Friday, 28 October 2022
शेअरबाजारातील गुंतवणुकीचे फंडे
#शेअरबाजारातील_गुंतवणुकीचे_फंडे
शेअरबाजारातूनच आपल्याला चांगला परतावा मिळेल असे वाटत असल्याने आज सामान्य गुंतवणूकदारांची टक्केवारी बऱ्यापैकी वाढली आहे. यातील काही लोक हे जुगारी प्रवृत्तीचेही आहेत त्यांना बाजाराने गेल्या अनेक वर्षात दिलेल्या वार्षिक परताव्याएवढा परतावा मासिक, पाक्षिक,साप्ताहिक मिळावा याहीपुढे जाऊन तो रोज मिळावा अशी अपेक्षा असते. यातील कितीही तज्ञ व्यक्ती असेल तरी सातत्याने अवास्तव परतावा मिळण्याची शक्यता नाही उलट अशी चाल अंगाशी येईन जे काही कमावले ते निघून जाऊन अधिक देयता कधी निर्माण होईल ते कळणारही नाही. तेव्हा असे बेधडकपणे फसवे दावे करणारे लोक जे काही सांगतात त्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका हे मी एवढ्या वर्षांच्या अनुभवातून निश्चित सांगू शकतो.
माझ्या आर्थिक विषयांवर फेसबुक पेज आणि ब्लॉगमुळे अनेक व्यक्ती माझ्या संपर्कात आहेत. यातील काही जाणकार व्यक्तीशी त्यांची गुंतवणूक करण्याची पद्धत जाणून घेतल्यावर सर्वसाधारण गुंतवणूकदारांना उपयोगी पडतील अशा दोन पद्धती मला सापडल्या ज्या मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांना उपयोगी पडतील त्यावर मी स्वतंत्र लेख लिहिले असून ते आपण पुन्हा मुळातून वाचू शकता. या दोन पद्धती अशा-
★नितीन पोताडे सरांची पद्धत- यामध्ये आपण निवडलेल्या शेअर्समध्ये एकरकमी गुंतवणूक न करता 50% रक्कम गुंतवावी. भाव 5% खाली आले की 5% गुंतवणूक वाढवावी आणि 5% वाढल्यावर 5% गुंतवणूक काढून घ्यावी. जेव्हा बाजारभाव सातत्याने वरखाली होतात तेव्हा ही पद्धत अत्यंत उपयोगी आहे यामुळे बाजार वर जावो की खाली गुंतवणूकदार म्हणून आपल्याकडे कायम गुंतवणूक संधी उपलब्ध राहते समजा भाव त्याहून वर जाऊन कुठेतरी स्थिरावले तरीही हीच पद्धत वापरावी. ती पातळी हा मुळभाव पकडून त्या खालीवर खरेदी विक्री व्यवहार करावेत.
★पंकज कोटलवर सरांची पद्धत- यामध्ये निवडलेल्या शेअरपैकी ज्यांचे भाव वाढत आहेत त्याच कंपनीचे शेअर्स थोडे थोडे खरेदी करावेत यामुळे आपला फोलिओ सतत उत्कर्ष दाखवतो. ज्या शेअर्सचे भाव वाढत नाहीत त्यांचे शेअर्स तसेच ठेवावेत त्यात अधिक गुंतवणूक केल्याने मोठ्या प्रमाणात पैसे अडकण्याची शक्यता असते.
या पद्धतीशिवाय गुंतवणूकदारांना सर्वमान्य असलेल्या पद्धती अशा-
★मार्केट लीडरमध्ये गुंतवणूक- प्रत्येक क्षेत्रात एक दोन दादा कंपन्या असतात आशा कंपन्या आपले बाजारातील स्थान टिकवण्याचा पर्यंत करीत असल्याने एक गुंतवणूकदार म्हणून त्या कंपन्या अपेक्षित कामगिरी करतात ना? एवढेच यावर लक्ष ठेवावे लागते.
★सरकारी कंपन्यांतील गुंतवणूक- सदर कंपन्यामधील गुंतवणूक सरकार हळू हळू काढून घेत आहे ही एक संथ प्रक्रिया आहे त्यामुळे या कंपन्यांच्या भावात त्यांचे खरे मूल्य दिसून येत नाही त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर मालमत्ता असल्याने खाजगीकरण झाल्याने त्याचा फायदा गुंतवणूकदारांना मिळू शकतो.
★भरपूर लाभांश देणाऱ्या कंपन्या- यात अनेक सरकारी काही खाजगी कंपन्या येतात या कंपन्या त्याच्या बाजारभावशी तुलना केली असता जो लाभांश देतात त्याचा उतारा हा मुदत ठेवींवरील व्याजाहून अधिक आहे त्यामुळे तुलनात्मकदृष्टीने यातून तोटा होण्याची शक्यता कमी असते त्याचप्रमाणे या शेअर्सच्या भावात 15 ते 20% भांडवलवृद्धीही होऊ शकते.
★म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाची गुंतवणूक- म्युच्युअल फंड योजनांच्या व्यवस्थापक कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतो ती वाढवतो अथवा कमी करतो याचा अहवाल जाहीर करीत असतो हा अहवाल अँफीच्या (सर्व म्युच्युअल फंड व्यवस्थापन कंपन्यांची संघटना) संकेतस्थळावर जाऊन कुणालाही पाहता येतो या पद्धतीने सर्वसाधारण माहिती मिळू शकते परंतु ती महिनाभरापूर्वीची असल्याने नंतर झालेल्या बद्दलबद्धल गुंतवणूकदार अनभिज्ञ राहतो.
★कॉफी कॅन पोर्टफोलिओ- या पद्धतीने जी गुंतवणूक केली जाते मागील 10 वर्षात सातत्याने नफ्यात 15% आणि उलाढालीत 10% सातत्याने वाढ दर्शविणाऱ्या कंपन्यांत केली जाते. अनेक वित्तीय संस्था, भांडवल व्यवस्थापन कंपन्या, मोठे गुंतवणूकदार दरवर्षी त्याचा या पद्धतीचा गुंतवणूक संच जाहीर करतात. त्याचा अभ्यास करून स्वतःचा गुंतवणूक संच तयार करता येणे शक्य आहे.
★स्मॉलकेस- ही म्युच्युअल फंडाच्या जवळपास जाणारी अलीकडे उदयास आलेली कल्पना आहे. यात कोणत्या शेअर्समध्ये किती प्रमाणात गुंतवणूक करायची ते आधीच ठरवले जाते. त्याप्रमाणे गुंतवणूकदारांच्या गरजेनुसार त्यांची निर्मिती केली जाते. यामुळे आपल्याला सूचनेनुसार गुंतवणूक करणे एवढाच पर्याय शिल्लक राहतो.
या आणि अशा पद्धतीचा विचार करून आपले स्वतःचे असे गुंतवणूक धोरण ठरवता येऊ शकते. असे धोरण ठरवताना काही गोष्टी मनात निश्चित कराव्यात आणि त्यांची जाणिव ठेवावी. उदाहरणार्थ-
*गुंतवणूक का? कशासाठी?
*आपण किती जोखीम स्वीकारू शकतो.
*आपली गुंतवणूक कमी होता कामा नये.
*मिळणारा परतावा सर्वसाधारण मिळू शकणाऱ्या परताव्याहून अधिक असावा.
*आपली गुंतवणूक पद्धत काय आहे ते आपल्याला ठामपणे सांगता येईल का?
तरीही काही ठाम निर्णय घेता येत नसेल आणि किमान आठ वर्षे थांबायची तयारी असेल तर म्युच्युअल फंडाच्या इंडेक्स फंड योजना साधारणतः 12%, फ्लेक्सजी कॅप 15% च्या आसपास परतावा देतील तर ब्ल्यू चिप फंडाचा परतावा याच्याच आसपास असेल असे मागील 40 वर्षाचा इतिहास पाहून आपण सांगू शकतो. याहून अधिक परतावा मिळू शकणाऱ्या योजनांत जोखीम अधिक असल्याने त्या सर्वसामान्य लोकांसाठी नाहीत.
दरमहा 5% तर जेष्ठांसाठी 8% मासिक परतावा देऊ करणाऱ्या योजनांच्या जाहीराती आघाडीच्या वृत्तपत्रातून रोज येत असल्या तरी असा परतावा सातत्याने मिळणे अशक्य आहे यात जोखिमही खूप जास्त असल्याने या सापळ्यात कोणी अडकू नये किंवा असा विचार आपले मित्र नातेवाईक करीत असल्यास त्यांना यापासून परावृत्त करावे.
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 28 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 21 October 2022
झेरोधाच्या अनुचित व्यापारी प्रथा आणि सेवेतील त्रुटी
#झेरोधाच्या_अनुचित_व्यापारी_प्रथा_आणि_सेवेतील_त्रुटी
ऑनलाइन व्यवहार करण्याशी माझा संबंध खऱ्या अर्थाने सन 2016 साली आला. मुंबई ग्राहक संघाच्या त्या वेळच्या शिक्षण विभागप्रमुख वसुंधराताई देवधर यांनी यूपीआयची माहिती असलेली एक लिंक पाठवून त्यावर एक लेख लिहून मागितला होता. या आधी ऑनलाइन काही हवं असल्यास ते मुलांना सांगितलं की तेच व्यवहार करायचे आणि वस्तू हातात यायची. यूपीआय ही क्रांतिकारी पेमेंट पद्धत तेव्हा नुकतीच सुरू झाली होती मी प्रत्यक्षात ऑनलाइन व्यवहार कधी केले नसले ते ते कसे करता येतील हे वाचले होते. यूपीआयवरील माहिती वाचल्यावर ही पध्दत आर्थिक बाबतीत क्रांतिकारी बदल घडवेल हे मी ओळखले. आता यावर लिहायचे तर त्यासाठी आवश्यक गोष्टी आपणच करून पहाव्यात तर त्याचे फायदे तोटे लोकांना सांगण्याचा नैतिक अधिकार आपल्याला असेल असे वाटल्याने त्यासाठी आवश्यक असणारा आभासी पत्ता (UPI address) तयार करून माझ्या भाच्याला ₹100/- पाठवून ते त्याला त्याच क्षणी मिळतात याची मी खात्री फोनवरून करून घेतली.
त्या दिवसापासून आजतागायत जिथे जिथे ऑनलाइन व्यवहार होऊ शकतो तो मी ऑनलाइन पद्धतीनेच करत आहे. यातील तत्परता, सुलभता, व्यवहाराची होणारी नोंद आणि हे सर्व जवळपास विनामूल्य! या गोष्टींची कुणालाही निश्चित भुरळ पडेल असेच सारेकाही. या सर्वाचा प्रसार प्रचार पुरस्कार तेव्हापासून मी करीतच आहे. ज्यांना असे व्यवहार करायची भीती वाटते त्यांची भीती घालवण्याचे काम मी सातत्याने करीत आहे. आपण हे सारं सहज करू शकतो हे कळल्यावर आत्मविश्वासात वाढ होते.
ब्रोकरकडे असणारे आपले खाते हे नेमके कोणत्या प्रकारच्या ब्रोकरकडे असावे याबाबत मार्गदर्शन करताना जे टेक्नोसॅव्ही आहेत त्यांनी डिस्काऊंट ब्रोकरकडे तर ज्यांना आपल्या परंपरागत पद्धतीने व्यवहार करायचे आहेत त्यांनी फुल फ्लेज ब्रोकर्सकडे आपले व्यवहार करावे असे माझे मत आहे. मध्यंतरी म्हणजे करोना कालखंडात मानवी हालचालींवर मर्यादा आल्याने बहुतेक फुल फ्लेज ब्रोकर्सनी आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी अँप विकसित केली त्यामुळे फोन करून व्यवहार करण्याऐवजी फोनमधून व्यवहार करता येणे शक्य झाले. अँप म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तो आपल्या गरजेनुरूप एक निश्चित केलेला कम्प्युटर प्रोग्राम आहे. याशिवाय सेबीने मार्जिन नियम बदलल्याने पूर्वीप्रमाणे एकाद्या खात्यास शब्दावर मार्जिन मिळणे बंद झाल्याने या दोन्ही ब्रोकर्सच्या कार्यपद्धतीत आता फारसा फरक राहिलेला नाही.
माझ्या भावी आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने मी गेल्यावर्षी जे बाजार व्यवहार केले त्याचा तपशील आयकर विवरणपत्र भरताना भरपूर ब्रोकरेज गेल्याचे लक्षात आले हेच व्यवहार डिस्काउंट ब्रोकरमार्फत केले असते तर 95% ब्रोकरेज वाचले असते. आपलयाला जर ऑनलाइन व्यवहार करता येतात मग आपण डिस्काउंट ब्रोकरकडे असे खाते का उघडू नये असा विचार आला?
असे खाते उघडताना त्याविषयी अधिक माहिती मिळवताना झेरोधाकडे खाते उघडुयात त्यांचे आयडीएफसी बँकेबरोबर 3 इन 1 खाते निर्माण करता येत असल्याचा करार झालेला असल्याने व्यवहाराच्या दृष्टीने सोईचे होईल म्हणून दोन्हीकडे खाते उघडण्याचा निर्णय मी घेतला याशिवाय असा निर्णय घेण्यामागे माझ्या जाणकार मित्राने झेरोधाचा इंटरफेस चांगला असून कस्टमर सर्व्हिस चांगली असल्याची केलेली शिफारस आणि हे खाते मुलगा वापरत असल्याने काही अडचण आल्यास त्याला विचारता येईल हा भरवसा होता.
मित्राच्या शिफारशींमुळे ठाण्यातील झेरोधा प्रतिनिधीने माझ्याशी संपर्क साधून मार्गदर्शन केले आणि ऑनलाइन खाते उघडताना कुठे अडचण आल्यास त्वरित मार्गदर्शन करू असे सांगितले. माझी 3 इन 1 खात्याची गरज सांगितल्यावर त्यांनी प्रथम आयएफसीआय बँकेत खाते उघडून तो नंबर झेरोधाकडे द्यावा असे सुचवल्याने प्रथम आयडीएफसी बँकेत आणि नंतर झेरोधामध्ये मी खाते ओपन केले. हे खाते उघडण्यासाठी मोजून 20 मिनिटातून अधिक कालावधी लागला नाही. केवायसीही ऑनलाइन झाले हा एक सुखद आणि आपला आत्मविश्वास वाढवणारा अनुभव होता. या सर्व घटना 22 ते 24 सप्टेंबर या कालावधीत. यानंतर मी हे खाते 3 in 1 करण्यासाठी द्यावा लागणारे पीओए डॉक्युमेंट पोर्टलवर जाऊन प्रोसेस केले त्याचा प्रिंटआऊट घेऊन तो स्पीड पोस्टाने बंगलोर येथे 28 सप्टेंबर रोजी पाठवला. तो त्यांना 30 सप्टेंबरला मिळाला. या प्रत्येक टप्यावर मला वेळोवेळी मेलवरून स्थितीची माहिती वेळोवेळी मिळत राहिल्याने समाधान वाटत होते.
हे समाधान अल्पकाळात नाहीसे झाले. 30 सप्टेंबरला मला संध्याकाळी मी पाठवलेला पीओए फॉर्म जुना असल्याने नाकारला असल्याचा मेल आला मी लगेच माझ्या संपर्कात असलेल्या सपोर्ट टीम मेम्बरशी संपर्क साधल्यावर त्यांनी मला वेगळी पीओए फॉर्मची लिंक पाठवली त्यातील फॉर्म आणि मी पोर्टलवरून घेतलेल्या फॉर्ममध्ये एका शब्दाचाही फरक नसल्याने तो फॉर्म पुन्हा पाठवण्यास मी नकार दिला. यानंतर सपोर्ट मेम्बरने त्यांच्या वरिष्ठांशी बोलून फॉर्म न पाठवता पीओए ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले त्याप्रमाणे केले असता ते नाकारण्यात आले याबाबत मी पोर्टलवर टिकेट जनरेट केले म्हणजे आपली तक्रार तेथे नोंदवली. त्याचे उत्तर मी पीओए फॉर्म पाठवलेला नसल्याने अर्ज नाकारण्यात आल्याचे कळवले. तेव्हापासून 14 ऑक्टोबरपर्यंत जिथे संपर्क साधला तेथून वेगवेगळे अनुभव आले. सपोर्ट करणारा वेगळे सांगणार, मेलचे उत्तर भलतेच, कस्टमर केअर तोंडाला पाणी पुसणारे आमची टीम तुमच्याशी 24 तासात संपर्क साधेल म्हणून सांगून वेळ मारून नेणार. यात नेमके काय करायला हवे कुणाचाच कुणाला मेळ नाही समस्या आहे तिथेच. ती सोडवायची सोडून तुम्ही नेट बँकिंगने, यूपीआयने पैसे पाठवून व्यवहार करू शकता किंवा आयडीएफसी बॅंकेला विचारून पहा सांगणार तर बँकवाले आमच्याकडून ओके आहे तुम्ही झेरोधाला विचारा सांगणार यातून मनस्ताप होण्याखेरीज काहीही झाले नाही.
14 ऑक्टोबर शुक्रवारी रात्री सपोर्ट टीमच्या मॅनेजरने 18 ऑक्टोबरपर्यंत प्राधान्याने तक्रार सोडवण्याचे आश्वासन दिले आहे एकंदरीत अनुभव पाहता त्यास यश येईल असे वाटले नाही, तोपर्यंत हा प्रश्न न सुटल्यास मी 19 ऑक्टोबर रोजी खाते बंद करणार म्हणून माझ्याकडून त्यांना मर्यादा घातली होती. सेवेतील त्रुटी आणि अनुचित व्यापारी प्रथा याबद्धल खाते काढताना भरलेले ₹200/- आणि मनस्ताप याबद्दल भरपाई मिळवू शकण्याचा पर्याय माझ्याकडे आहे. 19 ऑक्टोबर रोजी हा प्रश्न न सुटल्याने मी कंटाळून झेरोधा खाते बंद केले आहे. त्यांनीही तितक्याच तातडीने ते कोणताही विचारपूस न करता तत्परतेने बंद केले आहे. खाते रीतसर सुरू होण्यापूर्वी जर ही अवस्था असेल तर यानंतर उद्भवणाऱ्या तक्रारी मी कशा सोडवणार याबाबत मला वाटणारी काळजी रास्त आहे. आता अनधिकृतपणे झेरोधा आणि आयडीएफसी बॅंक यांच्यात काहीतरी नवीन करार होणार आहे असं समजतंय. ते सपोर्ट टीम,पोर्टल, कस्टमर केअर याना माहीत नसेल तर आपल्या पोर्टलवर आहे असे दाखवणे चूक आहे. मला आलेल्या मेलमध्ये असा करार नसल्याचे त्यांनी नाकारले नाही. उलट अपडेटेड फॉर्म पाठवा, फॉर्म आलेला नाही अशी कारणे दिली असून 24 तासात संपर्क केला जाईल सांगितले तरी तो कोणत्याही मार्गाने कधीच झाला नाही. मीच त्याचा वारंवार फॉलोअप घेत होतो प्रत्येक वेळी वेगवेगळ्या व्यक्तींना माझी तक्रार सुरुवातीपासून सांगत होतो. ऑनलाइन व्यवहार जितक्या सहज होतात तितक्या सहज या संबंधात उद्भवणारे प्रश्न अजूनही सहज सुटत नाहीत हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ज्या सुलभतेने खाते उघडले जाते किंवा बंद होते त्यावरून या सर्वानाच ग्राहक हवेत पण त्यांच्या तक्रारी नको आहेत किंवा त्याकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे आहे याची आस्था नाही, भले ते आपल्याला सोडून गेले तरी चालतील, हेच यातून अधोरेखित होत आहे.
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 21 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 14 October 2022
टोकनायझेशन -ऑनलाइन कार्ड व्यवहारासाठी
#टोकनायझेशन_ऑनलाइन_कार्ड_व्यवहारासाठी
एखादी वस्तू आणि सेवा यांची खरेदी ऑनलाईन करणं हे आता नवीन नाही. अशी खरेदी करताना कोणत्याही प्रकारच्या रोख रकमेची हाताळणी केली जात नाही कागदाचा वापर होत नाही. यासाठी पेमेंट करताना क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड याचा वापर करून, एईपीएस ही आधारद्वारे आपली ओळख पटवून, यूपीआय द्वारे, मोबाईल वॉलेटचा वापर करून, नेटबँकिंगद्वारे, विक्री ठिकाणी उपलब्ध पीओएस टर्मिनलवरून, मोबाईल बॅंकिंगने, पेयु पार्टनरच्या माध्यमातून हे व्यवहार सुरक्षित, जलद आणि विनामूल्य व्हावेत यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. ऑनलाइन पद्धतीने केल्या जाणाऱ्या सर्व व्यवहारातील 60% व्यवहार हे वेगवेगळ्या विक्री संस्थांच्या इ कॉमर्स पार्टलवरून होतात येथे विविध पेमेंट पद्धतीचे पर्याय उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणाहून ग्राहक वारंवार खरेदी करतात तेथे जर ते क्रेडिट/ डेबिट कार्ड वापरून व्यवहार करणार असतील तर पुन्हा व्यवहार करण्यास सोईच्या दृष्टीने कार्डची माहिती साठवून ग्राहकांना तात्काळ उपलब्ध केली जात होती. भारतीय रिझर्व बँकेने 1 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करत असताना ग्राहकांची महत्वपूर्ण माहिती म्हणजे कार्ड क्रमांक, सिविवी, कार्ड मुदत यासारखी महत्वाची माहिती साठवून ठेवण्यास व्यापारी संस्थाना मनाई केली आहे.
त्याऐवजी त्याची आभासी ओळख म्हणजे टोकनायझेद्वारे ओळख सिद्ध करून ऑनलाइन व्यवहार करायची सवलत दिली आहे. ग्राहकांना यापुढे प्रत्येक वेळी व्यवहार केल्यावर कार्ड वापर करणार असेल तर त्याचा पूर्ण तपशील द्यावा लागेल तो इ कॉमर्सच्या पोर्टलवर नसेल किंवा आपल्या कार्डाचे टोकनायझेशन करून मिळालेला क्रमांक वापरून करता येईल.
★आता कार्डाचे टोकनायझेशन म्हणजे काय? ते पाहुयात.
■हा एक आपल्या कार्डास दिलेला पर्यायी क्रमांक म्हणजेच कोड आहे जो आपणास बँकेच्या संकेतस्थळ अथवा अँप वरून मिळेल हा टोकन क्रमांक आपणास कार्डवरील आवश्यक माहिती ऐवजी विक्रेत्याच्या संकेतस्थळावर साठवण्या ऐवजी या टोकन क्रमांकाने आपले भविष्यातील व्यवहार पूर्ण करता येतील या नवीन सुविधेमुळे कोणत्याही विक्रेत्यास यापुढे ग्राहकांचा कार्ड क्रमांक, सिविवी आणि कार्डची मुदतसमाप्तीची तारीख ही वैयक्तिक माहिती आता साठवता येणार नाही
★हे टोकन कुठे वापरता येईल?
■एकदा हा कोड तयार केला की जेथे कार्ड डिटेल्स द्यावी लागतात त्या सर्वच ठिकाणी कार्डाचा तपशील देण्याऐवजी टोकन नंबर दिल्यावर व्यवहार अन्य कोणतीही माहिती न देता पूर्ण करता येईल
★यापासून कोणकोणते फायदे होतील?
■अश्या प्रकारे कार्ड तपशील पोर्टलवर देऊन व्यवहार करण्यापेक्षा अधिक सुरक्षित आहे कारण या मध्ये ग्राहकांचा कोणताही तपशील व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांस कळत नाही.
★अधिक सुरक्षित असलेला हा टोकनायझेशन कोड कुठून घ्यायचा?
■यासाठी-
*जेथे ऑनलाइन व्यवहार करणार तेथे खरेदी करून पे बिल येथपर्यंत येऊन तेथे असलेल्या पेमेंट गेटवेवर जा
*यानंतर पेमेंट करण्याच्या पर्याय प्रकारातून क्रेडिट / डेबिट कार्ड ची निवड करा त्यात आपले सर्व डिटेल भरा
*यानंतर secure your card किंवा save card as per RBI guidelines असा पर्याय येईल त्यास मान्यता द्या
*तुमच्या बँके खात्याशी संलग्न असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका
*तुमचे कार्ड सुरक्षित झाले असल्याचा संदेश येईल.
★ही क्रिया कशी पार पाडली जाईल?
■हा कोड मिळवताना कोणताही तयार तपशील मिळणार नाही तो स्वतःलाच भरावा लागेल. यास ग्राहकांची संमती मिळवताना ती त्यांनीच दिली आहे ना यासंबंधी पुरेशी काळजी घेऊन खात्री करूनच टोकन नंबर दिला जाईल.
★टोकनायझेशनची मार्गदर्शक तत्वे नक्की कोणत्या कार्डांसाठी?
■भारतात वापरल्या जाणाऱ्या रुपयात व्यवहार होत असलेल्या सर्व क्रेडिट/ डेबिट-कार्डाचे टोकनायझेशन होऊ शकते.
★ही मार्गदर्शक तत्वे नक्की कोणत्या व्यवहारासाठी?
■कार्डने होऊ शकणाऱ्या फक्त आंतरदेशीय व्यवहारासाठी उपयोगी.
★टोकनायझेशनचे व्यवस्थापन मी कसे करणार?
■आपल्या बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रास सांगून त्याचे व्यवस्थापन करता येईल. कार्डहोल्डर ज्याप्रमाणे टोकन मिळवू शकतो तसेच ते रद्द करू शकतो, स्थगित करू शकतो आपल्या गरजेनुसार पुन्हा पुन्हा वापरू शकतो.
★टोकनायझेशनचा पीओएस व्यवहारांवर परिणाम होईल का?
■नाही, ही कार्डचा थेट वापर करण्याहून अधिक सुरक्षित व्यवहार करण्यास उपलब्ध करण्यात आलेली ही सोय आहे.
★ही सेवा घेण्यास काही सेवाशुल्क द्यावे लागेल का?
■यासाठी ग्राहकास कोणतेही सेवाशुल्क द्यावे लागणार नाही.
★हा कोड देणे रद्द करणे नक्की कोण करणार?
■हे काम तुमची बँक किंवा त्यांनी मान्यता दिलेली विसा, मास्टरकार्ड, रूपे यासारखी पेमेंट यंत्रणा यांच्याकडूनच होईल.
★यामुळे कार्ड धारकाची माहिती सुरक्षित आहे का?
■ही माहिती सांकेतिक स्वरूपात अन्य सुरक्षित ठिकाणी साठवली जात असल्याने बँक किंवा त्यांनी मान्यता दिलेल्या लोकांपर्यंत ही माहिती जात नसल्याने अधिक सुरक्षित असल्याचे त्यांचे नियामक भारतीय रिजर्व बँकेचे मत आहे. विक्रेता, टोकनची मागणी करणारा ग्राहक, त्याची बँक आणि पेमेंट प्रणाली यांच्याकडे पूर्ण स्वरूपात ही माहिती साठवली जात नाही.
★ग्राहकाने टोकनायझेशन करणे सक्तीचे आहे का?
नाही, टोकनायझेशन न करणाऱ्या ग्राहकांना कार्डने व्यवहार करताना त्यावरील तपशील म्हणजे कार्डाचा 16 अंकी पूर्ण क्रमांक, वैधतेचा महिना/ वर्ष, सीवीवी प्रत्येकवेळी भरावा लागेल.
★एक व्यक्ती किती कार्डचे टोकनायझेशन करू शकेल यावर काही मर्यादा आहे का?
■नाही, एक व्यक्ती तो वापरत असलेल्या कितीही कार्डांचे त्याच्या इच्छेनुसार टोकनायझेशन करू शकतो आणि त्यातील कोणते कार्ड कुठे वापरावे ते ठरवू शकतो.
★टोकनायझेशन झालेले कार्ड नेमके कोणते ते इकॉमर्स मंचावर कसे समजेल?
■या मंचावर कार्डाच्या जागी पूर्ण क्रमांक दिसण्याऐवजी ×××× ×××× ×××× 1234 या ठिकाणी अंतिम चार अंक दिसतील.
★टोकनायझेशन रद्द केल्यावर, कार्ड नवीन मिळाल्यावर किंवा त्याचा दर्जा उंचावल्यावर काय होईल?
■काही नाही, ग्राहकांना अशा प्रसंगी पुन्हा एकदा नव्या कार्डाचे टोकनायझेशन पूर्वीच्याच पद्धतीने एकदा करून घ्यावे लागेल.
★प्रत्येक इकॉमर्स मंचासाठी कार्डाचे वेगळे टोकनायझेशन करावे लागेल का?
■हो, कारण हा एक खास क्रमांक असेल जो सदर कार्डऐवजी त्याच मंचासाठी तयार केला जाईल. एकच कार्ड वेगवेगळ्या मंचावर वापरायचे असल्यास प्रत्येक ठिकाणी वेगळे टोकन घ्यावे लागेल. तर एकाच ठिकाणी तीन वेगवेगळी कार्ड वापरायची असतील तरीही प्रत्येक कार्डाचे टोकनायझेशन करून घ्यावे लागेल. कारण हा कोड हा संबंधित मंच आणि कार्ड याची ओळख दर्शवणारा खास क्रमांक असेल.
★कार्डनिर्माता एखाद्या ठिकाणी टोकनायझेशन करण्यास नकार देऊ शकतो का?
■हो, यातील जोखमीचा विचार करून कोणत्या व्यापाऱ्यांस कार्ड सुविधा द्यावी आणि कोणास देऊ नये हा त्यांचा अधिकार आहे.
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 14 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.
Friday, 7 October 2022
वैद्यकीय इच्छापत्र एक निरवानिराव
#वैद्यकीय_इच्छापत्र_एक_निरवानिराव
मरण अटळ असले तरी ते येत असताना, आपण परावलंबी आहोत नाकातोंडात नळ्या घातल्या आहेत आणि केवळ कृत्रिम उपकरणाच्या साहाय्याने जिवंत आहोत अशी स्वतःबद्दलची कल्पनाच कोणी करू शकत नाही. आपला शेवटचा दिस गोड व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असल्याने अश्या विषयावर चर्चा करणे म्हणजे काहीतरी अभद्र बोलणे असे समजले जाते. आपल्या माहितीत अशी काही उदाहरणे असतील ज्यांच्यावर त्यांच्या प्रिय व्यक्तींना केवळ भावनेच्या आहारी जाऊन असे फारसा उपयोग नसलेले उपचार करण्याची वेळ आली. यात ती व्यक्ती तर गेलीच पण त्याच्या कुटुंबियांना मानसिक त्रासातून जावे लागले, याशिवाय मोठे भरमसाठ बिल झाल्याने आर्थिक झटका बसला ते वेगळे. उपाय होत नाही, परवडत नाही किंवा काही उपायच नाहीत अशा प्रसंगात नंतर पेशंटला घरी नेऊन तो कधी जातो याकडे वाट पाहत बसावे लागते ते वेगळेच.
अशी वेळ नक्की कोणावर कधी येईल हे सांगून येत नसेल तरी कोणतीही सुजाण व्यक्ती आपल्यामुळे भविष्यात आपल्या कुटुंबावर कदाचित अशी वेळ आली तर काय करायचे ? आपल्या आजारावर उपचार करून उपयोग होणार नसेलच तर खर्च करत राहायचा का? ज्याच्या सुखासाठी आपण आयुष्यभर धडपडलो त्या प्रिय व्यक्तींना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासात अडकवून ठेवावे का? कोणते उपचार करावेत करू नयेत याबद्दल आपली इच्छा व्यक्त करणारे इच्छापत्र आपण बनवू शकते यास लिव्हिंग विल असे म्हणतात. आपण यासंदर्भात निर्णय घेण्यास सक्षम नसू अशा वेळी कोणते उपचार करावेत आणि कोणते करू नयेत यासंबंधी आपल्या इच्छा त्यात व्यक्त करता येतील. थोडक्यात आपली इच्छा नसताना आपल्यावर कोणते उपचार केले जाऊ नयेत याविषयी आपल्या कुटुंबियांना केलेले हे मार्गदर्शन असते. त्यामुळे लोक काय म्हणतील सुचवलेले उपचार करावेत की नाही करावे यासंबंधी वेळेत निर्णय घेण्याचे मानसिक बळ त्यांना मिळेल. वैद्यकीय इच्छापत्राद्वारे आपण ते करू शकतो.
कोणतेही निर्णय घेण्यास आपण असमर्थ असलो किंवा झालो तर आपल्यावर कोणत्या टप्यापर्यंत उपचार करावेत याविषयी आपले वारस किंवा जे कोणी काळजी घेणारे असतील त्यांना आणि आपल्यावर उपचार कारणारे कोणीही डॉक्टर ( अलीकडे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आता मोडीत निघाली आहे) यांना दिशादर्शन करणारा हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. उदा. मेंदू काम करेनासा झाल्यास कृत्रिम साधने लावू नयेत, अन्न जात नसल्यास नळीच्याद्वारे अन्न देऊ नये. श्वसनाचा त्रास होत असल्यास ऑक्सिजन लावू नये, व्हेंटिलेटरवर ठेऊ नये किंवा विशिष्ठ पॅथीचेच उपचार करावेत अथवा करू नयेत यासंबंधी आपण त्यात लिहू शकतो. याचबरोबर आपल्या मृत्यूपश्चात नेत्रदान, देहदान, अवयवदान करायचे असल्यास त्या संदर्भातील आपल्या इच्छा यात लिहिता येतील.
यासंबंधी पूर्ण विचार करून आपल्या इच्छा लिहाव्यात आणि त्याचा तपशील एकत्रित करून ₹ 100/- च्या बॉण्डपेपरवर ते लिहून काढून त्यावर सही करावी साक्षीदार म्हणून जोडीदार मुले यांची सही घ्यावी याशिवाय या व्यक्तीची मानसिक स्थिती उत्तम असल्याचे डॉ तेथेच प्रमाणित करून सही करावी याशिवाय दोन विश्वासू व्यक्तीच्या सह्या घ्याव्या म्हणजे कठीण प्रसंगात घरचे लोक द्विधा मनस्थितीत असले तर त्यांचे ते अशा प्रसंगात योग्य निर्णय घेण्यात सहाय्य करतील. असे वैद्यकीय इच्छापत्र नोटराईजकरून त्याच्या प्रमाणित प्रति अधिक जास्तीची प्रत प्रत्येक संबंधितांना द्यावी.
मृत्यपत्र आणि हे इच्छापत्र यातील महत्वाचा फरक हा की मृत्यूपत्राची अंमलबजावणी व्यक्तीच्या मृत्यूनंतर होते आणि तो आपल्या संपत्तीचे वाटप कसे व्हावे हे सांगणारा कायदेशीर दस्त आहे. त्यातील तरतुदींची माहिती वारसांना नसते. वैद्यकीय इच्छापत्रातील तरतुदी तुम्ही जेव्हा कोणतेही निर्णय घेण्यास अकार्यक्षम होता तेव्हाच उपयोगात आणण्याचा विचार केला जातो. मृत्युपत्रातील तरतुदी लाभार्थीना माहिती नसण्याची शक्यता जास्त असते. वैद्यकीय इच्छापत्रात त्यांना याची माहिती आधीच असल्याने ठोस निर्णय घेण्यास मदत होते. याचा अर्थ आपण असे इच्छापत्र केल्यास आपल्यावर उपचार होणार नाहीत असा नाही कारण जोपर्यंत व्यक्ती विचार करू शकते तोपर्यंत तिच्या इच्छेनेच त्यावर उपचार केले जातात जेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही अशा प्रसंगातच काय करावे याचे मार्गदर्शन तुम्हीच करून ठेवलेले असल्याने त्याचा नक्की सारासार विचार केला जातो त्यामुळे असे इच्छापत्र केले तर त्याप्रमाणे केले जाईल का? अशी शंका आपण बाळगू नये उलट आपली निश्चित इच्छा सांगून त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य बहाल करावे कारण आपल्या प्रिय व्यक्तीचे हाल झालेले पहात राहणे कोणताही संवेदनशील माणूस पसंत करणार नाही.
डॉ मुरी या शास्त्रज्ञांनी त्यांच्या आयुष्यात राहिलेल्या इच्छांमध्ये (बकेट लिस्ट) जिवंतपणीच आपल्या मृत्यूनंतर होणाऱ्या शोकसभेत लोक काय म्हणतील ते ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्यांच्या विद्यार्थ्यांनी अशी शोकसभा आयोजित केली होती ज्यात ते स्वतः सहभागी झाले होते. याच संकल्पेनेच्या जवळपास जाणारी ही कल्पना आहे.
तुलनेने नवी अशी ही संकल्पना असून ती कितपत पचनी पडते ते पाहावे लागेल याविषयी इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध असून वृद्धकल्याणशास्त्र या विषयातील डॉक्टरेट मिळवलेल्या विदुषी डॉ रोहिणी पटवर्धन आणि त्यांचे सहकारी याविषयी जागृती निर्माण करीत आहेत तेव्हा अधिक माहिती मिळवून तसेच काही शंका असल्यास त्यांच्याशी याविषयावर चर्चा करावी आणि एक पाऊल पुढे टाकावे त्याच्या 'आपल्यासाठी आपणच' या पुस्तकात दिलेला वैद्यकीय इच्छापत्राचा नमुना संदर्भासाठी जसाच्या तसा देत आहे
वैद्यकीय इच्छापत्र नमुना
माझे कुटुंबीय, माझ्या आरोग्याबाबत आस्था बाळगणारी मंडळी आणि माझे डॉक्टर यांच्यासाठी मी हे वैद्यकीय इच्छापत्र लिहून ठेवत आहे.
1) मी वय
जन्मतारीख माझा पत्ता
मी मृत्युशय्येवर असेन, लवकरच मरण्याची शक्यता दिसत असेल आणि मी बोलण्याच्या परिस्थितीत नसेन, अशा अवस्थेत माझ्यावर
केल्या जाणाऱ्या उपचारांसंदर्भात मी हे वैद्यकीय इच्छापत्र करून, माझी इच्छा स्पष्टपणे नोंदवून ठेवत आहे.
2) आपल्या राज्यघटनेत नमूद केलेला, जगण्याचा अधिकार, या संकल्पनेची, तसंच आविष्कारस्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची मल पूर्ण माहिती आहे. सन्मानाने जगणं आणि सन्मानाने मरणं य भूमिकेला माझा पूर्ण पाठिंबा आहे.
3) माझ्या आजारपणात, मला जगवण्यासाठी जे उपचार केले जाती त्यासंबंधीच्या स्पष्ट सूचना मी माझ्या संबंधितांसाठी पुढीलप्रमा लिहून ठेवत आहे :
अ) मी मरणाच्या दारात असेन, किंवा गाढ बेशुद्धीत असेन, माझा मृत्यू लांबवण्याकरता काहीही उपचार करू नयेत. शरीरात सुया टोचून औषधोपचार करण्याचा किंवा कृत्रिम साधनांच्या मद मला जगवण्याचा प्रयत्न कृपया करू नये. कारण अशा अव आपल्या परावलंबनाचं ओझं इतरांवर टाकणं आणि जगत राह मला कीव करण्यासारखं आणि म्हणूनच घृणास्पद वाटतं.
ब) अशा प्रकारे केवळ जगवण्यासाठी जर उपचार सुरू झाले असतील आणि तेही मला सन्मानाचं जिणं जगण्याच्या दृष्टीने ठरणार नसतील तर मला असं निरर्थक जीवन जगण्याची अजिबात इच्छा नाही. म्हणून हे उपचार ताबडतोब थांबवावेत अशी माझी आग्रहाची विनंती आहे..
क) मी असाध्य रोगाने आजारी आहे, एकूणच जगण्याच्या शक्यता मंदावल्या आहेत किंवा माझ्या बेशुद्धीतून मी बाहेर येण्याचीही आशा नाही, अशा अवस्थेत मला कृत्रिमरीत्या अन्नपाणी देऊन जगवण्याचा खटाटोप करू नये. मला पुन्हा आग्रहपूर्वक सांगायचं आहे की, मला अशा परिस्थितीत कृत्रिमरीत्या जिवंत ठेवणारे सारे उपचार मी नाकारू इच्छिते /इच्छितो.
ड) मला माहीत आहे की, मी काहीही इच्छा नोंदवून ठेवली असली तरी इथे वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत, विचारविनिमय केला जाईल, पण मला ठामपणे म्हणायचं आहे की, या बाबतीतला कायदा असं स्पष्टपणे सांगतो की, अशा परिस्थितीत माणूस स्वत: बोलू शकत नसेल तर त्याच्या इच्छापत्राचं ऐकावं. म्हणूनच माझ्या बाबतीत या संदर्भातील निर्णयाची जबाबदारी घेणाऱ्या सर्वांना माझी पुनःपुन्हा विनंती आहे की, माझ्या वैद्यकीय इच्छापत्राचा मान राखला जावा.
4) माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझ्याविषयी आस्था बाळगणाऱ्या साऱ्यांसाठी या इच्छापत्रांतून मी सांगू बघत आहे की, ज्या वेळी कृत्रिम जीवनाधारांच्या मदतीनंतरही मी पुन्हा पहिल्यासारखं स्वावलंबी सहज जीवन जगू शकणार नाही, त्या वेळी तशा अवस्थेत जिवंत राहण्याची माझी इच्छा नाही. त्या वेळी मी सुदृढ मनाने निर्णय घेण्याच्या अवस्थेत नसेन, म्हणूनच इथे विचारात घेतलेल्या शक्यतांच्या पलीकडे तुम्हाला काही विचार करून निर्णय घेण्याची वेळ आलीच तर सन्मानाने जगणं आणि तसंच सन्मानाने मरणं या माझ्या ध्यासाची तुम्ही आठवण ठेवा. हे वैद्यकीय इच्छापत्र, मी कुणाच्याही दबावापोटी नव्हे, तर स्वतःच राजीखुषीने करत आहे.
मी
खालील साक्षीदारांसह दि.
रोजी वैद्यकीय इच्छापत्रावर माझी सही करत आहे.
नाव
सही
साक्षीदार क्र.1
नाव
फोन / मोबाइल
सही
साक्षीदार क्र. 2
नाव
फोन / मोबाइल
सही
यात जोडीदार मुले डॉक्टर (त्यांच्या टिपणीसह) आणि त्रयस्थ व्यक्ती अशी साक्षीदार संख्येत वाढ करता येईल. वैद्यकीय इच्छापत्र हे कायदेशीर कागदपत्र नसून सर्वांच्या सोयीसाठी त्यांच्याशी विचार विनिमय करून केलेली सोय असून ही एक प्रकारची निरवानिराव म्हणू शकतो ज्या योगे आपल्या प्रियजनाना आपण चुकीचे काही करत असल्याची खंत राहणार नाही. ते करण्याची मानसिक तयारी करण्यासाठीची कृती रोहिनीताईंच्याच शब्दात-
★दोन शब्द प्रत्यक्ष कृतीसाठी★
वैद्यकीय इच्छापत्र ही काळाची गरज आहे. आपले स्वत:चे आणि आपल्या प्रियजनांचे हाल वाचवण्याचा तोच एक मार्ग आहे. मरण अटळ आहे आणि ते सन्मानाने यावं यासाठीचा उपाय आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. मानसिक ताकदीने पुढचा विचार केला तर ते सर्वांच्या हिताचं ठरेल. स्वत:चं वैयक्तिक इच्छापत्र करण्यापूर्वी एखाद्या काल्पनिक केसचं इच्छापत्र तयार करा आणि फाडून टाका. मग स्वतःचं इच्छापत्र करून फाडून टाका. पुन्हा करा. जवळच्या मित्राला किंवा कुटुंबातल्या व्यक्तीला ते दाखवा. परत एकदा फाडून टाका आणि मग खरोखरी स्वतःचं वैद्यकीय इच्छापत्र करा. असं केल्याने आपली स्वत:ची मानसिक तयारी होईल. पहिल्या मसुद्यात असणारा भावनेचा कल्लोळ कमी होईल. कुटुंबाचीही थोडीफार मानसिकता तयार होईल आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा आपल्या जवळच्या लोकांना निर्णय घेण्याचा अधिकार मिळेल, मानसिक बळ मिळेल.
असे बळ आपल्याला मिळून प्रत्यक्ष कृती आपल्या हातून घडल्यास लेखाचा हेतू सार्थकी लागेल.
©उदय पिंगळे
(आधारित-
पुस्तके-आमच्यासाठी आम्हीच, आनंदस्वर जेष्ठांसाठी डॉ रोहिणी पटवर्धन रोहन प्रकाशन)
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 07 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत
Friday, 30 September 2022
मृत्युपत्र अपरिहार्य आवश्यकता भाग 2
#मृत्युपत्र_अपरिहार्य_आवश्यकता भाग 2
याशिवाय-
★भारतीय करार कायदा कलम 17 नुसार त्याची नोंदणी करणे आवश्यक नसले तरी नोंदणी करणे केव्हाही चांगलेच आहे.
★मृत्युपत्र संयुक्तपणे बनवता येत असले तरी स्वतंत्र बनवावे.
★यासाठी यातील तज्ञ व्यक्ती आणि वकील या दोघांची मदत घ्यावी. तज्ञ व्यक्ती आपल्या अपेक्षा त्यात येतात की नाही याची काळजी घेण्यासाठी तर वकील आपल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून भविष्यात कोणत्या अडचणी येऊ शकतील यादृष्टीने त्यातील तरतुदी, वाक्यरचना कायदेशीरदृष्ट्या योग्य आहेत की नाही हे पाहण्यासाठी असावा.
★मृत्युपत्राचा निर्माता आणि 2 साक्षीदार यात एक डॉक्टर असेल तर उत्तम यांनी प्रत्येक पानावर सह्या कराव्यात. शक्यतो त्या एकाच वेळी एकमेकांसमोर केल्या तर ते केव्हाही चांगले.
★मृत्युपत्राची मुळप्रत सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये, आपल्या वकिलाकडे व्यवस्थापक नेमला असल्यास त्याच्याकडे किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
★माहिती असल्यास किंवा नसल्यास अशी माहिती मिळवून त्यात अगदी थोडक्यात असा घराण्याचा इतिहास लिहावा. आयुष्यात उपयोगी पडलेल्या व्यक्तींचा उल्लेख कृथार्थथेने करावा. भविष्यात काही अडचण आल्यास कोणाकडून मार्गदर्शन घ्यावे याचा उल्लेख असावा. असे सुचवण्यामागे मनुष्य हा समाजप्रिय प्राणी असून त्यास समाज घटकांची उपयुक्तता पटवून द्यावी असा व्यापक हेतू आहे. असेच करायला हवे असे नाही.
★या संबंधातील वादविवादांच्यामध्ये संबंधित न्यायालयाने मृत व्यक्तीच्या स्थानी आपण आहोत असे समजून सारासार विचार करून या विषयी आपला निर्णय द्यावा अशी कायद्याची अपेक्षा आहे.
मुंबई ग्राहक पंचायतीने या विषयावर एक छोटी पुस्तिका बनवली होती यात किमान प्राथमिक माहिती आणि संदर्भासाठी मृत्युपत्राचा एक नमुना दिला आहे सध्या या पुस्तिकेची छापील प्रत उपलब्ध नाही. याची सॉफ्ट कॉपी कुणाला हवी असल्यास माझ्याकडून मागून घ्यावी. त्याचाच आधार घेऊन पूर्वी सुचवलेल्या नमुन्यात कालानुरूप योग्य ते बदल करत मृत्युपत्राचा नमुना कसा असावा ते येथे देत आहे.
मृत्युपत्र (नमुना)
★मी खाली सही करणार -
नाव: ×××
राहणार: ×××
पूर्ण पत्ता: ×××
व्यवसाय: ×××
मोबाईल क्रमांक: ×××
वय:××× वर्षे
★प्रास्ताविक: या भागात घराण्याचा इतिहास, आपल्या जडण जडणघडणीत /अडीअडचणीत मदत करणाऱ्या/ भविष्यात मार्गदर्शन होईल अशा व्यक्तींचा थोडक्यात कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा. असे न करताही मृत्युपत्र बनवता येईल.
★माझ्या पश्चात माझ्या संपत्तीचे वाटप विनातंटाबखेडा व सुलभरितीने व्हावे या हेतूने स्वखुशीने व संतुलित मानसिक अवस्थेत असताना माझ्या वाट्यास आलेल्या वंशपरंपरागत मालमत्तेचे / स्वकष्टार्जित मिळकतीचे मी स्वतःच्या इच्छेने खालीलप्रमाणे मृत्युपत्र (Will) करून ठेवीत आहे.
★मालमत्ता निर्मितीचे मार्ग: माझी सर्व मालमत्ता मला माझ्या वाट्यास आलेल्या वडिलोपार्जित मिळकतील भाग,माझ्या नोकरीच्या / व्यवसायाच्या उत्पन्नातून निर्माण झालेली आहे, पगार /मानधन / व्यवसायातील नफा/ गुंतवणुकीतून मिळणारे व्याज, लाभांश, भांडवली नफा, मिळणारे घरभाडे हे माझ्या उत्पन्नाचे साधन आहे या सर्व स्वकष्टार्जित आणि वारसाहक्काने माझ्या वाट्यास आलेल्या मालमत्तेची माझ्या मनाप्रमाणे विल्हेवाट करण्यास पूर्ण मुखत्यार आहे.
★मृत्यूपत्रातील लाभधिकारी:
माझे कुटुंबातील खालील व्यक्ती या मृत्यूपत्राचे लाभाधिकारी आहेत.
पत्नी: नाव ×××
व्यवसाय; ×××
वय: ×××
पत्ता ×××
मोठा मुलगा / मुलगी: नाव ×××
वय ×××
व्यवसाय ×××
पत्ता ×××
त्याच्या जोडीदारविषयी माहिती
त्यांच्या अपत्यांची माहिती
मुलगा/ मुलगी: नाव ×××
वय ×××
व्यवसाय ×××
त्याच्या जोडीदाराची माहिती
त्याच्या अपत्यांची माहिती
मुलगा/ मुलगी: ×××
याच्या सह/ शिवाय अन्य कुणा व्यक्तीस/ संस्थेस किंवा स्वतंत्रपणे निर्माण केलेल्या कौटुंबिक ज्ञासास मालमत्तेतील सर्व अथवा काही भाग द्यायचा असल्यास त्यांचा पूर्ण तपशील द्यावा त्याचप्रमाणे असे करण्याचे पटेल असे कारण त्याची शक्यतो कोणास वाईट वाटणार नाही अशा पद्धतीने मांडणी करून सांगावे किंवा कोणतेही कारण न देताही असे लिहू शकता.
★माझी स्थावर जंगम मिळकत खालीलप्रमाणे:
स्थावर मालमत्ता
1)राहत्या जागेचा तपशील घर/ फ्लॅट
2)शेतजमीन/ फार्महाऊस संपूर्ण तपशील
3)पडीक जमीन तपशिलासह
4)अन्य घर/ फ्लॅट लीजने दिले असल्यास त्याचा तपशील
5)गोडाऊन/ ऑफिस/ व्यापारी गाळा याचा तपशील.
6)अन्य स्थावर मालमत्ता
जंगम मालमत्ता
1. बँक/पतपेढी खाती तपशीलवार माहिती
*बँकेचे नाव
शाखा
खाते प्रकार
खातेक्रमांक
IFSC
विशिष्ट दिवशी शिल्लख असलेली रक्कम
₹
अन्य तपशील
सहधारक
नॉमिनी
अन्य बँका पतपेढी यातील खात्याची वरील पद्धतीने माहिती.
यातील कोणती खाती कशासाठी प्रामुख्याने वापरली जातात याचीही माहिती द्यावी.
2 शेअर्स:
★ब्रोकिंग फार्मचे नाव,पत्ता, ट्रेडिंग कोड
★डिपॉजीटरी / डिपॉजिटरी पार्टीसीपंटचे नाव, खाते क्र
विशिष्ठ दिवशी खात्यात असलेल्या शेअर/ बॉण्ड/ इनवीट/ रिटस/ इटीएफ यासारख्या मालमत्तेचा तपशील, बाजारमूल्य.
याचप्रकारचे अन्य खाते असल्यास त्याचा तपशील
3.मुदत ठेवी
बँक/ पतपेढी/ कंपनी येथील मुदत ठेवींचा संपूर्ण तपशील
शाखेचे नाव
खाते क्रमांक/FDR No
Amt
मुदतपूर्ती दिनांक
या सर्व गुंतवणुकीत त्याच्या व्यवहार्यतेनुसार तपशिलात बदल होऊ शकतो. याचा वर्षातून एकदा आढावा घेऊन 31 मार्च अखेरीस असलेला तपशील माझ्या वैयक्तिक डायरीत वेगळा लिहून ठेवीन.
4 सोने इतर मौल्यवान वस्तू:
तपशील प्रकार, वजन, वस्तू कायम वापरात आहे की लॉकरमध्ये
यातील तपशिलात फरक पडण्याची शक्यता आहे/ नाही तरीही 31 मार्च रोजी आढावा घेऊन लिहून ठेवीन.
5.अन्य गुंतवणूक त्याच्या तपशिलासह
*पोस्टाच्या योजना (NSC, MIS, TD, SSY इ)
*वरिष्ठ नागरिक योजना (SCSS)
*प्रधानमंत्री वयवंदना योजना (PMVVY)
*सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी योजना (PPF)
*विमा संलग्न बचत योजना (ELSS)
*खाजगी गुंतवणूक, अन्य योजना
*राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS)
*उधार म्हणून दिलेले पैसे
*म्युच्युअल फंड योजना डी मॅट खाते वगळून
योजनांची नावे
फोलिओ क्र
युनिट संख्या
बाजारमूल्य
*क्रेप्टो करन्सी मधील गुंतवणूक तपशील
*कमोडिटी करन्सी यातील गुंतवणूक तपशील
*या उल्लेख नसलेल्या अन्य योजनांचा तपशील
भविष्यातील गरजा, गुंतवणूक प्राधान्य आणि कर नियोजनयानुसार आवश्यक बदल करून वर्षांतून त्यांचा आढावा घेऊन नोंद ठेवली जाईल. त्यामुळे जंगम मालमत्ता तपशिलात फरक पडेल यातील काही गोष्टी वगळण्यात येतील तर काही नव्याने केल्या जातील.
★या सर्व माझ्या नावावर अस्तीत्वात असलेल्या निर्माण होणाऱ्या सर्व स्थावर जंगम मालमत्ता माझ्या पश्चात
माझी पत्नी (नाव)××× यांना मिळाव्यात
दुर्दैवाने ती नसल्यास मुलगा/मुलगी (नाव) ××× आणि मुलगा/मुलगी (नाव) ××× यांना सम / विषम प्रमाणात
मिळाव्यात
अथवा याशिवाय अन्य व्यक्ती / संस्था (नाव) ××× याना संपूर्ण अथवा काही प्रमाणात मिळाव्या.
यात लाभार्थींचा उल्लेख त्यांना मिळू शकणाऱ्या लाभासह / लाभशिवाय कारणासह करावा. सदर लाभार्थीनी आपल्या मर्जीनुसार त्याचा उपभोग घ्यावा.
★श्री. नाव ××× पत्ता ×××याना या मृत्युपत्राचे व्यवस्थापक म्हणून नेमले असून त्यांनी आणि / अथवा मृत्यूपत्राचे लाभार्थी म्हणजेच (त्यांची नावे) यांनी अथवा त्यांच्या वारसांनी यात व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचे संपूर्ण अधिकार मी त्यांना देत आहे.
★मी यापूर्वी मृत्यूपत्र केलेले नाही/ किंवा मी यापूर्वी ×××या तारखेस केलेले मृत्युपत्र रद्द करीत आहे सबब सदरचे मृत्युपत्र हे अखेरचे मृत्युपत्र समजण्यात यावे.
मृत्युपत्र धारकाची सही
पूर्ण नाव ×××
स्थळ ×××
दिनांक ×××
आमचे देखत श्री (नाव) ×××यांनी त्यांच्या मृत्युपत्रावर सही केली असून त्यांचे देखत आम्ही साक्षीदार म्हणून
1(नाव) ×××
आणि
2(नाव) ×××
आमच्या सह्या केल्या आहेत.
साक्षीदार 1.×××
सही
राहणार ×××
साक्षीदार 2.×××
सही
राहणार ×××
याप्रमाणे आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपले मृत्युपत्र बनवून यातील जाणकार आणि वकील यांचे त्यावरील मत घ्यावे. कायद्याने आवश्यक नसले तरी डॉ कडून वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे, नोंदणी करावी. याची प्रत नोंदणी अधिकारी/ व्यवस्थापक/ ट्रस्टी कंपनी यांच्याकडे अथवा स्वताकडे सुरक्षित ठेवावे मृत्यूपत्र हा महत्वाचा दस्त असून ते तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करणे केव्हाही चांगले!(संपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थसाक्षर डॉट कॉमवर 30 सप्टेंबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत
Friday, 23 September 2022
मृत्युपत्र अपरिहार्य आवश्यकता भाग 1
#मृत्युपत्र_अपरिहार्य_आवश्यकता भाग 1
मृत्यु या विषयाची चर्चा लोक अजिबात करत नाहीत तर मृत्यपत्र बनवणं ही खूप दूरची गोष्ट झाली. वास्तविक जन्माला असलेला जीव एक ना एक दिवस मरणारच त्यामुळेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तो अपरिहार्य आहे परंतू याबाबत आपण अत्यंत बेफिकीर आहोत.
मृत्युपत्र या शब्दाची तीव्रता कमी करण्यासाठी त्यास इच्छापत्र असे म्हणावे असे अनेकजण सुचवतात परंतु ते प्रत्यक्षात आपले मृत्यूपश्चात इच्छापत्र असते. इच्छा अनेक असू शकतात त्या पूर्ण होऊ शकतील नाही होणार पण मृत्यू अटळ असल्याने त्यास मृत्युपत्र असेच म्हणणे योग्य होईल वास्तविक आपल्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक जीवनात यावर सखोल चिंतन केलेले आहे असे असूनही आपण त्यावर चर्चा करणे टाळतो. ही एक अशुभ गोष्ट आहे अशी समजूत असल्याने त्यावर काही बोलले जात नाही. मृत्युपत्र म्हणजे अल्प जीवनास आमंत्रण असाही यामागे गैरसमज आहे. अज्ञान, भीती आणि स्वतःबद्दल फाजील आत्मविश्वास यामुळे अनेकदा ते करण्याचे टाळले जाते.
योग्य प्रकारे केलेले मृत्युपत्र त्यात उल्लेखलेल्या संपत्तीचे सुयोग्य वाटप करण्याचे सर्वात सर्वात सोपे अधिकृत साधन आहे. मृत्युपत्र बनवणे त्याची नोंदणी करणे सक्तीचे नाही तरीही ते योग्य प्रकारे कायद्यास अपेक्षित तरतुदीनुसार केले असल्यास आणि नोंदणी केली असल्यास त्यातील लाभार्थीच्या नावे संपत्तीचे हसत्तांतरण सुलभ होते. अनेक मालमत्ता प्रकारात नॉमिनी नेमण्याची तरतूद आहे. यामुळे चल अचल संपत्तीवर नाव लागू शकते परंतु यातील नॉमिनी हाच त्या संपत्तीचा अधिकारी नसून तो केवळ विश्वस्त असतो जर मृत्यूपत्र बनवले नसेल तर त्यामुळे मृत व्यक्तीच्या कायदेशीर हक्कात कोणताही बदल नाही त्यामुळे त्याच्या वारसांचे हक्क अबाधित रहातात. यातील चल/अचल मालमत्ता हसत्तांतर करण्यास अडचण येत नाही मात्र अचल मालमत्ता विक्री च्या वेळी ती सर्व बाजूने कायदेशीर हक्क असलेली (क्लिअर टायटल) आहे ना? त्यात अन्य कुणाचे हितसंबंध आहेत का ते पाहावे लागते. अशा वेळी मृत्यूपत्र उपयोगी पडते. कायद्यानुसार नॉमिनी या संपत्तीचा फक्त विश्वस्त असतो जर मृत्युपत्र बनवून संपत्तीचे वाटप केले नसेल तर हिंदू वारसा कायद्यात असलेल्या तरतुदींनुसार मालमत्तेची वाटणी होते. भारतातील बहुतेक व्यक्तींना लागू होणारा हिंदू विवाह कायदा हा शीख, जैन आणि बौद्ध धर्मियांना लागू आहे यानुसार एखादी व्यक्ती मृत्युपत्र न करता निधन पावल्यास त्याची वाट्यास येऊ शकणारी परंपरागत मिळकत आणि स्वकष्टार्जित मिळकत असल्यास त्यावर निधन पावलेल्या व्यक्तीसाहित सर्वांचा सारखा हिस्सा असतो. पारंपरिक मिळकतीचा आपल्याला मिळालेल्या वाट्याचा आणि स्वकष्टार्जित मालमत्तेचा विनियोग व्यक्ती आपल्या मर्जीनुसार कमीअधिक करू शकते अन्यथा ती जोडीदार आणि मुले (यात मुलगा किंवा मुलगी, तसेच मुलीची विवाहित अविवाहित स्थिती, त्याचप्रमाणे औरस, अनौरस, दत्तक असा कोणताच भेदभाव न करता) यामध्ये समान विभागणी केली जाते. जर त्या व्यक्तीस जोडीदार/ मुले नसतील तर प्रथम भाऊ अगर त्यांच्या वारसास असे कोणी नसल्यास बहीण अगर बहिणीच्या मुलांना ही संपत्ती वारसाहक्काने मिळते.
मृत्युपत्राद्वारे व्यक्ती त्याचा पूर्ण अधिकार असलेली वारसाहक्काने वाटप पूर्ण होऊन मिळालेली आणि स्वकष्टार्जित संपत्ती कशी वाटली जावी याबद्धल निर्देश देऊ शकतो. याची अंमलबजावणी मृत्यूनंतर होते. ती करण्याचे व्यवस्थापकीय अधिकार आपल्याला वारसास, त्रयस्थ व्यक्ती किंवा अशा प्रकारचे काम करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या कंपनीस देता येतात. त्यात ही संपत्ती किंवा तिचा भाग नेमका कुणाला आणि किती टक्के मिळावा यात काही कमीअधिक करायचे असेल किंवा एखाद्या संस्थेस द्यायचे असेल तर तशी तरतूद करता येते. वारस नसलेल्या अन्य त्रयस्थ व्यक्तीसही ही संपत्ती देता येईल किंवा स्वतंत्र कौटुंबिक न्यास स्थापन करून त्या न्यासासही देता येईल. मात्र संस्था किंवा न्यास यास संपत्ती देताना अशा मृत्यूपत्राची नोंदणी करणे सक्तीचे आहे. आपल्याला भविष्यात काय होईल ते माहिती नसल्याने शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम असतानाच ते बनवणे योग्य ठरते. त्यामुळे त्यात केलेल्या तरतुदी या वादाचे मुद्दे ठरण्याची शक्यता कमी राहाते.
मृत्युपत्र बनवताना लक्षात ठेवायच्या गोष्टी -
★आपल्या हक्काची वारसा हक्काने मिळालेली, स्वकष्टार्जित संपत्ती यांचे वाटप कसे व्हावे याची व्यवस्था करता येते. व्यक्तीने निर्माण केलेल्या, व्यवसाय भागीदारी, एकल कंपनी, कंपनी, ट्रस्ट यांना स्वतंत्र अस्तीत्व असल्याने त्यातील तरतूदीनुसार त्याची व्यवस्था लावता येईल.
★विवाहित महिलेस लग्नात माहेर आणि सासरच्या लोकांनी केलेले नातेवाईकांकडून वेळोवेळी भेट मिळालेलेले दागिने हे कोणीही कितीही प्रमाणात दिले असले0 तरी त्यावरील सर्वार्थाने तिचीच मालकी असते त्यास स्त्रीधन असे म्हणतात, सदर महिलेशिवाय अन्य कोणीही म्हणजे तिचा नवरा, आईवडील अथवा मुले यांचा त्यावर कोणताही अधिकार नसल्याने त्याचे वाटप कसे करावे ते ठरवू शकत नाही.
★मृत्यूपत्राचा निश्चित असा नमुना नाही तरी त्यात कोणकोणत्या गोष्टीचा कसा उल्लेख करावा याचे नमुने उपलब्ध आहेत आपल्या वकीलाशी चर्चा करून त्याचा तपशील निश्चित करावा. स्थावर जंगम मालमत्तांचा तपशील व्यवस्थित लिहावा.
★आपण किंवा आपला जोडीदार यापैकी कुणाला तरी आधी जावे लागणार याचा विचार करून जोडीदाराची पुरेशी तरतूद करावी किंवा त्यास अधिक मालमत्ता द्यावी त्याचप्रमाणे त्याच्या निवासाची सोय करावी.
★मुलांपैकी कुणाला कमी अधिक संपत्ती द्यायची असेल त्याचे सुयोग्य कारण लिहावे. म्हणजे गैरसमज होणार नाहीत. अन्य व्यक्ती संस्था यांना काही द्यायचे असल्यास त्याचाही उल्लेख कारणासह करावा. वारसा व्यतिरिक्त कुणाला काही द्यायचे असल्यास होता होईतो आपल्या हयातीतच त्यांना द्यायच्या गोष्टी देऊन टाकाव्यात. यावरून काही वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
★अविवाहित किंवा पुनर्विवाहित व्यक्तीने त्याच्या विवाहापूर्वी बनवलेले मृत्युपत्र विवाहानंतर आपोआपच रद्दबातल ठरते
★मृत्युपत्र बनवले आहे सांगावे आपले वारस हेच सर्व ठिकाणी नॉमिनी म्हणून असतील तर सोईचे होते परंतु त्यात काही बदल करायचा असल्यास आणि तो वारसाहक्काशी सुसंगत नसल्यास त्यातील तरतुदी जाहीर करू नयेत.
★मृत्युपत्र बनवण्याच्या दिवशी काही आजार असले आपली मानसिक स्थिती उत्तम असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरकडून घ्यावे. दोन साक्षीदार शक्यतो आपल्यापेक्षा वयाने लहान असलेले निवडून त्यांनी वाचून त्यावर साक्षीदार म्हणून सही केली आहे अशी अपेक्षा आहे. काही विवाद निर्माण झाल्यास साक्षीदारास न्यायालय साक्ष देण्यासाठी पाचारण करू शकते.
★जरी ते प्रथम करत असाल तरी त्यास अखेरचे मृत्युपत्र म्हणावे जर आधी बनवून त्यात बदल केला असल्यास सुधारित मृत्युपत्रावर अखेरचे मृत्युपत्र असे म्हणून आधीच्या पत्राचा उल्लेख करून चालू मृत्युपत्र हेच अंतिम मृत्यूपत्र असल्याचा उल्लेख करावा.
★यातील एखादा लाभार्थी आपल्या मृत्यूपूर्वी दुर्दैवाने मरण पावल्यास त्यास मिळणारी संपत्ती किती प्रमाणात कुणास देण्यात यावी याचा स्पष्ट करावा.(अपूर्ण)
©उदय पिंगळे
Saturday, 17 September 2022
पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत 3
पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3
★असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे डाऊन पेमेंट देण्यासाठी पैसे नाहीत अशा परिस्थितीत आम्ही आमची गुंतवणूक मोडू का?
■नाही तुमच्याकडे डाऊन पेमेंट देण्यास पैसे नसतील तर घर घेण्याचा विचारही करू नका. माझी यासंबंधी निश्चित अशी मतं आहेत.
*तुमच्या उभयतांच्या (नवरा बायको) वार्षिक उत्पन्नाच्या तिप्पट रकमेचे घर घ्या.
*तुमच्याकडे घरच्या किमतीच्या 40% रक्कम स्वताकडे तयार असायला हवी
*गृहकर्ज 20 वर्षाहून अधिक कालावधीचे नको.
*सर्व प्रकारच्या कर्जाचा एकत्रित EMI कापून जाऊन हातात येणाऱ्या मासिक प्राप्तीच्या 30% हून अधिक नको.
हे चारही निकष पूर्ण होत असतील तेव्हाच घर घेण्याचा विचार आपण करा अन्यथा भाड्याने राहा.
★कोविडनंतर मला मिळणारा निव्वळ परतावा बाजार पुरेसा वाढूनही अपेक्षित नाही, त्यामुळे मी नाखूष आहे मी काय करू? माझी सर्व गुंतवणूक इक्विटीमध्ये आहे दीर्घकाळ थांबायची माझी तयारी आहे.
■तुमची सर्व गुंतवणूक इक्विटीमध्ये आहे म्हणजे बाजारात व्यवहार होतात, कसे करायचे याची तुम्हाला माहिती आहे. अशी माहिती नसेल तर व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराची सेवा तुम्ही घेऊ शकता त्याला फी देऊ शकता. तुम्ही नाखूष आहात याचा अर्थ काय? तुम्हाला खुश करणं हे बाजाराचं काम नाही. बाजार आपली दिशा ठरवेल. नाखूष असायला अनेक कारणं कायम सापडतील. इंडेक्स 12% रिटर्न देतोय आणि तुमचा फोलिओ 11% च वाढला म्हणून तुम्ही नाखूष. इंडेक्स 12% वाढला आणि तुमचा फोलिओ 13 % वाढला पण तो 25% का वाढला नाही म्हणून तुम्ही नाखूष व्हाल, इंडेक्स 20% वाढला पण तुम्हाला 12% रिटर्न मिळाला तुम्ही अधिक नाराज व्हाल. अशी कारणं वेगवेगळी असू शकतील. तुमची खरेदी चुकीच्या वेळी झाली असेल. एवढं मात्र निश्चित की तुमचा परतावा चालू बाजार परातव्यातून खूप अधिक फारसा कधी असणार नाही.
★अशा वेळी सल्लागाराशी मदत घ्यावी किंवा त्याच्याशी चर्चा करावी का?
■तुम्ही स्वतःच व्यवस्थापन करत असाल तर अशी चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही त्याच्याशी किंवा एखाद्या योजनेशी तुलना करून पहा ना? तुम्हाला 12% परतावा मिळतोय आणि त्याला 18% मिळत असेल तर स्वतःच मॅनेज करण्यापेक्षा त्याच्याकडे जाऊ शकता.
★एका जेष्ठ नागरिकांनी इथे एक प्रश्न विचारला आहे की त्याचं वय 63 आहे. या वयात एक कोटी रुपये मिड कॅप, स्मॉल कॅप शेअरमध्ये मी गुंतवू का? हे पैसे मला पुढे किमान 10 वर्षतरी लागणार नाहीत.
■याचा विचार करतानाही तुमचं भांडवल किती तेही पाहिलं पाहिजे तुमचे येणारे उत्पन्न दरवर्षी 5 लाख असेल तर तुमच्या निवृत्तीच्या दृष्टीने दीड कोटीं मालमत्ता त्याच्याकडे असणे जरुरीचे आहे. तुमच्याकडे 10 कोटी असतील तर ही चैन परवडू शकेल. पण जर 2 कोटी असतील तर तुमची मालमत्ता तुम्हाला पुरेल एवढीच आहे मग हे धाडस तुम्ही करू नये त्याने कदाचित तुम्ही अडचणीत येऊ शकाल. आपण पहाल रतन टाटा, अजिझ प्रेमजी 80 च्या जवळपास आहेत त्यांची बहुतेक गुंतवणूक इक्विटीमध्ये आहे पण ती रक्कम प्रचंड असल्याने त्यात पडणाऱ्या भावातील फरकाने त्यांना काही फरक पडत नाही. वय महत्वाचं नाही असं मी म्हणत नाही पण एकूण किती पैसे आहेत ते अधिक महत्वाचं आहे.
★एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की आपल्या गुंतवणूक संचाचे परीक्षण कधी करावं? त्याचे निकष नेमके काय असावेत.
■वर्षातून एकदा तरी परीक्षण केलेच पाहिजे. जेव्हा कधी मोठा खर्च जसे मुलीचे लग्न, परदेशी मिळालेली शिक्षक संधी अशा प्रसंगात खूप जास्त खर्च होतो त्यावेळी त्याचं परीक्षण करावं. मी नेहमी याची तुलना शाळेत घेत असलेल्या पालकसभेशी करतो. माझ्या मुलीच्या शाळेत अशी सभा असायची तेव्हा मी तिच्या क्लास टीचरना मी त्या सभेस यायलाच हवं का? विचारायचो ते नेहमीच तुम्ही नाही आलात तरी चालेल म्हणायचे. बहुदा त्यांच्या तिच्याविषयी तक्रारी नसाव्यात पण त्यांनी तुम्ही यायलाच हवं सांगितले असतं तर मला जावं लागलं असतं. वर्षातून एकदा आपल्या गुंतवणुकीवर नजर टाकून त्याच्याबद्धल तक्रारी आहेत अशा अपेक्षित परतावा न देणाऱ्या गुंतवणुकीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्य गुंतवणूक तशीच ठेवावी. एका निश्चित दिवशी वर्षभरात एकदा तरी असे करावे आणि त्याच तारखेचे पुढील वर्षी पालन करावे म्हणजे त्यात एकसमानता राहते.
★मुलांच्या उच्च शिक्षणाची तरतूद आपण कशी करू शकतो?
■तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची ही जबाबदारी आहे की त्यांनी तुम्हाला छोटी मुले असतील तर त्यांच्या उच्च शिक्षणासाठी एकादी योजना त्याचप्रमाणे तुमच्या निवृत्ती नियोजनासाठी एक तरी योजना सुचवायला हवी. किती वर्षांचा कालावधी आहे ते पाहून गुंतवणूक मालमत्तांची समभाग आणि कर्जरोखे यांची विभागणी सुचवावी. तुमच्या मुलांना त्याच्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचे पत्रक त्यात दाखवलेली वाढ ही कशी झाली समजावून सांगावे. त्यांच्या विचारांना चालना द्यावी. त्यांनी काही मागणी केली तर यातून पैसे काढून घेऊया का विचारावे. तो नक्कीच नको म्हणेल. तुम्ही जबाबदारीने वागत असाल तर तेही जबाबदारीने वागतील. आपोआपच तो अर्थसाक्षर होईल. सल्लागाराने योग्य अशी योजना बनवून आपल्याला समजावून द्यायला हवी. आपलं उद्दिष्ट मुलांचे उच्च शिक्षण त्यासाठी ही योजना आपल्या निवृत्तीसाठी एक योजना हवीच हवी. प्रत्येक कुटूंबाच्यासाठी त्याच्या आवश्यकतेनुसार ती वेगळी असेल यासाठी अमुक अमुक हा एकच पर्याय नसेल. आपल्या ऐपतीप्रमाणे गुंतवणूक केली जाईल, वाढवली जाईल आवश्यक असल्यास स्थगित केली जाईल पण काढून घेतली जाणार नाही. कर नियोजन करण्याच्या दृष्टीनेही हे आवश्यक आहे.
★मालमत्तेत वाढ होण्याच्या दृष्टीने एसआयपी करावी की एकरकमी गुंतवणूक करावी तसेच भविष्यात एसडब्लूपी करायची असेल तर त्यातून किती रक्कम काढून घ्यावी.
■मी काही जरी याबद्दल सांगितले तरी तुम्ही ऐपतीप्रमाणेच गुंतवणूक करणार. तुम्हाला दरमहा पगार मिळत असेल तर मासिक एसआयपी करायला हरकत नाही, पण जर एखादा शेतकरी असेल तर विशिष्ठ काळातच गुंतवणूक करता येईल तो एकरकमी गुंतवणूक करू शकेल व्यवसाय करीत असणारी व्यक्ती रोज काही पैसे बाजूला ठेऊ शकेल. प्रत्येक व्यक्तीनुसार गुंतवणूक पद्धत बदलावी लागेल. शेतकरी दररोज एसआयपी करू शकत नाही.
★विविध मालमत्तेत विभागणी कशी केली जावी?
■हे पण व्यक्तिव्यक्ती नुसार बदलेल. तुमचं उत्पन्न, उपलब्ध साधने,पर्याय, जबाबदाऱ्या या सर्वानुसार ही विभागणी बदलत राहील याचे एक ठोस उत्तर कुणालाच देता येणार नाही.
★एक अंतिम प्रश्न आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकेल अशी एखादी योजना आपल्याला सांगता येईल का?
■इंग्रजी rich आणि welth असे दोन शब्द आहेत त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. रिच खूप आहेत होतील पण त्यांचे मार्ग मर्यादित आहेत ते बंद झाले तर सगळंच डळमळीत होईल पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल जर welthy असाल तर उत्पन्नाचा एक मार्ग बंद झाला तर तुम्हाला चिंता वाटणार नाही त्याला तुम्ही पर्याय शोधू शकाल. तेव्हा तुम्ही कोण आहात, तुमचे उत्पन्न, गरजा, उदिष्ट, जबाबदाऱ्या याचा पूर्ण विचार करून योजना बनवणे आणि त्या पार पाडणं आणि welthy बनणं हेच तुमचं अंतिम उद्दिष्ट हवं.
अतिशय रंगतदार झालेल्या या चर्चेत सरांनी बारीक बारीक गोष्टी विचारात घेऊन त्यावरील आपली मतं मांडली. स्वातंत्र्याच्या अमृतमोहोत्सवानिमित्त या मुलाखतीचे आयोजन इक्विटीवाला डॉट कॉम यांनी हा कार्यक्रम ऑगस्ट 2022 रोजी आयोजित केला होता यात व्यक्त करण्यात आलेल्या विचारापैकी घर हा विषय सोडून सर्वच विचारांशी मी सहमत आहे.
घर घेण्याचा विचार करताना सर असे म्हणतात-
*तुमच्या उभयतांच्या (नवरा बायको) वार्षिक उत्पन्नाच्या तिप्पट रकमेचे घर घ्या.
*या किंमतीचे मुंबईत काय पण उपनगरात घर मिळणे अशक्य आहे.
*तुमच्याकडे घरच्या किमतीच्या 40% रक्कम स्वताकडे तयार असायला हवी.
*ही रक्कमही किमान 25 लाख होईल ते जमण्यास बराच कालावधी लागेल.
*गृहकर्ज 20 वर्षाहून अधिक कालावधीचे नको.
*जास्तीत जास्त रकमेचे आणि दीर्घ मुदतीचे कर्ज घ्यावे असे माझे ठाम मत आहे. यामुळे गृहकर्ज देणाऱ्यांना फायदा होत असला तरी हे सर्वात कमी दराने मिळणारे कर्ज असल्याने शिल्लक पैशाची स्मार्ट गुंतवणूक केल्यास भांडवल निर्माण होऊन कर्ज एकरकमी फेडताही येऊ शकते. ते कसे? हे मी वेगळ्या लेखातून समजावून दिले आहे. आधीच मोठ्या झालेल्या या लेखाच्या विस्तार भयामुळे अधिक लिहीत नाही.
*सर्व प्रकारच्या कर्जाचा एकत्रित EMI कापून जाऊन हातात येणाऱ्या मासिक प्राप्तीच्या 30% हून अधिक नको.
*कर्ज अधिक घेणार म्हणजे हातात उत्पन्न कमी येणार ते 40 ते 50% असावेत हे गृहकर्जाचे निकष आहेत त्यामुळे सुरवातीस थोडा त्रास झाला तरी नंतर ठीक होते असा अनुभव आहे.
हे चारही निकष पूर्ण होत असतील तेव्हाच घर घेण्याचा विचार आपण करा अन्यथा भाड्याने राहा.
असे ठरवले तर अनेक काळ भाड्याच्याच घरात राहावे लागेल. हे मुद्दे सोडले तर अतिशय उत्तम विचार असलेले व्याख्यान म्हणजे काय असा समृद्ध करणारा अनुभव मिळाला तो आपल्याला मिळावा त्या हेतूने या सर्व गोष्टी पूर्ण स्वातंत्र्य घेऊन तीन भागात लिहू शकलो. तूर्तास विराम घेतो.(संपूर्ण)
©उदय पिंगळे
Subscribe to:
Posts (Atom)