Friday, 25 July 2025
दीपस्तंभ भाग दोन
#दीपस्तंभ_भाग_दोन
यापूर्वीच्या भागात गुंतवणूक तज्ज्ञ आणि शेअरबाजारातील विचारवंत यांची थोडक्यात ओळख आणि विचार जाणून घेतले या भागात अर्थशास्त्रज्ञ आणि समाजाभिमुख विचार करणारे काही विचारवंत यांची ओळख आणि विचार जाणून घेऊयात.
■अर्थशास्त्रज्ञ व वित्तविषयक विचारवंत
7. रिचर्ड थेलर (Richard Thaler)
नोबेल पुरस्कार विजेते. ‘Behavioral Economics’ चे संस्थापक सदस्य. ‘Nudge’ या पुस्तकात त्यांनी मानवी मानसशास्त्र हे त्यांच्या गुंतवणुकीवर कसा प्रभाव टाकते ते स्पष्ट केले आहे.
थेलर यांचे विचार-
●वर्तणूक अर्थशास्त्राचे गृहितक असे आहे की लोक पारंपरिक अर्थशास्त्र मानते त्यापेक्षा खूप कमी शहाणे असतात.
●कोणाला काही करायला प्रवृत्त करायचं असेल, तर ते आधी सोपं करा.
●आपण विचार करणाऱ्या भावना नाही तर भावना असलेले विचार करणारे यंत्र आहोत.
●लोक अल्पकालीन तोट्यांना अधिक महत्त्व देतात आणि दीर्घकालीन नफ्यांकडे दुर्लक्ष करतात.
●शेअरबाजार हा गोष्टी सांगणारे मशीन आहे. त्यातील कथा या भावनांपेक्षा जास्त किंमत ठरवतात.
●तोटा सहन करता येणे ही भावना, नफ्याच्या आनंदापेक्षा दुप्पट तीव्र असते.
●बचत ही कठीण असते कारण आपण फक्त आत्तावर लक्ष केंद्रित करतो, पुढचं विसरतो.
●एक चांगला हलका धक्का अथवा प्रोत्साहन म्हणजे असा पर्याय जो लोकांना त्यांचे निर्णय स्वातंत्र्य राखून चांगला निर्णय घेण्यास मदत करतो.
●फक्त अधिक माहिती देऊन लोकांचे अज्ञान दूर करता येत नाही.
●बाजार कितीही काळ असह्य वाटेल इतका गैरवर्तन करत राहू शकतो.
8. रॉन चर्नो (Ron Chernow)
प्रसिद्ध इतिहासकार व चरित्रलेखक. J.P. Morgan, Rockefeller आणि Alexander Hamilton यांच्यावर चरित्रे लिहिली. भांडवलशाहीचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाचे योगदान.
चेर्नो यांचे विचार:
●वॉल स्ट्रीटचा इतिहास म्हणजे सट्टा आणि भ्रम यांची एक साखळी आहे.
●बाजार अनेकदा तर्काने नव्हे तर केवळ भावनांनी चालवले जातात.
●आर्थिक इतिहास हा अमेरिकन शिक्षणातील सर्वात दुर्लक्षित विषय आहे पण भांडवलशाही समजून घेण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे.
●प्रत्येक आर्थिक फुगवटा आनंदात सुरू होतो आणि नैराश्यात संपतो.
●वॉल स्ट्रीट हा केवळ आर्थिक आकड्यांचा नाही तर मानवी मानसिकतेचाही खेळ आहे.
●भांडवलशाही ही एकाच वेळी सर्जनशील आणि विध्वंसक असते.
●शेअरबाजार नेहमी अती आशावाद आणि अती निराशावाद यामध्ये वरखाली होत असतो.
●सर्वात वाईट आर्थिक संकटे तेव्हाच उद्भवतात, जेव्हा लोक म्हणतात यावेळी वेगळं आहे.
●महान संपत्ती केवळ मार्केटचे वेळेवर भाकीत करून नव्हे, तर जग बदलणाऱ्या कंपन्या उभ्या करून मिळवली जाते.
●सुज्ञ निर्णय घेणे आणि संयम बाळगणे वॉल स्ट्रीटवर धाडसापेक्षा दुर्मिळ आहे.
9. पॉल क्रुगमन (Paul Krugman)
नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ आणि न्यूयॉर्क टाईम्सचे स्तंभलेखक. आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक भौगोलिक रचना आणि समाजवादी अर्थधोरणांचा समर्थक.
त्यांचे विचार-
●बाजार व्यवस्था ही कायद्याच्या चौकटीत चालणारी सामाजिक सहकार्य आणि परस्पर फायद्यांची प्रणाली आहे.
●आर्थिक व्यवस्थेमध्ये आत्मविश्वास सर्व काही आहे.
●शेअरच्या किंमती वास्तवापेक्षा मानसिकतेने जास्त ठरवल्या जातात.
●अर्थशास्त्र म्हणजे नैतिकतेचा पाठ नाही. ते परिणाम आणि कारणांबद्दल आहे.
●आर्थिक बाजारात सुरक्षिततेचा आभास होणं सर्वात धोकादायक असतो.
●लोक सध्याची स्थिती भविष्यातही तशीच राहील असे गृहित धरतात त्यामुळेच बबल तयार होतात.
●अदृश्य हाताला अनेकदा भटकू नये म्हणून दृश्यमान हाताची गरज असते.
●तेजी आणि मंदी हे भांडवलशाहीचे भाग आहेत पण चुकीची धोरणं त्यांना अधिक वाईट बनवतात.
●जर गुंतवणूक इतकीच सोपी असती, तर सगळेच श्रीमंत झाले असते.
●अर्थशास्त्रज्ञांना खूप काही कळत नाही, पण ते इतरांना काहीच कसं कळत नाही असं वाटायला लावतात.
■विकास व समाजाभिमुख अर्थव्यवस्थेचे तज्ञ
10. चार्ली मंगर (Charles Munger)
बर्कशायर हाथवेचे उपाध्यक्ष आणि वॉरेन बफे यांचे दीर्घकालीन भागीदार होते Mental Models आणि व्यवहारिक तर्कशास्त्र यांचा पुरस्कार करणारे गुंतवणूकदार. संयम, सुलभता आणि उलट सुलट तपासणी या तत्त्वांचा पुरस्कार.
त्यांचे विचार-
●मोठा पैसा केवळ खरेदी किंवा विक्रीत नसतो तर तो थांबण्यात असतो.
●प्रत्येक दिवस आपण कालपेक्षा थोडं अधिक शहाणं व्हावं, हे प्रयत्न करत रहा.
●प्रत्येक समस्या उलट करून पहा. उलटा विचार करा.
●फार मोठा फायदा आपण फक्त एक गोष्ट करून मिळवतो तो म्हणजे मूर्खपणा.
●योग्य किमतीला चांगली कंपनी घेणं, उत्तम किमतीत साधारण कंपनी घेण्यापेक्षा केव्हाही चांगलं.
●शहाणा माणूस नेहमी अदृश्य गोष्टी शोधतो, स्पष्ट दिसणाऱ्या नव्हे.
●जे तुम्हाला माहीत नाही, ते स्वीकारणं ही खऱ्या शहाणपणाची सुरुवात आहे.
●आज जगात जे काही चाललं आहे ते जर तुम्हाला गोंधळात टाकत नसेल याचा अर्थ तुम्ही त्याला समजून घेत नाही.
●झुंडीचा पाठपुरावा केला, तर तुम्ही नेहमीच सरासरीकडे परतता.
●एक साधी कल्पना घ्या आणि ती गंभीरतेने अमलात आणा.
11. अभिजीत बॅनर्जी (Abhijit Banerjee)
MIT मधील प्राध्यापक आणि नोबेल पुरस्कार विजेते. ‘Poor Economics’ या पुस्तकाचे सहलेखक. विकास आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी ‘Randomized Control Trials’ वापरणारे पहिले अर्थशास्त्रज्ञ.
त्यांचे विचार-
●विकास म्हणजे मोठे आराखडे नव्हेत, तर एकावेळी एक समस्या सोडवणं.
●बाजार अनेक वेळा अपयशी ठरतो. म्हणूनच सरकारांनी हस्तक्षेप करावा लागतो.
●गरीब असहाय नसतात. ते अत्यंत काटेकोर निर्णय घेतात.
●सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न ही कल्पना नक्कीच चाचपून पाहण्यासारखी आहे.
●अर्थशास्त्रीय मॉडेल्स नेहमी माणसांच्या वर्तनाचं अचूक चित्रण करत नाहीत.
●दारिद्र्याशी लढण्यासाठी मतप्रवाह नव्हे, प्रयोग आणि पुरावे लागतात.
●छोट्या बदलांमुळे मोठी परिणामकारकता येऊ शकते.
●आपल्याला दारिद्र्याचं गौरवीकरण थांबवून, गरीब लोकांचे म्हणणे ऐकायला हवे.
●प्रेरणा (incentives) महत्त्वाच्या आहेत, पण संदर्भ (context) त्याहून महत्त्वाचा आहे.
●फक्त आर्थिक वाढीने विषमता नाहीशी होत नाही.
12. मोहम्मद युनूस (Muhammad Yunus)
बांगलादेश ग्रामीण बँकेचे संस्थापक आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते. मायक्रोफायनान्स व "Social Business" या संकल्पनांचा प्रचार केला. गरीबांना आर्थिक सशक्तता देण्याचे कार्य केले. सध्या बंगला देशाचे हंगामी अध्यक्ष.
त्यांचे विचार-
●गरीब माणसं म्हणजे बोन्साय वृक्षासारखी आहेत. बीज चांगलं असतं, पण समाजाने त्यांना वाढण्यासाठी जागा दिली नाही.
●कर्ज (क्रेडिट) मिळणं हा मानवी हक्क आहे.
●जर प्रत्यक्षात आणण्याची इच्छा असेल तर जगात गरिबी नसलेली व्यवस्था आपण सहज तयार करू शकतो.
●दान हे गरिबीचे उत्तर नाही. दान केवळ गरिबी टिकवून ठेवतं.
●पैसे कमवणं म्हणजे आनंद तर इतरांना आनंद देणं म्हणजे त्याहून श्रेष्ठ आनंद.
●आपल्यापैकी प्रत्येकात अपार क्षमता आहे. मायक्रोक्रेडिट त्या क्षमतेला मोकळं करतं.
●सामाजिक व्यवसाय म्हणजे नफ्याचा विचार न करता समस्या सोडवणं.
●गरिबी लोकांनी निर्माण केली नाही तर ती आपण बनवलेल्या व्यवस्थेमुळे निर्माण झाली आहे.
●अर्थव्यवस्था ही लोकांसाठी असावी, लोकं अर्थव्यवस्थेसाठी नाहीत.
●तुम्ही जर वेगळी कल्पना करू शकत असाल तर ती शक्य देखील करू शकता. (समाप्त)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायतीचे या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
Friday, 18 July 2025
दीपस्तंभ भाग एक
दीपस्तंभ_भाग_एक
अर्थशास्त्रात गुंतवणुकीचा अभ्यास करताना गुंतवणूक तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजाभिमुख विकास व्यवस्थेचा विचार करणारे म्हणून अनेक मार्गदर्शकांची नावे पुढे येतात. त्यातील निवडक व्यक्तींचा आणि त्या प्रत्येकाचा त्यांच्या विषयावरील मौलिक विचारांचा थोडक्यात मागोवा घेण्याचा हा प्रयत्न. त्यांचे विचार आपल्याला नक्कीच दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करतील आणि प्रेरणा देतील.
■गुंतवणूक तज्ज्ञ आणि शेअरबाजार विचारवंत
1. वॉरेन बफे (Warren Buffett)
बर्कशायर हाथवे या अमेरिकन गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष (या वर्षअखेर या पदावरून ते निवृत्त होत आहेत), गुंतवणुकीचे चालते बोलते विद्यापीठ आणि ‘ओरेकल ऑफ ओमाहा’ या टोपणनावाने प्रसिद्ध. दीर्घकालीन मूल्याधारित गुंतवणुकीचे समर्थक आहेत. मजबूत पायाभूत तत्त्वांवर चालणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणुक करण्यावर त्यांचा भर असतो.
बफे यांचे विचार-
●इतर लोक अधिक फायदा होईल या लोभाने शेअर्स खरेदी करत असतील तेव्हा घाबरून विक्री करा आणि जेव्हा सगळे घाबरून विक्री करीत असतील, तेव्हा खरेदी करा.
●शेअर बाजाराची रचना ही सक्रिय गुंतवणूकदारांकडून संयमी गुंतवणूकदारांकडे पैसा हस्तांतरित करण्यासाठी केली आहे.
● तुम्ही खरेदीसाठी देता ती किंमत आणि विक्री करून मिळवता ते मूल्य.
●शेअर कायमस्वरूपी ठेवायला आवडतात.
●ज्या कंपनीत गुंतवणूक केल्यावर पुढची दहा वर्षे बाजार बंद राहिला तरी चालेल, अशाच कंपनीत पैसे गुंतवा.
●जेव्हा तुम्हाला तुम्ही काय करत आहात हे समजत नाही तेव्हा सर्वाधिक धोका उद्भवतो.
●शेअरबाजातील चालू भाव बाजारातील लोकांचे कंपनी विषयी मत दाखवत असले तरी ते कंपनीचे दीर्घकालीन मार्केट मूल्य मोजण्याचे यंत्र आहे.
●संधी क्वचित येतात. जेव्हा सुवर्णधारा वाहते, तेव्हा त्याचा पुरेपूर फायदा घ्या.
●जेव्हा बाजारभाव खाली येतात, तेव्हाच भांडवल वापरण्याची सर्वोत्तम संधी असते.
●योग्य किमतीत चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणं, स्वस्तात वाईट कंपनीचे शेअर्स घेण्यापेक्षा नेहमीच चांगलं.
2. पीटर लिंच (Peter Lynch)
फिडेलिटी मॅजेलन फंडचे माजी व्यवस्थापक. त्यांनी शेअर बाजारात सातत्याने सर्वोत्कृष्ट परतावा मिळवलेला आहे. लिंच “तुम्हाला जे समजते त्यातच गुंतवणूक करा” या तत्त्वाचा पुरस्कार करतात.
त्यांचे विचार-
●तुमच्याकडे जे आहे त्याबद्दलची माहिती ठेवा त्याचबरोबर ते का आहे, हेही समजून घ्या.
●प्रत्येक शेअरमागे एक कंपनी म्हणजे व्यवसाय असतो. ती कंपनी नेमका काय व्यवसाय करते ते शोधा.
●शेअर मार्केटमध्ये पैसे कमावण्याची खरी गुरुकिल्ली म्हणजे घाबरून सर्व शेअर्स विकून टाकू नका.
●ज्याने सर्वात जास्त दगड पलटले, तोच जिंकतो.
●ज्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत त्यामध्येच गुंतवणूक करा.
●मंदी येणारच त्यामुळे शेअर बाजार कोसळणार. हे मान्य नसेल, तर त्याचा अर्थ गुंतवणुकीसाठी तुम्ही तयार नाही असा होतो.
●बाजारभाव खाली येण्याची वाट बघून किंवा त्या संबंधी अंदाज बांधून जेवढं नुकसान होतं ते प्रत्यक्षात खाली आलेल्या भावामुळे झालेल्या नुकसानीपेक्षा अधिक असतं.
●बाजारभाव वाढल्याने चांगले शेअर्स विकून वाईट शेअर्स ठेवणं म्हणजे बहरलेली फुलझाडं कापून टाकून आणि गवतावर पाणी वाया घालवणं.
●जेव्हा तुमच्याकडे भक्कम कंपन्यांचे शेअर्स असतात, तेव्हा काळ तुमच्या बाजूने असतो.
●अधिक गुंतागुंत नको, जितकं साध आणि सरळ तितकं चांगलं.
3. बेंजामिन ग्रॅहम (Benjamin Graham)
मूल्याधारीत गुंतवणूक (व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग) या संकल्पनेचे जनक. ‘The Intelligent Investor’ या पुस्तकाचे लेखक आणि वॉरेन बफे यांचे गुरू. त्यांनी ‘Margin of Safety’ या संकल्पनेचा पुरस्कार केला.
ग्रॅहम यांचे विचार-
●वैयक्तिक गुंतवणूकदाराने कायमच गुंतवणूकदारासारखेच वागावे, सट्टेबाजासारखे नाही.
●थोडक्यात शेअरबाजार हा मतदान मशीनसारखा असतो, पण दीर्घकालात तो वजन मोजणारे यंत्र बनतो.
●गुंतवणुक व्यवस्थापन म्हणजे त्यातील परताव्याचे नाही तर जोखमीचे व्यवस्थापन.
●बुद्धिमान गुंतवणूकदार हा वास्तववादी असतो. तो आशावाद्यांना शेअर्स विकतो आणि निराश व्यक्तीकडून शेअर्स खरेदी करीत असतो..
●गुंतवणूकदाराचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे तो स्वतःच.
●सर्वोत्तम गुंतवणूक ही केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातूनच केली जाते.
●समाधानकारक गुंतवणूक परतावा मिळवणे खूप सोपे आहे परंतु उत्कृष्ट परतावा मिळवणे सर्वात कठीण गोष्ट आहे.
●तुम्ही जेव्हा सट्टा खेळत असता तेव्हा ती गुंतवणूक आहे असे समजून स्वतःला फसवू नका.
●आशावादावर नव्हे, आकड्यांवर आधारित खरेदी करा.
●बुद्धिमान गुंतवणूकदार संशयी असतो तो केवळ आणि केवळ वाजवी किमतीतच खरेदी करतो.
4. फिलिप फिशर (Philip Fisher)
वाढीवर आधारित गुंतवणुकीचे प्रवर्तक. ‘Common Stocks and Uncommon Profits’ या पुस्तकाचे लेखक. नाविन्यपूर्ण संशोधन आणि दीर्घकालीन दृष्टी असलेल्या कंपन्यांमधील गुंतवणुकीचे समर्थक.
फिशर यांचे विचार-
●शेअरबाजार अशा लोकांनी भरलेला आहे जिथे सर्वाना मूल्य नाही तर किंमत माहित असते म्हणूनच गुंतवणूक करताना किंमतीवर नाही, तर मूल्यावर लक्ष केंद्रित करा.
●संयमी गुंतवणूकदार गाढ झोपतो. सुरक्षित आणि स्थिर गुंतवणूकीतून मनःशांती मिळते.
●जो गुंतवणूकदार स्वतंत्रपणे विचार करू शकतो, तो नफा मिळवू शकतो.
●जर शेअर खरेदी करताना व्यवस्थित अभ्यास केला असेल, तर तो विकण्याची वेळ कधीच येत नाही. उत्तम कंपन्या या नेहमी दीर्घकाळासाठी ठेवायच्या असतात.
●यशस्वी गुंतवणूकदार हा तोच असतो ज्याला व्यवसायातील समस्यामध्ये स्वाभाविक रस असतो. शेअरमागे असलेल्या व्यवसायास नीट समजून घ्या.
●युद्धाच्या भीतीमुळे खरेदी करण्यास घाबरू नका. संकटकाळातच सर्वोत्तम संधी उपलब्ध असू शकतात.
●ज्याचं संशोधन सर्वात उत्तम आहे, ती कंपनीच शेवटी आघाडीवर राहते. नाविन्यपूर्ण कंपन्यांमध्ये गुंतवा.
● जास्त पैसे मोजून खरेदी केल्याने एक उत्कृष्ट कंपनीत केलेली गुंतवणूक देखील सर्वात वाईट गुंतवणूक ठरते म्हणून मोजलेली किंमतही तितकीच महत्त्वाची आहे.
●मोठे गुंतवणूकदार कंपनीच्या भूतकाळाकडे नव्हे, भविष्यातील क्षमतेकडे पहातात.
●कालावधी हा व्यवसायाचा जिवलग मित्र असतो. चांगल्या कंपन्यांना वेळ द्या, त्याचा नफा वाढत जातो.
5. जॉन सी. बोगल (John C. Bogle)
व्हॅनगार्ड ग्रुपचे संस्थापक. त्यांनी पहिला लो-कॉस्ट इंडेक्स फंड सुरू केला. अप्रत्यक्ष (Passive investing) आणि कमी खर्च असलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर.
बोगल यांचे विचार-
●गवताच्या ढिगाऱ्यात सुई शोधण्याचा प्रयत्न करू नका, संपूर्ण ढिगाराच खरेदी करा. एकेका कंपनीऐवजी संपूर्ण बाजारात एकत्रित गुंतवणूक (इंडेक्स फंड) करा.
●शेअर बाजार हे गुंतवणुकीपासून तुमचे लक्ष विचलित करणारे मोठे साधन आहे. रोजच्या हालचालींकडे न पाहता, दीर्घकालीन दृष्टी ठेवा.
●वेळ हा तुमचा मित्र आहे आणि तीव्र भावना (इम्पल्स) तुमचा शत्रू. त्यामुळे संयम बाळगा, भावनांवर नियंत्रण ठेवा.
●व्यवस्थापक जितका जास्त मोबदला घेतात, गुंतवणूकदार तितकं कमी कमावतो. जास्त खर्च म्हणजे गुंतवणूकीवरील कमी परतावा.
●जे काही होईल ते होईलच म्हणून आपला गुंतवणुकीचा मार्ग बदलू नका. नेहमी शिस्तीत राहणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
●तुम्हाला शेअर बाजारात २०% तोटा होण्याची शक्यता सहन होत नसेल, तर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका बाजारातील तीव्र चढ उतार सहन करण्याची मनाची तयारी ठेवा.
●शेअरबाजारातील एक सखोल नियम म्हणजे सरासरीकडे परतणं त्यामुळे बेफाम वाढ झाल्यावर शेअर पुन्हा स्थिर मूल्यावर येतोच येतो.
●इक्विटी फंड गुंतवणूकदाराचे दोन मोठे शत्रू म्हणजे खर्च आणि भावना त्यांना नियंत्रणात ठेवा.
●इंडेक्स फंड तुम्हाला वैयक्तिक शेअर्सची निवड, योग्य वेळ पकडण्याची आणि व्यवस्थापक निवडीची जोखीम टाळतात त्यातील साधेपणातच यश आहे.
●गुंतवणुकीत तुम्हाला जे मिळतं ते सहसा त्या गोष्टींपासून मिळतं, ज्या तुम्ही पैसे न देता घेता, कमी खर्च म्हणजे जास्त परतावा.
6. रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki)
‘Rich Dad Poor Dad’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक. त्यांनी आर्थिक साक्षरतेचा प्रचार केला आणि लोकांनी पैशासाठी काम न करता पैसे आपल्यासाठी कसे काम करतात ही संकल्पना समजावून देण्यावर त्यांचा भर आहे.
कियोसाकी यांचे विचार-
●श्रीमंत लोक पैसे मिळवण्यासाठी काम करत नाहीत. ते पैशांना आपल्यासाठी काम करायला लावतात.
●तुम्ही किती पैसे कमावता ते महत्त्वाचे नाही तुम्ही ते किती आणि कसे टिकवता हे महत्त्वाचे आहे.
●आर्थिक स्वातंत्र्य केवळ त्या लोकांसाठी उपलब्ध आहे जे त्याचा अभ्यास करतात आणि त्यासाठी प्रचंड मेहनत करतात.
●यशस्वी गुंतवणूकदार सगळं जाणणारे नाही तर शिकत राहणारे असतात.
●ज्या गोष्टी समजत नाहीत त्यात गुंतवणूक करू नका, आधी शिकून घ्या.
●शेअर बाजार हा संयमी व्यक्तीकडे पैसा हस्तांतरित करणारे यंत्र आहे.
●आजच्या बदलत्या जगात, तुम्हाला काय येतं यापेक्षा तुम्ही ते किती लवकर शिकता,हे अधिक महत्त्वाचं आहे.
●अपयश आल्यावर हार मानणारे हरतात तर वारंवार अपयशावर अपयश येऊनही न हार मानणारेच जिंकतात.
●आपल्याकडे असलेली सर्वात शक्तिशाली मालमत्ता म्हणजे आपला मेंदू.
●तुम्ही फक्त तेव्हाच गरीब होता, जेव्हा तुम्ही हार मानता म्हणूनच शिकणं कधीही थांबवू नका. (अपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
Friday, 11 July 2025
जेन स्ट्रीट विरुद्ध सेबी
#जेन_स्ट्रीट_विरुद्ध_सेबी
जेन स्ट्रीट ही अमेरिकन गुंतवणूक कंपनी. तिच्या उपकंपन्या आणि त्यांची विदेशी संस्थात्मक गुंतवणूक संस्था या जगभरातील विविध शेअरबाजारात आर्थिक गुंतवणूक करीत असतात. त्यांनी भारतीय शेअरबाजारातील डिरिव्हेटिव पद्धतीच्या व्यवहारात गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून यापुढे कोणतेही व्यवहार करण्यास सेबीने बंदी घातली आहे. सेबीने असा अंतरिम आदेश दिला असून त्यांची सखोल चौकशी केली जाईल. त्यांनी बेकायदेशीररित्या कमावलेल्या रकमेतून ₹ 4800 कोटी गोठवण्यात आले असून ते एका विशेष खात्यात (एस्क्रु अकाउंट) ठेवले जातील. आरोपावरील स्पष्टीकरण देण्यासाठी तसेच अंतरिम आदेशाला आव्हान देण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही कारवाई सध्या तात्पुरती असून पुढील निर्णय जेन स्ट्रीटच्या उत्तरानंतर होणार आहे. या बंदीनंतर बाजारातील डिरिव्हेटिव व्यवहारांमध्ये लक्षणीय घट झाली असून अल्गो ट्रेडिंगवर लक्ष ठेवले जात आहे.
याप्रकरणाची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेऊया-
भारतीय शेअरबाजारात दोन प्रकारचे व्यवहार होतात. हे सर्व व्यवहार म्हणजे एक प्रकारचे करार असतात ते पूर्ण करण्याची हमी शेअरबाजार घेतो त्यात कसूर झाल्यास त्यांची पूर्तता आधी निश्चित केलेल्या नियमानुसार होते.
●रोखीचे व्यवहार- येथे शेअर अथवा पैसे देऊन घेऊन व्यवहार पूर्ण केले जातात असे व्यवहार सामान्यतः दुसऱ्या कामकाज दिवशी अथवा काही प्रमाणात त्याच दिवशी पूर्ण केले जातात. ते किमान एक शेअर तर कमाल बाजारात उपलब्ध असलेल्या संख्येएवढे असू शकतात. त्यांची पूर्तता करण्यासाठी पूर्ण रक्कम द्यावी लागते.
●डिरिव्हेटिव बाजार- हे व्यवहार मालमत्तेच्या किंमतीवर आधारित पैजेची स्वरूपातील असून अधिक गुंतागुंतीचे आहेत. ते शेअर्स, रोखे, निर्देशांक, वस्तू, चलन, व्याजदर यामध्ये होऊ शकतात. यातील काही व्यवहार प्रत्यक्ष देवाण घेवाणीतून तर निर्देशांक, व्याजदर यातील व्यवहार त्यातील भावाच्या लाभहानीच्या फरकातून समायोजित केले जातात. हे व्यवहार एका विशिष्ट किमान आकार आणि त्यांच्या पटीत होत असतात. शेअर्स व त्यावर आधारित निर्देशांक यातील एक व्यवहार पाच लाखाहून अधिक रकमेचा असतो त्यासाठी पूर्ण पैसे न देता एकूण व्यवहाराच्या काही प्रमाणात हमी रक्कम घेतली जाते त्यास मार्जिन असे म्हणतात भविष्यातील व्यवहार (फ्युचर्स) आणि पर्याय व्यवहार (ऑप्शन) हे या प्रकारातील करार आहेत. फ्युचर्समध्ये भविष्यात विशिष्ट दिवशी मालमत्ता खरेदी/विक्री करण्याचे आश्वासन दिलेले असते. यातील किंमतीत कोणताही फरक पडला तरी त्यांची पूर्तता करावीच लागते. ऑप्शन या प्रकारात मालमत्ता खरेदी अथवा विक्री करण्याचा अधिकार मिळतो परंतु त्यांची पूर्तता केलीच पाहिजे असे बंधन नसते. यासाठी तुम्हाला बयाणा (प्रीमियम) म्हणून ठराविक रक्कम द्यावी लागते. किंमत वाढल्यास हक्क वापरून मालमत्ता खरेदी करता येईल तर किंमत कमी झाल्यास हक्क सोडून दिल्याने त्यासाठी मोजलेल्या रकमेवर पाणी सोडावे लागेल. ऑप्शन करारांचे कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन असे दोन प्रकार आहेत. भविष्यात किंमत वाढेल असा अंदाज असल्यास कॉल ऑप्शन तर किंमत कमी होईल असा अंदाज असल्यास पुट ऑप्शनचा करार केला जातो. या दोन्ही प्रकारांच्या खरेदी विक्री होऊ शकते. भावात पडणाऱ्या फरकानुसार रोजच्या बंद भावाच्या तुलनेत मार्जिन कमी अधिक केले जाते. त्याचप्रमाणे या दोन्ही प्रमुख करार त्यातील उपप्रकारात डे ट्रेडिंग होऊ शकते. त्यामुळे त्याच दिवशी अथवा सौदापूर्ती होण्यापूर्वी उलट व्यवहार करून त्यातून कधीही बाहेर पडता येते. यातील ऑप्शनमधील खरेदी व्यवहारात अगदीच किरकोळ भांडवल लागत असल्याने आणि त्यातून अधिक फायदा मिळण्याची शक्यता असल्याने ट्रेडर्सना ते अधिक आकर्षित करतात त्यातून त्व्यक्तींमध्ये असलेल्या जुगारी प्रवृत्तीस प्रोत्साहन मिळत असल्याने झटपट पैसे मिळवण्याची आस असलेल्या अनेकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. जगभरात या पद्धतीने होणाऱ्या व्यवहारातील सर्वाधिक (60%) व्यवहार भारतातील राष्ट्रीय शेअरबाजारात होतात.
एकंदरीतच डिरिव्हेटिव प्रकारातील व्यवहारांना तुलनेने कमी भांडवल लागून त्यातून अधिक लाभ होण्याची शक्यता असली तरी त्यातून फार मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. काही प्रसंगात आपले पूर्ण भांडवल नाहीसे होऊन अधिकची पदरमोडही करावी लागते. सेबीच्या संशोधन अहवालानुसार सामान्य गुंतवणूकदारांतील 10 पैकी 9 जणांना डिरिव्हेटिव व्यवहारात आर्थिक वर्ष 2021-22 ते 2024-25 या काळात तोटा झाला. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांनी डिरिव्हेटिव व्यवहारातील जोखीम समजून न घेता व्यवहार करू नयेत यासाठी सेबी जनजागृती करते. तरीही उलाढाल वाढत असल्याने त्यासाठी आवश्यक असणारी किमान हमी रक्कम (मार्जिन) आणि खरेदी विक्री व्यवहार संच (लॉट साईज) वाढवण्याचे उपाय सेबीने योजले आहेत. या व्यवहारातून सामान्य गुंतवणूकदारांचा तोटा होत असेल तर कोणीतरी फायदा कामावणारा नक्कीच असणार. असे लाभार्थी हे अतिश्रीमंत गुंतवणूकदार आणि वित्तसंस्था याच आहेत. म्युच्युअल फंड कंपन्याना भावात पडणाऱ्या फरकाने होऊ शकणारे संभाव्य नुकसान (हेजिंग) टाळण्याच्या मर्यादेतच डिरिव्हेटिव प्रकारातील व्यवहार करण्याचे त्यांच्यावर बंधन आहे.
■या सर्व प्रकारात जेन स्ट्रीटने काय केलं?
त्यांनी डिरिव्हेटिव कराराच्या शेवटच्या दिवशी ‘पंप ऍण्ड डंप’ धोरणाचा वापर केला.
म्हणजेच,
●त्यांनी बँकिंग निर्देशांकावर प्रभाव पाडणारे महत्त्वाचे शेअर्स जसेकी एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआयचे शेअर्स सकाळी मोठ्या प्रमाणात खरेदी केले.
●त्यामुळे बॅंक निफ्टी निर्देशांक वर गेला.
●हे पाहून रिटेल ट्रेडर्सनी कॉल ऑप्शन खरेदी करण्यास धाव घेतली, त्यांना वाटलं की आणखी तेजी येईल.
●त्याच सुमारास जेन स्ट्रीट यांनी नेमकी उलटी बाजू घेतली, त्यांनी कॉल ऑप्शन विकले आणि पुट ऑप्शन खरेदी करून ठेवले.
●नंतर, एकदम सर्व बँक शेअर्स विकले त्यामुळे अचानक पुरवठा वाढल्याने निर्देशांक कोसळला.
●त्याचा परिणाम पुट ऑप्शन महागले आणि कॉल ऑप्शन शून्य झाले, जेन स्ट्रीटने यातून जबरदस्त नफा कमावला. या संपूर्ण कालावधीत 18 वेळा सौदापूर्तीच्या एकाच दिवशी या पद्धतीने विविध व्यवहार करून कंपनीने ₹ 43289 कोटी एकूण कमावले त्यातील केवळ ऑप्शनच्या व्यवहारांतून ₹36500/- कोटींचा नफा कमावला गेला. हे सर्व कंपनीच्या वतीने कुणी व्यक्तिने केलं असं वाटत असेल, तरी तसं नव्हतं. त्यांनी हाय-स्पीड अल्गोरिदम्स वापरले, जे बाजारात सेकंदाच्या काही भागातच जेन स्ट्रीटला आवश्यक कृती करत होते.
■सेबीला याची माहिती कशी मिळाली?
जेन स्ट्रीटने कंपनीने अमेरिकेत त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपनीवर (मिलेनियम मॅनेजमेंट) केस केली. त्यात त्यांनी असा दावा केला की मिलेनियमने त्यांचे गुप्त अल्गोरिदम डिझाइन करणाऱ्या डग शॅडेवाल्ड आणि डॅनीयल स्पॉटीसवुड या दोन कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेत घेऊन त्यांच्या मदतीने आपल्या गुंतवणूक धोरणात बदल केला त्यामुळे आमचे नुकसान होत असल्याने आम्हाला त्याची भरपाई मिळावी. पुढे प्रत्यक्षात पुराव्यांची देवाणघेवाण होत असताना न्यायालयीन कारवाई न होता हा वाद गुप्त तडजोडीने मिटवण्यात आला. जरी हा दोन अमेरिकन कंपनीतील अंतर्गत वाद असला तरी त्यात भारतीय शेअरबाजाराचा संबंध आल्याने मीडियाचे लक्ष वेधले गेले. त्यातच मयंक बन्सल या ट्रेडरनेही अचानक उलाढालीत होणारी व्यवहारवाढ संशयास्पद असल्याची तक्रार सेबीकडे केली होती. यावर सेबीने स्वतः पुढाकार घेऊन चौकशी चालू केली आणि जेन स्ट्रीटच्या जानेवारी 2023 ते मार्च 2025 पर्यंतच्या काही व्यवहारांची तपासणी केली. त्यातून 18 संशयास्पद दिवस समोर आले आणि यातील बहुतेक दिवस डिरिव्हेटिवच्या सौदापूर्तीचे दिवस होते. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सहा महिन्यातून अधिक कालावधी लागू शकतो. गुंतवणूकदारांचे तोपर्यंत होऊ शकणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठीच सेबीला त्यांना प्राप्तअसलेल्या अधिकाराचा वापर करून अंतरिम आदेश देण्यात आला आहे.
■सेबीने शोधलेले दोन प्रमुख फसवणुकीचे प्रकार
◆दिवसभरातील निर्देशांक हेराफेरी: बाजार नकारात्मक असताना, सकाळी 09:15 ते 12:00 दरम्यान जेन स्ट्रीटने बँक निफ्टीतील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी केली.
एकाचवेळी ते डिरिव्हेटिव मार्केटमध्ये पुट ऑप्शन खरेदी करीत होते नंतर त्यांनी सर्व शेअर्स विकले त्यामुळे निर्देशांक खाली गेला. पुट ऑप्शन महाग झाल्याने त्यातून जबरदस्त फायदा झाला. उदाहरणार्थ 17 जानेवारी 2024 रोजी एचडीएफसी बँकेचे निकाल खराब असूनही ₹4300 कोटींची बँकेच्या शेअर्स खरेदी केली गेली, जिचा उपयोग बँक निर्देशांक कृत्रिमरित्या उचलण्यासाठी झाला.
◆बाजार बंद होण्याच्या शेवटच्या अर्ध्या तासात मोठी विक्री: यामध्ये त्यांनी शेवटच्या अर्ध्या तासात (दुपारी 03:00 ते 03:30 या वेळेत) मोठ्या प्रमाणावर बँकेच्या शेअर्सची विक्री केली. यामुळे बंद निर्देशांक खाली गेला आणि फायनल प्राइस कमी झाल्यामुळे पुट ऑप्शनवर फायदा मिळाला.
■बँक निफ्टीवरच लक्ष का?
कारण बँक निफ्टीमध्ये उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असल्याने ते अधिक तरल आहे त्यामुळे सहज खरेदी-विक्री करता येते. अन्य व्यवहारांच्या तुलनेने खूप मोठ्या संख्येने बँक निफ्टी ऑप्शनचे व्यवहार होतात (16 लाख ट्रेडर्स).
■सेबीच्या कारवाई मागील कारणे:
●निर्देशांकामध्ये सौदापूर्तीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात संशयास्पद हालचाल.
●ठराविक संस्था व्यक्ती यांनाच व्यवहारातून असामान्य आणि सातत्यपूर्ण नफा.
●फसवणूक आणि गैरवर्तन करणारे व्यवहार. सेबी कायदा सन 1992 कलम 11 व 11(4) मधील तरतुदींचे उल्लंधन करणारे याचबरोबर ते सेबीने सन 2023 मध्ये निर्देशित केलेल्या पीएफयुपिटी नियमावलीतील नियम 3ए, 3बी 3 सी, 3डी नुसार फसवणूक, दिशाभूल करणारे आणि 4(1), 4(2)(ए), 4(2)(ई), 4(2)(जी) नुसार कृत्रिम मागणी/पुरवठा निर्माण करून बाजारभावात अनैसर्गिक चढउतार घडवणारे असल्याने नियमावलीचे
उल्लंघन करणारे होते.
●सेबीने राष्ट्रीय शेअर बाजारामार्फत तुमच्या व्यवहारांचा बाजारावर विपरित परिणाम होत असल्याचा इशारा फेब्रुवारी 2025 ला दिला होता त्याकडे कंपनीने केलेले दुर्लक्ष.
यामुळे
●सामान्य गुंतवणूकदारांचे होत असलेले मोठे नुकसान टाळण्यासाठी आणि भारतीय शेअरबाजारातील व्यवहारांच्या पारदर्शकतेवर उभे होत असलेले प्रश्नचिन्हावर मात करण्यासाठी ही कारवाई केली गेली असे सेबीचे म्हणणे आहे. त्यांनी यापुढील लक्ष मिलेनियम मॅनेजमेंट आणि अन्य हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडरकडे वळवले आहे. या प्रकरणाची चौकशी इतर निर्देशांक आणि बाजार भागांतही विस्तारित करण्यात येईल. डिरिव्हेटिव व्यवहारांसाठी नवीन नियम, सौदापूर्तीच्या पद्धतीत बदल, व्यवहार संच मर्यादेत वाढ यासारखे बदल भविष्यात नियामकांकडून अपेक्षित आहेत. या प्रकरणात पुढे नेमके काय होईल ते येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. सेबीचे अनेक निर्णय त्यांची अपिलेट अथोरिटी सॅटने रद्द केले आहेत हेही आपल्याला विचारात घ्यावे लागेल.
■गुंतवणूकदारांसाठी धडा: डिरिव्हेटिव व्यवहार हे सोपे वाटतात, तेवढे सोपे नाहीत. हाय-स्पीड अल्गो आणि प्रचंड भांडवल घेऊन उभ्या असलेल्या संस्थांसमोर सामान्य गुंतवणूकदार भरकटतात. त्यामुळे बाजारात आपण काय ट्रेड करीत आहोत यापेक्षा ते कोणाच्या विरुद्ध ते करतो आहोत ते महत्त्वाचं असतं.
■निष्कर्ष: डिरिव्हेटिव व्यवहारामध्ये अर्धं युद्ध हे समजून घेणं असतं की आपण नक्की कोणत्या गोष्टींवर पैज लावतो तर बाकीचं युद्ध असतं ते कोणाच्या विरुद्ध लावतो ते समजणं.
सुजाण गुंतवणूकदारांना यातून योग्य तो बोध घेतीलच!
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
11 जुलै 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉम या संकेतस्थळावर पूर्वप्रकाशीत.
Friday, 4 July 2025
सावध ऐका पुढल्या हाका
#सावध_ऐका_पुढल्या_हाका!
गेले काही दिवस कुणालाही सहज फोन करावा म्हटलं तर सक्तीने अमिताभच्या आवाजातील एक सरकारी कॉलर ट्यून ऐकावी लागत आहे. त्यामुळे अस्वस्थता वाढते, संदेश उपयुक्त असला तरी त्याचा सततचा भडिमार असह्य वाटतो. कोविड काळानंतर ऑनलाइन व्यवहार त्याचबरोबर यासंबंधीच्या ग्राहकांच्या तक्रारी ही सातत्याने वाढत असल्याने असे व्यवहार पूर्णपणे सुरक्षित नाहीत असे आपण निश्चित म्हणू शकतो. झालेल्या गैरव्यवहारात बरेचदा संबंधित ग्राहकाने केलेली छोटीशी चूक त्याला महागात पडते. मग असे व्यवहार करायचेच नाहीत का? यावर त्यासंबंधीच्या सुरक्षा व्यवस्था अधिकाधिक मजबूत बनवणे हाच त्यावरील उपाय आहेत. या संदर्भात संबंधित बँकेची जबाबदारी रिझर्व बँकेच्या परिपत्रकात स्पष्टपणे दिली आहे, त्याकडे पद्धतशीर दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे आता यासंबंधातील धोरण ठरवणे आणि नियम करणे ही सरकारची जबाबदारी आहे. सायबर फसवणुकीत गेलेला ग्राहकांचा प्रत्येक रुपया सरकारने सुरक्षित केला पाहिजे हा मुद्दा मुंबई ग्राहक पंचायतीने सरकारकडे लावून धरलेला आहे. अनेक सामाजिक संस्था, ग्राहक संस्था, केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालय, भारतीय रिजर्व बँक या सर्वांकडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून व्यवहार करताना त्यांनी नेमके काय करावे आणि काय करू नये, कोणती काळजी घ्यावी. यासंबंधीची माहिती विविध समाज माध्यमातून देऊन ग्राहक जागृती करण्यात येत असते.
कुणाही अनोळखी व्यक्तीला ओटीपी देऊ नये याबद्दल लोक आता सावध होत असल्याने ओटीपी वापरून होणारे गैरव्यवहार इतर गैरव्यवहाराच्या तुलनेत कमी होत आहेत हे दिलासादायक आहे. या समजुतीला छेद देणारी एक अजब घटना समोर आली असून त्यामध्ये 'ओटीपी' व्यवस्थेला बाजूस करून एका हॅकरने धक्का दिला आहे. त्याने आदित्य बिर्ला कॅपिटलचे अँप क्रॅक केले असून, त्यावरील ग्राहकांच्या विविध खात्यांमधून सुमारे जवळपास दोन कोटी रुपयांचे डिजिटल सोने परस्पर ऑनलाइन पद्धतीने विकले. अलीकडे मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूकीचा गुन्हा समोर आला असून यामुळे बाजारात खळबळ उडाली आहे. मुंबईतील प्रभादेवी भागातून सायबर फसवणुकीचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एका अज्ञात हॅकरने आदित्य बिर्ला कॅपिटल डिजिटल लिमिटेडच्या एबीसीडी अँपमध्ये घुसून काही मूलभूत तांत्रिक बदल केले आणि अनेक ग्राहकांच्या खात्यांमधून सुमारे 2 किलो वजनाचे डिजिटल सोने विकले. त्यानंतर फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने विक्री करून आलेली रक्कम विविध बनावट वैयक्तिक बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करून तो गायब झाला आहे. ही घटना अजबरीत्या निदर्शनास आली, झाले असे की अचानक असे नुकसान झालेल्या अनेक ग्राहकांनी कंपनीच्या कॉल सेंटरला फोन करून त्यांच्या संमतीशिवाय त्यांनी खरेदी केलेले डिजिटल सोने विकल्याची तक्रार केली. तेव्हा पडताळणी केल्यावर ही घटना उघडकीस आली. ते समजल्यानंतर, कंपनीने मुंबईतील सेंट्रल रिजन सायबर पोलिसांकडे तक्रार (एफआयआर) दाखल केली असून सायबर सेलने याची पूर्ण गांभीर्याने संपूर्ण चौकशी सुरू केली आहे.
तक्रारीनुसार, 9 जून 2025 रोजी, कंपनीच्या तांत्रिक टीमला असे आढळून आले की एका अज्ञात व्यक्तीने digital.adityabirlacapital.com वरील एबीसीडी अँप आणि कंपनीच्या सर्व्हरमधील अप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) हॅक केला होता. हॅकरने अँपच्या सामान्य व्यवहार पद्धतीमध्ये (प्रोटोकॉल) फेरफार केला आणि अनिवार्य असणारा केवळ एकदाच वापरता येणाऱ्या (वन-टाइम पासवर्ड) संदेश पडताळणी प्रक्रियेला बाजूस सारून 435 हून अधिक वापरकर्त्यांच्या खात्यांमधून डिजिटल सोने यशस्वीरित्या विकले. अशा प्रकारे ओटीपी प्रक्रियेस दूर करण्याचा हा धक्कादायक प्रकार पाहून सायबर तज्ज्ञही विचारात पडले आहेत. कंपनीने सायबर तक्रार दाखल केल्यानंतर, तात्काळ संबंधित ग्राहकांना सोन्याची भरपाई दिली आणि सोने विक्रीवर तात्पुरती स्थगिती आणली. त्यानंतर त्यातील सुरक्षा अधिक कडक करून विक्री सुविधा पूर्ववत देऊ केली आहे. सुकृत दर्शनी यात गुंतवणूकदारांचे कोणतेही नुकसान झाले नसले तरी असं काहीतरी होऊ शकतं हे त्यांना समजलं आहे त्यामुळे अनेकांना प्रश्न पडेल की, यावर उपाय काय ? तर सध्या तरी यावर ठोस असा उपाय तितका नाही. पेक्षा जिथं तुम्ही ऑनलाईन (डिजिटल) पद्धतीने गुंतवणूक करीत आहात ती करताना अधिक सावधगिरी बाळगावी, हे उत्तम. मोठी गुंतवणूक करताना तरी किमान *बसल्या जागी काम होतेय* असं म्हणत ऑनलाईन व्यवहार शक्य असल्यास टाळावे. त्यासाठी सेबी, सरकार मान्य असे जे मध्यस्थ असतात किंवा संबंधित कंपनीच्या ऑफिसेस मधील अधिकृत कर्मचारी असतात त्यांच्या सोबत राहून गुंतवणूक करावी. त्याने फसवणूक होण्याची शक्यता किमान असते.
■डिजिटल गुंतवणूकदारांसाठी सुरक्षा टिप्स-
●दोन अथवा अधिक टप्यातील ओळख (MFA) वापरा, ओटीपी अॅप वापरा (Google Authenticator), केवळ एसएमएस वर अवलंबून राहू नका.
●अॅपला दिलेल्या परवानग्या तपासा, एसएमएस वाचण्याची, फाइल्समध्ये प्रवेश यांसारख्या परवानग्या मर्यादित ठेवा.
●नियमितपणे गुंतवणूक तपासा, व्यवहार सूचना (SMS / ईमेल) ऑन ठेवा.
●प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी वेगळे पासवर्ड वापरा. सहसा ओळखता येणार नाही पासवर्ड ठेवा आणि पासवर्ड मॅनेजरचा वापर करा.
●फक्त अधिकृत अॅप स्टोअर्सवरून अॅप डाऊनलोड करा अनधिकृत वेबसाईट्स लिंक्स असलेल्या एपिके फाईल्स टाळा.
●फिशिंग ईमेल आणि लिंकपासून सावध रहा
संस्था, प्रसिद्ध व्यक्ती सारख्या नावाने आलेले फसवे ईमेल ओळखा.
●आपले एपीआय टोकन तपासा (प्रगत वापरकर्त्यांसाठी) कोणते थर्ड पार्टी एपीआय वापरत आहेत, ते तपासा आणि अनावश्यक टोकन हटवा. हे सर्वसाधारण जाणकार व्यक्तींकडून समजून घ्यावे. हा एक प्रकारचा डिजिटल पासवर्ड आहे जो आपल्याला अँप वापरण्याची परवानगी देतो, वापरकर्त्याची ओळख आणि अधिकार यांची माहिती ठेवतो.
●मोबाइलला सुरक्षित ठेवा.
फिंगरप्रिंट / फेस लॉकसारखी ओळख वापरा.
■भारतातील डिजिटल गोल्ड व फिनटेक सुरक्षा यांचं भवितव्य
●सेबी आणि भारतीय रिझर्व बँक यांच्याकडून अधिक कडक नियमांची अपेक्षा.
●सायबर इन्शुरन्स सेवा आता अनेक अॅप्समध्ये सक्तीने लागू होऊ शकतील.
●Zero Trust Security आणि AI आधारित फ्रॉड डिटेक्शन वापरणं अनिवार्य व्हायची शक्यता आहे.
एखादी गंभीर समस्या किंवा आव्हान समोर असताना, लोकांना 'सावध ऐका पुढल्या हाका' असे म्हणून परिस्थितीचे गांभीर्य ओळखायला सांगितले जाते. डिजिटल व्यवहार करायचे असतील तर डिजिटल शहाणपण प्राप्त करणे आवश्यक आहे. हे एक दुधारी शस्त्र असून ते जितके चांगले वाटते, तितकेच ते आपल्याच अंगावर उलटूही (बुमरँग) शकते. हे यानिमित्ताने लक्षात घ्यावे !
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत, याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 4 जुलै 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 27 June 2025
पैसा, पैसा आणि पैसा!
#पैसा_पैसा_आणि_पैसा
पैसा आणि उद्योजकता या विषयाचे संस्कार मराठी माणसांवर नसल्याने या विषयावर बोलणे, आपापसात चर्चा करणे टाळले जाते. पैसा जीवनाचे सर्वस्व नसले तरी प्रत्येक ठिकाणी तुमचे पैशांवाचून अडते. आपल्याकडे किती पैसे असावेत याचा कोणताच मापदंड नाही. पैसा ही अशी शक्ती आहे जी कधीच पुरेशी आहे असं वाटतं नाही. एकीकडे सतत पैसा पैसा करणारे लोक, जे कायम प्रत्येक गोष्ट पैशांत मोजतात. येन केन प्रकारे तो केवळ आपल्यालाच मिळावा असं त्यांना वाटतं तर दुसरीकडे लोक कल्याणार्थ अतिशय निरीच्छ व्यक्ती आहेत ते पैसा महत्वाचा न मानता त्यांचे कार्य उत्तमरीतीने करीत असून भरीव कार्यही करीत असतात, अशी टोकाची उदाहरणे समाजात आहेत. आपण पडलो मध्यम प्रवृत्तीची माणसे आता आपली मनोभुमिका कोणतीही असो, पैशाचे महत्व जाणत असल्याने आणि सातत्याने प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागत असल्याने इच्छापूर्तीचे साधन म्हणून सर्वांनी त्याचा स्वीकार केला आहे. तो योग्य मार्गाने वैध पद्धतीने मिळवला आणि योग्य त्या कारणासाठी खर्च केला तर त्याचे मोल राहते हे आपल्याला पटले आहे.
या विषयावर सर्व भाषांत अनेक स्वतंत्र तसेच अनुवादीत पुस्तके असली तरी बहुतांश पुस्तके पैसा कसा मिळवावा, वाढावावा, टिकवावा अशा स्वरूपाची आहेत. अशी पुस्तके निश्चितच असली पाहिजेत याबद्दल वाद नाही परंतु मन न गुंतवता योग्य प्रकारे पैशांचा वापर केल्यास त्याचे मूल्य कसे वाढते. या विषयावर चिंतन करणारे पुस्तक अलीकडेच मी वाचून पूर्ण केलं. त्याचं नाव आहे, ‘पैसा, पैसा आणि पैसा’. हे पुस्तकं लिहिलं आहे प्रा सुरेश गर्जे यांनी. सन 2023 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची किंमत ₹170/- असून ते सकाळ पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. या शंभर पानी पुस्तकात लेखानामागील भूमिका सांगून एकंदर चौदा निबंधासारखे लेख असून ते एकामागोमाग एक अथवा स्वतंत्र वाचलेत तरी चालण्यासारखे आहे. ज्यात पैशांच्या शक्तीचे तत्त्वज्ञान, त्याचा उपयोग, आणि समाजहिताच्या संदर्भातील जबाबदारी या सर्वांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
प्रत्येक लेखाचे थोडक्यात सार अतिशय कमी शब्दात सुरवातीलाच दिले असून त्याचे अधिक स्पष्टीकरण लेखात आहे.
■लेख विषय आणि थोडक्यात स्पष्टीकरण असे,
◆पैशांचे झाड- उद्यागाच्या भूमीत कल्पकतेची बीजे योग्य वेळी पेरावी लागतात. त्यावर घामाचे चिंतन करावे लागते. तेव्हा ती बीजे अंकुरतात. रोपांच्या रूपाने डोलू लागतात. त्यांच्या वाढीच्या दृष्टीने डोळ्यात तेल घालून त्यांची मशागत करावी लागते. तेव्हा पैशांचे झाड उभे राहते. त्यांना पाने फुले बहरतात. यासाठी अहर्निश धडपड करावी लागते, कष्ट उपसावे लागतात, तेव्हा कुठे पैशांचे झाड डोलू लागते.
◆धनसंग्रह नेमका कशासाठी?- दरिद्रीनारायणाची सेवा हीच परमात्म्याची सेवा आहे. याचा अर्थ असा की, लोककल्याणाची कामे ही सत्कर्मे होत. धनसंग्रह स्वतःच्या उपभोगसाठी न करता तो जनकल्याणासाठी, गरजूच्या पीडाहरणासाठी केल्यानेच मनःशांती प्राप्त होऊ शकते.
◆पैसे कामावण्याच्या प्रेरणा- खर्च आणि काटकसर, काटकसर आणि बचत यात तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. अत्यंत जरुरी बाबींवर खर्च करणे आणि अनावश्यक गोष्टीवर खर्च टाळणे, हे शहाणपणाचे लक्षण आहे. खर्च हा नेहमी उधळेपणाच्या मर्यादेपर्यंत करू नये आणि काटकसर कंजूषपणाच्या स्तरापर्यंत पोहचू नये. खर्च आणि काटकसर यांतील सुवर्णमध्य साधला पाहिजे.
◆जोडूनिया धन- आर्थिक व्यवहारात सर्वतोपरी प्रामाणिकपणास महत्व आहे आणि असा सत्यावर आधारित, नीतिमत्तेला घरून असणारा व्यवहार ‘उत्तम व्यवहार’ सदरात मोडतो आणि त्याची उत्तम फळे कर्त्या व्यक्तीस यथावकाश निश्चितच प्राप्त होत असतात.
◆पैशाचे सामर्थ्य - पैशाची भूमिका सर्वच क्षेत्रात महत्वापूर्ण आहे. वैयक्तिक बाबतीत कुटुंब आणि परिवाराच्या संबंधी, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक प्रभाव दर्शवत असतो. कोणत्याही उपक्रमांचे आयोजन आणि सामाजिक सुधारणांचे प्रकल्प एक इंचभरही पुढे पैशाशिवाय पुढे हलू शकत नाहीत.
◆दौड पैशासाठी- सुवर्णाचा साठा सुवर्णाचे मोल कमी होऊ शकते, परंतु प्रियजनांचा, नात्यागोत्यातील जिवंत व्यक्तींच्या प्रेमाचा साठा कधीच कमी होत नाही. हीच जीवनातील खरी संपत्ती आहे. जीवनातील सुख आणि आनंद देण्याची शक्ती सोन्यात नाही.
◆पैशाची निरर्थकता- माणसाची तृष्णा थांबली, की त्याच्या ठायी असलेल्या यातनांचे शमन होयला हवे. सत्य, अहिंसा आणि करुणा हे तीन घटक मानवाची प्रज्ञा आणि शील यांच्या संवर्धनाचे कारण आहेत. ज्ञानप्राप्तीबरोबरच सदाचाराचा प्रवेश मानवी मनात झाला, की मनःशांतीचे बिजाकुरण होयला वेळ लागत नाही.
◆अपरिग्रह- आज करोडोंच्या संख्येने गोरगरीब, आसराहीन, अन्नासाठी दाही दिशा भटकणारे लोक जगाच्या पाठीवर आहेत, तोपर्यंत गांधींच्या विचारांचे गांभीर्य कायम टीकणारे आहे.
◆पैशाची सार्थकता- पैशाच्या त्यागातून प्राप्त होणारी मनःशांती, समाधान, सुख आणि आनंद आगळवेगळा असतो. मनुष्यजीवनात अशा प्रकारच्या आनंदाची अनुभूती प्राप्त करण्याचा सक्रिय सहभाग आणि प्रयत्न प्रत्येक पैसेवाल्या व्यक्तीने स्वतःच्या उत्पन्नाच्या काही भागातून करणे आवश्यक आहे.
◆सुखाचा शोध- दरिद्री लोकांचे दारिद्र्य दूर करणे, अज्ञान दूर करण्यासाठी मोफत शाळा, महाविद्यालयाची उभारणी माफक दरात शिक्षणाच्या सोयी, सर्व सुविधानी युक्त भव्य रुग्णालये, अनाथालये, विध्यार्थांसाठी वसतिगृहे, वृद्धांसाठी शुश्रुषालये, महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती, आदिवासीच्या विकासाचे उपक्रम, नैसर्गिक आपत्ती, भूकंप, समुद्री वादळे, महापुरानी ग्रस्त जनसमुदायासाठी पिण्याच्या पाण्याच्या सोई असे अनेक उपक्रम राबवण्यासाठी स्वतःजवळील घनाचा शक्य तेवढा भाग खर्च करून समाजाच्या उपकारांची अंशतः का होईना परतफेड करावी.
◆आर्थिक भ्रष्टाचार- अवैध मार्गानी पैसा जमा करण्याच्या प्रवृत्तीची कारणमिमांसा हा या लेखाचा एक एक हेतू आहे. पैशाच्या सोबत प्रतिष्ठा येते. समाजात मानसन्मान प्राप्त होतो. यासाठी आणि सुखासोयीनी युक्त, चैनींनी युक्त जीवन जगण्यासाठी आणि पिढ्यानंपिढ्याच्या आर्थिक सुरक्षतेसाठी आणि भावी काळात आर्थिक विपत्तीला सामोरे जाण्याची पाळी येऊ नये, यासाठी आवश्यक सुरक्षेची भक्कम तटबंदी उभारण्याकरिता येनकेन प्रकारेन पैसा वाढवण्याची प्रवृत्ती निर्माण होत असते. या प्रवृत्तीला मुळी अंतच नसतो.
◆पैसा आणि प्रारब्ध- समस्याचे निराकरण कसे होईल, त्यातून साहिसलामत सुटण्याचे मार्ग कोणते यावर चिंतन करणे उपयुक्त आहे. पैशांची कमतरता आहे, आर्थिक परिस्थिती बिकट आहे, दारिद्र्याची छाया कुटुंबावर आहे. अशा परिस्थितीत माणूस एकच करू शकतो, परिश्रम. पैसा कमावण्याचे परिश्रम. परिश्रमाच्या झाडाला पैशांची फळे लागतात. प्रारब्धानुसार ती कमी अधिक लागतील हा भाग वेगळा, परंतु फळे लागणार एवढे मात्र निश्चित समजले पाहिजे.
◆पैसा आणि रचनात्मक उपक्रम- मुलांना ‘धन कमवा’ हे शिकवत असताना धर्मही शिकवला पाहिजे. अर्थात नीतिधर्म किंवा मानवता धर्म. या धर्मात जी शिकवण दिली जाते, तिचा परिणाम चरित्र्याची निर्मिती आणि नैतिकदृष्ट्या वागणुकीचे संवर्धन यात होत असते.
◆सुख आणि आनंद- समाजावरील प्रेम हे प्रेमाची व्यापकता दाखवते, प्रेम ही शक्ती आहे. ती व्यक्तीला शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ प्राप्त करून देते. जनताजनार्धनावरील प्रेम ही प्रेमाची विशाल व्याप्ती आहे. हे प्रेम लोकसेवा कार्यातून व्यक्त होते. ज्यांच्याकडे अधिक धनसंग्रह आहे त्यांनी अभावग्रस्तांवर पैशांचा पाऊस पाडला पाहिजे, प्रेमाचा वर्षाव केला पाहिजे.
थोडक्यात,
●पैशाची ऊर्जा आणि सामर्थ्य: पैशामध्ये मोठी शक्ती आहे — स्वतंत्रता, संसाधने, आणि क्षमता निर्माण करण्याची क्षमता. मात्र, पैसा कच्चा संसाधन आहे, ज्याला योग्य दिशा आणि ध्येयाच्या अनुरूप वापरल्यासच फलदायी ठरते.
●वैयक्तिक वागणूक: सकस नियोजन, संयमन, गुंतवणूक आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यावर भर. केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर आवश्यकतेनुसार गरजू लोकांसाठी वापर करण्याद्वारे आत्मसंतुष्टी मिळते आणि समाधान वाढतं.
●सामाजिक उत्तरदायित्व:
पैसा ‘देणगी’ किंवा ‘दान’ स्वरूपात समाजाच्या भल्यासाठी वापरणे, जे आत्मिक समाधान शंभरपट वाढवते. फक्त वैयक्तिक संपत्तीच नव्हे, तर समाजातील गरजू जनतेसाठीही पैशाचा हितकारक उपयोग कसा करता येईल याचा संदेश पुस्तकातून मिळतो.
■कोणाला उपयुक्त?
◆व्यक्तिगत वित्त व्यवस्थापन शिकणाऱ्यांना – खर्च‑नियोजन, गुंतवणूक आणि बचत विषयक मूलभूत दृष्टीकोनासाठी.
◆समाजसेवी व दानप्रवृत्त लोकांसाठी – पैशाच्या समाजोपयोगाच्या मूल्यांना समजण्यासाठी.
◆चिंतनशील‑आध्यात्मिक वाचकांसाठी – तत्त्वज्ञानाने प्रेरित लेखनातून आर्थिक दृष्टीकोन प्राप्त करण्यासाठी.
■का वाचावे?
शाश्वत जीवनशैलीचा पुरस्कार करणारे हे पुस्तक वाचताना, विनोबांच्या पूर्वी वाचलेल्या ‘गीता प्रवचने’ या पुस्तकाची प्रकर्षाने आठवण करून देते. ते तुमच्या आर्थिक ज्ञानाचं परिमाण वाढवण्यास मदत करतं, आणि सोबतच समाजातील गरजूंच्या भल्यासाठी पैसे कसे वापरायचे हेही शिकवते. आत्म‑विकासाला आणि समाजोपयोगाला एकत्र साधून लेखनातून जीवनात अर्थ प्राप्त करण्याचे मार्ग दाखवले आहेत. अर्पणपत्रिकेत म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक पैशाचा सदुपयोग करणाऱ्या आणि पैशाचा हव्यास असलेल्या समस्त जनांस असले तरी कुणाचाही पैशाविषयीच्या दृष्टिकोनात निश्चित बदल करू शकणारे असल्याने संग्रही ठेवण्यासाठी, प्रियजनांस भेट देण्यासाठी योग्य आहे. पुस्तकातील लेख आणि त्याविषयीची अधिक माहिती पुस्तकातलीच आहे, मी फक्त निमित्यमात्र! अजूनही दोन पुस्तकं निवांततेने वाचतोय, उपयुक्त वाटल्यास त्यावरही यथावकाश नक्की लिहीन.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत, याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक आहेत.)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 27 जून 2025 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 13 June 2025
फिनटेक उद्योग आणि नव्या उद्योग संधी
#फिनटेक_उद्योग_आणि_नव्या_उद्योग_संधी
‘फिनटेक’ हा शब्द यापूर्वी बऱ्याचदा वाचनात अथवा कानावर अनेकदा आला असेल. हा शब्द फायनान्स आणि टेक्नॉलॉजी या दोन शब्दांच्या मिश्रणातून तयार झाला आहे. जसे ‘निफ्टी’= एनएससी + फिफ्टी, ‘सेन्सेक्स’= सेन्सेटिव्ह + इंडेक्स. अशा प्रकारे दोन शब्दातून तयार होणाऱ्या शब्दाला मराठी व्याकरणात ‘संधी’ म्हणतात. ‘संधी’ हा शब्द ‘शक्यता, अवसर, वेळ, अवधी’ अशा अर्थानेही सामान्यपणे वापरला जातो. फिनटेक कंपन्या या वित्तीय क्षेत्रांशी संबंधित विविध कार्य हे तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होणाऱ्या शक्यताचा अधिकाधिक वापर करून करत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर या कंपन्या अशा प्रकारचे डिजिटल तंत्रज्ञान विकसित करतात ज्यामुळे व्यक्ती व्यक्तीना एकमेकांना (पी 2 पी) पैसे पाठवायचे असतील तर त्याचे खास अँप्लिकेशन्स बनवले जाईल त्यामुळे हा व्यवहार सुलभ होईल. फिनटेक हा खूप व्यापक शब्द आहे. अलीकडे इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व्यवहार वाढले असले तरी भारतात अजूनही रोख रकमेने अनेक व्यवहार होत आहेत. लोक बँकांना केंद्रित ठेवून त्यांच्या माध्यमातून व्यवहार करतात. यातील काही व्यवहारांसाठी शुल्क आकारणी करण्यात येते. जर असे व्यवहार सुरक्षित, झटपट आणि अत्यंत कमी खर्चात किंवा विनामूल्य झाले तर अधिकाधिक लोक त्याकडे आकर्षित होतील. ते करण्याचे महत्वाचे कार्य या कंपन्या करत असतात. या वर्ष अखेरपर्यंत भारतातील फिनटेक व्यवसाय 230 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता असून सन 2030 पर्यंत तो 30.55% वार्षिक वृद्धीदराने 550 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जागतिक फिनटेक व्यवसायात आपले स्थान तिसरे आहे.
■फिनटेक कंपन्या या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना देत असलेल्या महत्वाच्या आर्थिकसुविधा या पारंपरिक बँकिंगपेक्षा वेगवान, सुलभ आणि किफायतशीर दरात अथवा विनामूल्य देतात.
●पैशांची देवाणघेवाण:
◆उदाहरण: फोन पे, गूगल पे, पेटीएम
◆सेवा: युपीआय, पैसे पाठवणे, क्यू आर कोड, बिल पेमेंट्स, व्यापारांना एकमेकांशी (बी 2 बी), व्यापारी आणि ग्राहक (बी 2 पी), ग्राहक आणि व्यापारी (पी 2 बी), व्यक्तींना एकमेकांशी (पी 2 पी) पैशांचे व्यवहार करण्याची सुविधा,
●कर्ज वितरण:
◆उदाहरण: क्रेडिटबी, लेंडिंगकार्ट
◆सेवा: वैयक्तिक आणि व्यवसायासाठी झटपट कर्ज, सामान मासिक हप्ते सुविधा.
●शेअर बाजार अन्य गुंतवणूक मंच
◆उदाहरण: झेरोदा, ग्रोव, अपस्टोक्स
◆सेवा: शेअर्स, म्युच्युअल फंड्स त्यातील नियमित गुंतवणूक करण्यासाठी त्याचा आढावा घेण्यासाठी योग्य अँप्सची निर्मिती
●निओबँक्स (डिजिटल बँका)
●उदाहरण: ज्युपिटर, नियो, फी
●सेवा: बँक खाते, कार्ड, खर्चाचे व्यवस्थापन (पूर्णतः ऑनलाइन) कोणत्याही शाखेत न जाता.
●विमा तंत्रज्ञान:
●उदाहरण: ऍको, पॉलिसीबाजार, डिजिट
●सेवा: विमा खरेदी, दावा प्रक्रिया, वर्गणी तुलना ऑनलाईन आणि अँप्सच्या माध्यमातून
●व्यक्तिगत आर्थिक व्यवस्थापन
◆उदाहरण: मनीव्ह्यू, वॉलनट
◆सेवा: खर्च मागोवा, आर्थिक नियोजन, क्रेडिट स्कोअर
आज बहुतेक लोकांकडे त्यांच्या मोबाईलमध्ये किमान एक तरी फायनान्शियल अँप आहे, ज्यामुळे आपले जीवन सुसह्य होण्यास मदत झाली आहे. गुगल पे/ पेटीएम यांनी मोठी बाजारपेठ काबीज केली आहे. अनेकजण उद्योजक त्यात अधिकाधिक कल्पकता आणून त्यांचे स्टार्टअप उद्योग सुरू करीत आहेत. ते स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यास सरकारी प्रोत्साहनही मिळत आहे. अनेक नावीन्यपूर्ण फिनटेक कंपन्या व्यवसायवृद्धीस हातभार लावून आपल्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम करीत आहेत. आपल्या पेमेंट करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवत असल्याने त्यांचे महत्व अधोरेखित होते
■फायदे:
●ग्रामीण भागात आर्थिक सेवा पोहोचवणे.
●कॅशलेस व्यवहाराला चालना.
●स्टार्टअप्स आणि मध्य लघु आणि सूक्ष्म उद्योगासाठी फायद्याचे.
●पारंपरिक बँकिंगला पूरक सेवा.
■आव्हाने
●नियामक नियमांचे पालन आणि सायबर सुरक्षेचा धोका.
●सन 2024 मधील पहिल्या सहामाहीत फंडिंगमध्ये 59% घट.
●योग्य टॅलेंट मिळवणे आणि ग्राहक टिकवून ठेवणे हे मोठे प्रश्न.
■संधी
●दुर्लक्षित लोकसंख्येसाठी आर्थिक समावेशाचे दरवाजे खुले.
●ग्रामीण आणि निमशहरी भागांत वाढीची मोठी शक्यता.
●पारंपरिक बँका आणि फिनटेकमधील परस्पर सहकार्याला चालना
भारतातील ग्राहकांना उपयोग होईल अशा भविष्यकालीन नाविन्यपूर्ण फिनटेक कल्पना त्यासंबधीची उदाहरणे आणि त्यांचे परिणाम
●पूरक वित्त - (Embedded Finance)
म्हणजे काय: बँकींग किंवा आर्थिक सेवा थेट. पेमेंट,कर्ज, विमा एकाच छताखाली उपलब्ध.
उदाहरण: फ्लिपकार्टवर खरेदी करताना कर्ज मिळणे.
परिणाम: बँकेकडे न जाता व्यवहार पूर्ण.
●कृत्रिम प्रज्ञेवर आधारित संपत्ती व्यवस्थापन- (Robo-Advisors)
म्हणजे काय: कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून दिला जाणारा गुंतवणुकीचा सल्ला. हा सल्ला वैयक्तिक असेल.
उदाहरण: तुमच्या मासिक खर्चाचा विचार करून म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला.
परिणाम: नवशिक्यांसाठी गुंतवणूक सुलभ आणि प्रभावी होण्याची शक्यता.
●CBDC (डिजिटल रुपये – RBI कडून)
म्हणजे काय: आरबीआयने जारी केलेला डिजिटल भारतीय रुपया. सध्या मोठ्या कंपन्या व्यवहार करण्यासाठी त्याचा वापर करीत आहेत भविष्यात हा वापर सार्वत्रिक होईल.
परिणाम: जलद, सुरक्षित, सहज शोध घेता येऊ शकेल व्यवहार.
●विकेंद्रित वित्त - (Decentralized Finance)
म्हणजे काय: ब्लॉकचेनवर तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक सेवा, मध्यस्थाचा कमीतकमी वापर,पारदर्शक व्यवहार.
उदाहरण: कर्ज, विमा, व्याज मिळवणे स्मार्ट कॉन्ट्रॅक्टद्वारे.
परिणाम: पारदर्शक, कमीतकमी व्याजदर आणि व्यवस्थापन फी आकारणी शक्य आहे त्यावर नियमन गरजेचे.
●बोलून सूचना देऊन केले जाणारे व्यवहार- (Voice based banking/transactions)
म्हणजे काय: आपल्या भाषेत फक्त बोलून व्यवहार.
उदाहरण: "मंदारला 1000 रुपये त्वरित पाठवा" अशी सूचना गुगल असिस्टंला केली असता माझ्या खात्यातील पैसे गुगल पे ने मंदारच्या खात्यात त्वरित हस्तांतरीत होतील.
परिणाम: ज्येष्ठ नागरिक आणि अल्पशिक्षित व्यक्तींना व्यवहार करण्यासाठी उपयुक्त.
●कृषी वित्तव्यवहार - (Agri-Fintech)
म्हणजे काय: शेतकऱ्यांसाठी खास आर्थिक तंत्रज्ञान सेवा.
उदाहरण: हवामान अंदाजावर आधारित कर्ज, पीक विमा अॅपवरून.
परिणाम: ग्रामीण भागाचा आर्थिक विकास.
●पर्यायी विदेद्वारे पतमानांकन-
म्हणजे काय: कॉल, व्यवहार, मोबाईल वापराच्या डेटावरून क्रेडिट स्कोअर.
परिणाम: ज्यांच्याकडे बँक इतिहास नाही त्यांनाही कर्ज.
●बायोमेट्रिक + ब्लॉकचेन केवायसी-
म्हणजे काय: फिंगरप्रिंट, डोळा स्कॅन व ब्लॉकचेनद्वारे तपासणी.
परिणाम: फास्ट व फसवणूक-मुक्त ओळख पडताळणी.
●ग्राहकांच्या गरजेनुसार विशेष सेवा- (Special Services)
म्हणजे काय: ग्राहकांच्या विशिष्ट खास गरजा ओळखून त्यानुसार सेवा
उदाहरण: ग्राहकास काही समभाग, म्युच्युअल फंड युनिटस, दीर्घकालीन रोख्यामधील गुंतवणूक प्रदीर्घकाळ ठेवायची असल्यास- ती त्यास मोडताही येणार नाही आणि सुरक्षित राहील अशा पद्धतीने साठवून ठेवता येईल अशी डीजीलॉकर अथवा एन्टिटीलॉकर सदृश्य सुविधा
परिणाम: वारसांसाठी निश्चित सुरक्षित दीर्घकालीन गुंतवणूक करता येणे शक्य.
ही यादी परिपूर्ण नसून यात ग्राहकांच्या विशिष्ट आणि नेमक्या गरजा ओळखून त्यात अनेक गोष्टींची भर घालता येईल. त्यातून फिनटेक निर्मितीत रस असणाऱ्या उद्योजकांना अनेक नावीन्यपूर्ण स्टार्टअप उद्योगात ‘अवसर’ अशा अर्थाने संधी शोधता येणे शक्य आहे.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असून हा लेख कोणत्याही फिनटेक मंचाची शिफारस करीत नाही
13 जून 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
Sunday, 8 June 2025
जर्मनीची लवकर निवृत्तीवेतन सुरुवात योजना
#जर्मनीची_लवकर_निवृत्तीवेतन_सुरुवात_योजना_आर्थिक_साक्षरतेकडे_एक_क्रांतिकारी_पाऊल_की_केवळ_एक_कल्पना?
जगभरात अनेक देश सामाजिक सुरक्षेचा भाग म्हणून त्यांच्या नागरिकांसाठी कल्याणकारी योजना राबवीत असतात. अनेकदा अशा प्रकारच्या योजना ह्या बेरोजगार, ज्येष्ठ नागरिक, कामगार याच्यासाठी अथवा क्वचित समाजातील मोठ्या वंचित घटकासाठी राबवण्यात येतात. त्यात केवळ वृद्धांसाठी असलेल्या अश्या खास योजना आहेत. आयुर्मानात वाढ होत असल्याने जगभरात वृद्धांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे अशा योजनांवरील खर्चात सातत्याने वाढ होत असते. विकसित देशांची लोकसंख्या कमी आणि सरकारचे उत्पन्न अधिक असल्याने त्यांना सरसकट अशा योजना सर्वांसाठी रबावता येतात, परंतु वृद्धांची संख्या वाढत असल्याने त्यांनाही आता या खर्चावर नियंत्रण असावे असे वाटू लागले आहे. विकसनशील देशात त्या राबवण्यावर मर्यादा येत असल्याने त्याला कठोर चाळणी लावली जाते. जर्मनीला एकंदर लोकसंख्येत वृद्धांची संख्या सातत्याने वाढत असल्याने अशा योजनांवरील खर्चात होणाऱ्या वाढीचा ताण येत आहे. त्यावर उपाय म्हणून अगदी गेल्या आठवड्यात त्यांनी एक अभिनव योजना सुरु करण्याचे ठरवले आहे. सध्या ती केवळ प्रस्तावित असून त्यास मंजुरी मिळायची आहे. त्यानुसार आता सामाजिक सुरक्षा योजनेचा एक भाग म्हणून आर्थिक सुरक्षिततेसाठी प्रथमच 6 ते 18 या वयोगटातील मुलांसाठी ‘लवकर निवृत्तीवेतन सुरुवात’ (Early Start Pension) या नावाची योजना आणण्याचे ठरवले आहे. या योजनेतून लहान वयातच देशात आर्थिक साक्षरतेचा पाया घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
जर्मनी ही सध्या जगातील तिसरी आणि युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मोटार वाहने, त्यांचे सुटे भाग आणि रासायनिक उद्योग यात जर्मन कंपन्या आघाडीवर असून सकल राष्ट्रीय उत्पन्नात तेथील सेवा क्षेत्राचा 70% वाटा असल्याचे सन 2024 च्या केपीएमजीच्या अहवालात म्हटले आहे. जगभरातील निवृत्तीवरील योजनांच्या संकेतास तडा देत प्रथमच, सहा ते अठरा या वयोगटातील सर्व मुलांसाठी सरकारने तयार केलेली ही निवृत्तीवेतन योजना आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या एनपीएस वात्सल्य आणि लाडकी बहीण या योजनांशी त्याची काहीशी तुलना होऊ शकते. एनपीएस वात्सल्य ही निवृत्ती योजना असली तरी त्यातील वर्गणी केवळ पालकांनी भरायची आहे बालक सज्ञान झाले की त्यांनी तिचे एनपीएस मध्ये रूपांतर करायचे आहे तर पात्रता पूर्ण केलेल्या लाडक्या बहिणींना सरकारकडून दरमहा रक्कम मिळते. जर्मनीतील प्रस्तावित असलेल्या या योजनेनुसार शाळेत जाणाऱ्या प्रत्येक पात्र मुलांना सरकारकडून दरमहा दहा युरो मिळतील. पालक त्याच्या इच्छेनुसार त्यात रक्कम जमा करू शकतील. सरकारकडून
एकूण जास्तीतजास्त बारा वर्षाच्या कालावधीत प्रत्येक मुलाला एकूण 1440 युरो मिळू शकतील. ही निवृत्ती योजना असल्याने पुढे 60 वर्षे त्यात सातत्याने चक्रवाढ गतीने वाढ होत राहील कारण जर्मनीत 67 हे सन 1964 नंतर जन्मलेल्या नागरिकांचे निवृत्तीचे वय आहे. स्वेच्छानिवृत्ती 45 वर्षे पूर्ण झाल्यावर घेता येते अशी तेथे तरतूद आहे. या निवृत्तीनिधीत जमा होणारी रक्कम सरकारतर्फे भांडवल बाजारात गुंतवली जाईल. मुलाचे पालक त्यात स्वेच्छेने रक्कम जमा करू शकतील. लाभार्थी मूल अठरा वर्षाचे झाल्यावर त्यात त्यांना स्वकमाईची रक्कम भरण्याची परवानगी मिळेल. या मध्ये जमा रकमेवर कर सवलत मिळेल तसेच त्यातील नियमांनुसार सुयोग्य कारणासाठी पैसे काढूनही घेता येतील. योजनेस लवकर सुरुवात झाल्याने अधिक रक्कम जमा होऊन दीर्घकाळात त्यात लक्षणीय वाढ होईल.
योजनेच्या समर्थकांचे असे म्हणणे आहे की- ●यामुळे मुलांना लहान वयातच आर्थिक साक्षरतेची शिकवण मिळेल. लहानपणापासून आर्थिक संकल्पनांची ओळख करून देणं ही काळाची गरज आहे. ही योजना मुलांना पैसे, गुंतवणूक आणि बचत यांचे महत्त्व समजून घेण्यास मदत करू शकते.
●चक्रवाढव्याज, गुंतवणूक आणि बचत यांचे महत्व समजेल. मुलांचा आर्थिक बाजारपेठ, दीर्घकालीन भांडवल सुरक्षितता या संकल्पनाशी परिचय होईल. वयाच्या अगदी सुरुवातीपासूनच बचत सुरू केल्यामुळे व्याजाच्या चक्रवाढीचा अधिक फायदा मिळेल. परिणामी, निवृत्तीच्या वेळी त्यांनी पुरेसा निधी साठवलेला असेल.
●ज्या घरांमध्ये मुलांबरोबर बचत गुंतवणूक या विषयावर चर्चाच होत नाही तेथे ती होण्याची सुरुवात होईल.
●वाढत्या वृद्ध लोकसंख्येमुळे सरकारी निवृत्ती निधीवर ताण वाढत आहे. जर प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्याच योजनेत बालवयात लवकर बचत सुरू केली, तर भविष्यात सरकारी यंत्रणेवरचा अतिरिक्त भार कमी होऊ शकतो.
सीएनबीसी मेकच्या अहवालानुसार, ●आपल्याकडील सरकारच्या वादग्रस्त ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणे जर्मनीतील अनेक लोकांना ही योजना विसंगत वाटते. त्यांना केवळ प्रतिकात्मक दृष्ट्या ही योजना शक्तिशाली वाटत असली तरी वास्तविक जगात अनेक वर्षांनी त्याचे मूल्य फारसे नसेल असे वाटते. त्यामुळे तेथे जमलेल्या निधीचे वास्तविक मूल्य कमी असल्याने त्यातून अर्थपूर्ण निवृत्ती निधी जमा होण्याची शक्यता कमी वाटते.
●हे केवळ बचत खाते असल्याने आणि त्यातून गुंतवणूक केली गेल्याने त्यामागील गुंतवणूक निर्णय समजून घेऊन आर्थिक साक्षरता वाढेल का? याबाबत अनेक मान्यवरांना शंका आहेत. ●काही तज्ज्ञांचे मत आहे की इतक्या लहान वयात पैशांबद्दलची जबाबदारी देणे मुलांवर मानसिक दडपण अणू शकते.
●काही समीक्षक असे म्हणतात की ही योजना केवळ एक ‘feel good’ वातावरण निर्माण करण्यासाठी आहे. प्रत्यक्षात या योजनेचा सर्वसामान्य कुटुंबांवर फारसा परिणाम होणार नाही.
●अशा लहान मुलांसाठी स्वतंत्र निवृत्ती योजना तयार करणे, तिचे व्यवस्थापन करणे व पालकांना प्रोत्साहित करणे हे प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरू शकतं.
काही अर्थतज्ज्ञ याला पुढील पिढीसाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजनाची चांगली सुरुवात मानतात. ही योजना प्रत्यक्षात राबवायला अत्यंत कठीण आहे, विशेषतः जेव्हा सामाजिक आणि मानसिक बाबी लक्षात घेतल्या जातील. ‘आरडब्ल्यूआय लीबनिझ इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक रिसर्च’ चे प्रमुख ‘क्रिस्टोफ श्मिट’ आणखी एक पाऊल पुढचा विचार करतात. त्यांना हा प्रस्ताव मुळातून दोषपूर्ण वाटतोय आणि शैक्षणिकदृष्ट्याही ते चुकीचे आहे असे वाटते. बचतीचा मूळ गाभा - उद्याच्या चांगल्यासाठी आजचा त्याग करणे- यातून हरवला आहे, असे त्यांना वाटते. मुलांना निवड करण्याची किंवा त्याग करणे म्हणजे काय हे समजून न घेता, निष्क्रियपणे निधी मिळत असल्याने, बचतीचा खरा हेतू त्यातून हरवला जात असल्याचे वाटते. श्मिट पुढे म्हणतात की, माफक आर्थिक परताव्याच्या आशेने असे प्रयोग करण्यापेक्षा सध्याची राष्ट्रीय शिक्षण प्रणाली सुधारण्यासाठी तेच पैसे खर्च करणे अधिक योग्य होईल.
जर्मनीची लवकर सुरू होणारी ही पेन्शन योजना, निवृत्ती नियोजन आणि आर्थिक शिक्षणासाठी एक नवीन दृष्टिकोन आहे यात शंका नाही. ती निश्चितच महत्त्वाकांक्षेत दूरदर्शी वाटते. पुढच्या पिढीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि बचतीबद्दल समाजाच्या विचारांना आकार देणारी वाटते. त्याचबरोबर ती परिणामकारकता, प्रतीकात्मकता विरुद्ध वस्तुस्थिती आणि मुलांना निवृत्ती बचत योजनेत सरकारकडून पैशाचे वाटप केल्याने त्यांना पैशाबद्दल खरोखर काही अर्थपूर्ण शिकवले जाईल का? याबद्दल गंभीर प्रश्न देखील उपस्थित करते. सर्व जग म्हणूनच या अभिनव आर्थिक प्रयोगाकडे पाहत असताना, एक गोष्ट निश्चित आहे - जर्मनीची मुले लवकरच या ग्रहावरील निवृत्तीसाठी तरतूद करणारे सर्वात तरुण गुंतवणूकदार बनू शकतात. ‘लवकर निवृत्तीवेतन सुरुवात’ ही संकल्पना आकर्षक वाटत असली, तरी तिच्या यशासाठी ठोस अंमलबजावणी, पालकांचे सहकार्य आणि शैक्षणिक पातळीवर सखोल आर्थिक साक्षरतेचा समावेश असावा लागेल. सध्या तरी ही योजना केवळ प्रस्तावित आहे आणि भविष्यात तिच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेवरच तिच्या यशाचे मोजमाप अवलंबून आहे. तेव्हा जर्मनीतील नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम नागरिक म्हणून वाढतील की त्यांना कधी तरी निवृत्तीसाठी तरतूद करावी लागते, हेच विसरतील?
हे केवळ फक्त येणारा काळ (जो सहा दशके एवढा दीर्घ आहे) ठरवेल.
उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत. याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकर म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)
6 जून 2025 रोजी अर्थसाक्षर डॉट कॉमवर पूर्वप्रकाशीत.
Subscribe to:
Posts (Atom)