजारात येणाऱ्या नवनव्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, महागडे मोबाईल इत्यादी. ज्या मिळायला हव्यात म्हणून तुम्हाला कदाचित कर्ज घेण्याचा मोह होतो. (या गोष्टींसाठी कर्ज घेण्यापूर्वी आपल्याला तिची आवश्यकता आहे का? याचा सर्वप्रथम विचार करा.)
आपल्या प्राथमिक गरजांकडे दुर्लक्ष करून इच्छा आकांक्षाची पूर्तता कराल तर बचत करणे अशक्य आहे म्हणूनच बचतीकडे दुर्लक्ष न करता आधी प्राथमिक गरजा नंतर इच्छा आणि त्यानंतर आकांक्षा असा खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवावा. यातील क्रमात कोणताही अदलाबदल झाल्यास आर्थिक स्थैर्य निर्माण होणार नाही.
3. उत्पन्न आणि खर्चाचे व्यवस्थापन
प्रत्येकाने आपल्या खर्चाचा मागोवा घेऊन त्याचा आढावा घेण्यासाठी आपले उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करणे जरुरीचे आहे. उत्पन्न आणि खर्च यांचे व्यवस्थापन करण्याचे मार्ग,
●अंदाजपत्रक तयार करणे: अंदाजपत्रक तयार करण्यासाठी आपल्याला मिळणारे सर्व उत्पन्न जसे पगार, बोनस, घरभाडे, व्यवसायाचे उत्पन्न, अन्य उत्पन्न आणि अपेक्षित खर्च जसे वाणसामान, वीज बिल, अन्य बिले, मनोरंजन यांच्यावरील अपेक्षित खर्च लिहून काढा. हे खर्च करत असताना उत्पन्नातील काही भाग हा बचत आणि गुंतवणूक यासाठी राखून ठेवा आणि त्यानंतर या अंदाजपत्रकाचे तंतोतंत पालन करा.
●खर्चाचा प्राधान्यक्रम ठरवा: खर्च करताना गरजेच्या गोष्टी सर्वप्रथम त्यानंतर इच्छा आणि आकांक्षा असा क्रम असुद्या. तरीही काही शिल्लख रहात असेल तर आणि तरच अनावश्यक खर्चाचा विचार करा.
●राखीव निधी (गंगाजळी) निर्माण करा: उत्पन्नातील काही रक्कम सक्तीने बाजूला ठेवून गंगाजळी निर्माण करा. अकस्मात येणारे संकट आणि त्यामुळे उद्भवणारे खर्च यांच्याशी सामना करण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
●गुंतवणूक करा: आपल्या इच्छा, आकांक्षा लवकरात लवकर आपल्या उत्पन्नातील काही भागाची गुंतवणूक करा.
4. महागाई: वस्तू आणि सेवांच्या किंमतीत होणारी वाढ.
वस्तू आणि सेवा यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असते. त्यामुळे पैशांचे मूल्य कमी होते म्हणजे आज जी वस्तू ₹100/- मध्ये येईल त्यापेक्षा कमी प्रमाणात भविष्यात वस्तू उपलब्ध होते. महागाई दरवर्षी 6% दराने वाढत असेल तर आज शंभर रुपयात उपलब्ध असलेल्या वस्तू अथवा सेवेसाठी आपल्याला पुढील वर्षी ₹106/- मोजावे लागतील.
महागाईचा दर 6% असल्यास सध्याचे ₹ 1 लाखचे मूल्य 5 वर्षांनी ₹74700/-, 10 वर्षांनी ₹55800/-, 15 वर्षांनी 41700/- ,तर 20 वर्षांनी ₹31200/- असे कमी कमी होईल.
महागाई नियंत्रणात आणणे आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्यातील नाही. त्याचे आपल्या वैयक्तिक अर्थकारणावर होणारे विपरीत परिणाम कमी करता येतात. त्यासाठी,
●खर्चांचा प्राधान्यक्रम ठरवा आणि अनावश्यक खर्च टाळा.
●आपली गुंतवणूक विविध मालमत्ता प्रकारात अशी विभागा की त्यातून मिळणारा सरासरी परतावा हा महागाईवर मात करणारा असेल.
●दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्या. शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने यातील गुंतवणुकीवर यांनी दिलेल्या परताव्याचा इतिहास पाहिला असता त्यातून दीर्घकाळात महागाईवर निश्चितच मात करता येते.
5. चक्रवाढ गतीने होणारी तुमच्या पैशांची वाढ
जसजसा अधिक काळ जाईल तसतशी चक्रवाढ व्याजाने तुमच्या बचतीतील केवळ मुद्दल नव्हे तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावरील व्याजाने मोठ्या प्रमाणात वाढ होते. अल्बर्ट आईस्टाईन म्हणतात, चक्रवाढ व्याज हे जगातील आठवं आश्चर्य आहे. हे ज्याला समजतं तो कमावतो आणि ज्याला ते समजत नाही तो त्याची किंमत मोजतो.
●चक्रवाढ व्याजाची जादू: जर 1 लाख रुपये 10% सरळ व्याजाने 20 वर्षासाठी ठेवले तर त्याचे तीन लाख रुपये होतात पण हीच रक्कम 10% चक्रवाढ व्याजाने ठेवली असता 20 वर्षांनी 6 लाख 72 हजार होतात. तुम्ही हे पडताळून पाहू शकता. चक्रवाढ व्याजाची झटपट गणना करून देणारे गणक उपलब्ध आहेत.
●चक्रवाढ व्याजाचे ठोकताळे: झटपट चक्रवाढ व्याजाची मोजणी करण्याचे नियम
★72 चा नियम- गुंतवणूकीचे मूल्य दुप्पट होण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज येतो. व्याजदराने 72 या संख्येस भागले असता गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी समजेल. उदा. चक्रवाढ व्याजदर 9% असेल तर गुंतवणूक दुप्पट होण्यास 72÷9= 8 म्हणून 8 वर्ष लागतील.
★114 चा नियम- यामुळे मुद्दल तिप्पट होण्याचा कालावधी समजतो.
★144 चा नियम- यामुळे मुद्दल चौपट होण्याचा कालावधी समजतो. (अपूर्ण)
(सेबीच्या सारथी या अँपवर उपलब्ध माहितीचा भावानुवाद)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक आहेत)
Friday, 15 August 2025
एक देश एक प्रमाणवेळ
#एक_देश_एक_प्रमाणवेळेकडे
स्थानिकवेळ आणि प्रमाणवेळ या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. स्थानिक वेळ म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणाच्या रेखांशावर आधारित वेळ, जी सूर्याच्या स्थितीनुसार बदलत जाते. तर, प्रमाण वेळ म्हणजे एखाद्या मोठ्या प्रदेशासाठी निश्चित केलेली एक समान वेळ, ज्यामुळे त्या प्रदेशातील वेळेची एकरूपता टिकून राहते. स्थानिक वेळ ही सूर्याच्या स्थितीवर अवलंबून असते. प्रत्येक रेखांशासाठी स्थानिक वेळ वेगळी असू शकते, कारण सूर्य पूर्वेकडील भागांमध्ये लवकर उगवतो आणि पश्चिमेकडील भागात उशिरा. पूर्वी, जेव्हा दळणवळणाची साधने कमी होती, तेव्हा स्थानिक वेळच वापरली जात होती.
प्रमाण वेळ म्हणजे एखाद्या मोठ्या प्रदेशासाठी निश्चित केलेली एक समान वेळ. हे वेळ क्षेत्र (time zone) निश्चित करण्यासाठी वापरले जाते. भारताची प्रमाण वेळ 82°30' पूर्व रेखांशावर आधारित आहे, जी प्रयागराज जवळून जाते, आणि ती युटीसी +05:30 Hrs (यूनिव्हर्सल टाइम कोऑर्डिनेटेड) आहे, प्रमाण वेळामुळे जगभरातील लोकांना वेळेचे नियोजन करणे सोपे होते. थोडक्यात, स्थानिक वेळ ही सूर्याच्या आकाशातील स्थितीवर आधारित असून ती प्रत्येक ठिकाणी वेगळी असू शकते, तर प्रमाण वेळ ही एखाद्या मोठ्या प्रदेशासाठी निश्चित केलेली एक समान वेळ आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर वेळेचे व्यवस्थापन करणे सोपे होते.
आपल्याकडील अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रम वेळेत सुरू होत नसले तरी सध्याच्या गतिमान जीवनात आपण वेळेवर फारच अवलंबून आहोत. आपण नोकरी करत असाल तेथून येण्याची वेळ निश्चित नसली तरी वेळेवर कामावर जावं लागतं, व्यवसाय करीत असाल त्यातील स्पर्धेत टिकून राहायचे तर वेळेचे पूर्ण पालन करावं लागतं. गुंतवणूक करत असाल तर त्याचीही निश्चित वेळ असते. अनेक गुंतवणूकदार, ट्रेडर्स त्याच्या बाजारातील फायनल ऑर्डर डॉट 03:29 ला पंच करतात. अलार्म, डेडलाईन, घाई हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. हे हास्यास्पद वाटत असलं तरी त्यात तथ्य आहे.
एकदा का समाज वेळेवर अवलंबून राहू लागला की वेळेबद्धल एकमत असणं गरजेचं असतं. आपण घड्याळ बनवली मग अचुकतेसाठी अणूघड्याळ मग त्यांचं संपूर्ण नेटवर्क - जे उपग्रहांपासून, सर्व्हर, पॉवरग्रीड आणि फायटर जेट एकमेकांशी जोडले गेले. प्रत्येक देशाने आपापल्या वेळा ठरवल्या. अमेरिकेकडे सहा फ्रान्सकडे बारा प्रमाणवेळा आहेत. नेपाळची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेच्या 15 मिनिटे पुढे आहे. ही सर्व यंत्रणा वेळेच्या अदृश्य एकमतावर चालते मिलिसेकंद चुकलं, की संपूर्ण यंत्रणा कोसळू शकतं. इतकं असूनही, भारताचे बहुतेक डिजिटल सिस्टीम्स अजूनही दुसऱ्याच्या वेळेवर चालतात. भारत सरकार बदलू इच्छित आहे, एका नव्या धोरणाद्वारे, ‘एक देश, एक प्रमाणवेळ’ – एक असा प्रस्ताव भारतातील सर्व डिजिटल आणि कायदेशीर पायाभूत व्यवस्था एका अचूक, भारत-केंद्रित वेळेच्या मानकावर आधारित असतील. विदेशी वेळा, जीपीएस आणि गुगलचे सर्व्हर याऐवजी, भारताचे स्वतःचे अणुघड्याळ आणि उपग्रह प्रणाली वापरायची (जसे की NavIC – Navigation with Indian Constellation) आणि देशभरातल्या सर्व यंत्रणा — रेल्वेपासून उपग्रहांपर्यंत — एकाच नॅनोसेकंद अचूक वेळेवर चालवायच्या. सध्या भारतातील बहुतांश मोबाईल, बँकिंग, टेलिकॉम आणि शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स अमेरिका नियंत्रणाखालील जीपीएस किंवा क्लाउड बेस्ड वेळेवर चालतात तर इसरो, डीआरडीओ आणि शेअर बाजार यांच्यासारख्या मोजक्या संस्था मात्र भारतीय NavIC प्रणालीशी जोडलेल्या आहेत. सन 2016 मध्ये एक जीपीएस बग फक्त तेरा मायक्रोसेकंदाची चूक घेऊन आला. (0.013 सेकंद) त्यामुळे अमेरिकेतील पोलीस रेडिओ, टेलिकॉम नेटवर्क, ग्लोबल डेटा स्टॅम्पिंग विस्कळीत झाले. हाय-फ्रिक्वेन्सी ट्रेडर्सना मोठा फटका बसला. युरोपमध्ये सन 2020 मध्ये अशीच एक वेळेशी संबंधित गडबड संपूर्ण टेलिव्हिजन आणि टेलिकॉम सेवा ठप्प करू शकली, म्हणूनच आपल्या प्रमाणवेळेवर आपला स्वायत्त अधिकार असणे आवश्यक आहे. भारताजवळ त्यांची प्रमाणवेळ IST (Indian Standard Time) आधीपासूनच अस्तित्वात आहे. ही वेळ UTC +5:30 आहे – ती सन 1906 मध्ये निश्चित करण्यात आली. आज ही वेळ राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा (NPL), दिल्ली येथे अणुघड्याळांद्वारे सांभाळली जाते. ही घड्याळं सीझियम-133 अणूंमध्ये होणाऱ्या कंपनांवर आधारित असतात. एक सेकंद = 9,192,631,770 कंपने. यांची अचूकता इतकी जबरदस्त असते की 30 दशलक्ष वर्षांनंतर त्यात फक्त एक सेकंद फरक पडू शकतो.
सध्या ‘एक देश, एक प्रमाणवेळ’ यासाठी सरकार काय करतंय?
●देशभर पाच प्रादेशिक वेळ प्रयोगशाळा उभारल्या आहेत: अहमदाबाद, बेंगळुरू, भुवनेश्वर, फरीदाबाद आणि गुवाहाटी
●प्रत्येक ठिकाणी सुपर-अचूक अणुघड्याळ बसवले आहेत.
●हे NTP (Network Time Protocol) आणि PTP (Precision Time Protocol) द्वारे 0.1 मिलिसेकंदात संपूर्ण देशभर वेळ पोहोचवतील.
●लवकरच Legal Metrology (IST) Rules, 2025 ही नवीन कायदाशीर चौकट येणार आहे.
●यानुसार सर्वच संस्थांना फक्त भारतीय वेळा वापरणे बंधनकारक होईल — जीपीएस, गुगल वेळ यांचा वापर बंद होईल.
●सरकारने याबाबत शेअरबाजार, सेबी आणि बँकांना याबाबत आधीच सूचना दिल्या आहेत.
हा मुद्दा आत्ताच का? याचे कारण,
●आता वेळ ही ‘पायाभूत सुविधा ’आहे.
●डिजिटल व्यवहार, AI, रिअल टाइम डेटा — सगळं वेळेवर अवलंबून आहे. जर यंत्रणा एका वेळेवर सहमत नसतील, तर त्या वास्तवावरही सहमत होऊ शकत नाहीत आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
●आजही जगातील चार अब्जांहून अधिक लोक जीपीएस नियंत्रित वेळेवर चालतात. जर जीपीएस स्पूफ किंवा जॅम केलं गेलं (यूक्रेन, मिडल ईस्टमध्ये असं घडलंय), तर भारतातली एटीएम, एअर ट्रॅफिक कंट्रोल, रडार प्रणाली बंद पडू शकतात.
इतर देश सध्या काय करीत आहेत?
●अमेरिका, चीनने स्वतःची वेळ प्रणाली आणि बॅकअप सिस्टीम्स तयार केल्या आहेत.
●युरोपचे गॅलिलिओ उपग्रह नेटवर्कसुद्धा चालू आहे.
●भारत मात्र अजूनही जगातल्या वेळेवर अवलंबून आहे.
●एका अमेरिकन अहवालानुसार, चुकीच्या वेळेमुळे होणारे नुकसान $1 बिलियन प्रति दिवस असू शकते. आपण अजून ते मोजत देखील नाही.
यातील अडचणी-
●खर्च — अणुघड्याळं, उपग्रह, NTP/PTP प्रणाली उभारणं महाग आहे.
●एकसंधता — बँकिंग, टेलिकॉम, पावर कंपन्यांनी ही नवी वेळ स्वीकारावी लागेल.
●प्रशासन — प्रत्येक संस्था वेळेवर अपग्रेड आणि कम्प्लायंट राहील का?
●मोठा विरोधाभास: पूर्व भारत — आसाम, अरुणाचल प्रदेश इ. राज्ये अनेक वर्षांपासून वेगळ्या प्रणामवेळेची मागणी करत आहेत. पूर्व आणि पश्चिम टोकाकडील स्थानिक वेळेत दोन तासाचा फरक आहे. पूर्वेकडील भागात सूर्य हिवाळ्यात 4:30 ला उगवतो आणि सायंकाळी 5 पूर्वीच मावळतो. तरीही तिथले सर्व व्यवहार, ऑफिसेस आणि शाळा देशाच्या प्रमाणवेळेनुसार चालतात. एक अभ्यास सांगतो की एकाच प्रमाणवेळेमुळे आपली 2.7 अब्ज युनिट वीज वाया जाते, हजारो कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. यासाठी सध्या असलेले प्रमाणवेळेचे ठिकाण बदलून ते थोडे पूर्वेकडे सरकवावे अशी एक शिफारस होती.
यावर अधिक चांगला उपाय काय असू शकतो?
हेच अणुघड्याळ नेटवर्क वापरून दुहेरी वेळा देणं — पूर्व भारतासाठी एक आणि उर्वरीत भागासाठी एक. यामुळे देशाला अचूकता मिळेल आणि मानवी भांडवलात ₹29000 कोटी (₹4.1 बिलियन) ची भर पडेल
‘एक देश, एक प्रमाणवेळ’ ही कल्पना यंत्रणेला अचूक बनवून काही प्रश्न निर्माण करते:
●जर वेळ एका संस्थेकडे केंद्रीकृत असेल, तर तिचं ऑडिट कोण करेल?
●बॅकअप कोणता?
●आजचं उपलब्ध मिश्र-जागतिक कालचक्र त्यापेक्षा अधिक विश्वासार्ह आहे का?
या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन, ही योजना आपल्या देशाला ‘आपल्या प्रमाणवेळेच्या स्वातंत्र्याचा’ अधिकार देत आहे.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
Friday, 8 August 2025
क्वांटची बाजी
#क्वांटची_बाजी_देशातील_पहिल्या_विशेषीकृत_गुंतवणूक_योजनेची_लवकरच_सुरुवात
भांडवल बाजारात अप्रत्यक्ष गुंतवणूक करण्यासाठी महत्त्वाचे तीन पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड योजना, गुंतवणूक संच व्यवस्थापन सेवा आणि पर्यायी गुंतवणूक निधी. यातील म्युच्युअल फंड हा पर्याय सर्वच गुंतवणूकदारांना उपयुक्त आहे तरीही अधिक परतावा मिळावा या हेतूने गुंतवणूकदार डमी गुंतवणूक व्यवस्थापन योजनांत गुंतवणूक करतात. गुंतवणूक करण्यासाठी अनेक अधिकृत पर्याय उपलब्ध असले तरी लोभ आणि हव्यास यामुळे अनेक गुंतवणूकदार अधिक आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन देणाऱ्या बेकायदेशीर योजनांना बळी पडतात. पीएमएस आणि एआयएफ मधील किमान गुंतवणूक ही अनुक्रमे पन्नास लाख ते एक कोटी रुपये असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्यातील नाही. तेव्हा अशा गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड आणि पीएमएस यांच्यातील अंतर भरून काढू शकेल असा अधिकचा, वेगळा परंतु अधिक जोखीम घेऊन अधिक परतावा मिळण्याची शक्यता असलेला गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल असे सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात सरकारने जाहीर केले होते. या सर्वयोजनांची माहिती आपण यापूर्वी करून घेतली होती. त्यातील विशेषीकृत गुंतवणूक योजना या योजनेची मार्गदर्शक तत्वे सेबीने यापूर्वीच जाहीर केली होती. सर्व म्युच्युअल फंडांची स्वशासित संघटना अँफी यांनी यासंबंधीची गुंतवणूक नियमावली सेबीशी चर्चा करून जाहीर करावी असे सुचवले होते. या मार्गदर्शक तत्वाचा आधार घेऊन निश्चित नियम असलेल्या योजना नव्या आर्थिक वर्षात सर्वाना उपलब्ध होतील असा अंदाज होता. त्यांनी सुचवलेली नियमावली आपण पुन्हा एकदा थोडक्यात समजून घेऊयात.
योजनेची मुख्य वैशिष्ठ्ये-
■मालमत्ता व्यवस्थापन कंपनीसाठीचे पात्रता निकष-
●किमान 3 वर्षांचा कार्यकाळ आणि ₹10,000 कोटींचा गुंतवणूक निधी त्यांच्याकडे (गेल्या 3 वर्षांचा सरासरी AUM) असणे आवश्यक.
अथवा
किमान 10 वर्षांचा निधी व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO) ची नियुक्ती करून ₹5,000 कोटींचा सरासरी गुंतवणूक निधी व्यवस्थापन करण्याचा अनुभव असावा.
●अतिरिक्त फंड मॅनेजर कडे ₹ 500 कोटींच्या निधीचे व्यवस्थापन करण्याचा तीन वर्षांचा अनुभव असावा.
●सेबी कायद्याच्या सेक्शन 11, 11B आणि 24 नुसार फंड हाऊस विरुद्ध अलीकडच्या तीन वर्षात कोणतीही कारवाई झालेली नसावी.
●या निधींची जाहिरात करून म्युच्युअल फंड व्यवस्थापन कंपन्यांना त्याचे ब्रॅण्डिंग करता येईल.
● या निधींसाठी स्वतंत्र गुंतवणूकस्नेही संकेतस्थळ किंवा स्वतंत्र पेज बनवावे लागेल.
■ किमान गुंतवणूक रक्कम:
●किमान ₹10 लाख गुंतवणूक आवश्यक (SIP, SWP, STP परवानगी आहे, परंतु एकूण गुंतवणूक ₹10 लाखांपेक्षा कमी असता कामा नये).
●जर बाजारातील चढ-उतारांमुळे गुंतवणूक ₹10 लाखांखाली गेली तर चालेल परंतु ती अयोग्य व्यवस्थापनामुळे अथवा वारंवार गुंतवणूक धोरण बदलल्याने खाली जात आहे असे गुंतवणूकदारास वाटल्यास संपूर्ण रक्कम त्यास बाजारभावाने मागे घेता येईल.
●गुंतवणूक कोणत्या मालमत्ता प्रकारात किती टक्यांपर्यत करावी याच्या मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत.
●मान्यताप्राप्त गुंतवणूकदारांसाठी (हा एक वेगळा अधिक जोखीम स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदारांचा प्रकार आहे) हा नियम लागू नाही.
■गुंतवणूकीस उपलब्ध फंड प्रकार : गुंतवणूकदारांना सध्या इक्विटी आधारित तीन कर्जरोख्यांवर आधारित दोन आणि एकत्रित असे दोन प्रकारचे फंड असे एकूण सात प्रकार उपलब्ध होणार असून यातील कोणत्याही फंडाचे गुंतवणूक धोरण ठरवताना त्यातील मान्य प्रचलीत निर्देशांक हे मानद निर्देशांक म्हणून स्वीकारता येतील.
■डेरिव्हेटिव्ह्स धोरण:
◆SIF फंडांना 25% पर्यंत डेरिव्हेटिव मधील व्यवहार करण्याची परवानगी आहे. हेजिंगसाठी (जोखीम व्यवस्थापन हेतूने) व्यवहार करण्याशिवाय असलेली ही अतिरिक्त मर्यादा आहे. उदाहरणार्थ, इक्विटी लॉंग शॉर्ट फंडाकडे ₹100 कोटी निधी असेल तर त्यातील 25 कोटींची डिरिव्हेटिव मर्यादा हेजिंग आणि गुंतवणूक संच पुनर्स्थापना करण्याच्या मर्यादेशिवाय आहे.
वेगवेगळ्या चौदा शक्यतांसाहित दोन वेगवेगळ्या पोझिशन ऑफसेट होतील की नाही आणि त्यावरून नेट एक्सपोजर काय असेल? ते समजावून सांगणारा तक्ता सेबीने प्रकाशित केला होता.
■वर्गणी आणि परतफेड (Subscription & Redemption) विषयक धोरण:
◆SIF ओपन-एंडेड, क्लोज-एंडेड किंवा इंटरवल फंड स्वरूपात असू शकतो.
●परतफेडीचा कालावधी दररोज, तिमाही, अर्धवार्षिक किंवा वार्षिक असू शकतो.
●15 कार्यदिवसांपर्यंत परतफेडीसाठी नोटीस कालावधी लागू शकतो.
■सूचीबद्धता (Listing) निकष:
◆सर्व क्लोज-एंडेड आणि इंटरवल फंडांना स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध करणे बंधनकारक आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक बाजारभावावर गरजेनुसार काढून घेण्याचा पर्याय उपलब्ध राहील
■जोखीम व्यवस्थापन आणि त्यांचे प्रकटीकरण:
◆जोखीम मूल्यांकन दर महिन्याला जाहीर करावे लागेल (AMC च्या वेबसाइट आणि AMFI वेबसाइटवर).
◆‘Risk-Band’ पद्धतीने जोखीम पाच विविध स्तरांमध्ये विभागली जाईल. लेव्हल 1 सर्वात कमी जोखीम ते लेव्हल 5 सर्वाधिक जोखीम असा चढता क्रम असेल.
◆फंड मॅनेजरना त्यांचे पुढील निधी गुंतवणूक धोरण आणि त्याचा जोखीम स्तर दरवर्षी 31 मार्च पूर्वी जाहीर करावे लागेल. याशिवाय
◆वर्षभरात त्यात काही बदल केल्यास त्याची माहिती एएमसी आणि अँफी यांच्या संकेतस्थळावर वेळोवेळी अद्ययावत करावी लागेल.
◆योजनेतील गुंतवणूक दर दोन महिन्यांनी जानेवारी, मार्च, मे, जुलै, सप्टेंबर, आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवशी म्युच्युअल फंड योजनांच्या पद्धतीने जाहीर करण्यात येईल.
◆योजनेच्या परीचालनासाठी केलेले व्यवहार हे वैयक्तिक गुंतवणूकदारांचे व्यवहार समजले जाणार नाहीत जेव्हा गुंतवणूक काढून घेतली जाईल तेव्हाच अल्प/ दीर्घ मुदतीचा भांडवली लाभानूसार कर आकारला जाईल. ही यातील जमेची बाजू असून कर मुळातून कापला जाणार नाही.
■वितरकांची पात्रता:
◆SEBI ने NISM Series-XIII: Common Derivatives Certification परीक्षा उत्तीर्ण असलेल्या वितरकानाच विशेषीकृत गुंतवणूक निधीवर आधारित उत्पादने वितरित करण्याची परवानगी दिली आहे. ज्यामुळे संभाव्य गुंतवणूकदार हा गुंतवणूक प्रकार त्यातील जोखीम बक्षीस संकल्पना समजून घेऊ शकेल.
आतापर्यंत एडलवाईस म्युच्युअल फंड, मिरे अॅसेट म्युच्युअल फंड, एसबीआय म्युच्युअल फंड, आयटीआय म्युच्युअल फंड, डीएसपी म्युच्युअल फंड, क्वांट म्युच्युअल फंड, मोतीलाल ओसवाल यासारख्या काही इतर फंड हाऊसेसनी त्यांचे एसआयएफ गुंतवणूक प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत परंतु त्त्यांची उत्पादने जाहीर केलेली नाहीत. यातील क्वांट म्युच्युअल फंडाला भारतातील पहिली विशेषीकृत गुंतवणूक योजना (SIF) चालू करण्यासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे, बाजार नियामक सेबीची मान्यता मिळवणारी ती भारतातील पहिली मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (AMC) बनली आहे. एसआयएफ फ्रेमवर्क अंतर्गत फंड हाऊसची पहिली योजना - ' क्यूएसआयएफ इक्विटी लाँग-शॉर्ट फंड ' - ऑगस्ट 2025 मध्ये सुरू होईल आणि येत्या काही महिन्यांत दुसरी वेगळी इक्विटी आणि हायब्रिड एसआयएफ योजना सुरू करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर समांतरपणे गुंतवणूकदारांना या उत्पादनांबद्दल शिक्षित करण्याचे त्यांचे प्रयत्न असतील, असे क्वांट म्युच्युअल फंडाने जाहीर केले आहे. योजनेबद्दल अधिक सांगताना, फंड हाऊसने म्हटले आहे की ही उत्पादन श्रेणी जे गुंतवणूकदार अधिक विकसित गुंतवणूक धोरणे शोधत आहेत. वाढत्या आणि घसरणाऱ्या बाजारपेठेचा फायदा घेण्यासाठी एसआयएफ दीर्घ आणि अल्पकालीन पोझिशन्स घेऊ शकतात आणि वाढीव जोखीम कमी करण्याच्या साधनांसह मुख्य गुंतवणूक धोरणाचा भाग म्हणून डेरिव्हेटिव्ह साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर करू शकतात. ज्यांना वित्तीय बाजारपेठांची चांगली माहिती आहे आणि तुलनेने उच्च जोखीम घेण्याची क्षमता आहे आणि अधिक विकसित गुंतवणूक धोरणे शोधत आहेत त्यांच्यासाठी पुढे जाऊन, हे फंड हाऊस एसआयएफसाठी एक वेगळी ब्रँड ओळख, वेगळी वेबसाइट आणि कम्युनिकेशन पोर्टल तयार करणार असून येत्या काही दिवसात संभाव्य गुंतवणूकदारांना या उत्पादनांबद्दल शिक्षित करण्याचे त्यांचे प्रयत्न असतील.
फंड हाऊसला काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये निवडक खरेदीच्या संधी आढळतात जसे की सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक, पायाभूत सुविधा, हॉटेल्स आणि हॉस्पिटॅलिटी, फार्मास्युटिकल्स, उपभोग आणि दूरसंचार. मौल्यवान धातूंबद्दल भाष्य करताना, क्वांट म्युच्युअल फंडने म्हटले आहे की ऑगस्ट महिना सोन्यासाठी हंगामीदृष्ट्या अधिक तेजीचा असतो आणि फंड हाऊसच्या विश्लेषणाने असे मान्य केले आहे की सोने $3,500/Oz च्या आसपास पोहोचले आहे पुढील दोन महिन्यांत कच्चे तेल आणि इतर वस्तू सुधारू शकतात कारण डॉलर निर्देशांक आधीच तळाशी पोहोचला आहे, ऑगस्ट महिना थोडा मंदीचा असून अमेरिकन बाजारपेठ आता आत्मसंतुष्टतेची चिन्हे दर्शवत आहे आणि क्वांटचे असुरक्षितता निर्देशक वाढत आहेत. जेव्हा आपण ते अस्थिरता विश्लेषणासह एकत्रित करतो, तेव्हा भू-राजकीय वातावरण रचनात्मक राहिल्यानंतरही पोर्टफोलिओचे पुनर्संतुलन आणि पुनर्बांधणी करण्यात अधिक बचावात्मक दृष्टिकोन आवश्यक असतो. क्वांट म्युच्युअल फंडचा असा विश्वास आहे की अमेरिकेच्या वाढत्या कर्ज संकटाला तोंड देण्यासाठी अमेरिकन डॉलरचे अवमूल्यन हा एकमेव व्यावहारिक मार्ग आहे. जागतिक मध्यवर्ती बँकेचे महत्व कमी होत आहे कारण ती महागाई नियंत्रित करू शकत नाही आणि आर्थिक परिस्थितीत प्रभावी पुनरुज्जीवन आणू शकत नाही. ट्रम्प यांनी अलिकडेच लादलेल्या शुल्कानंतर भारतीय जीडीपीवर दरवर्षी सुमारे 0.5% इतका लक्षणीय परिणाम दर्शवितो. शिवाय त्यांनी रशियासोबतच्या कच्या तेलाच्या व्यापारासाठी भारतावर अतिरिक्त दंड लावल्याने बाजारपेठेसाठी बरीच अनिश्चितता निर्माण झाली आहे. क्वांट म्युच्युअल फंडावरील गुंतवणूकदारांचा विश्वास कौतुकास्पद असून आणि हे फंड हाऊस बदलत्या परिस्थितीत बाजारपेठांमध्ये मार्गक्रमण करत असताना शिस्तबद्ध गुंतवणूक आणि दीर्घकालीन मूल्यावर आपले लक्ष केंद्रित करीत आहे.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते ही पूर्णपणे वैयक्तिक आहेत. डिरिव्हेटिव किंवा त्यासंबंधित गुंतवणूक ही अत्यंत धोकादायक गुंतवणूक समजली जात असल्याने परस्पर गुंतवणूक करू नये यासंदर्भात आपल्या वित्तीय सल्लागाराची मदत घेता येईल)
पूर्वप्रकाशीत लेख
Friday, 1 August 2025
डार्क पॅटर्नच्या विळख्यात
#डार्क_पॅटर्नच्या_विळख्यात
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने अलीकडेच सर्व इ कॉमर्स मंचना त्यांच्या मंचाची सखोल तपासणी करून ते डार्क पॅटर्न मुक्त असल्याची खात्री करून घेण्यासाठी 6 जून 2025 तीन महिन्याची मुदत दिली आहे. हा सल्ला ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 मधील कलम 18(1) नुसार देण्यात आला असून, अनुचित व्यापार पद्धती प्रतिबंधित करण्याचे अधिकार सीसीपीएला दिलेले आहेत. सल्ला केवळ ग्राहक संरक्षण कायद्यापुरते मर्यादित नाही. तो डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण अधिनियम 2023 (DPDP Act) शीही संबंधित आहे. या कायद्यांतर्गत, संमती ही मुक्त, विशिष्ट, माहितीपूर्ण आणि अस्पष्टतेपासून मुक्त असणे अत्यावश्यक आहे. डिझाईनच्या माध्यमातून संमती मिळवताना जर वापरकर्त्याच्या निवडी अस्पष्ट किंवा दिशाभूल करणाऱ्या असतील, तर ती संमती अवैध ठरू शकते. त्यामुळे डिसगाइज्ड कन्सेंट, फेक अर्जन्सी, आणि डेटा राईट्समध्ये अडथळा आणणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जगभरातही याच दिशेने धोरणात्मक बदल घडत आहेत. युरोपियन युनियनचा GDPR, तसेच EU डेटा संरक्षण मंडळ (EDPB) यांनी असे डार्क पॅटर्न्स वैध संमतीच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील फेडरल ट्रेड कमिशन (FTC) नेही सबस्क्रिप्शन आणि जाहिरात प्रक्रियेत अशा पॅटर्न्स वापरणाऱ्या कंपन्यांवर दंड आकारले आहेत. त्यामुळे भारताची धोरणे जागतिक स्तरावर सुसंगत असल्याचे दिसून येते – विशेषतः प्लॅटफॉर्म जबाबदारी आणि वापरकर्ता हक्कांचे संरक्षण या दृष्टिकोनातून. कायदेशीर आणि व्यवसायाच्या दृष्टीने, हा सल्ला स्पष्ट संदेश देतो की यूजर इंटरफेस हे फक्त उत्पादनाचे कार्य नसून, आता ते नियमनाधीन क्षेत्र बनले आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म्सनी यातील डिझाईन, संमती प्रक्रिया, सदस्यता रद्दीकरण, जाहिराती, आणि माहिती संकलनाच्या प्रक्रियेचे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे. डिझाईन, कायदेशीर सल्लागार आणि अनुपालन टीम यांच्यात सुसंवाद साधणे व अंतर्गत लेखापरीक्षण यंत्रणा निर्माण करणे उपयुक्त ठरेल.
सध्या इंटरनेटवरून व्यवहार करताना ग्राहकांना अनेकदा अवचित धक्के बसतात. नको असलेले पर्याय पदरात पडतात. जास्तीचे बिल लागते. भलतीच विंडो समोर उघडली जाते आणि आपण तिथून व्यवहार करू लागतो. असे अनुभव अनेकांना आले आहेत अगदी इमेलचा वापर करत असताना ‘विशेष ऑफर’च्या नावाखाली तुम्हाला काही मिनिटांत कृती करण्यास भाग पाडणारे संदेश सहज मिळतात – आणि आश्चर्य म्हणजे, तीच ऑफर काही आठवड्यांनीसुद्धा उपलब्ध असते! किंवा एखादी ऑनलाइन सदस्यता रद्द करणे हा एक अडथळ्यांचा खेळ वाटतो – "कॅन्सल" बटण सापडायलाच तयार नाही. हे सर्व म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मवर वापरल्या जाणाऱ्या डार्क पॅटर्न्सचे सामान्य उदाहरण आहे – अशा फसव्या डिझाईन युक्त्या ज्या वापरकर्त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध निर्णय घेण्यास प्रवृत्त करतात. ग्राहकाच्या स्पष्ट आणि सकारात्मक कृतीशिवाय (उदा. प्री-टिक बॉक्स किंवा गृहीत धरलेली संमती) काहीही मान्य असल्याचे समजले जाणार नाही, हेही पुनरुच्चारित करण्यात आले आहे. थोडक्यात ग्राहकांच्या निवडीवर ऑनलाइन प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिझाइन तंत्रासाठी हा शब्द वापरला जात आहे. त्यामुळे आपली दिशाभूल होऊ शकते.
इ कोमर्सचा वापर करताना जो व्यवहार मंच वापरला जाईल त्याविषयी ग्राहकांना पूर्ण माहिती सहज समजावी, असे अपेक्षित आहे. झटपट मिळणारी माहिती आणि ग्राहकाभिमुख रचना असे मंचाचे वैशिष्ठ असावे. मात्र आता हा वापर तितकासा सोपा राहिलेला नाही. गुगल, मेटा, एमेझॉन, लिंकडीन यासारख्या अनेक फर्म त्याच्या वापरकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी विविध युक्त्या योजत आहेत. लोकांनी कंपनीस अपेक्षित लिंकवर क्लिक करावं, त्यांना अपेक्षित असाच मजकूर पहावा यासाठी इंटरनेट तज्ञांनी वापरकर्त्यांना दिसणारे दृश्य आणि त्यानुसार त्यांचा संभाव्य प्रतिसाद यांचे विविध पॅटर्न शोधले आहेत. त्याद्वारे अपेक्षित परिणाम साधण्यासाठी संबंधित संकेतस्थळाची रचना जरा किचकट केली जाते. यालाच 'डार्क पॅटर्न' म्हणतात. अशा प्रकारे ग्राहकांना बेसावध ठेवून फसवणूक करून व्यवसाय वाढवला जातो. डिजिटल माध्यमातून होणारी ही फसवणूक टाळण्यासाठी जाहिरातदारांची स्वयंनियंत्रण संस्था 'आस्की' यांनी एक पाऊल पुढे टाकून अलीकडेच या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आणि सर्व जाहिरातदारांनी एक सप्टेंबर 2023 पासून त्याचे पालन करण्याचे आवाहन 'आस्की' ने केले होते. यात 'डार्क पॅटर्न' म्हणजे काय हे विशद करण्यात आले आहे. असे करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रणकक्ष निर्माण करण्यात आला त्यासाठी ग्राहक कल्याण मंत्रालयाची मदत घेण्यात आली. त्यातून डार्क पॅटर्न्स प्रतिबंध आणि नियमन मार्गदर्शक तत्वे 2023 नुसार 13 प्रकारचे डार्क पॅटर्न्स निषिद्ध ठरवले गेले आहेत. त्यामुळे आता सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना स्वतःचा आढावा घ्यावा लागेल आणि त्यात डार्क पॅटर्न्स असल्यास त्यास दुरुस्त करावे लागेल. त्याचप्रमाणे, स्वयं-घोषणा करून अशा पद्धतींचा अभाव असल्याचे घोषित करण्याचेही प्रोत्साहन दिले आहे. हा सल्ला एक स्पष्ट संकेत देतो की सीसीपीए आता डिजिटल प्लॅटफॉर्म डिझाईन आणि ग्राहक संमती याबाबतीत अधिक सतर्क राहणार आहे. डार्क पॅटर्न्सचा वापर अनेकदा अनुचित व्यापारी प्रथा समजला जाऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की सर्वच डिझाईन सोल्यूशन्स बेकायदेशीर आहेत त्यामुळे प्रत्येक प्रकरणाचे बारकाईने मूल्यमापन आवश्यक आहे. जर एखाद्या प्लॅटफॉर्मने नियमांचे पालन केले असेल, तर स्वयंघोषणा करून आपली जबाबदारी व पारदर्शकता दाखवणे हे ग्राहकांचा व नियामकांचा विश्वास जिंकण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. जागतिक पातळीवर काम करणाऱ्या कंपन्यांनीही प्रायव्हसी-बाय-डिझाईन आणि फेअरनेस-बाय-डिझाईन या मूल्यांशी सुसंगतपणे कार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येक डिझाईन पॅटर्न बेकायदेशीर असेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक घटकाचे बारकाईने विश्लेषण, आणि कायद्याच्या चौकटीत वापरकर्ता हक्कांची पूर्तता होते की नाही याचा विचार करणे आवश्यक आहे. सीसीपीएचा सल्ला हा अजूनपर्यंत दंडात्मक स्वरूपाचा नाही, पण तो एक नियमित अपेक्षा दर्शवतो की डिजिटल ग्राहक इंटरफेस हे पारदर्शक, न्याय्य आणि वापरकर्त्याच्या स्वायत्ततेचा आदर करणारे असावे. हे धोरण लवकर अंगीकारल्यास कंपन्या भविष्यातील नियामक जोखमीपासून सुरक्षित राहू शकतील, तसेच त्यांच्या विश्वासार्हतेत वृद्धी होईल.
सध्या खालील रचनांना डार्क पॅटर्न्स असे वर्गीकृत केले आहे-
●खोटी तातडी (False Urgency)- "फक्त 2 मिनिटं बाकी!" असा संदेश दाखवून ग्राहकाला गोंधळात खरेदी करायला लावणे.
●खरेदीत अधिक वस्तू (Basket Sneaking)- खरेदी करताना नकळत अतिरिक्त वस्तू टालणे.चेक आउट दरम्यान न मागता सोबत इन्शुरन्स देणे.
●लज्जास्पद टीका (Confirm Shaming)-
नकार देणाऱ्याला लाजवणारी भाषा वापरणे
"माझं आयुष्य सुधारायचं नाही" असं बटन नकारासाठी ठेवणे
●अनावश्यक कृतीची सक्ती (Forced Action)- अनावश्यक कृती करण्यास भाग पाडणे. काही सेवा वापरण्याआधी मित्रांना आमंत्रण पाठवणे बंधनकारक करणे
●नोंदणी रद्द अवघड करणे (Subscription Trap)- सदस्यता रद्द करणे अवघड बनवणे. अनसबस्क्राईब करायला अनेक स्टेप्स किंवा असा पर्याय लपवून ठेवणे.
●पर्याय लपवणे (Interface Interference)
वापरकर्त्याच्या लक्षात न येईल अशा प्रकारे पर्याय लपवणे
रद्द किंवा नकार पर्याय छोटा किंवा फिका दाखवणे
●एक गोष्ट सांगून दुसरीच देणे (Bait and Switch)- एका गोष्टीचं आश्वासन देऊन दुसरं काही देणे. मोफत वापर सांगून नंतर कार्डवर शुल्क आकारणे
●किंमत लपवून अधिक आकार घेणे (Drip Pricing)- अंतिम किंमत लपवून ठेवणे आणि टप्प्याटप्प्याने उघड करणे. सुरुवातीला ₹499 दाखवणे पण नंतर ₹699 भरावे लागणे. (टॅक्स, डिलिव्हरी)
●छुपी जाहिरात (Disguised Advertisement)- जाहिरात ही माहिती वाटावी अशी सादर करणे,ब्लॉग लेखात प्रायोजित उत्पादनाचा छुपा प्रचार करणे.
●वारंवार विनंतीचा त्रास (Nagging)-
नोटिफिकेशन परवानगी साठी सतत पॉपअप येणे
●गोंधळात टाकणारी भाषा (Trick Wording)- "Don't uncheck if you don’t want to opt out" अशा गुंतागुंतीच्या शब्दांची वापर
●माहिती लपवून कृती (Sneaking)-
डिफॉल्ट चेक बॉक्स ठेवून ग्राहकाची नोंदणी करणे
●नोंदणी सोपी आणि रद्द अवघड (Roach Motel) -सोपी नोंदणी पण रद्द करणे अवघड, उदा. एक क्लिकने साइन अप पण अनसबस्क्राईब करणे गुंतागुंतीचे.
असे प्रकार इ कॉमर्स मंचावर वस्तू आणि सेवा खरेदी करण्याच्या निमित्ताने होत असल्याने यात ग्राहकांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांनी सावध राहावे. या संबंधातील आपल्या तक्रारी आस्की, सीसीपीए यांच्याकडे कराव्यात.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
Friday, 25 July 2025
दीपस्तंभ भाग दोन
#दीपस्तंभ_भाग_दोन
यापूर्वीच्या भागात गुंतवणूक तज्ज्ञ आणि शेअरबाजारातील विचारवंत यांची थोडक्यात ओळख आणि विचार जाणून घेतले या भागात अर्थशास्त्रज्ञ आणि समाजाभिमुख विचार करणारे काही विचारवंत यांची ओळख आणि विचार जाणून घेऊयात.
■अर्थशास्त्रज्ञ व वित्तविषयक विचारवंत
7. रिचर्ड थेलर (Richard Thaler)
नोबेल पुरस्कार विजेते. ‘Behavioral Economics’ चे संस्थापक सदस्य. ‘Nudge’ या पुस्तकात त्यांनी मानवी मानसशास्त्र हे त्यांच्या गुंतवणुकीवर कसा प्रभाव टाकते ते स्पष्ट केले आहे.
थेलर यांचे विचार-
●वर्तणूक अर्थशास्त्राचे गृहितक असे आहे की लोक पारंपरिक अर्थशास्त्र मानते त्यापेक्षा खूप कमी शहाणे असतात.
●कोणाला काही करायला प्रवृत्त करायचं असेल, तर ते आधी सोपं करा.
●आपण विचार करणाऱ्या भावना नाही तर भावना असलेले विचार करणारे यंत्र आहोत.
●लोक अल्पकालीन तोट्यांना अधिक महत्त्व देतात आणि दीर्घकालीन नफ्यांकडे दुर्लक्ष करतात.
●शेअरबाजार हा गोष्टी सांगणारे मशीन आहे. त्यातील कथा या भावनांपेक्षा जास्त किंमत ठरवतात.
●तोटा सहन करता येणे ही भावना, नफ्याच्या आनंदापेक्षा दुप्पट तीव्र असते.
●बचत ही कठीण असते कारण आपण फक्त आत्तावर लक्ष केंद्रित करतो, पुढचं विसरतो.
●एक चांगला हलका धक्का अथवा प्रोत्साहन म्हणजे असा पर्याय जो लोकांना त्यांचे निर्णय स्वातंत्र्य राखून चांगला निर्णय घेण्यास मदत करतो.
●फक्त अधिक माहिती देऊन लोकांचे अज्ञान दूर करता येत नाही.
●बाजार कितीही काळ असह्य वाटेल इतका गैरवर्तन करत राहू शकतो.
8. रॉन चर्नो (Ron Chernow)
प्रसिद्ध इतिहासकार व चरित्रलेखक. J.P. Morgan, Rockefeller आणि Alexander Hamilton यांच्यावर चरित्रे लिहिली. भांडवलशाहीचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाचे योगदान.
चेर्नो यांचे विचार:
●वॉल स्ट्रीटचा इतिहास म्हणजे सट्टा आणि भ्रम यांची एक साखळी आहे.
●बाजार अनेकदा तर्काने नव्हे तर केवळ भावनांनी चालवले जातात.
●आर्थिक इतिहास हा अमेरिकन शिक्षणातील सर्वात दुर्लक्षित विषय आहे पण भांडवलशाही समजून घेण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे.
●प्रत्येक आर्थिक फुगवटा आनंदात सुरू होतो आणि नैराश्यात संपतो.
●वॉल स्ट्रीट हा केवळ आर्थिक आकड्यांचा नाही तर मानवी मानसिकतेचाही खेळ आहे.
●भांडवलशाही ही एकाच वेळी सर्जनशील आणि विध्वंसक असते.
●शेअरबाजार नेहमी अती आशावाद आणि अती निराशावाद यामध्ये वरखाली होत असतो.
●सर्वात वाईट आर्थिक संकटे तेव्हाच उद्भवतात, जेव्हा लोक म्हणतात यावेळी वेगळं आहे.
●महान संपत्ती केवळ मार्केटचे वेळेवर भाकीत करून नव्हे, तर जग बदलणाऱ्या कंपन्या उभ्या करून मिळवली जाते.
●सुज्ञ निर्णय घेणे आणि संयम बाळगणे वॉल स्ट्रीटवर धाडसापेक्षा दुर्मिळ आहे.
9. पॉल क्रुगमन (Paul Krugman)
नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ आणि न्यूयॉर्क टाईम्सचे स्तंभलेखक. आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक भौगोलिक रचना आणि समाजवादी अर्थधोरणांचा समर्थक.
त्यांचे विचार-
●बाजार व्यवस्था ही कायद्याच्या चौकटीत चालणारी सामाजिक सहकार्य आणि परस्पर फायद्यांची प्रणाली आहे.
●आर्थिक व्यवस्थेमध्ये आत्मविश्वास सर्व काही आहे.
●शेअरच्या किंमती वास्तवापेक्षा मानसिकतेने जास्त ठरवल्या जातात.
●अर्थशास्त्र म्हणजे नैतिकतेचा पाठ नाही. ते परिणाम आणि कारणांबद्दल आहे.
●आर्थिक बाजारात सुरक्षिततेचा आभास होणं सर्वात धोकादायक असतो.
●लोक सध्याची स्थिती भविष्यातही तशीच राहील असे गृहित धरतात त्यामुळेच बबल तयार होतात.
●अदृश्य हाताला अनेकदा भटकू नये म्हणून दृश्यमान हाताची गरज असते.
●तेजी आणि मंदी हे भांडवलशाहीचे भाग आहेत पण चुकीची धोरणं त्यांना अधिक वाईट बनवतात.
●जर गुंतवणूक इतकीच सोपी असती, तर सगळेच श्रीमंत झाले असते.
●अर्थशास्त्रज्ञांना खूप काही कळत नाही, पण ते इतरांना काहीच कसं कळत नाही असं वाटायला लावतात.
■विकास व समाजाभिमुख अर्थव्यवस्थेचे तज्ञ
10. चार्ली मंगर (Charles Munger)
बर्कशायर हाथवेचे उपाध्यक्ष आणि वॉरेन बफे यांचे दीर्घकालीन भागीदार होते Mental Models आणि व्यवहारिक तर्कशास्त्र यांचा पुरस्कार करणारे गुंतवणूकदार. संयम, सुलभता आणि उलट सुलट तपासणी या तत्त्वांचा पुरस्कार.
त्यांचे विचार-
●मोठा पैसा केवळ खरेदी किंवा विक्रीत नसतो तर तो थांबण्यात असतो.
●प्रत्येक दिवस आपण कालपेक्षा थोडं अधिक शहाणं व्हावं, हे प्रयत्न करत रहा.
●प्रत्येक समस्या उलट करून पहा. उलटा विचार करा.
●फार मोठा फायदा आपण फक्त एक गोष्ट करून मिळवतो तो म्हणजे मूर्खपणा.
●योग्य किमतीला चांगली कंपनी घेणं, उत्तम किमतीत साधारण कंपनी घेण्यापेक्षा केव्हाही चांगलं.
●शहाणा माणूस नेहमी अदृश्य गोष्टी शोधतो, स्पष्ट दिसणाऱ्या नव्हे.
●जे तुम्हाला माहीत नाही, ते स्वीकारणं ही खऱ्या शहाणपणाची सुरुवात आहे.
●आज जगात जे काही चाललं आहे ते जर तुम्हाला गोंधळात टाकत नसेल याचा अर्थ तुम्ही त्याला समजून घेत नाही.
●झुंडीचा पाठपुरावा केला, तर तुम्ही नेहमीच सरासरीकडे परतता.
●एक साधी कल्पना घ्या आणि ती गंभीरतेने अमलात आणा.
11. अभिजीत बॅनर्जी (Abhijit Banerjee)
MIT मधील प्राध्यापक आणि नोबेल पुरस्कार विजेते. ‘Poor Economics’ या पुस्तकाचे सहलेखक. विकास आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी ‘Randomized Control Trials’ वापरणारे पहिले अर्थशास्त्रज्ञ.
त्यांचे विचार-
●विकास म्हणजे मोठे आराखडे नव्हेत, तर एकावेळी एक समस्या सोडवणं.
●बाजार अनेक वेळा अपयशी ठरतो. म्हणूनच सरकारांनी हस्तक्षेप करावा लागतो.
●गरीब असहाय नसतात. ते अत्यंत काटेकोर निर्णय घेतात.
●सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न ही कल्पना नक्कीच चाचपून पाहण्यासारखी आहे.
●अर्थशास्त्रीय मॉडेल्स नेहमी माणसांच्या वर्तनाचं अचूक चित्रण करत नाहीत.
●दारिद्र्याशी लढण्यासाठी मतप्रवाह नव्हे, प्रयोग आणि पुरावे लागतात.
●छोट्या बदलांमुळे मोठी परिणामकारकता येऊ शकते.
●आपल्याला दारिद्र्याचं गौरवीकरण थांबवून, गरीब लोकांचे म्हणणे ऐकायला हवे.
●प्रेरणा (incentives) महत्त्वाच्या आहेत, पण संदर्भ (context) त्याहून महत्त्वाचा आहे.
●फक्त आर्थिक वाढीने विषमता नाहीशी होत नाही.
12. मोहम्मद युनूस (Muhammad Yunus)
बांगलादेश ग्रामीण बँकेचे संस्थापक आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते. मायक्रोफायनान्स व "Social Business" या संकल्पनांचा प्रचार केला. गरीबांना आर्थिक सशक्तता देण्याचे कार्य केले. सध्या बंगला देशाचे हंगामी अध्यक्ष.
त्यांचे विचार-
●गरीब माणसं म्हणजे बोन्साय वृक्षासारखी आहेत. बीज चांगलं असतं, पण समाजाने त्यांना वाढण्यासाठी जागा दिली नाही.
●कर्ज (क्रेडिट) मिळणं हा मानवी हक्क आहे.
●जर प्रत्यक्षात आणण्याची इच्छा असेल तर जगात गरिबी नसलेली व्यवस्था आपण सहज तयार करू शकतो.
●दान हे गरिबीचे उत्तर नाही. दान केवळ गरिबी टिकवून ठेवतं.
●पैसे कमवणं म्हणजे आनंद तर इतरांना आनंद देणं म्हणजे त्याहून श्रेष्ठ आनंद.
●आपल्यापैकी प्रत्येकात अपार क्षमता आहे. मायक्रोक्रेडिट त्या क्षमतेला मोकळं करतं.
●सामाजिक व्यवसाय म्हणजे नफ्याचा विचार न करता समस्या सोडवणं.
●गरिबी लोकांनी निर्माण केली नाही तर ती आपण बनवलेल्या व्यवस्थेमुळे निर्माण झाली आहे.
●अर्थव्यवस्था ही लोकांसाठी असावी, लोकं अर्थव्यवस्थेसाठी नाहीत.
●तुम्ही जर वेगळी कल्पना करू शकत असाल तर ती शक्य देखील करू शकता. (समाप्त)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायतीचे या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
Friday, 18 July 2025
दीपस्तंभ भाग एक
दीपस्तंभ_भाग_एक
अर्थशास्त्रात गुंतवणुकीचा अभ्यास करताना गुंतवणूक तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजाभिमुख विकास व्यवस्थेचा विचार करणारे म्हणून अनेक मार्गदर्शकांची नावे पुढे येतात. त्यातील निवडक व्यक्तींचा आणि त्या प्रत्येकाचा त्यांच्या विषयावरील मौलिक विचारांचा थोडक्यात मागोवा घेण्याचा हा प्रयत्न. त्यांचे विचार आपल्याला नक्कीच दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करतील आणि प्रेरणा देतील.
■गुंतवणूक तज्ज्ञ आणि शेअरबाजार विचारवंत
1. वॉरेन बफे (Warren Buffett)
बर्कशायर हाथवे या अमेरिकन गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष (या वर्षअखेर या पदावरून ते निवृत्त होत आहेत), गुंतवणुकीचे चालते बोलते विद्यापीठ आणि ‘ओरेकल ऑफ ओमाहा’ या टोपणनावाने प्रसिद्ध. दीर्घकालीन मूल्याधारित गुंतवणुकीचे समर्थक आहेत. मजबूत पायाभूत तत्त्वांवर चालणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणुक करण्यावर त्यांचा भर असतो.
बफे यांचे विचार-
●इतर लोक अधिक फायदा होईल या लोभाने शेअर्स खरेदी करत असतील तेव्हा घाबरून विक्री करा आणि जेव्हा सगळे घाबरून विक्री करीत असतील, तेव्हा खरेदी करा.
●शेअर बाजाराची रचना ही सक्रिय गुंतवणूकदारांकडून संयमी गुंतवणूकदारांकडे पैसा हस्तांतरित करण्यासाठी केली आहे.
● तुम्ही खरेदीसाठी देता ती किंमत आणि विक्री करून मिळवता ते मूल्य.
●शेअर कायमस्वरूपी ठेवायला आवडतात.
●ज्या कंपनीत गुंतवणूक केल्यावर पुढची दहा वर्षे बाजार बंद राहिला तरी चालेल, अशाच कंपनीत पैसे गुंतवा.
●जेव्हा तुम्हाला तुम्ही काय करत आहात हे समजत नाही तेव्हा सर्वाधिक धोका उद्भवतो.
●शेअरबाजातील चालू भाव बाजारातील लोकांचे कंपनी विषयी मत दाखवत असले तरी ते कंपनीचे दीर्घकालीन मार्केट मूल्य मोजण्याचे यंत्र आहे.
●संधी क्वचित येतात. जेव्हा सुवर्णधारा वाहते, तेव्हा त्याचा पुरेपूर फायदा घ्या.
●जेव्हा बाजारभाव खाली येतात, तेव्हाच भांडवल वापरण्याची सर्वोत्तम संधी असते.
●योग्य किमतीत चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणं, स्वस्तात वाईट कंपनीचे शेअर्स घेण्यापेक्षा नेहमीच चांगलं.
2. पीटर लिंच (Peter Lynch)
फिडेलिटी मॅजेलन फंडचे माजी व्यवस्थापक. त्यांनी शेअर बाजारात सातत्याने सर्वोत्कृष्ट परतावा मिळवलेला आहे. लिंच “तुम्हाला जे समजते त्यातच गुंतवणूक करा” या तत्त्वाचा पुरस्कार करतात.
त्यांचे विचार-
●तुमच्याकडे जे आहे त्याबद्दलची माहिती ठेवा त्याचबरोबर ते का आहे, हेही समजून घ्या.
●प्रत्येक शेअरमागे एक कंपनी म्हणजे व्यवसाय असतो. ती कंपनी नेमका काय व्यवसाय करते ते शोधा.
●शेअर मार्केटमध्ये पैसे कमावण्याची खरी गुरुकिल्ली म्हणजे घाबरून सर्व शेअर्स विकून टाकू नका.
●ज्याने सर्वात जास्त दगड पलटले, तोच जिंकतो.
●ज्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत त्यामध्येच गुंतवणूक करा.
●मंदी येणारच त्यामुळे शेअर बाजार कोसळणार. हे मान्य नसेल, तर त्याचा अर्थ गुंतवणुकीसाठी तुम्ही तयार नाही असा होतो.
●बाजारभाव खाली येण्याची वाट बघून किंवा त्या संबंधी अंदाज बांधून जेवढं नुकसान होतं ते प्रत्यक्षात खाली आलेल्या भावामुळे झालेल्या नुकसानीपेक्षा अधिक असतं.
●बाजारभाव वाढल्याने चांगले शेअर्स विकून वाईट शेअर्स ठेवणं म्हणजे बहरलेली फुलझाडं कापून टाकून आणि गवतावर पाणी वाया घालवणं.
●जेव्हा तुमच्याकडे भक्कम कंपन्यांचे शेअर्स असतात, तेव्हा काळ तुमच्या बाजूने असतो.
●अधिक गुंतागुंत नको, जितकं साध आणि सरळ तितकं चांगलं.
3. बेंजामिन ग्रॅहम (Benjamin Graham)
मूल्याधारीत गुंतवणूक (व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग) या संकल्पनेचे जनक. ‘The Intelligent Investor’ या पुस्तकाचे लेखक आणि वॉरेन बफे यांचे गुरू. त्यांनी ‘Margin of Safety’ या संकल्पनेचा पुरस्कार केला.
ग्रॅहम यांचे विचार-
●वैयक्तिक गुंतवणूकदाराने कायमच गुंतवणूकदारासारखेच वागावे, सट्टेबाजासारखे नाही.
●थोडक्यात शेअरबाजार हा मतदान मशीनसारखा असतो, पण दीर्घकालात तो वजन मोजणारे यंत्र बनतो.
●गुंतवणुक व्यवस्थापन म्हणजे त्यातील परताव्याचे नाही तर जोखमीचे व्यवस्थापन.
●बुद्धिमान गुंतवणूकदार हा वास्तववादी असतो. तो आशावाद्यांना शेअर्स विकतो आणि निराश व्यक्तीकडून शेअर्स खरेदी करीत असतो..
●गुंतवणूकदाराचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे तो स्वतःच.
●सर्वोत्तम गुंतवणूक ही केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातूनच केली जाते.
●समाधानकारक गुंतवणूक परतावा मिळवणे खूप सोपे आहे परंतु उत्कृष्ट परतावा मिळवणे सर्वात कठीण गोष्ट आहे.
●तुम्ही जेव्हा सट्टा खेळत असता तेव्हा ती गुंतवणूक आहे असे समजून स्वतःला फसवू नका.
●आशावादावर नव्हे, आकड्यांवर आधारित खरेदी करा.
●बुद्धिमान गुंतवणूकदार संशयी असतो तो केवळ आणि केवळ वाजवी किमतीतच खरेदी करतो.
4. फिलिप फिशर (Philip Fisher)
वाढीवर आधारित गुंतवणुकीचे प्रवर्तक. ‘Common Stocks and Uncommon Profits’ या पुस्तकाचे लेखक. नाविन्यपूर्ण संशोधन आणि दीर्घकालीन दृष्टी असलेल्या कंपन्यांमधील गुंतवणुकीचे समर्थक.
फिशर यांचे विचार-
●शेअरबाजार अशा लोकांनी भरलेला आहे जिथे सर्वाना मूल्य नाही तर किंमत माहित असते म्हणूनच गुंतवणूक करताना किंमतीवर नाही, तर मूल्यावर लक्ष केंद्रित करा.
●संयमी गुंतवणूकदार गाढ झोपतो. सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूकीतून मनःशांती मिळते.
●जो गुंतवणूकदार स्वतंत्रपणे विचार करू शकतो, तो नफा मिळवू शकतो.
●जर शेअर खरेदी करताना व्यवस्थित अभ्यास केला असेल, तर तो विकण्याची वेळ कधीच येत नाही. उत्तम कंपन्या या नेहमी दीर्घकाळासाठी ठेवायच्या असतात.
●यशस्वी गुंतवणूकदार हा तोच असतो ज्याला व्यवसायातील समस्यामध्ये स्वाभाविक रस असतो. शेअरमागे असलेल्या व्यवसायास नीट समजून घ्या.
●युद्धाच्या भीतीमुळे खरेदी करण्यास घाबरू नका. संकटकाळातच सर्वोत्तम संधी उपलब्ध असू शकतात.
●ज्याचं संशोधन सर्वात उत्तम आहे, ती कंपनीच शेवटी आघाडीवर राहते. नाविन्यपूर्ण कंपन्यांमध्ये गुंतवा.
● जास्त पैसे मोजून खरेदी केल्याने एक उत्कृष्ट कंपनीत केलेली गुंतवणूक देखील सर्वात वाईट गुंतवणूक ठरते म्हणून मोजलेली किंमतही तितकीच महत्त्वाची आहे.
●मोठे गुंतवणूकदार कंपनीच्या भूतकाळाकडे नव्हे, भविष्यातील क्षमतेकडे पहातात.
●कालावधी हा व्यवसायाचा जिवलग मित्र असतो. चांगल्या कंपन्यांना वेळ द्या, त्याचा नफा वाढत जातो.
5. जॉन सी. बोगल (John C. Bogle)
व्हॅनगार्ड ग्रुपचे संस्थापक. त्यांनी पहिला लो-कॉस्ट इंडेक्स फंड सुरू केला. अप्रत्यक्ष (Passive investing) आणि कमी खर्च असलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर.
बोगल यांचे विचार-
●गवताच्या ढिगाऱ्यात सुई शोधण्याचा प्रयत्न करू नका, संपूर्ण ढिगाराच खरेदी करा. एकेका कंपनीऐवजी संपूर्ण बाजारात एकत्रित गुंतवणूक (इंडेक्स फंड) करा.
●शेअर बाजार हे गुंतवणुकीपासून तुमचे लक्ष विचलित करणारे मोठे साधन आहे. रोजच्या हालचालींकडे न पाहता, दीर्घकालीन दृष्टी ठेवा.
●वेळ हा तुमचा मित्र आहे आणि तीव्र भावना (इम्पल्स) तुमचा शत्रू. त्यामुळे संयम बाळगा, भावनांवर नियंत्रण ठेवा.
●व्यवस्थापक जितका जास्त मोबदला घेतात, गुंतवणूकदार तितकं कमी कमावतो. जास्त खर्च म्हणजे गुंतवणूकीवरील कमी परतावा.
●जे काही होईल ते होईलच म्हणून आपला गुंतवणुकीचा मार्ग बदलू नका. नेहमी शिस्तीत राहणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
●तुम्हाला शेअर बाजारात २०% तोटा होण्याची शक्यता सहन होत नसेल, तर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका बाजारातील तीव्र चढ उतार सहन करण्याची मनाची तयारी ठेवा.
●शेअरबाजारातील एक सखोल नियम म्हणजे सरासरीकडे परतणं त्यामुळे बेफाम वाढ झाल्यावर शेअर पुन्हा स्थिर मूल्यावर येतोच येतो.
●इक्विटी फंड गुंतवणूकदाराचे दोन मोठे शत्रू म्हणजे खर्च आणि भावना त्यांना नियंत्रणात ठेवा.
●इंडेक्स फंड तुम्हाला वैयक्तिक शेअर्सची निवड, योग्य वेळ पकडण्याची आणि व्यवस्थापक निवडीची जोखीम टाळतात त्यातील साधेपणातच यश आहे.
●गुंतवणुकीत तुम्हाला जे मिळतं ते सहसा त्या गोष्टींपासून मिळतं, ज्या तुम्ही पैसे न देता घेता, कमी खर्च म्हणजे जास्त परतावा.
6. रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki)
‘Rich Dad Poor Dad’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक. त्यांनी आर्थिक साक्षरतेचा प्रचार केला आणि लोकांनी पैशासाठी काम न करता पैसे आपल्यासाठी कसे काम करतात ही संकल्पना समजावून देण्यावर त्यांचा भर आहे.
कियोसाकी यांचे विचार-
●श्रीमंत लोक पैसे मिळवण्यासाठी काम करत नाहीत. ते पैशांना आपल्यासाठी काम करायला लावतात.
●तुम्ही किती पैसे कमावता ते महत्त्वाचे नाही तुम्ही ते किती आणि कसे टिकवता हे महत्त्वाचे आहे.
●आर्थिक स्वातंत्र्य केवळ त्या लोकांसाठी उपलब्ध आहे जे त्याचा अभ्यास करतात आणि त्यासाठी प्रचंड मेहनत करतात.
●यशस्वी गुंतवणूकदार सगळं जाणणारे नाही तर शिकत राहणारे असतात.
●ज्या गोष्टी समजत नाहीत त्यात गुंतवणूक करू नका, आधी शिकून घ्या.
●शेअर बाजार हा संयमी व्यक्तीकडे पैसा हस्तांतरित करणारे यंत्र आहे.
●आजच्या बदलत्या जगात, तुम्हाला काय येतं यापेक्षा तुम्ही ते किती लवकर शिकता,हे अधिक महत्त्वाचं आहे.
●अपयश आल्यावर हार मानणारे हरतात तर वारंवार अपयशावर अपयश येऊनही न हार मानणारेच जिंकतात.
●आपल्याकडे असलेली सर्वात शक्तिशाली मालमत्ता म्हणजे आपला मेंदू.
●तुम्ही फक्त तेव्हाच गरीब होता, जेव्हा तुम्ही हार मानता म्हणूनच शिकणं कधीही थांबवू नका. (अपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
Friday, 11 July 2025
जेन स्ट्रीट विरुद्ध सेबी
#जेन_स्ट्रीट_विरुद्ध_सेबी
जेन स्ट्रीट ही अमेरिकन गुंतवणूक कंपनी. तिच्या उपकंपन्या आणि त्यांची विदेशी संस्थात्मक गुंतवणूक संस्था या जगभरातील विविध शेअरबाजारात आर्थिक गुंतवणूक करीत असतात. त्यांनी भारतीय शेअरबाजारातील डिरिव्हेटिव पद्धतीच्या व्यवहारात गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून यापुढे कोणतेही व्यवहार करण्यास सेबीने बंदी घातली आहे. सेबीने असा अंतरिम आदेश दिला असून त्यांची सखोल चौकशी केली जाईल. त्यांनी बेकायदेशीररित्या कमावलेल्या रकमेतून ₹ 4800 कोटी गोठवण्यात आले असून ते एका विशेष खात्यात (एस्क्रु अकाउंट) ठेवले जातील. आरोपावरील स्पष्टीकरण देण्यासाठी तसेच अंतरिम आदेशाला आव्हान देण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही कारवाई सध्या तात्पुरती असून पुढील निर्णय जेन स्ट्रीटच्या उत्तरानंतर होणार आहे. या बंदीनंतर बाजारातील डिरिव्हेटिव व्यवहारांमध्ये लक्षणीय घट झाली असून अल्गो ट्रेडिंगवर लक्ष ठेवले जात आहे.
याप्रकरणाची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेऊया-
भारतीय शेअरबाजारात दोन प्रकारचे व्यवहार होतात. हे सर्व व्यवहार म्हणजे एक प्रकारचे करार असतात ते पूर्ण करण्याची हमी शेअरबाजार घेतो त्यात कसूर झाल्यास त्यांची पूर्तता आधी निश्चित केलेल्या नियमानुसार होते.
●रोखीचे व्यवहार- येथे शेअर अथवा पैसे देऊन घेऊन व्यवहार पूर्ण केले जातात असे व्यवहार सामान्यतः दुसऱ्या कामकाज दिवशी अथवा काही प्रमाणात त्याच दिवशी पूर्ण केले जातात. ते किमान एक शेअर तर कमाल बाजारात उपलब्ध असलेल्या संख्येएवढे असू शकतात. त्यांची पूर्तता करण्यासाठी पूर्ण रक्कम द्यावी लागते.
●डिरिव्हेटिव बाजार- हे व्यवहार मालमत्तेच्या किंमतीवर आधारित पैजेची स्वरूपातील असून अधिक गुंतागुंतीचे आहेत. ते शेअर्स, रोखे, निर्देशांक, वस्तू, चलन, व्याजदर यामध्ये होऊ शकतात. यातील काही व्यवहार प्रत्यक्ष देवाण घेवाणीतून तर निर्देशांक, व्याजदर यातील व्यवहार त्यातील भावाच्या लाभहानीच्या फरकातून समायोजित केले जातात. हे व्यवहार एका विशिष्ट किमान आकार आणि त्यांच्या पटीत होत असतात. शेअर्स व त्यावर आधारित निर्देशांक यातील एक व्यवहार पाच लाखाहून अधिक रकमेचा असतो त्यासाठी पूर्ण पैसे न देता एकूण व्यवहाराच्या काही प्रमाणात हमी रक्कम घेतली जाते त्यास मार्जिन असे म्हणतात भविष्यातील व्यवहार (फ्युचर्स) आणि पर्याय व्यवहार (ऑप्शन) हे या प्रकारातील करार आहेत. फ्युचर्समध्ये भविष्यात विशिष्ट दिवशी मालमत्ता खरेदी/विक्री करण्याचे आश्वासन दिलेले असते. यातील किंमतीत कोणताही फरक पडला तरी त्यांची पूर्तता करावीच लागते. ऑप्शन या प्रकारात मालमत्ता खरेदी अथवा विक्री करण्याचा अधिकार मिळतो परंतु त्यांची पूर्तता केलीच पाहिजे असे बंधन नसते. यासाठी तुम्हाला बयाणा (प्रीमियम) म्हणून ठराविक रक्कम द्यावी लागते. किंमत वाढल्यास हक्क वापरून मालमत्ता खरेदी करता येईल तर किंमत कमी झाल्यास हक्क सोडून दिल्याने त्यासाठी मोजलेल्या रकमेवर पाणी सोडावे लागेल. ऑप्शन करारांचे कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन असे दोन प्रकार आहेत. भविष्यात किंमत वाढेल असा अंदाज असल्यास कॉल ऑप्शन तर किंमत कमी होईल असा अंदाज असल्यास पुट ऑप्शनचा करार केला जातो. या दोन्ही प्रकारांच्या खरेदी विक्री होऊ शकते. भावात पडणाऱ्या फरकानुसार रोजच्या बंद भावाच्या तुलनेत मार्जिन कमी अधिक केले जाते. त्याचप्रमाणे या दोन्ही प्रमुख करार त्यातील उपप्रकारात डे ट्रेडिंग होऊ शकते. त्यामुळे त्याच दिवशी अथवा सौदापूर्ती होण्यापूर्वी उलट व्यवहार करून त्यातून कधीही बाहेर पडता येते. यातील ऑप्शनमधील खरेदी व्यवहारात अगदीच किरकोळ भांडवल लागत असल्याने आणि त्यातून अधिक फायदा मिळण्याची शक्यता असल्याने ट्रेडर्सना ते अधिक आकर्षित करतात त्यातून त्व्यक्तींमध्ये असलेल्या जुगारी प्रवृत्तीस प्रोत्साहन मिळत असल्याने झटपट पैसे मिळवण्याची आस असलेल्या अनेकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. जगभरात या पद्धतीने होणाऱ्या व्यवहारातील सर्वाधिक (60%) व्यवहार भारतातील राष्ट्रीय शेअरबाजारात होतात.
एकंदरीतच डिरिव्हेटिव प्रकारातील व्यवहारांना तुलनेने कमी भांडवल लागून त्यातून अधिक लाभ होण्याची शक्यता असली तरी त्यातून फार मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. काही प्रसंगात आपले पूर्ण भांडवल नाहीसे होऊन अधिकची पदरमोडही करावी लागते. सेबीच्या संशोधन अहवालानुसार सामान्य गुंतवणूकदारांतील 10 पैकी 9 जणांना डिरिव्हेटिव व्यवहारात आर्थिक वर्ष 2021-22 ते 2024-25 या काळात तोटा झाला. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांनी डिरिव्हेटिव व्यवहारातील जोखीम समजून न घेता व्यवहार करू नयेत यासाठी सेबी जनजागृती करते. तरीही उलाढाल वाढत असल्याने त्यासाठी आवश्यक असणारी किमान हमी रक्कम (मार्जिन) आणि खरेदी विक्री व्यवहार संच (लॉट साईज) वाढवण्याचे उपाय सेबीने योजले आहेत. या व्यवहारातून सामान्य गुंतवणूकदारांचा तोटा होत असेल तर कोणीतरी फायदा कामावणारा नक्कीच असणार. असे लाभार्थी हे अतिश्रीमंत गुंतवणूकदार आणि वित्तसंस्था याच आहेत. म्युच्युअल फंड कंपन्याना भावात पडणाऱ्या फरकाने होऊ शकणारे संभाव्य नुकसान (हेजिंग) टाळण्याच्या मर्यादेतच डिरिव्हेटिव प्रकारातील व्यवहार करण्याचे त्यांच्यावर बंधन आहे.
■या सर्व प्रकारात जेन स्ट्रीटने काय केलं?
त्यांनी डिरिव्हेटिव कराराच्या शेवटच्या दिवशी ‘पंप ऍण्ड डंप’ धोरणाचा वापर केला.
म्हणजेच,
●त्यांनी बँकिंग निर्देशांकावर प्रभाव पाडणारे महत्त्वाचे शेअर्स जसेकी एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआयचे शेअर्स सकाळी मोठ्या प्रमाणात खरेदी केले.
●त्यामुळे बॅंक निफ्टी निर्देशांक वर गेला.
●हे पाहून रिटेल ट्रेडर्सनी कॉल ऑप्शन खरेदी करण्यास धाव घेतली, त्यांना वाटलं की आणखी तेजी येईल.
●त्याच सुमारास जेन स्ट्रीट यांनी नेमकी उलटी बाजू घेतली, त्यांनी कॉल ऑप्शन विकले आणि पुट ऑप्शन खरेदी करून ठेवले.
●नंतर, एकदम सर्व बँक शेअर्स विकले त्यामुळे अचानक पुरवठा वाढल्याने निर्देशांक कोसळला.
●त्याचा परिणाम पुट ऑप्शन महागले आणि कॉल ऑप्शन शून्य झाले, जेन स्ट्रीटने यातून जबरदस्त नफा कमावला. या संपूर्ण कालावधीत 18 वेळा सौदापूर्तीच्या एकाच दिवशी या पद्धतीने विविध व्यवहार करून कंपनीने ₹ 43289 कोटी एकूण कमावले त्यातील केवळ ऑप्शनच्या व्यवहारांतून ₹36500/- कोटींचा नफा कमावला गेला. हे सर्व कंपनीच्या वतीने कुणी व्यक्तिने केलं असं वाटत असेल, तरी तसं नव्हतं. त्यांनी हाय-स्पीड अल्गोरिदम्स वापरले, जे बाजारात सेकंदाच्या काही भागातच जेन स्ट्रीटला आवश्यक कृती करत होते.
■सेबीला याची माहिती कशी मिळाली?
जेन स्ट्रीटने कंपनीने अमेरिकेत त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपनीवर (मिलेनियम मॅनेजमेंट) केस केली. त्यात त्यांनी असा दावा केला की मिलेनियमने त्यांचे गुप्त अल्गोरिदम डिझाइन करणाऱ्या डग शॅडेवाल्ड आणि डॅनीयल स्पॉटीसवुड या दोन कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेत घेऊन त्यांच्या मदतीने आपल्या गुंतवणूक धोरणात बदल केला त्यामुळे आमचे नुकसान होत असल्याने आम्हाला त्याची भरपाई मिळावी. पुढे प्रत्यक्षात पुराव्यांची देवाणघेवाण होत असताना न्यायालयीन कारवाई न होता हा वाद गुप्त तडजोडीने मिटवण्यात आला. जरी हा दोन अमेरिकन कंपनीतील अंतर्गत वाद असला तरी त्यात भारतीय शेअरबाजाराचा संबंध आल्याने मीडियाचे लक्ष वेधले गेले. त्यातच मयंक बन्सल या ट्रेडरनेही अचानक उलाढालीत होणारी व्यवहारवाढ संशयास्पद असल्याची तक्रार सेबीकडे केली होती. यावर सेबीने स्वतः पुढाकार घेऊन चौकशी चालू केली आणि जेन स्ट्रीटच्या जानेवारी 2023 ते मार्च 2025 पर्यंतच्या काही व्यवहारांची तपासणी केली. त्यातून 18 संशयास्पद दिवस समोर आले आणि यातील बहुतेक दिवस डिरिव्हेटिवच्या सौदापूर्तीचे दिवस होते. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सहा महिन्यातून अधिक कालावधी लागू शकतो. गुंतवणूकदारांचे तोपर्यंत होऊ शकणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठीच सेबीला त्यांना प्राप्तअसलेल्या अधिकाराचा वापर करून अंतरिम आदेश देण्यात आला आहे.
■सेबीने शोधलेले दोन प्रमुख फसवणुकीचे प्रकार
◆दिवसभरातील निर्देशांक हेराफेरी: बाजार नकारात्मक असताना, सकाळी 09:15 ते 12:00 दरम्यान जेन स्ट्रीटने बँक निफ्टीतील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी केली.
एकाचवेळी ते डिरिव्हेटिव मार्केटमध्ये पुट ऑप्शन खरेदी करीत होते नंतर त्यांनी सर्व शेअर्स विकले त्यामुळे निर्देशांक खाली गेला. पुट ऑप्शन महाग झाल्याने त्यातून जबरदस्त फायदा झाला. उदाहरणार्थ 17 जानेवारी 2024 रोजी एचडीएफसी बँकेचे निकाल खराब असूनही ₹4300 कोटींची बँकेच्या शेअर्स खरेदी केली गेली, जिचा उपयोग बँक निर्देशांक कृत्रिमरित्या उचलण्यासाठी झाला.
◆बाजार बंद होण्याच्या शेवटच्या अर्ध्या तासात मोठी विक्री: यामध्ये त्यांनी शेवटच्या अर्ध्या तासात (दुपारी 03:00 ते 03:30 या वेळेत) मोठ्या प्रमाणावर बँकेच्या शेअर्सची विक्री केली. यामुळे बंद निर्देशांक खाली गेला आणि फायनल प्राइस कमी झाल्यामुळे पुट ऑप्शनवर फायदा मिळाला.
■बँक निफ्टीवरच लक्ष का?
कारण बँक निफ्टीमध्ये उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असल्याने ते अधिक तरल आहे त्यामुळे सहज खरेदी-विक्री करता येते. अन्य व्यवहारांच्या तुलनेने खूप मोठ्या संख्येने बँक निफ्टी ऑप्शनचे व्यवहार होतात (16 लाख ट्रेडर्स).
■सेबीच्या कारवाई मागील कारणे:
●निर्देशांकामध्ये सौदापूर्तीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात संशयास्पद हालचाल.
●ठराविक संस्था व्यक्ती यांनाच व्यवहारातून असामान्य आणि सातत्यपूर्ण नफा.
●फसवणूक आणि गैरवर्तन करणारे व्यवहार. सेबी कायदा सन 1992 कलम 11 व 11(4) मधील तरतुदींचे उल्लंधन करणारे याचबरोबर ते सेबीने सन 2023 मध्ये निर्देशित केलेल्या पीएफयुपिटी नियमावलीतील नियम 3ए, 3बी 3 सी, 3डी नुसार फसवणूक, दिशाभूल करणारे आणि 4(1), 4(2)(ए), 4(2)(ई), 4(2)(जी) नुसार कृत्रिम मागणी/पुरवठा निर्माण करून बाजारभावात अनैसर्गिक चढउतार घडवणारे असल्याने नियमावलीचे
उल्लंघन करणारे होते.
●सेबीने राष्ट्रीय शेअर बाजारामार्फत तुमच्या व्यवहारांचा बाजारावर विपरित परिणाम होत असल्याचा इशारा फेब्रुवारी 2025 ला दिला होता त्याकडे कंपनीने केलेले दुर्लक्ष.
यामुळे
●सामान्य गुंतवणूकदारांचे होत असलेले मोठे नुकसान टाळण्यासाठी आणि भारतीय शेअरबाजारातील व्यवहारांच्या पारदर्शकतेवर उभे होत असलेले प्रश्नचिन्हावर मात करण्यासाठी ही कारवाई केली गेली असे सेबीचे म्हणणे आहे. त्यांनी यापुढील लक्ष मिलेनियम मॅनेजमेंट आणि अन्य हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडरकडे वळवले आहे. या प्रकरणाची चौकशी इतर निर्देशांक आणि बाजार भागांतही विस्तारित करण्यात येईल. डिरिव्हेटिव व्यवहारांसाठी नवीन नियम, सौदापूर्तीच्या पद्धतीत बदल, व्यवहार संच मर्यादेत वाढ यासारखे बदल भविष्यात नियामकांकडून अपेक्षित आहेत. या प्रकरणात पुढे नेमके काय होईल ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. सेबीचे अनेक निर्णय त्यांची अपिलेट अथोरिटी सॅटने रद्द केले आहेत हेही आपल्याला विचारात घ्यावे लागेल.
■गुंतवणूकदारांसाठी धडा: डिरिव्हेटिव व्यवहार हे सोपे वाटतात, तेवढे सोपे नाहीत. हाय-स्पीड अल्गो आणि प्रचंड भांडवल घेऊन उभ्या असलेल्या संस्थांसमोर सामान्य गुंतवणूकदार भरकटतात. त्यामुळे बाजारात आपण काय ट्रेड करीत आहोत यापेक्षा ते कोणाच्या विरुद्ध ते करतो आहोत ते महत्त्वाचं असतं.
■निष्कर्ष: डिरिव्हेटिव व्यवहारामध्ये अर्धं युद्ध हे समजून घेणं असतं की आपण नक्की कोणत्या गोष्टींवर पैज लावतो तर बाकीचं युद्ध असतं ते कोणाच्या विरुद्ध लावतो ते समजणं.
सुजाण गुंतवणूकदारांना यातून योग्य तो बोध घेतीलच!
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
11 जुलै 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम या संकेतस्थळावर पूर्वप्रकाशीत.
Friday, 4 July 2025
सावध ऐका पुढल्या हाका
#सावध_ऐका_पुढल्या_हाका!
गेले काही दिवस कुणालाही सहज फोन करावा म्हटलं तर सक्तीने अमिताभच्या आवाजातील एक सरकारी कॉलर ट्यून ऐकावी लागत आहे. त्यामुळे अस्वस्थता वाढते, संदेश उपयुक्त असला तरी त्याचा सततचा भडिमार असह्य वाटतो. कोविड काळानंतर ऑनलाइन व्यवहार त्याचबरोबर यासंबंधीच्या ग्राहकांच्या तक्रारी ही सातत्याने वाढत असल्याने असे व्यवहार पूर्णपणे सुरक्षित नाहीत असे आपण निश्चित म्हणू शकतो. झालेल्या गैरव्यवहारात बरेचदा संबंधित ग्राहकाने केलेली छोटीशी चूक त्याला महागात पडते. मग असे व्यवहार करायचेच नाहीत का? यावर त्यासंबंधीच्या सुरक्षा व्यवस्था अधिकाधिक मजबूत बनवणे हाच त्यावरील उपाय आहेत. या संदर्भात संबंधित बँकेची जबाबदारी रिझर्व बँकेच्या परिपत्रकात स्पष्टपणे दिली आहे, त्याकडे पद्धतशीर दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे आता यासंबंधातील धोरण ठरवणे आणि नियम करणे ही सरकारची जबाबदारी आहे. सायबर फसवणुकीत गेलेला ग्राहकांचा प्रत्येक रुपया सरकारने सुरक्षित केला पाहिजे हा मुद्दा मुंबई ग्राहक पंचायतीने सरकारकडे लावून धरलेला आहे. अनेक सामाजिक संस्था, ग्राहक संस्था, केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालय, भारतीय रिजर्व बँक या सर्वांकडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून व्यवहार करताना त्यांनी नेमके काय करावे आणि काय करू नये, कोणती काळजी घ्यावी. यासंबंधीची माहिती विविध समाज माध्यमातून देऊन ग्राहक जागृती करण्यात येत असते.
कुणाही अनोळखी व्यक्तीला ओटीपी देऊ नये याबद्दल लोक आता सावध होत असल्याने ओटीपी वापरून होणारे गैरव्यवहार इतर गैरव्यवहाराच्या तुलनेत कमी होत आहेत हे दिलासादायक आहे. या समजुतीला छेद देणारी एक अजब घटना समोर आली असून त्यामध्ये 'ओटीपी' व्यवस्थेला बाजूस करून एका हॅकरने धक्का दिला आहे. त्याने आदित्य बिर्ला कॅपिटलचे अँप क्रॅक केले असून, त्यावरील ग्राहकांच्या विविध खात्यांमधून सुमारे जवळपास दोन कोटी रुपयांचे डिजिटल सोने परस्पर ऑनलाइन पद्धतीने विकले. अलीकडे मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूकीचा गुन्हा समोर आला असून यामुळे बाजारात खळबळ उडाली आहे. मुंबईतील प्रभादेवी भागातून सायबर फसवणुकीचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एका अज्ञात हॅकरने आदित्य बिर्ला कॅपिटल डिजिटल लिमिटेडच्या एबीसीडी अँपमध्ये घुसून काही मूलभूत तांत्रिक बदल केले आणि अनेक ग्राहकांच्या खात्यांमधून सुमारे 2 किलो वजनाचे डिजिटल सोने विकले. त्यानंतर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने विक्री करून आलेली रक्कम विविध बनावट वैयक्तिक बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करून तो गायब झाला आहे. ही घटना अजबरीत्या निदर्शनास आली, झाले असे की अचानक असे नुकसान झालेल्या अनेक ग्राहकांनी कंपनीच्या कॉल सेंटरला फोन करून त्यांच्या संमतीशिवाय त्यांनी खरेदी केलेले डिजिटल सोने विकल्याची तक्रार केली. तेव्हा पडताळणी केल्यावर ही घटना उघडकीस आली. ते समजल्यानंतर, कंपनीने मुंबईतील सेंट्रल रिजन सायबर पोलिसांकडे तक्रार (एफआयआर) दाखल केली असून सायबर सेलने याची पूर्ण गांभीर्याने संपूर्ण चौकशी सुरू केली आहे.
तक्रारीनुसार, 9 जून 2025 रोजी, कंपनीच्या तांत्रिक टीमला असे आढळून आले की एका अज्ञात व्यक्तीने digital.adityabirlacapital.com वरील एबीसीडी अँप आणि कंपनीच्या सर्व्हरमधील अप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) हॅक केला होता. हॅकरने अँपच्या सामान्य व्यवहार पद्धतीमध्ये (प्रोटोकॉल) फेरफार केला आणि अनिवार्य असणारा केवळ एकदाच वापरता येणाऱ्या (वन-टाइम पासवर्ड) संदेश पडताळणी प्रक्रियेला बाजूस सारून 435 हून अधिक वापरकर्त्यांच्या खात्यांमधून डिजिटल सोने यशस्वीरित्या विकले. अशा प्रकारे ओटीपी प्रक्रियेस दूर करण्याचा हा धक्कादायक प्रकार पाहून सायबर तज्ज्ञही विचारात पडले आहेत. कंपनीने सायबर तक्रार दाखल केल्यानंतर, तात्काळ संबंधित ग्राहकांना सोन्याची भरपाई दिली आणि सोने विक्रीवर तात्पुरती स्थगिती आणली. त्यानंतर त्यातील सुरक्षा अधिक कडक करून विक्री सुविधा पूर्ववत देऊ केली आहे. सुकृत दर्शनी यात गुंतवणूकदारांचे कोणतेही नुकसान झाले नसले तरी असं काहीतरी होऊ शकतं हे त्यांना समजलं आहे त्यामुळे अनेकांना प्रश्न पडेल की, यावर उपाय काय ? तर सध्या तरी यावर ठोस असा उपाय तितका नाही. पेक्षा जिथं तुम्ही ऑनलाईन (डिजिटल) पद्धतीने गुंतवणूक करीत आहात ती करताना अधिक सावधगिरी बाळगावी, हे उत्तम. मोठी गुंतवणूक करताना तरी किमान *बसल्या जागी काम होतेय* असं म्हणत ऑनलाईन व्यवहार शक्य असल्यास टाळावे. त्यासाठी सेबी, सरकार मान्य असे जे मध्यस्थ असतात किंवा संबंधित कंपनीच्या ऑफिसेस मधील अधिकृत कर्मचारी असतात त्यांच्या सोबत राहून गुंतवणूक करावी. त्याने फसवणूक होण्याची शक्यता किमान असते.
■डिजिटल गुंतवणूकदारांसाठी सुरक्षा टिप्स-
●दोन अथवा अधिक टप्यातील ओळख (MFA) वापरा, ओटीपी अॅप वापरा (Google Authenticator), केवळ एसएमएस वर अवलंबून राहू नका.
●अॅपला दिलेल्या परवानग्या तपासा, एसएमएस वाचण्याची, फाइल्समध्ये प्रवेश यांसारख्या परवानग्या मर्यादित ठेवा.
●नियमितपणे गुंतवणूक तपासा, व्यवहार सूचना (SMS / ईमेल) ऑन ठेवा.
●प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी वेगळे पासवर्ड वापरा. सहसा ओळखता येणार नाही पासवर्ड ठेवा आणि पासवर्ड मॅनेजरचा वापर करा.
●फक्त अधिकृत अॅप स्टोअर्सवरून अॅप डाऊनलोड करा अनधिकृत वेबसाईट्स लिंक्स असलेल्या एपिके फाईल्स टाळा.
●फिशिंग ईमेल आणि लिंकपासून सावध रहा
संस्था, प्रसिद्ध व्यक्ती सारख्या नावाने आलेले फसवे ईमेल ओळखा.
●आपले एपीआय टोकन तपासा (प्रगत वापरकर्त्यांसाठी) कोणते थर्ड पार्टी एपीआय वापरत आहेत, ते तपासा आणि अनावश्यक टोकन हटवा. हे सर्वसाधारण जाणकार व्यक्तींकडून समजून घ्यावे. हा एक प्रकारचा डिजिटल पासवर्ड आहे जो आपल्याला अँप वापरण्याची परवानगी देतो, वापरकर्त्याची ओळख आणि अधिकार यांची माहिती ठेवतो.
●मोबाइलला सुरक्षित ठेवा.
फिंगरप्रिंट / फेस लॉकसारखी ओळख वापरा.
■भारतातील डिजिटल गोल्ड व फिनटेक सुरक्षा यांचं भवितव्य
●सेबी आणि भारतीय रिझर्व बँक यांच्याकडून अधिक कडक नियमांची अपेक्षा.
●सायबर इन्शुरन्स सेवा आता अनेक अॅप्समध्ये सक्तीने लागू होऊ शकतील.
●Zero Trust Security आणि AI आधारित फ्रॉड डिटेक्शन वापरणं अनिवार्य व्हायची शक्यता आहे.
एखादी गंभीर समस्या किंवा आव्हान समोर असताना, लोकांना 'सावध ऐका पुढल्या हाका' असे म्हणून परिस्थितीचे गांभीर्य ओळखायला सांगितले जाते. डिजिटल व्यवहार करायचे असतील तर डिजिटल शहाणपण प्राप्त करणे आवश्यक आहे. हे एक दुधारी शस्त्र असून ते जितके चांगले वाटते, तितकेच ते आपल्याच अंगावर उलटूही (बुमरँग) शकते. हे यानिमित्ताने लक्षात घ्यावे !
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत, याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 4 जुलै 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 27 June 2025
पैसा, पैसा आणि पैसा!
#पैसा_पैसा_आणि_पैसा
पैसा आणि उद्योजकता या विषयाचे संस्कार मराठी माणसांवर नसल्याने या विषयावर बोलणे, आपापसात चर्चा करणे टाळले जाते. पैसा जीवनाचे सर्वस्व नसले तरी प्रत्येक ठिकाणी तुमचे पैशांवाचून अडते. आपल्याकडे किती पैसे असावेत याचा कोणताच मापदंड नाही. पैसा ही अशी शक्ती आहे जी कधीच पुरेशी आहे असं वाटतं नाही. एकीकडे सतत पैसा पैसा करणारे लोक, जे कायम प्रत्येक गोष्ट पैशांत मोजतात. येन केन प्रकारे तो केवळ आपल्यालाच मिळावा असं त्यांना वाटतं तर दुसरीकडे लोक कल्याणार्थ अतिशय निरीच्छ व्यक्ती आहेत ते पैसा महत्वाचा न मानता त्यांचे कार्य उत्तमरीतीने करीत असून भरीव कार्यही करीत असतात, अशी टोकाची उदाहरणे समाजात आहेत. आपण पडलो मध्यम प्रवृत्तीची माणसे आता आपली मनोभुमिका कोणतीही असो, पैशाचे महत्व जाणत असल्याने आणि सातत्याने प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागत असल्याने इच्छापूर्तीचे साधन म्हणून सर्वांनी त्याचा स्वीकार केला आहे. तो योग्य मार्गाने वैध पद्धतीने मिळवला आणि योग्य त्या कारणासाठी खर्च केला तर त्याचे मोल राहते हे आपल्याला पटले आहे.
या विषयावर सर्व भाषांत अनेक स्वतंत्र तसेच अनुवादीत पुस्तके असली तरी बहुतांश पुस्तके पैसा कसा मिळवावा, वाढावावा, टिकवावा अशा स्वरूपाची आहेत. अशी पुस्तके निश्चितच असली पाहिजेत याबद्दल वाद नाही परंतु मन न गुंतवता योग्य प्रकारे पैशांचा वापर केल्यास त्याचे मूल्य कसे वाढते. या विषयावर चिंतन करणारे पुस्तक अलीकडेच मी वाचून पूर्ण केलं. त्याचं नाव आहे, ‘पैसा, पैसा आणि पैसा’. हे पुस्तकं लिहिलं आहे प्रा सुरेश गर्जे यांनी. सन 2023 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची किंमत ₹170/- असून ते सकाळ पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. या शंभर पानी पुस्तकात लेखानामागील भूमिका सांगून एकंदर चौदा निबंधासारखे लेख असून ते एकामागोमाग एक अथवा स्वतंत्र वाचलेत तरी चालण्यासारखे आहे. ज्यात पैशांच्या शक्तीचे तत्त्वज्ञान, त्याचा उपयोग, आणि समाजहिताच्या संदर्भातील जबाबदारी या सर्वांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
प्रत्येक लेखाचे थोडक्यात सार अतिशय कमी शब्दात सुरवातीलाच दिले असून त्याचे अधिक स्पष्टीकरण लेखात आहे.
■लेख विषय आणि थोडक्यात स्पष्टीकरण असे,
◆पैशांचे झाड- उद्यागाच्या भूमीत कल्पकतेची बीजे योग्य वेळी पेरावी लागतात. त्यावर घामाचे चिंतन करावे लागते. तेव्हा ती बीजे अंकुरतात. रोपांच्या रूपाने डोलू लागतात. त्यांच्या वाढीच्या दृष्टीने डोळ्यात तेल घालून त्यांची मशागत करावी लागते. तेव्हा पैशांचे झाड उभे राहते. त्यांना पाने फुले बहरतात. यासाठी अहर्निश धडपड करावी लागते, कष्ट उपसावे लागतात, तेव्हा कुठे पैशांचे झाड डोलू लागते.
◆धनसंग्रह नेमका कशासाठी?- दरिद्रीनारायणाची सेवा हीच परमात्म्याची सेवा आहे. याचा अर्थ असा की, लोककल्याणाची कामे ही सत्कर्मे होत. धनसंग्रह स्वतःच्या उपभोगसाठी न करता तो जनकल्याणासाठी, गरजूच्या पीडाहरणासाठी केल्यानेच मनःशांती प्राप्त होऊ शकते.
◆पैसे कामावण्याच्या प्रेरणा- खर्च आणि काटकसर, काटकसर आणि बचत यात तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. अत्यंत जरुरी बाबींवर खर्च करणे आणि अनावश्यक गोष्टीवर खर्च टाळणे, हे शहाणपणाचे लक्षण आहे. खर्च हा नेहमी उधळेपणाच्या मर्यादेपर्यंत करू नये आणि काटकसर कंजूषपणाच्या स्तरापर्यंत पोहचू नये. खर्च आणि काटकसर यांतील सुवर्णमध्य साधला पाहिजे.
◆जोडूनिया धन- आर्थिक व्यवहारात सर्वतोपरी प्रामाणिकपणास महत्व आहे आणि असा सत्यावर आधारित, नीतिमत्तेला घरून असणारा व्यवहार ‘उत्तम व्यवहार’ सदरात मोडतो आणि त्याची उत्तम फळे कर्त्या व्यक्तीस यथावकाश निश्चितच प्राप्त होत असतात.
◆पैशाचे सामर्थ्य - पैशाची भूमिका सर्वच क्षेत्रात महत्वापूर्ण आहे. वैयक्तिक बाबतीत कुटुंब आणि परिवाराच्या संबंधी, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक प्रभाव दर्शवत असतो. कोणत्याही उपक्रमांचे आयोजन आणि सामाजिक सुधारणांचे प्रकल्प एक इंचभरही पुढे पैशाशिवाय पुढे हलू शकत नाहीत.
◆दौड पैशासाठी- सुवर्णाचा साठा सुवर्णाचे मोल कमी होऊ शकते, परंतु प्रियजनांचा, नात्यागोत्यातील जिवंत व्यक्तींच्या प्रेमाचा साठा कधीच कमी होत नाही. हीच जीवनातील खरी संपत्ती आहे. जीवनातील सुख आणि आनंद देण्याची शक्ती सोन्यात नाही.
◆पैशाची निरर्थकता- माणसाची तृष्णा थांबली, की त्याच्या ठायी असलेल्या यातनांचे शमन होयला हवे. सत्य, अहिंसा आणि करुणा हे तीन घटक मानवाची प्रज्ञा आणि शील यांच्या संवर्धनाचे कारण आहेत. ज्ञानप्राप्तीबरोबरच सदाचाराचा प्रवेश मानवी मनात झाला, की मनःशांतीचे बिजाकुरण होयला वेळ लागत नाही.
◆अपरिग्रह- आज करोडोंच्या संख्येने गोरगरीब, आसराहीन, अन्नासाठी दाही दिशा भटकणारे लोक जगाच्या पाठीवर आहेत, तोपर्यंत गांधींच्या विचारांचे गांभीर्य कायम टीकणारे आहे.
◆पैशाची सार्थकता- पैशाच्या त्यागातून प्राप्त होणारी मनःशांती, समाधान, सुख आणि आनंद आगळवेगळा असतो. मनुष्यजीवनात अशा प्रकारच्या आनंदाची अनुभूती प्राप्त करण्याचा सक्रिय सहभाग आणि प्रयत्न प्रत्येक पैसेवाल्या व्यक्तीने स्वतःच्या उत्पन्नाच्या काही भागातून करणे आवश्यक आहे.
◆सुखाचा शोध- दरिद्री लोकांचे दारिद्र्य दूर करणे, अज्ञान दूर करण्यासाठी मोफत शाळा, महाविद्यालयाची उभारणी माफक दरात शिक्षणाच्या सोयी, सर्व सुविधानी युक्त भव्य रुग्णालये, अनाथालये, विध्यार्थांसाठी वसतिगृहे, वृद्धांसाठी शुश्रुषालये, महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती, आदिवासीच्या विकासाचे उपक्रम, नैसर्गिक आपत्ती, भूकंप, समुद्री वादळे, महापुरानी ग्रस्त जनसमुदायासाठी पिण्याच्या पाण्याच्या सोई असे अनेक उपक्रम राबवण्यासाठी स्वतःजवळील घनाचा शक्य तेवढा भाग खर्च करून समाजाच्या उपकारांची अंशतः का होईना परतफेड करावी.
◆आर्थिक भ्रष्टाचार- अवैध मार्गानी पैसा जमा करण्याच्या प्रवृत्तीची कारणमिमांसा हा या लेखाचा एक एक हेतू आहे. पैशाच्या सोबत प्रतिष्ठा येते. समाजात मानसन्मान प्राप्त होतो. यासाठी आणि सुखासोयीनी युक्त, चैनींनी युक्त जीवन जगण्यासाठी आणि पिढ्यानंपिढ्याच्या आर्थिक सुरक्षतेसाठी आणि भावी काळात आर्थिक विपत्तीला सामोरे जाण्याची पाळी येऊ नये, यासाठी आवश्यक सुरक्षेची भक्कम तटबंदी उभारण्याकरिता येनकेन प्रकारेन पैसा वाढवण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते. या प्रवृत्तीला मुळी अंतच नसतो.
◆पैसा आणि प्रारब्ध- समस्याचे निराकरण कसे होईल, त्यातून साहिसलामत सुटण्याचे मार्ग कोणते यावर चिंतन करणे उपयुक्त आहे. पैशांची कमतरता आहे, आर्थिक परिस्थिती बिकट आहे, दारिद्र्याची छाया कुटुंबावर आहे. अशा परिस्थितीत माणूस एकच करू शकतो, परिश्रम. पैसा कमावण्याचे परिश्रम. परिश्रमाच्या झाडाला पैशांची फळे लागतात. प्रारब्धानुसार ती कमी अधिक लागतील हा भाग वेगळा, परंतु फळे लागणार एवढे मात्र निश्चित समजले पाहिजे.
◆पैसा आणि रचनात्मक उपक्रम- मुलांना ‘धन कमवा’ हे शिकवत असताना धर्मही शिकवला पाहिजे. अर्थात नीतिधर्म किंवा मानवता धर्म. या धर्मात जी शिकवण दिली जाते, तिचा परिणाम चरित्र्याची निर्मिती आणि नैतिकदृष्ट्या वागणुकीचे संवर्धन यात होत असते.
◆सुख आणि आनंद- समाजावरील प्रेम हे प्रेमाची व्यापकता दाखवते, प्रेम ही शक्ती आहे. ती व्यक्तीला शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ प्राप्त करून देते. जनताजनार्धनावरील प्रेम ही प्रेमाची विशाल व्याप्ती आहे. हे प्रेम लोकसेवा कार्यातून व्यक्त होते. ज्यांच्याकडे अधिक धनसंग्रह आहे त्यांनी अभावग्रस्तांवर पैशांचा पाऊस पाडला पाहिजे, प्रेमाचा वर्षाव केला पाहिजे.
थोडक्यात,
●पैशाची ऊर्जा आणि सामर्थ्य: पैशामध्ये मोठी शक्ती आहे — स्वतंत्रता, संसाधने, आणि क्षमता निर्माण करण्याची क्षमता. मात्र, पैसा कच्चा संसाधन आहे, ज्याला योग्य दिशा आणि ध्येयाच्या अनुरूप वापरल्यासच फलदायी ठरते.
●वैयक्तिक वागणूक: सकस नियोजन, संयमन, गुंतवणूक आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर भर. केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर आवश्यकतेनुसार गरजू लोकांसाठी वापर करण्याद्वारे आत्मसंतुष्टी मिळते आणि समाधान वाढतं.
●सामाजिक उत्तरदायित्व:
पैसा ‘देणगी’ किंवा ‘दान’ स्वरूपात समाजाच्या भल्यासाठी वापरणे, जे आत्मिक समाधान शंभरपट वाढवते. फक्त वैयक्तिक संपत्तीच नव्हे, तर समाजातील गरजू जनतेसाठीही पैशाचा हितकारक उपयोग कसा करता येईल याचा संदेश पुस्तकातून मिळतो.
■कोणाला उपयुक्त?
◆व्यक्तिगत वित्त व्यवस्थापन शिकणाऱ्यांना – खर्च‑नियोजन, गुंतवणूक आणि बचत विषयक मूलभूत दृष्टीकोनासाठी.
◆समाजसेवी व दानप्रवृत्त लोकांसाठी – पैशाच्या समाजोपयोगाच्या मूल्यांना समजण्यासाठी.
◆चिंतनशील‑आध्यात्मिक वाचकांसाठी – तत्त्वज्ञानाने प्रेरित लेखनातून आर्थिक दृष्टीकोन प्राप्त करण्यासाठी.
■का वाचावे?
शाश्वत जीवनशैलीचा पुरस्कार करणारे हे पुस्तक वाचताना, विनोबांच्या पूर्वी वाचलेल्या ‘गीता प्रवचने’ या पुस्तकाची प्रकर्षाने आठवण करून देते. ते तुमच्या आर्थिक ज्ञानाचं परिमाण वाढवण्यास मदत करतं, आणि सोबतच समाजातील गरजूंच्या भल्यासाठी पैसे कसे वापरायचे हेही शिकवते. आत्म‑विकासाला आणि समाजोपयोगाला एकत्र साधून लेखनातून जीवनात अर्थ प्राप्त करण्याचे मार्ग दाखवले आहेत. अर्पणपत्रिकेत म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक पैशाचा सदुपयोग करणाऱ्या आणि पैशाचा हव्यास असलेल्या समस्त जनांस असले तरी कुणाचाही पैशाविषयीच्या दृष्टिकोनात निश्चित बदल करू शकणारे असल्याने संग्रही ठेवण्यासाठी, प्रियजनांस भेट देण्यासाठी योग्य आहे. पुस्तकातील लेख आणि त्याविषयीची अधिक माहिती पुस्तकातलीच आहे, मी फक्त निमित्यमात्र! अजूनही दोन पुस्तकं निवांततेने वाचतोय, उपयुक्त वाटल्यास त्यावरही यथावकाश नक्की लिहीन.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत, याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 27 जून 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 13 June 2025
फिनटेक उद्योग आणि नव्या उद्योग संधी
#फिनटेक_उद्योग_आणि_नव्या_उद्योग_संधी
‘फिनटेक’ हा शब्द यापूर्वी बऱ्याचदा वाचनात अथवा कानावर अनेकदा आला असेल. हा शब्द फायनान्स आणि टेक्नॉलॉजी या दोन शब्दांच्या मिश्रणातून तयार झाला आहे. जसे ‘निफ्टी’= एनएससी + फिफ्टी, ‘सेन्सेक्स’= सेन्सेटिव्ह + इंडेक्स. अशा प्रकारे दोन शब्दातून तयार होणाऱ्या शब्दाला मराठी व्याकरणात ‘संधी’ म्हणतात. ‘संधी’ हा शब्द ‘शक्यता, अवसर, वेळ, अवधी’ अशा अर्थानेही सामान्यपणे वापरला जातो. फिनटेक कंपन्या या वित्तीय क्षेत्रांशी संबंधित विविध कार्य हे तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होणाऱ्या शक्यताचा अधिकाधिक वापर करून करत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर या कंपन्या अशा प्रकारचे डिजिटल तंत्रज्ञान विकसित करतात ज्यामुळे व्यक्ती व्यक्तीना एकमेकांना (पी 2 पी) पैसे पाठवायचे असतील तर त्याचे खास अँप्लिकेशन्स बनवले जाईल त्यामुळे हा व्यवहार सुलभ होईल. फिनटेक हा खूप व्यापक शब्द आहे. अलीकडे इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व्यवहार वाढले असले तरी भारतात अजूनही रोख रकमेने अनेक व्यवहार होत आहेत. लोक बँकांना केंद्रित ठेवून त्यांच्या माध्यमातून व्यवहार करतात. यातील काही व्यवहारांसाठी शुल्क आकारणी करण्यात येते. जर असे व्यवहार सुरक्षित, झटपट आणि अत्यंत कमी खर्चात किंवा विनामूल्य झाले तर अधिकाधिक लोक त्याकडे आकर्षित होतील. ते करण्याचे महत्वाचे कार्य या कंपन्या करत असतात. या वर्ष अखेरपर्यंत भारतातील फिनटेक व्यवसाय 230 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता असून सन 2030 पर्यंत तो 30.55% वार्षिक वृद्धीदराने 550 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जागतिक फिनटेक व्यवसायात आपले स्थान तिसरे आहे.
■फिनटेक कंपन्या या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना देत असलेल्या महत्वाच्या आर्थिकसुविधा या पारंपरिक बँकिंगपेक्षा वेगवान, सुलभ आणि किफायतशीर दरात अथवा विनामूल्य देतात.
●पैशांची देवाणघेवाण:
◆उदाहरण: फोन पे, गूगल पे, पेटीएम
◆सेवा: युपीआय, पैसे पाठवणे, क्यू आर कोड, बिल पेमेंट्स, व्यापारांना एकमेकांशी (बी 2 बी), व्यापारी आणि ग्राहक (बी 2 पी), ग्राहक आणि व्यापारी (पी 2 बी), व्यक्तींना एकमेकांशी (पी 2 पी) पैशांचे व्यवहार करण्याची सुविधा,
●कर्ज वितरण:
◆उदाहरण: क्रेडिटबी, लेंडिंगकार्ट
◆सेवा: वैयक्तिक आणि व्यवसायासाठी झटपट कर्ज, सामान मासिक हप्ते सुविधा.
●शेअर बाजार अन्य गुंतवणूक मंच
◆उदाहरण: झेरोदा, ग्रोव, अपस्टोक्स
◆सेवा: शेअर्स, म्युच्युअल फंड्स त्यातील नियमित गुंतवणूक करण्यासाठी त्याचा आढावा घेण्यासाठी योग्य अँप्सची निर्मिती
●निओबँक्स (डिजिटल बँका)
●उदाहरण: ज्युपिटर, नियो, फी
●सेवा: बँक खाते, कार्ड, खर्चाचे व्यवस्थापन (पूर्णतः ऑनलाइन) कोणत्याही शाखेत न जाता.
●विमा तंत्रज्ञान:
●उदाहरण: ऍको, पॉलिसीबाजार, डिजिट
●सेवा: विमा खरेदी, दावा प्रक्रिया, वर्गणी तुलना ऑनलाईन आणि अँप्सच्या माध्यमातून
●व्यक्तिगत आर्थिक व्यवस्थापन
◆उदाहरण: मनीव्ह्यू, वॉलनट
◆सेवा: खर्च मागोवा, आर्थिक नियोजन, क्रेडिट स्कोअर
आज बहुतेक लोकांकडे त्यांच्या मोबाईलमध्ये किमान एक तरी फायनान्शियल अँप आहे, ज्यामुळे आपले जीवन सुसह्य होण्यास मदत झाली आहे. गुगल पे/ पेटीएम यांनी मोठी बाजारपेठ काबीज केली आहे. अनेकजण उद्योजक त्यात अधिकाधिक कल्पकता आणून त्यांचे स्टार्टअप उद्योग सुरू करीत आहेत. ते स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यास सरकारी प्रोत्साहनही मिळत आहे. अनेक नावीन्यपूर्ण फिनटेक कंपन्या व्यवसायवृद्धीस हातभार लावून आपल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम करीत आहेत. आपल्या पेमेंट करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवत असल्याने त्यांचे महत्व अधोरेखित होते
■फायदे:
●ग्रामीण भागात आर्थिक सेवा पोहोचवणे.
●कॅशलेस व्यवहाराला चालना.
●स्टार्टअप्स आणि मध्य लघु आणि सूक्ष्म उद्योगासाठी फायद्याचे.
●पारंपरिक बँकिंगला पूरक सेवा.
■आव्हाने
●नियामक नियमांचे पालन आणि सायबर सुरक्षेचा धोका.
●सन 2024 मधील पहिल्या सहामाहीत फंडिंगमध्ये 59% घट.
●योग्य टॅलेंट मिळवणे आणि ग्राहक टिकवून ठेवणे हे मोठे प्रश्न.
■संधी
●दुर्लक्षित लोकसंख्येसाठी आर्थिक समावेशाचे दरवाजे खुले.
●ग्रामीण आणि निमशहरी भागांत वाढीची मोठी शक्यता.
●पारंपरिक बँका आणि फिनटेकमधील परस्पर सहकार्याला चालना
भारतातील ग्राहकांना उपयोग होईल अशा भविष्यकालीन नाविन्यपूर्ण फिनटेक कल्पना त्यासंबधीची उदाहरणे आणि त्यांचे परिणाम
●पूरक वित्त - (Embedded Finance)
म्हणजे काय: बँकींग किंवा आर्थिक सेवा थेट. पेमेंट,कर्ज, विमा एकाच छताखाली उपलब्ध.
उदाहरण: फ्लिपकार्टवर खरेदी करताना कर्ज मिळणे.
परिणाम: बँकेकडे न जाता व्यवहार पूर्ण.
●कृत्रिम प्रज्ञेवर आधारित संपत्ती व्यवस्थापन- (Robo-Advisors)
म्हणजे काय: कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून दिला जाणारा गुंतवणुकीचा सल्ला. हा सल्ला वैयक्तिक असेल.
उदाहरण: तुमच्या मासिक खर्चाचा विचार करून म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला.
परिणाम: नवशिक्यांसाठी गुंतवणूक सुलभ आणि प्रभावी होण्याची शक्यता.
●CBDC (डिजिटल रुपये – RBI कडून)
म्हणजे काय: आरबीआयने जारी केलेला डिजिटल भारतीय रुपया. सध्या मोठ्या कंपन्या व्यवहार करण्यासाठी त्याचा वापर करीत आहेत भविष्यात हा वापर सार्वत्रिक होईल.
परिणाम: जलद, सुरक्षित, सहज शोध घेता येऊ शकेल व्यवहार.
●विकेंद्रित वित्त - (Decentralized Finance)
म्हणजे काय: ब्लॉकचेनवर तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक सेवा, मध्यस्थाचा कमीतकमी वापर,पारदर्शक व्यवहार.
उदाहरण: कर्ज, विमा, व्याज मिळवणे स्मार्ट कॉन्ट्रॅक्टद्वारे.
परिणाम: पारदर्शक, कमीतकमी व्याजदर आणि व्यवस्थापन फी आकारणी शक्य आहे त्यावर नियमन गरजेचे.
●बोलून सूचना देऊन केले जाणारे व्यवहार- (Voice based banking/transactions)
म्हणजे काय: आपल्या भाषेत फक्त बोलून व्यवहार.
उदाहरण: "मंदारला 1000 रुपये त्वरित पाठवा" अशी सूचना गुगल असिस्टंला केली असता माझ्या खात्यातील पैसे गुगल पे ने मंदारच्या खात्यात त्वरित हस्तांतरीत होतील.
परिणाम: ज्येष्ठ नागरिक आणि अल्पशिक्षित व्यक्तींना व्यवहार करण्यासाठी उपयुक्त.
●कृषी वित्तव्यवहार - (Agri-Fintech)
म्हणजे काय: शेतकऱ्यांसाठी खास आर्थिक तंत्रज्ञान सेवा.
उदाहरण: हवामान अंदाजावर आधारित कर्ज, पीक विमा अॅपवरून.
परिणाम: ग्रामीण भागाचा आर्थिक विकास.
●पर्यायी विदेद्वारे पतमानांकन-
म्हणजे काय: कॉल, व्यवहार, मोबाईल वापराच्या डेटावरून क्रेडिट स्कोअर.
परिणाम: ज्यांच्याकडे बँक इतिहास नाही त्यांनाही कर्ज.
●बायोमेट्रिक + ब्लॉकचेन केवायसी-
म्हणजे काय: फिंगरप्रिंट, डोळा स्कॅन व ब्लॉकचेनद्वारे तपासणी.
परिणाम: फास्ट व फसवणूक-मुक्त ओळख पडताळणी.
●ग्राहकांच्या गरजेनुसार विशेष सेवा- (Special Services)
म्हणजे काय: ग्राहकांच्या विशिष्ट खास गरजा ओळखून त्यानुसार सेवा
उदाहरण: ग्राहकास काही समभाग, म्युच्युअल फंड युनिटस, दीर्घकालीन रोख्यामधील गुंतवणूक प्रदीर्घकाळ ठेवायची असल्यास- ती त्यास मोडताही येणार नाही आणि सुरक्षित राहील अशा पद्धतीने साठवून ठेवता येईल अशी डीजीलॉकर अथवा एन्टिटीलॉकर सदृश्य सुविधा
परिणाम: वारसांसाठी निश्चित सुरक्षित दीर्घकालीन गुंतवणूक करता येणे शक्य.
ही यादी परिपूर्ण नसून यात ग्राहकांच्या विशिष्ट आणि नेमक्या गरजा ओळखून त्यात अनेक गोष्टींची भर घालता येईल. त्यातून फिनटेक निर्मितीत रस असणाऱ्या उद्योजकांना अनेक नावीन्यपूर्ण स्टार्टअप उद्योगात ‘अवसर’ अशा अर्थाने संधी शोधता येणे शक्य आहे.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असून हा लेख कोणत्याही फिनटेक मंचाची शिफारस करीत नाही
13 जून 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
Sunday, 8 June 2025
जर्मनीची लवकर निवृत्तीवेतन सुरुवात योजना
#जर्मनीची_लवकर_निवृत्तीवेतन_सुरुवात_योजना_आर्थिक_साक्षरतेकडे_एक_क्रांतिकारी_पाऊल_की_केवळ_एक_कल्पना?
जगभरात अनेक देश सामाजिक सुरक्षेचा भाग म्हणून त्यांच्या नागरिकांसाठी कल्याणकारी योजना राबवीत असतात. अनेकदा अशा प्रकारच्या योजना ह्या बेरोजगार, ज्येष्ठ नागरिक, कामगार याच्यासाठी अथवा क्वचित समाजातील मोठ्या वंचित घटकासाठी राबवण्यात येतात. त्यात केवळ वृद्धांसाठी असलेल्या अश्या खास योजना आहेत. आयुर्मानात वाढ होत असल्याने जगभरात वृद्धांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे अशा योजनांवरील खर्चात सातत्याने वाढ होत असते. विकसित देशांची लोकसंख्या कमी आणि सरकारचे उत्पन्न अधिक असल्याने त्यांना सरसकट अशा योजना सर्वांसाठी रबावता येतात, परंतु वृद्धांची संख्या वाढत असल्याने त्यांनाही आता या खर्चावर नियंत्रण असावे असे वाटू लागले आहे. विकसनशील देशात त्या राबवण्यावर मर्यादा येत असल्याने त्याला कठोर चाळणी लावली जाते. जर्मनीला एकंदर लोकसंख्येत वृद्धांची संख्या सातत्याने वाढत असल्याने अशा योजनांवरील खर्चात होणाऱ्या वाढीचा ताण येत आहे. त्यावर उपाय म्हणून अगदी गेल्या आठवड्यात त्यांनी एक अभिनव योजना सुरु करण्याचे ठरवले आहे. सध्या ती केवळ प्रस्तावित असून त्यास मंजुरी मिळायची आहे. त्यानुसार आता सामाजिक सुरक्षा योजनेचा एक भाग म्हणून आर्थिक सुरक्षिततेसाठी प्रथमच 6 ते 18 या वयोगटातील मुलांसाठी ‘लवकर निवृत्तीवेतन सुरुवात’ (Early Start Pension) या नावाची योजना आणण्याचे ठरवले आहे. या योजनेतून लहान वयातच देशात आर्थिक साक्षरतेचा पाया घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
जर्मनी ही सध्या जगातील तिसरी आणि युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मोटार वाहने, त्यांचे सुटे भाग आणि रासायनिक उद्योग यात जर्मन कंपन्या आघाडीवर असून सकल राष्ट्रीय उत्पन्नात तेथील सेवा क्षेत्राचा 70% वाटा असल्याचे सन 2024 च्या केपीएमजीच्या अहवालात म्हटले आहे. जगभरातील निवृत्तीवरील योजनांच्या संकेतास तडा देत प्रथमच, सहा ते अठरा या वयोगटातील सर्व मुलांसाठी सरकारने तयार केलेली ही निवृत्तीवेतन योजना आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या एनपीएस वात्सल्य आणि लाडकी बहीण या योजनांशी त्याची काहीशी तुलना होऊ शकते. एनपीएस वात्सल्य ही निवृत्ती योजना असली तरी त्यातील वर्गणी केवळ पालकांनी भरायची आहे बालक सज्ञान झाले की त्यांनी तिचे एनपीएस मध्ये रूपांतर करायचे आहे तर पात्रता पूर्ण केलेल्या लाडक्या बहिणींना सरकारकडून दरमहा रक्कम मिळते. जर्मनीतील प्रस्तावित असलेल्या या योजनेनुसार शाळेत जाणाऱ्या प्रत्येक पात्र मुलांना सरकारकडून दरमहा दहा युरो मिळतील. पालक त्याच्या इच्छेनुसार त्यात रक्कम जमा करू शकतील. सरकारकडून
एकूण जास्तीतजास्त बारा वर्षाच्या कालावधीत प्रत्येक मुलाला एकूण 1440 युरो मिळू शकतील. ही निवृत्ती योजना असल्याने पुढे 60 वर्षे त्यात सातत्याने चक्रवाढ गतीने वाढ होत राहील कारण जर्मनीत 67 हे सन 1964 नंतर जन्मलेल्या नागरिकांचे निवृत्तीचे वय आहे. स्वेच्छानिवृत्ती 45 वर्षे पूर्ण झाल्यावर घेता येते अशी तेथे तरतूद आहे. या निवृत्तीनिधीत जमा होणारी रक्कम सरकारतर्फे भांडवल बाजारात गुंतवली जाईल. मुलाचे पालक त्यात स्वेच्छेने रक्कम जमा करू शकतील. लाभार्थी मूल अठरा वर्षाचे झाल्यावर त्यात त्यांना स्वकमाईची रक्कम भरण्याची परवानगी मिळेल. या मध्ये जमा रकमेवर कर सवलत मिळेल तसेच त्यातील नियमांनुसार सुयोग्य कारणासाठी पैसे काढूनही घेता येतील. योजनेस लवकर सुरुवात झाल्याने अधिक रक्कम जमा होऊन दीर्घकाळात त्यात लक्षणीय वाढ होईल.
योजनेच्या समर्थकांचे असे म्हणणे आहे की- ●यामुळे मुलांना लहान वयातच आर्थिक साक्षरतेची शिकवण मिळेल. लहानपणापासून आर्थिक संकल्पनांची ओळख करून देणं ही काळाची गरज आहे. ही योजना मुलांना पैसे, गुंतवणूक आणि बचत यांचे महत्त्व समजून घेण्यास मदत करू शकते.
●चक्रवाढव्याज, गुंतवणूक आणि बचत यांचे महत्व समजेल. मुलांचा आर्थिक बाजारपेठ, दीर्घकालीन भांडवल सुरक्षितता या संकल्पनाशी परिचय होईल. वयाच्या अगदी सुरुवातीपासूनच बचत सुरू केल्यामुळे व्याजाच्या चक्रवाढीचा अधिक फायदा मिळेल. परिणामी, निवृत्तीच्या वेळी त्यांनी पुरेसा निधी साठवलेला असेल.
●ज्या घरांमध्ये मुलांबरोबर बचत गुंतवणूक या विषयावर चर्चाच होत नाही तेथे ती होण्याची सुरुवात होईल.
●वाढत्या वृद्ध लोकसंख्येमुळे सरकारी निवृत्ती निधीवर ताण वाढत आहे. जर प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्याच योजनेत बालवयात लवकर बचत सुरू केली, तर भविष्यात सरकारी यंत्रणेवरचा अतिरिक्त भार कमी होऊ शकतो.
सीएनबीसी मेकच्या अहवालानुसार, ●आपल्याकडील सरकारच्या वादग्रस्त ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणे जर्मनीतील अनेक लोकांना ही योजना विसंगत वाटते. त्यांना केवळ प्रतिकात्मक दृष्ट्या ही योजना शक्तिशाली वाटत असली तरी वास्तविक जगात अनेक वर्षांनी त्याचे मूल्य फारसे नसेल असे वाटते. त्यामुळे तेथे जमलेल्या निधीचे वास्तविक मूल्य कमी असल्याने त्यातून अर्थपूर्ण निवृत्ती निधी जमा होण्याची शक्यता कमी वाटते.
●हे केवळ बचत खाते असल्याने आणि त्यातून गुंतवणूक केली गेल्याने त्यामागील गुंतवणूक निर्णय समजून घेऊन आर्थिक साक्षरता वाढेल का? याबाबत अनेक मान्यवरांना शंका आहेत. ●काही तज्ज्ञांचे मत आहे की इतक्या लहान वयात पैशांबद्दलची जबाबदारी देणे मुलांवर मानसिक दडपण अणू शकते.
●काही समीक्षक असे म्हणतात की ही योजना केवळ एक ‘feel good’ वातावरण निर्माण करण्यासाठी आहे. प्रत्यक्षात या योजनेचा सर्वसामान्य कुटुंबांवर फारसा परिणाम होणार नाही.
●अशा लहान मुलांसाठी स्वतंत्र निवृत्ती योजना तयार करणे, तिचे व्यवस्थापन करणे व पालकांना प्रोत्साहित करणे हे प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरू शकतं.
काही अर्थतज्ज्ञ याला पुढील पिढीसाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजनाची चांगली सुरुवात मानतात. ही योजना प्रत्यक्षात राबवायला अत्यंत कठीण आहे, विशेषतः जेव्हा सामाजिक आणि मानसिक बाबी लक्षात घेतल्या जातील. ‘आरडब्ल्यूआय लीबनिझ इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक रिसर्च’ चे प्रमुख ‘क्रिस्टोफ श्मिट’ आणखी एक पाऊल पुढचा विचार करतात. त्यांना हा प्रस्ताव मुळातून दोषपूर्ण वाटतोय आणि शैक्षणिकदृष्ट्याही ते चुकीचे आहे असे वाटते. बचतीचा मूळ गाभा - उद्याच्या चांगल्यासाठी आजचा त्याग करणे- यातून हरवला आहे, असे त्यांना वाटते. मुलांना निवड करण्याची किंवा त्याग करणे म्हणजे काय हे समजून न घेता, निष्क्रियपणे निधी मिळत असल्याने, बचतीचा खरा हेतू त्यातून हरवला जात असल्याचे वाटते. श्मिट पुढे म्हणतात की, माफक आर्थिक परताव्याच्या आशेने असे प्रयोग करण्यापेक्षा सध्याची राष्ट्रीय शिक्षण प्रणाली सुधारण्यासाठी तेच पैसे खर्च करणे अधिक योग्य होईल.
जर्मनीची लवकर सुरू होणारी ही पेन्शन योजना, निवृत्ती नियोजन आणि आर्थिक शिक्षणासाठी एक नवीन दृष्टिकोन आहे यात शंका नाही. ती निश्चितच महत्त्वाकांक्षेत दूरदर्शी वाटते. पुढच्या पिढीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि बचतीबद्दल समाजाच्या विचारांना आकार देणारी वाटते. त्याचबरोबर ती परिणामकारकता, प्रतीकात्मकता विरुद्ध वस्तुस्थिती आणि मुलांना निवृत्ती बचत योजनेत सरकारकडून पैशाचे वाटप केल्याने त्यांना पैशाबद्दल खरोखर काही अर्थपूर्ण शिकवले जाईल का? याबद्दल गंभीर प्रश्न देखील उपस्थित करते. सर्व जग म्हणूनच या अभिनव आर्थिक प्रयोगाकडे पाहत असताना, एक गोष्ट निश्चित आहे - जर्मनीची मुले लवकरच या ग्रहावरील निवृत्तीसाठी तरतूद करणारे सर्वात तरुण गुंतवणूकदार बनू शकतात. ‘लवकर निवृत्तीवेतन सुरुवात’ ही संकल्पना आकर्षक वाटत असली, तरी तिच्या यशासाठी ठोस अंमलबजावणी, पालकांचे सहकार्य आणि शैक्षणिक पातळीवर सखोल आर्थिक साक्षरतेचा समावेश असावा लागेल. सध्या तरी ही योजना केवळ प्रस्तावित आहे आणि भविष्यात तिच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेवरच तिच्या यशाचे मोजमाप अवलंबून आहे. तेव्हा जर्मनीतील नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक म्हणून वाढतील की त्यांना कधी तरी निवृत्तीसाठी तरतूद करावी लागते, हेच विसरतील?
हे केवळ फक्त येणारा काळ (जो सहा दशके एवढा दीर्घ आहे) ठरवेल.
उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत. याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकर म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
6 जून 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
डब्बा ट्रेडिंग
#डब्बा_ट्रेडिंग
कर चुकवण्यासाठी अनेक छोटे मोठे व्यवहार रोखीत होत असतात हे आपल्याला माहीत आहे. अधिकाधिक लोकांनी आपले सर्वच व्यवहार जाहीर करून त्यावर असलेल्या सवलतींचा लाभ घेऊन देय कर भरावा अशी सरकारची इच्छा असते. त्याप्रमाणे सर्वांनी प्रामाणिकपणे कर भरल्यास विकासासाठी मुबलक पैसा उपलब्ध होऊन भविष्यात कर दर कमी होऊ शकतील. कर संकलन वाढवण्याचा उपाय म्हणून सरकार अनेक उत्पन्न आणि खर्च यावर टीडीएस, टीसीएस लागू करते. हा एक प्रकारचा अग्रीम कर असुन त्यामुळे संबंधित व्यक्ती आपले उत्पन्न जाहीर करून नियमानुसार कर भरेल अशी अपेक्षा असते. भविष्यात सर्वच रोखीचे व्यवहार पूर्णपणे बंद करून अथवा त्यावर काही कर लावणे शक्य आहे परंतु त्यात असंख्य अडचणी आहेत. अजूनही अनेक लोक विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि अशिक्षित लोक ऑनलाइन व्यवहार करीत नाहीत. त्यांना ते तितकेसे सोपे आणि सुरक्षित वाटत नाहीत यासंबंधीत तक्रारी समाधानकारक रित्या सुटतील अशी ठोस यंत्रणा नाही. याचबरोबर आज अनेक असे व्यवसाय आहेत ज्यात रोखीचे अधिकाधिक व्यवहार होतात. हे व्यवहार करणारे व्यावसायिक सर्वच राजकीय पक्षातील राजकारणी लोक करत असल्याने ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांचे यासंबंधात हितसंबंध जपले जावेत याबाबत ते अत्यंत दक्ष असतात. जोपर्यंत त्यांना असे वाटते तोपर्यंत त्यात बदल होणे जवळपास अशक्य आहे. आज जीएसटी लागू झाल्यावर कर संकलन वाढत असले तरी सर्व घाऊक
नियमित व्यवहारांबरोबर जवळपास तेवढेच व्यवहार रोख रकमेत होतात हे उघड सत्य आहे. ते बदलण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि त्यासाठी त्याच्यावर जनतेचा दबाव या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. जोपर्यंत राजकारणी आणि जनता यांचे हे साटेलोटे असेच राहील तो पर्यंत यात मोठा फार काही बदल होईल असे वाटत नाही.
इतर बाजारांप्रमाणे शेअरबाजार, वस्तुबाजार आणि चलन बाजारात होणाऱ्या नियमित व्यवहारांशीवाय समांतर असे व्यवहार फार पूर्वीपासून होत आहेत. हे व्यवहार प्रामुख्याने रोखीत आणि विश्वासावरच होत असतात. सूचिबाह्य शेअर्सची खरेदी विक्री करणारे काही मंच आपण मागील काही लेखात पाहिले, असे मंच अधिकृत असून त्यावर व्यवहार करण्यास बंदी नाही. या व्यवहारांवर कमी नियामक बंधने असली तरी पारदर्शक पद्धतीने आणि अधिकृतपणे होतात. त्यावर कर आकारणी कशी होणार तेही आपल्याला माहिती आहे. मान्यताप्राप्त बाजारात होणारे व्यवहार हे करार असतात आणि ते पूर्ण करणे संबंधितांवर बंधनकारक असते या व्यवहार पुर्ततेची हमी बाजार नियामक मंडळावर असते. कोणत्याही कारणाने ते पूर्ण झाले नाहीत तर त्यांची भरपाई कशी करायची यांचे निश्चित नियम असल्याने ते अधिक सुरक्षित असतात. याशिवाय अन्य ठिकाणी जर समांतररित्या असे व्यवहार होत असतील तर त्यास डब्बा ट्रेडिंग असे म्हणतात. यात प्रामुख्याने पैजेचे व्यवहार होतात. या पैजा प्रत्यक्षात खरेदी विक्री न करता भविष्यातील विशिष्ट वेळी, दिवशी, शेअरचा भाव, निर्देशांक, सोने चांदी यासारख्या मौल्यवान वस्तूंचा भाव, डॉलरचा भाव एवढा असेल अशा स्वरूपाच्या असतात. या पैजा अत्यंत कमी पैशांची हमी देऊन लावता येतात आणि त्यांचे समायोजन पूर्वी आणि आजही प्रामुख्याने रोख पद्धतीने होते. पूर्वी ही पैजेची रक्कम डब्यात, खोक्यात अथवा बादलीत ठेवण्यात येत असल्याने त्यास डब्बा ट्रेडिंग, बॉक्स ट्रेडिंग आणि बकेट ट्रेडिंग असे नाव पडले असण्याची शक्यता आहे. आता काही व्यवहार डी मॅट खात्याचा वापर करून आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन पद्धतीनेही केले जात आहेत. डब्बा ऑपरेटरशी संपर्क करून असे व्यवहार करायचे असल्याचे तोंडी अथवा अन्य कोणास शोधाता येणार नाही अशा पद्धतीने कळवण्यात येते, काही रक्कम देण्याच्या बोलीवर व्यवहार निश्चित केला जातो, यातील किंमती नियमित बाजारा बरोबर ताडण्यात येतात, त्यात जिकल्यास ठरलेली रक्कम देण्यात येते रोख रक्कम त्रितीयपक्षी मध्यस्थाच्या माध्यमातून दिली घेतली जात असून केवळ विश्वासावर हे व्यवहार केले जातात. यास कायद्याचे कोणतेही पाठबळ नसल्याने, एक प्रकारे तो मालमत्तेतील किमतीच्या चढ उतारावर आधारित असा जुगार आहे.
■मान्यताप्राप्त बाजार, सूचिबाह्य शेअर्स खरेदीविक्री मंच, डब्बा ट्रेडिंग यांची तुलना-
●कायदेशीरपणा: मान्यताप्राप्त बाजार आणि सूचिबाह्य शेअर्सच्या व्यवहारांचे मंच कायदेशीर असल्याने सुरक्षित आहेत. डब्बा ट्रेडिंग मंच बेकायदेशीर आहेत.
●व्यवहार व्यवस्था: बाजार आणि सूचिबाह्य शेअर्स मंच यावरील व्यवहार निश्चित नियमाने होतात. यावरील ग्राहकांची नोंद ठेवली जाते. ओळख पटवली जाते व्यवहार पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होतात. डब्बा ट्रेडिंग व्यवहार त्यांचे जरी काही नियम असले तरी ते बहुतेक रोख रकमेत आणि केवळ विश्वासावर होतात. त्याचे समायोजन डब्बा ट्रेडिंग ऑपरेटरद्वारे केले जाते.
●नियामक देखरेख: बाजार व्यवहारावर सेबीचे पूर्ण नियंत्रण असून सूचिबाह्य शेअर्स व्यवहार कमी नियंत्रणात आहेत. डब्बा ट्रेडिंग हे सेबीच्या नियामक यंत्रणेत येत नाहीत.
●कर आकारणी: बाजार व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून मान्यताप्राप्त बाजारात अल्प आणि दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर विशेष दराने कर आकारणी केली जाते. सुहीबाह्य शेअर्सवरील भांडवली नफ्यावर अन्य मालमत्तांप्रमाणे दोन वर्षानंतर विशेष दराने कर आकारणी केली जाते. डब्बा ट्रेडिंग व्यवहार अधिकृतपणे नोंदले जात नसल्याने त्यावर कोणताही कर दिला जात नाही.
●जोखीम तीव्रता: आधी सांगितल्याप्रमाणे बाजारातील व्यवहार अधिक सुरक्षित असल्याने त्यातील जोखीम अत्यंत कमी असते. सूचिबाह्य शेअर्सच्या व्यवहारांचे मंच विविध परवानग्या घेऊन हे व्यवहार करीत असल्याने आता त्यातील जोखीम खूप कमी झाली आहे. डब्बा ट्रेडिंग व्यवहार बेकायदेशीर असल्याने त्यात फसवणूक, त्याचप्रमाणे त्यात भाग घेतल्याबद्दल कायदेशीर कारवाई आणि शिक्षा होऊ शकण्याची शक्यता आहे.
■अन्य व्यवहार आणि डब्बा ट्रेडिंग यातील मुख्य फरक:
●पारदर्शकतेचा अभाव: डब्बा ट्रेडिंग पारदर्शक पद्धतीने होत नाही. त्यामुळे त्यात फसवणूक होण्याची शक्यता असते.
●गुंतवणूकदार संरक्षणाचा अभाव: हे व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर असल्याने यातील फसवणुकी संदर्भात गुंतवणूकदार ग्राहकांना कुठेही दाद मागता येत नाही.
●कर आकारणी: या व्यवहारावर कोणतीही कर आकारणी होत नाही किंबहूना असे व्यवहार कर चुकवण्यासाठीच केले जातात.
●व्यवहार समायोजन: यातील व्यवहारांचे समायोजन संबंधित डब्बा ऑपरेटरकडून केले जाते.
थोडक्यात,
डब्बा ट्रेडिंग ही नियमित बाजार अथवा अधिकृत मंचाबाहेर केल्या जाण्याऱ्या बेकायदेशीर व्यवहारांची प्रक्रिया आहे.
प्रत्यक्ष शेअर्सची खरेदी विक्री न करता भावातील फरकाचा लाभ देणारे, दलाली न आकारणारे, कमी भांडवलावर कित्येक पटीत व्यवहारांची परवानगी देणारे, बाजार संचाहून वेगळ्या संचात / तुकड्यात खरेदी विक्री करता येणारे, पैज लावण्याची परवानगी देणारे, त्वरीत पैसे देण्याची व्यवस्था करणारे, अधिकाधिक लोक वापरत असलेले, 24 तास कार्यरत असणारे, आणि आता तंत्रज्ञानाचा वापरुन ग्राहकस्नेही व्यवहार पर्याय उपलब्ध करून देणारे असून डब्बा ट्रेडिंग ब्रोकर आणि त्यांचे मंच समाज माध्यमावर उघडपणे जाहिराती प्रकाशित करीत असतात. सहज गुगल सर्च केलं असता, भारतातील प्रमुख डब्बा ट्रेडरची मिळालेली नावे अशी-
ट्रेडेक्स लाइव, एरो ट्रेड, व्ही मनी, व्हेंटज मार्केट, डब्बा ट्रेडिंग, स्काय ट्रेड, आवाज शेअर्स, डब्बा ट्रेडिंग कस्ट माइज, एलिट फॉर्च्युन, ट्रेड पाल अशी 10 आघाडीची नावे सहज मिळाली. यांची अँप्स आणि संकेतस्थळेही आहेत, यातील ‘व्यवहार किमान पैशांत कमाल व्यवहार’ या तत्वांवर आधारित असल्याने ते व्यक्तींमधील जुगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देतात. यास कायदेशीर संरक्षण नसल्याने गुंतवणूकदराचे नुकसान होऊन कायदेशीर समस्या उद्भवू शकतात. प्रतिभूती करार नियमन कायदा 1956 च्या (SCRA) कलम 23 (1) नुसार प्रतिभूती व्यवसायासाठी प्रचार करणे, बोली किंवा देकार देण्यासाठी लोकांना एकत्र करणे, कायद्यातील कलमांचे पालन न करणे आणि प्रतिभूती अपील न्यायाधिकरणाच्या आदेशांचे पालन न करणे यांचा समावेश आहे त्यामुळे असे व्यवहार करणे बेकायदेशीर आहे त्याचप्रमाणे भारतीय न्याय संहिता 2023 (BNS) च्या कलम 410 (विश्वासाचा भंग) आणि 318(फसवणूक आणि कट) नुसारही गुन्हेगारी कृत्य आहे. याबद्दल संबंधित व्यक्ती आणि व्यापारी यांना जास्तीत जास्त 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि अथवा ₹ 25 कोटीपर्यत दंडाची शिक्षा होऊ शकते. बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी केवळ माहिती म्हणून डब्बा ट्रेडिंग म्हणजे काय जाणून घ्यावे. हा लेख डब्बा ट्रेडिंगमधील गुंतवणूक आणि त्यांच्याशी संबंधित कोणत्याही मध्यस्तांची शिफारस करीत नाही.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकरणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 30 मे 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
आयटीआर 3 विषयक शंका समाधान
#आयटीआर_3_विषयक_शंका_समाधान….
आयकर रिटर्न फॉर्म (ITR-3) हा अशा व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे व्यापार अथवा व्यवसायातून उत्पन्न मिळते. याशिवाय घरभाडे, भांडवली नफा, पगार किंवा अन्य उत्पन्न आहे, ज्यासाठी सर्वसमावेशक हिशेब पुस्तके राखणे आवश्यक असेल अथवा नसेल. हा सरकारच्या आयकर विभागाने विविध प्रकारच्या उत्पन्न असलेल्या करदात्यांसाठी विहित केलेल्या विविध आयकर रिटर्न फॉर्मपैकी एक आहे. या फॉर्म विषयीच्या शंकाची उत्तरे जाणून घेऊन तो कसा दाखल करता येतो त्याची अधिक तपशीलवार माहिती घेऊया.
◆आयटीआर-3 फॉर्म म्हणजे काय?
~आयटीआर-3 हा भारतात पगार, व्यवसाय आणि अन्य स्रोतांमधून उत्पन्न असलेल्या व्यक्ती आणि हिंदू अविभाजित कुटुंबांसाठी (एचयूएफ) वापरला जाणारा प्राप्तिकर परतावा फॉर्म आहे.
◆आयटीआर-३ कोण दाखल करू शकते?
~उद्योग किंवा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न, पगार किंवा पेन्शनमधून मिळणारे उत्पन्न, घराच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न भांडवली नफ्यातून मिळणारे उत्पन्न, इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न. याशिवाय करदात्याकडे त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांपैकी एक म्हणून मालकी हक्क किंवा व्यवसाय असणे आवश्यक आहे. हा फॉर्म अधिक व्यापक असून करदात्यांना त्यांच्या उत्पन्नाबद्दल आणि विविध स्रोतांमधील कपातींबद्दल तपशीलवार माहिती सादर करण्याची परवानगी देतो. यात विविध विभाग आहेत जिथे करदात्यांना त्याची वैयक्तिक माहिती, एकूण उत्पन्नाची गणना, वेगवेगळ्या स्रोतांमधून उत्पन्नाचे तपशील, वजावट, भरलेले कर आणि त्यांची पडताळणी या संबंधित अनेक तपशील द्यावे लागतात.
◆खालील श्रेणींमध्ये येणाऱ्या करदात्यांकडून आयटीआर-3 दाखल करता येईल.
~पगार अथवा पेन्शन याशिवाय करदाता हा मालक असलेल्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न (ऑडिट आणि नॉन-ऑडिट दोन्ही प्रकरणे)
एकापेक्षा जास्त घरांच्या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न
'इतर स्रोतांमधून उत्पन्न' अंतर्गत येणाऱ्या लॉटरी, घोड्यांच्या शर्यती आणि इतर क्रियाकलाप जिंकून मिळालेली बक्षिसे
भारताबाहेरील देशातील मालमत्तेच्या माध्यमातून उत्पन्न मालमत्ता
अल्पकालीन किंवा दीर्घकालीन भांडवली नफ्यातून मिळणारे उत्पन्न
भागीदारी फर्मकडून मिळालेला मोबदला असे उत्पन्नाचे एकाहून अनेक स्रोत असलेले वैयक्तिक करदाते किंवा असे हिंदू अविभक्त कुटुंब यांना हा फॉर्म भरता येईल.
◆आयटीआर-3 दाखल करण्यास कोण पात्र नाही?
~व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबे वगळता इतर कोणीही आयटीआर-3, फॉर्म भरण्यास पात्र नाहीत. त्याचप्रमाणे-
आयटीआर-1 (सहज), आयटीआर-2 आणि आयटीआर-4 (सुगम) भरणारे करदाते, व्यापार व्यावसायिक अथवा भागीदारीत उत्पन्न नसलेले करदाते हा फॉर्म भरू शकत नाहीत.
◆आयटीआर-3 फॉर्मची रचना काय आहे?
~दरवर्षी फॉर्ममध्ये किरकोळ बदल होत असले तरी अशा नियमित बदलाशिवाय यावर्षी फॉर्मची रचना थोडी बदलली असून त्यातील प्रमुख बदल असे-
●भांडवली नफ्याचे विभाजन: भांडवली नफ्यासंबंधित करदर बदलल्याने 23 जुलै 2024 च्या आधी आणि नंतर झालेल्या विक्रीमुळे मिळालेला भांडवली नफा या वर्षी स्वतंत्रपणे नोंदवावा लागेल.
●बायबॅक तोटा: 1 ऑक्टोबर 2024 पासून, शेअर बायबॅक म्हणून मिळालेली रक्कम लाभांश समजून त्यावर इतर स्रोतापासून मिळालेले उत्पन्न मानून कर आकारला जाणार असून सदर शेअर खरेदी करण्यासाठी मोजलेली रक्कम भांडवली तोटा म्हणून मान्य केली जाणार आहे.
●मालमत्ता प्रकटीकरण मर्यादेत वाढ: आता मालमत्ता आणि दायित्वे नोंदवण्याची मर्यादा ₹1 कोटी (पूर्वी ₹50 लाख) पेक्षा जास्त असेल तरच आवश्यक आहे.
●नवीन कलम ४४बीबीसी: क्रूझ व्यवसाय ऑपरेटरसाठी लागू केले आहे. या कलमाअंतर्गत, प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या 20% रक्कम करपात्र उत्पन्न म्हणून गणली जाते.
●अधिक कपात तपशील: 80C, 10(13A), इत्यादी अंतर्गत दाव्यांसाठी तपशीलवार अहवाल आवश्यक आहे. कलम 80 सी, कलम 10 (13 ए)
●घरभाडे भत्ता आणि इतर संबंधित कलमांखाली कपातीचा दावा करणाऱ्या करदात्यांना आता आयटीआर-3 फॉर्ममध्ये अधिक बारकाईने माहिती द्यावी लागेल.
●टीडीएस विभाग कोड: व्यवसायाच्या स्वरूपावरून आणि त्याच्या उपविभागावरून ज्या अंतर्गत कर कापला गेला त्याचा नेमका व्यवसाय कोड भरणे आवश्यक आहे. यासाठी विविध व्यवसायांचे कोड आयकर विभागाने जाहीर केले असून ते त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
●कलम 80 सी खालील गुंतवणूक खर्च आणि कलमनिहाय टीडीएस टिसीएस रिपोर्टिंग सारख्या कपातींसाठी स्वतंत्र तपशील देणे सुरू करण्यात आले आहे.
यामुळे सादर करण्यात आलेल्या माहितीत पारदर्शकता, अचूकता येऊन विवरणपत्र दाखल करणे सोईचे होईल.
◆आयटीआर 3 दाखल करण्यास आवश्यक कागदपत्रे-
~पॅन, आधार, बँक खात्यांची माहिती, पगार मिळत असल्यास फॉर्म 16, गुंतवणूक तपशील, हिशोब पुस्तके.
◆आयटीआर 3, विवरणपत्र दाखल करण्याचे सर्वसाधारण टप्पे -
●विभागाच्या संकेतस्थळावर विवरण भरण्यासाठी लॉग इन करणे
●आपल्या खात्यास पॅन लिंक करणे
●वैयक्तिक माहिती- जसे की, नाव, पत्ता, पॅन, आधार, करदात्याचा प्रकार इ माहिती देणे
●उत्पन्नाचे स्रोत- विविध व्यवसाय त्यातून मिळालेला नफा त्यासंबंधित इतर तपशील, पगार पेन्शन घरभाडे भांडवली नफा अन्य उत्पन्न याचा तपशील आणि
केलेली गुंतवणूक आणि खर्च यांची विस्तृत माहिती द्यावी लागेल.
●भरलेल्या अथवा मुळातून कापलेल्या कराचा तपशील: यांची तपशीलवार माहिती द्यावी.
●इतर आवश्यक खुलासे : नियमानुसार इतर आवश्यक ते खुलासे करावे लागतील.
●करदेयता: सारांश पहा, तुलना करा आवश्यक असल्यास करमोजणी करण्याच्या पद्धतीत बदल केल्यास करामध्ये काय फरक पडतो तो पहावा आणि योग्य करप्रणाली निश्चित करावी. *नवी कर प्रणाली एकदा स्वीकारली की त्यात बदल करता येत नाही.* हे लक्षात ठेवूनच ती स्वीकारावी अथवा नाकारावी.
●दिलेली माहिती खरी असल्याचे प्रकटीकरण करावे
●आवश्यक असल्यास कर भरणा करावा
●यानंतर आयकर विभागाच्या पोर्टलवर विवरणपत्र सादर करून त्यांचे सत्यापन करावे. असे सत्यापन तीस दिवसात न केल्यास विवारणपत्र दाखल केले नाही असे समजण्यात येते. त्यामुळे यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.
असे यातील सर्वसाधारण टप्पे आहेत
स्वतः आपले आयटीआर 3 दाखल करणे गोंधळात टाकणारे आणि त्रासदायक असू शकते. ते बरेच क्लिष्ट असल्याने, विशेषतः सामान्य लोकांसाठी, पुढील दंड आणि सूचना टाळण्यासाठी कर व्यावसायिकाची मदत घेणे उचित आहे. त्याच्याकडून तुमच्या कर प्रश्नांचे निराकरण करताना तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या वजावटीचा जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल ते पहाणे जरुरीचे आहे.
◆आपण व्यावसायिक मदतीशिवाय आयटीआर 3 दाखल करू शकतो का?
~हो, जर तुम्हाला तुमच्या खात्यांचे लेखापरीक्षण करण्याची आवश्यकता नसेल तर तुम्ही कोणत्याही व्यावसायिक मदतीशिवाय आयटीआर 3 दाखल करू शकता. तथापि, हा फॉर्म अतिशय किचकट असल्यामुळे आयटीआर स्वतः दाखल करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि कठीण असू शकते म्हणून तुमचे अचूक आयटीआर दाखल करण्यासाठी कर व्यावसायिकांचा सल्ला घेणे अधिक योग्य होईल.
✍️उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकरणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 23 मे 2025 रोजी पूर्वप्रकाशित.
Subscribe to:
Posts (Atom)