Friday, 6 March 2020

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी PPF 2019


#सार्वजनिक_भविष्यनिर्वाह_निधी (PPF-2019)
            सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या योजनेत महत्त्वाचे बदल झाल्याच्या बातम्या समाज माध्यमांत प्रसारित होत आहेत. त्या वाचल्यावर असे लक्षात आले की हे बदल खूप महत्त्वाचे आहेत असे नाहीत. झालेल्या बदलांमुळे आता ही नवी योजना कशी असेल ते जाणून घेऊयात. यासंबंधीचे बदल १२ डिसेंबर २०१९ च्या शासकीय राजपत्रात प्रकाशित झाले आहेत. त्यामुळे त्याच दिवसापासून हे नवे नियम पूर्वी काढलेल्या खात्यांसह सर्व खात्यांना लागू आहेत.
★या योजनेचे नाव सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी -२०१९ असे असेल. पूर्वीच्या हेच नाव असलेल्या -१९६८ या योजनेची जागा सदर योजना घेईल.
★योजनेचा कालावधी, सहभागी झालेले आर्थिकवर्षं सोडून १५ आर्थिक वर्षांचा असेल म्हणजेच किमान कालावधी १५ वर्ष १ दिवस तर कमाल कालावधी १६ वर्षांचा म्हणजेच १६ आर्थिक वर्षांचा असेल. मुदत पूर्ण झाल्यावर पुढील ५ वर्षांसाठी त्याची मुदत कितीही वेळा वाढवता येते. वाढीव मुदतीत पैसे भरणे अथवा न भरणे यापैकी कोणताही पर्याय स्वीकारता येईल. समजा एखाद्या व्यक्तीने १ जानेवारी २०१० रोजी खाते उघडले असेल तर ते आर्थिकवर्षं २००९-१० मध्ये उघडले असल्याने त्यापुढील १५ आर्थिक वर्ष म्हणजे ३१ मार्च २०२५ रोजी बंद होईल.१ एप्रिल २०२५ नंतर याची मुदत ३१ मार्च २०३० पर्यंत वाढवता येऊ शकेल.
★पोस्ट ऑफिस, काही सरकारी अथवा खाजगी बँकेत योजनेचे खाते उघडता येईल. (यासाठी फॉर्म १ चा वापर करावा) खाते उघण्यासाठी किमान ₹ ५००/- ची आवश्यकता आहे. जरी हे खाते बँकेत असेल तरी योजनेचे पैसे सरकारकडे असून त्यास सरकारची हमी असल्याने ते बँकेत असलेली ठेव म्हणून समजले जाणार नाहीत. त्यामुळे बँक बुडाली तरी रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहील. आपल्या सोयीप्रमाणे त्याच बँकेच्या पोस्टाच्या अन्य शाखेत, इतर बँकेच्या शाखेत किंवा पोस्टातून बँक अथवा बँकेतून पोस्टात बदलून घेता येईल.
★फक्त निवासी भारतीय व्यक्तीला खाते काढता येऊ शकते. अनिवासी भारतीय, हिंदू अविभक्त कुटूंबाचे खाते काढता येत नाही. पूर्वी चालू असलेले खाते चालू ठेवता येईल त्याची मुदत वाढवता येत नाही.
★एका व्यक्तीस एकच खाते काढता येईल अज्ञान व्यक्तीच्यावतीने त्यांचा आईवडील अथवा कायदेशीर पालकांना खाते चालवता येईल.
★हे खाते संयुक्तपणे काढता येणार नाही. नामनिर्देशन करता येईल.
★एका आर्थिक वर्षात या योजनेत स्वतःच्या व अज्ञान मुलांच्या नावे किमान ₹ ५००/- ते कमाल ₹ १ लाख ५० हजार भरता येतील.
★खाते चालू असताना खातेदाराचा मृत्यू झाल्यास यापूर्वीच्या महिन्यापर्यंत मान्य केलेले व्याज देऊन पूर्ण रक्कम त्याचा वारसास देण्यात येईल यातून कोणतीही काटछाट होणार नाही.
★योजनेत किमान ₹ ५००/- ते कमाल १ लाख ५०  हजार विभागून कितीही वेळा टाकता येतील. मात्र ही रक्कम ५० च्या पटीत असणे गरजेचे आहे.
★दर महिन्याच्या ५ तारखेला असलेली किंवा त्यानंतरची खात्यातील  किमान शिल्लक ही पूर्ण महिन्याची शिल्लक समजून त्यावर व्याज मिळेल याचाच अर्थ असा की ५ तारखेस जमा केलेल्या रकमेवर पूर्ण महिन्याचे व्याज मिळेल.
★या खात्यात भरलेल्या रकमेवर विहित मर्यादेत ८०/क ची सवलत मिळेल. याशिवाय दरवर्षी मिळणारे व्याज आणि मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम कोणत्याही मर्यादेशिवाय पूर्णपणे करमुक्त आहे.
★व्याज दरवर्षी वर्षातून एकदा दिले जाईल. दर तिमाहीस बाजारातील व्याजदरानुसार बदल केला जाऊ शकतो. असा बदललेला दर तिमाही सुरू होण्यापूर्वी जाहीर केला जाईल. सध्या या खात्यावरील व्याजाचा दर वार्षिक ७.९% आहे.
★खाते चालू केल्यापासून दुसऱ्या आर्थिक वर्षांनंतर  ते  सहाव्या आर्थिक वर्षांच्या कालावधीत या पूर्वीच्या आर्थिक वर्षातील शिल्लख रकमेच्या २५% रकमेचे कर्ज मिळू शकते त्यावर १% दराने व्याज द्यावे लागेल या कर्जाची पूर्तता ३६ महिन्यात न केल्यास शिल्लख रकमेवर ६% दराने व्याजाची आकारणी होईल. एका वर्षात एकदाच व आधीचे कर्ज पूर्ण फिटले असल्यास नवीन कर्ज मिळेल. वरील उदाहरणात खातेदार १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत कर्ज मिळवण्यासाठी पात्र असेल. (कर्ज घेण्यास फॉर्म २ चा वापर करावा)
★खाते चालू असताना एखाद्या वर्षी किमान ₹ ५००/- न भरल्यास ज्या कालावधीत रक्कम भरली नाही त्यासाठी ₹ ५० प्रतिवर्षं एवढा दंड पडेल. किमान जमा अधिक दंडाची रक्कम भरल्याशिवाय खाते पूर्ववत होणार नाही.
★७ व्या आर्थिक वर्षांपासून १६ व्या आर्थिकवर्षापर्यंत त्यापूर्वीच्या चार वर्षांच्या शिल्लख रकमेच्या ५०% रक्कम किंवा या मागील वर्षाच्या शिल्लख रकमेच्या ५०% रक्कम  यापैकी जी रक्कम कमी असेल ती परतफेड न करण्याच्या अटीवर वर्षातून एकदा काढून घेता येऊ शकेल. वरील उदाहरणात १ एप्रिल २०१५ पासून वर्षातून एकदा दरवर्षी पाहिजे असल्यास रक्कम काढता येईल या काळात ३१ मार्च २०१२ च्या शिल्लक रकमेची ५०% रक्कम काढता येईल अथवा ३१ मार्च २०१५ रोजी शिल्लख रकमेच्या ५०% यातील सर्वात कमी असलेली रक्कम काढता येईल. (पैसे काढण्यासाठी फॉर्म २ चाच वापर करावा)
★खात्याची मुदतपूर्ती झाल्यावर हे खाते ५ वर्षांनी वाढवता येते तेव्हा यातील शिल्लख रकमेच्या ६०% रक्कम काढून घेता येईल. पुढील कालावधीत त्यात रक्कम जमा करायची की नाही या संबंधात खातेदारांना दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत मात्र एक वर्षात सदर खात्यात पैसे न भरल्यास त्यानंतरच्या वर्षात त्यात पैसे भरता येणार नाहीत. (खाते बंद करण्यास किंवा त्याची मुदत, पैसे न भरता ५ वर्ष वाढवण्यास फॉर्म ३ चा वापर करावा तर पैसे भरत राहून मुदत वाढवण्यास फॉर्म ४ चा वापर करावा)
★जवळच्या व्यक्तीच्या  गंभीर आजारावरील खर्चासाठी अथवा उच्च शिक्षणासाठी पाच वर्षे पूर्ण झालेले खाते मुदतीपूर्वी बंद करता येते (यासाठी फॉर्म ५ चा वापर करावा) असे खाते बंद करताना त्यात वेळोवेळी जमा केलेल्या व्याजाची रक्कम   १% व्याजदर कमी करून दंड म्हणून कापून घेतली जाईल.
★या खात्यावर कोणत्याही प्रकारची जप्ती कोणतेही न्यायालय आणू शकत नाही.
       सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीमुळे 'थेंबे थेंबे तळे साठे' या न्यायाने मोठया प्रमाणात भांडवल जमा होते. करात सवलत, करमुक्त व्याज व मुदतापूर्ती नंतर मिळणारी करमुक्त रक्कम यामुळे नोकरी करणारे, न करणारे, व्यावसायिक, विद्यार्थी, निवृत्त या सर्वाना उपयोगी पडेल अशी ही योजना आहे, तिचा कल्पकतेने वापर करता येऊ शकेल. खात्रीशीर सर्वाधिक परतावा देणारी, दुसऱ्या क्रमांकाची, सर्वाधिक व्याज देणारी सरकारी योजना आहे. याहून अधिक व्याज वरिष्ठ नागरिक बचत योजना व सुकन्या समृद्धी योजनेस मिळते परंतू पी पी एफ प्रमाणे या योजनेचे खाते प्रत्येकास काढता येत नसल्याने त्यास मर्यादा आहेत. या योजनेस पूरक असलेल्या राष्ट्रीय सेवानिवृत्ती योजना (NPS) व समभाग संलग्न बचत योजना (ELSS) कदाचित अधिक लाभ देऊ शकतात परंतू असा लाभ मिळेलच याची कोणतीही हमी नसल्याने प्रत्येक व्यक्तीकडे हे खाते हवेच. याशिवाय पालकांनी त्याच्या मुलांना खाते उघडून दिल्यास भविष्यात त्यांना त्याचा चांगला वापर करता येऊ शकेल.
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर येथे ६ मार्च २०१९ रोजी पूर्वप्रकाशीत.

No comments:

Post a Comment