Friday, 15 November 2024

दीर्घकालीन गुंतवणूक काही मंत्रतंत्र

#दीर्घकालीन_गुंतवणूक_काही_मंत्रतंत्र “मंत्रतंत्र’ म्हटल्यावर अध्यात्मिक, आदीभौतिक संबंधित काहीतरी असावे असे वाटत असेल तर आपली निराशा होणार आहे. मागील लेखात आपण दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे काय? त्याची वैशिष्ट्ये, फायदे/ तोटे समजून घेतले. अशी गुंतवणूक वाटते तितकी सोपी नसली तरी अशक्य नाही. सर्वच दीर्घकालीन गुंतवणूक दीर्घकाळात फायदेशीर ठरेल असे नसल्याने काही सिद्द तंत्रांची माहिती असणे आवश्यक आहे, त्यांला अनुभवाची जोड देऊन आपल्या वृत्तीनुरूप त्यात कल्पक बदलही करावा लागतो. गुंतवणूक अनेक मालमत्ता प्रकारात करता येत असली तरी तुलनात्मक दृष्टीने भांडवल बाजारात गुंतवणूक करणे अधिक लाभदायक आणि सुलभ होऊ शकते, ते कसे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. गुंतवणूक करताना पाळायचे काही मंत्र - ●सुरुवात लवकरात लवकर करावी. ●संयम पाळावा. ●सखोल अभ्यास करावा. ●विविध मालमत्ता प्रकारात विभाजन करावे. ●भावनेच्या भरात निर्णय घेण्याचे टाळावे. ●आढावा घेऊन अत्यावश्यक तेथे बदल करावे. ●द्यावे लागणारे कर लक्षात घ्यावे. ●निश्चित ध्येय ठरवावे. हे मंत्र लक्षात ठेवून शिस्तीत आणि संयमाने गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात किफायतशीर ठरते. अनेक गुंतवणूकदार त्विविध पद्धतीने त्यांची गुंतवणूक करीत असतात. त्यातील काही पद्धती अशा ●केवळ खरेदी करीत राहणे आणि सांभाळणे: यापद्धतीत योग्य स्टॉक निवडून तो वाजवी किमतीत (स्वस्त नव्हे) मिळत असल्यास फक्त घेतला जातो आणि दीर्घकाळ सांभाळला जातो. या काळात भावात पडणाऱ्या फरकाचा कोणताही परिणाम होत नाही. ●रुपयांच्या सरासरी किमतीचा लाभ घेणे : आधी ठरवलेली रक्कम ठराविक दिवशी निश्चित केलेल्या मालमत्तेत गुंतवणे. यामुळे दीर्घकाळात सरासरीचा लाभ होतो म्हणजे किंमत कमी असल्यास अधिक मालमत्ता आणि जास्त असल्यास कमी मालमत्ता मिळत असल्याने एकूण मालमत्तेची सरासरी किंमत कमी होते. अशा पद्धतीने नियमित रक्कम बाजूला केल्यास त्यास गुंतवणूक म्हणावे का? कारण अशा पद्धतीने बचत करता येईल आणि भांडवल निर्माण करण्यासाठी ते योग्यही असेल पण गुंतवणूक ही आपल्या टप्यात आल्यावरच करायची असते. परंतु या पद्धतीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरत असल्याचा अनुभव आहे आणि म्युच्युअल फंड योजनांचा इतिहास तपासता ते सिद्ध झाले आहे. त्यामुळे अनेकजण भांडवल बाजारात या पद्धतीने थेट गुंतवणूक करून प्रत्यक्ष तर म्युच्युअल फंड युनिट खरेदी करून अप्रत्यक्ष पद्धतीने गुंतवणूक करीत असतात. ●डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यातील गुंतवणूक: दीर्घ मुदतीत लाभ होत असला तरी केलेल्या गुंतवणुकीतून नियमित काहीतरी मिळत राहावे अशी काही लोकांची विशेषतः पेन्शन मिळत नसलेल्या सेवानिवृत्त लोकांची गरज असते. मध्यम उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तीला काही अकस्मात खर्च पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी काही रकमेची गरज असते. त्यामुळेच ज्यांचा डिव्हिडंड हा फिक्स डिपॉझिट व्याजाशी मिळताजुळता आहे अशा ठिकाणी गुंतवणूक करून डिव्हिडंड आणि भांडवलवृद्धी या दुहेरी हेतूने अशी गुंतवणूक केली जाते. रिटस आणि इनव्हीट निमिर्तीमागे हाच हेतू आहे. याशिवाय विविध कंपन्या वर्षभर वेगवेगळ्या वेळी आपल्या धारकांना डिव्हिडंड देण्याचे जाहीर करीत असतात. त्यांनी तसे जाहीर केल्याने बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होऊन त्याचा बाजारभाव वाढतो. ही वाढ जाहीर केलेल्या डिव्हिडंडपेक्षा जास्त असते याचा फायदा अनेकजण धुर्तपणे करून घेत असतात. अशीच वाढ कंपनीने बोनस शेअर्स देण्याचे, शेअर्सचे विभाजन करण्याचे अथवा प्राधान्य भाग देण्याचे ठरवल्यावर दिसून येते. ते जाहीर होण्यापासून प्रत्यक्षात मिळेपर्यंतच्या कालावधीत भावात पडणाऱ्या फरकाचा लाभ घेऊन आपले होल्डिंग तसेच ठेवून सरासरी किंमत कमी करता येते. ●इंडेक्स फंड अथवा इटीएफमधील गुंतवणूक: काही गुंतवणूकदार हे इंडेक्स फंड अथवा इटीएफ मध्ये सातत्याने गुंतवणूक करीत असतात यात दिर्घकाळात चांगला परतावा मिळत असल्याने जोखीम कमी आहे. या दोन्हींचे उद्दिष्ट सारखेच असले तरी त्यात थोडा फरक आहे. गुंतवणूकदारास म्युच्युअल फंडाचे युनिट हे त्याच्या मालमत्ता मूल्याने (एनएव्ही) फंडहाऊसकडून इटीएफ हे बाजारमूल्याने (मार्केट प्राईज) भांडवल बाजारातून घ्यावे लागतात. ●मूल्य ओळखून केलेली गुंतवणूक : भांडवल बाजार हा काही काळ एक तर वाढत किंवा कमी होत असतो अथवा अनेकदा एकाच पातळीवर स्थिरावलेला असतो. गुंतवणूकदारास शेअरचा बाजारभाव दिसत असतो परंतु वेगवेगळ्या मूलभूत आणि तांत्रिक गोष्टींची मदत त्याचे वास्तविक मूल्य काढता आले आणि त्यात आधी गुंतवणूक करता येते. ही गुंतवणूक जेवढी लवकर होईल तेवढी अधिक लाभदायक ठरू शकते. ●वाढणाऱ्या शेअर्समधील गुंतवणूक : ज्यांचे भाव सातत्याने वाढत आहेत असे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स निवडून त्यामधील गुंतवणूक अनेकजण सातत्याने थोडी थोडी वाढवत असतात. त्यांना ट्रेंड फॉलोअर्स असे म्हणतात हा ही दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा मार्ग होऊ शकतो. भाव खाली आल्यावर अनेकजण सरासरी करण्यासाठी गुंतवणूक करीत असतात त्यांच्या एका विशिष्ट मर्यादेनंतरही भाव खाली आल्यास वैफल्य येऊ शकते त्यामुळे मोठ्या प्रमाणात भांडवल अडकून राहते. त्यापेक्षा ही पद्धत अधिक उजवी आहे. ●भावपातळी समजून केलेली गुंतवणूक - एका विशिष्ट किमतीस अर्धी गुंतवणूक करून त्याच्या अथवा बाजाराच्या भावपातळीखाली भाव गेल्यास अल्प खरेदी आणि वर गेल्यास किंचित विक्री असे करून उरलेल्या रक्कमेची गुंतवणूक करीत गेल्यास भावात पडणाऱ्या मोठ्या फरकाचा गुंतवणूकदारावर ताण पडत नाही. ●विशिष्ट प्रकारातील गुंतवणूक : यापद्धतीने गुंतवणूक करणारे केवळ विशिष्ट सेक्टर, बाजार सायकल, इंडेक्समधील स्टॉक, मार्केट लिडर्स यात आपली गुंतवणूक करतात. हे स्टॉक नेहमी महागच असतात अंदाज चुकल्यास बराच काळ त्यात पैसे अडकून राहू शकतात अथवा नुकसान स्वीकारावे लागते. ●विशिष्ट हेतू मनात ठेवून केलेली गुंतवणूक : काही विशिष्ट हेतू निश्चित करून ही गुंतवणूक केली जाते. जसे सनराईज सेक्टर, इएसजी क्षेत्रात केलेली गुंतवणूक. यातील मुख्य हेतू हा क्षेत्रास प्रोत्साहन मिळावे आपले सामाजिक भान जपावे एवढाच मर्यादित असतो. ●विभागून केलेली गुंतवणूक- अशी गुंतवणूक भांडवल बाजारातील विविध क्षेत्रात विभागून करण्यात येते दरवेळी काही क्षेत्रे उत्कृष्ट कामगिरी करीत असल्याने त्यातील जोखीमही विभागली जाते. ●समतोल साधत केलेली गुंतवणूक -आपल्या गुंतवणूकीचे मूल्यमापन करून आवश्यक असल्यास त्यात बदल केला जातो. यात वारंवार बदल करणे अपेक्षित नसून केवळ अत्यावश्यक बदलच अपेक्षित असतात. ●कर वाचवण्यासाठी केलेली गुंतवणूक- ही एक गुंतवणूक पद्धत आहे. भांडवल बाजारातील गुंतवणुकीस काही कर सवलती असून केवळ कर वाचववा एवढाच त्याचा मुख्य हेतू असतो. याशिवाय गुंतवणूक तज्ञ अनेक पद्धती सुचवत असतात स्वतः टिप्स देत असतात केवळ त्यावर विश्वास ठेवूनही अनेकजण गुंतवणूक करतात. या पद्धती म्हणजे आपली अंतिम गुंतवणूक पद्धत नसून आपल्याला योग्य वाटणारी गुंतवणूक पद्धत शोधून बँक टेस्टिंगद्वारे तिची व्यवहार्यता तपासून वेळोवेळी त्याचा आढावा घेऊन आवश्यक तेथे बदल केल्यास आपण यशस्वी गुंतवणूकदार होण्याच्या शक्यता वाढतात. गुंतवणूक करताना काही ठिकाणी तोटा होणे स्वाभाविक असले तरी आपले भांडवल सुरक्षित राहून आपल्याला सातत्याने महागाईवर मात करणारा परतावाही मिळायला हवा. तंत्र कोणतेही असो. आपल्याकडील गुंतवणूकयोग्य निधी, आर्थिक उद्दिष्ट, जोखीम क्षमता, कामगिरी आणि गुंतवणूक कालावधी यासर्वाचे सदैव भान असावे. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.) अर्थसाक्षर डॉट कॉमवर 15 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्वप्रकाशीत.

No comments:

Post a Comment