Friday, 9 January 2026
सन 2026 पुढील प्रश्न
#सन _2026_पुढील_प्रश्न
सन 2026 मध्ये नुकताच आपण प्रवेश केला, या नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा! झेरोदाच्या संकेतस्थळाचा द डेली ब्रिफ हा भाग आहे. ज्याचा उद्देश भारतीय बाजारपेठ आणि जगातील प्रमुख आर्थिक गोष्टी सोप्याभाषेत समजावून सांगणे आहे. फक्त काय घडले, तेवढंच नाही तर का आणि कसे ते ही तिथे सांगितले जाते. या वर्षी पुढे आवासून उभे असलेले काही प्रश्न-
●जगातील दोन महाशक्तींतील संघर्षाचा त्यांच्या आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील?
- जगामध्ये दोन प्रमुख महाशक्ती अमेरिका आणि चीन या सन 2026 मध्ये आर्थिक बदलाच्या टप्प्यावर आहेत. अमेरिकेने टेरिफ वाढवले स्थगित केले पुन्हा लागू केले पण अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसलेला नाही. चीनच्या अर्थव्यवस्थेतील मालमत्ता क्षेत्र कोलमडले असले तरीही निर्यात वाढत आहे. परंतु सन 2026 मध्ये या संघर्षपूर्ण धोरणांचा परिणाम स्पष्ट पाहायला मिळेल का, हा अजूनही प्रश्न आहे.
●क्विक कॉमर्स (10-मिनिटांत डिलिव्हरी) कंपन्या आणि स्टार्टअप नफ्यात येतील का?
- पूर्वी लोक विचारत होते काय 10 मिनिटांत मिळणाऱ्या डिलिव्हरीची खरंच गरज आहे का? पण आता हे मॉडेल विशेषतः तरुणांत खूप लोकप्रिय झाले आहे. ब्लिंकिट, स्वीगी आणि झेप्टो यांसारख्या कंपन्या बाजारात आल्या आहेत आणि इतरही नवनवे प्लेयर्स आपल्या नाविन्यपूर्ण सेवांसह येत आहेत परंतु विस्तारासाठी खर्च वाढल्यानंतर निव्वळ नफा कधी येईल हा प्रश्न आहे कारण सध्या मार्केट शेअर मिळवण्यावर या कंपन्यांकडून पैसा, पाण्यासारखा खर्च केला जातो आहे.
●कर्जांवरील व्याजदर आणखी किती कमी होतील?
- भारतीय रिजर्व बँकेने (RBI) सन 2025 मध्ये रेपोरेट मोठ्या प्रमाणात कमी करून 5.25% केला आहे. त्यामुळे बँकांनी त्यांचे कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. रेपोरेट सन 2026 मध्ये हे अजून कमी होऊन कर्जे अधिक स्वस्त होतील का? रिजर्व बँक हे निर्णय महागाई, सकल राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ आणि जागतिक परिस्थिती पाहून घेते. सध्या या बाबींवर निश्चित उत्तर नाही.
●भारताच्या काही महत्वाच्या सुधारणांनी (Reforms) प्रत्यक्ष परिणाम दाखवले की नाही?
- सन 2025 मध्ये भारताने काही महत्वाच्या सुधारणा केल्या. उदा. त्यात वस्तू आणि सेवादरात बदल केले, नवीन कामगार कायदा आणला, काही गुणवत्ता नियंत्रण निर्णय मागे घेतले इत्यादी. या सर्व बदलांचा व्यवसायांवर आणि दीर्घकालीन आर्थिक वाढीत किती सकारात्मक परिणाम होईल, हे सन 2026 मध्ये दिसून येणे अपेक्षित आहे.
●भारतीय लोक नैसर्गिक हिरेच अजूनही का पसंद करतात?
- जागतिक हिर्यांचा बाजार बदलत आहे. कृत्रिम हिर्यांची मागणी वाढत आहे. त्यांची किंमत कमी आहे. तसेच ते पर्यावरण पूरक आहेत. परंतु भारतात अजूनही नैसर्गिक हिर्याना परंपरा, प्रतिष्ठा आणि भावना यामुळे अधिक प्राधान्य देण्यात येते. यात हळूहळू बदल होत असला तरी भविष्यात हे बदलेल का? हे सन 2026 मध्ये स्पष्ट होईल.
●भारत निर्यातीसाठी नवीन व्यापार बाजार शोधू शकेल का?
- भारताच्या आयात निर्यातीत मोठी तफावत आहे. निर्यात कमी आयात जास्त, सध्या अमेरिकेतील मागणी कमी होताना दिसते त्यामुळे भारताने इंग्लंड, न्यूझीलंड, ओमान, संयुक्त अरब अमिरात आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांसोबत मुक्त व्यापार करार (FTA) केले आहे. पण EU आणि ASEAN यांसोबत करार लवकरच शक्य होतील का हे महत्त्वाचे ठरेल.
● सूक्ष्मउधारी (Microfinance) चक्र कोठे आहे?
- किरकोळ रकमेचे ऋण व्यवसाय हे ग्रामीण भागातील पैशाच्या प्रवाहावर अवलंबून असते. जेव्हा अर्थव्यवस्था मंदावते तेव्हा हे ऋण फेडण्यात कर्जदारास अडचणी येतात. 2025 मध्ये NPAs (non-performing assets) वाढले होते, पण 2025 च्या शेवटच्या महिन्यांत ते कमी होताना दिसत आहेत. 2026 मध्ये हा चक्र पुन्हा सामान्य स्तरावर येईल का हे पाहणे महत्वाचे आहे.
●AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) हा एक बबल आहे का तर त्याचा परिणाम कोणाला होईल?
- AI तंत्रज्ञानाची सप्लाय चेन संपूर्ण जगभर पसरलेली आहे. जर AI मध्ये संकट आले तर ते सर्वत्र परिणाम करेल. अमेरिका, चीन, तैवान, दक्षिण कोरिया, भारत आणि इतर बाजार. मोठ्या कंपन्यांनी AI साठी खुप मोठी रक्कम खर्च केली आहे. आता त्याचा सुयोग्य परतावा मिळेल का, हे सन 2026 मध्ये महत्वाचे ठरेल.
●भारतीय IT उद्योग AI लहरीमध्ये टिकून राहू शकेल का?
- सन 2025 मध्ये भारतीय IT क्षेत्राच्या दिग्गज कंपन्यांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागला. त्याचा परिणाम काही कंपन्यांनी कामगार कमी केले. त्यांची वाढ मंदावली. असं असलं तरी लहान, कौशल्य-आधारित कंपन्या AI आणि नव्या तंत्रज्ञानात पुढे आहेत. पारंपारिक कामाचे मॉडेल आता पुरेसे नाही. त्यामुळे 2026 मध्ये भारतीय IT साठी बदल आवश्यक आहे.
●भारताच्या हरित महत्वाकांक्षेनंतर सोलर नंतर पुढे काय?
- सन 2025 मध्ये भारतात सौर ऊर्जा रेकॉर्ड पातळीवर पोहोचली. परंतु सौर ऊर्जा वाढल्यामुळे विजेचा साठा (storage) हा मोठा प्रश्न आहे. भारत वेगवेगळ्या स्टोरेज प्रकल्पांचा प्रयोग करत आहे. अनेक प्रकारचे बॅटरी पर्याय त्यासाठी आहेत परंतु सोलर प्रमाणे स्टोरेज मधील मोठी वाढ सन 2026 मध्ये किती जलद होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
सन 2026 मधील आणखी काही महत्त्वाचे प्रश्न:
◆युरोपिय युनियनने नव्यानेच लागू कार्बन बॉर्डर एडजस्टमेंट मेकॅनिझम CBAM नुसार हरित संरक्षणवाद म्हणून काही वस्तूंवर कर लादल्याने त्याचा भारतीय निर्यातींवर नेमका काय परिणाम होईल?
◆भारतातील न्यूक्लियर ऊर्जा क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढेल का?
◆भारताचा चिप उद्योग इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात यशस्वी होईल का?
◆सोनं आणि चांदीची किंमत अजून किती वाढेल?
◆खाजगी भांडवली गुंतवणूक वाढेल का?
◆भारतात पूर्ण 5G rollout होईल का?
◆फार्मा उद्योगात तोंडावाटे घेता येणारे इन्शुलिन (GLP-1) जर जगभरातील लोकांनी स्वीकारल्याने क्रांतिकारक बदल होतील का?
येणारा काळच या आणि अशा सर्व प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सभासद आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत.
लेखातील मते वैयक्तिक आहेत)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment