Friday, 30 December 2022

मार्केट पडलं, पुढे काय?

#मार्केट_पडलं_पुढे_काय? मार्केट कधी पडणार? हा लेख लिहून 15/20 दिवस होतात न होतात तोच आज काही दिवसानंतर मार्केट बऱ्यापैकी खाली आलंय. 3 डिसेंबरला ते सर्वोच्च शिखरावर होतं. जेव्हा सेन्सेक्स 63500 हून अधिक होता तेव्हा तो 70000 कधी जाईल याची चर्चा चालू होती तर आज तो 50000 पर्यंत खाली येऊ शकेल असे विचार अनेकजण व्यक्त करीत आहेत वाढयाला सुरुवात झाल्यावर 45 दिवसांत तो सर्वोच्च स्थानी पोहोचला पण थोडा खाली राहून तो 4,5 दिवसात सर्वोच्च स्थानापासून घसरून तीव्रतेने खाली आला. 23 डिसेंबर 2022 रोजी याची तीव्रता सर्वात अधिक होती खरं तर यात विशेष काहीच नाही गेली अनेक वर्षे वर्षातून दोनचार वेळा मार्केटमध्ये अशी तीव्र घट आणि वाढ होण्याचे प्रसंग येत असतात मग ते कशामुळे झालं याची लेबल आता लावली जातील. 26, 27 डिसेंबर 2022 रोजी बरोबर उलटं घडलं याचं कारण काय? त्यावर अनेक वाद संवाद होतील. जी कारणे दिली जातात त्याचा शुक्रवारी मार्केट पडण्याशी आणि लगेच सोमवार मंगळवारी वाढण्याशी जो काही संबंध जोडला जाईल, तो तकलादू आहे. याबाबत कोणीही अस काही होईल असं निश्चित भाकीत केलेलं नव्हतं आणि करूही शकत नाही. इंडेक्स हा एक सर्वसामान्य मार्गदर्शक आहे, तो वाढला किंवा कमी झाला तर आपल्याकडील सर्व शेअर्स वाढतील किंवा कमी होतील असे नाही. खरं तर अशा पडझडीची ज्यांना भीती वाटते त्यांनी बाजारात थेट गुंतवणूक करूच नये जरी म्युच्युअल फंड योजनांत गुंतवणूक असेल तर त्याची एनएव्ही कमी अधिक होत राहील. ज्यांना फक्त सुरक्षितता हवीय त्यामी फिक्स डिपॉजीट किंवा डेट फंड योजनाकडे जावे आता हे दर वाजवी झाले असून ते 7 ते 8 % च्या आसपास आहेत. पारंपरिक विचारसरणीच्या लोकांना या वाढीचा फायदा उठवून अधिक दराने अधिक कालावधीच्या मुदतीच्या ठेवी ठेवता येतील. लवकरच हे दर कमी होतील अशी शक्यता वाटते रिजर्व बँकेने त्याच्या प्राईम लेंडिंग रेट कमी केला की बँका कर्जदर कमी करण्याऐवजी फिक्स डिपॉझिटचे दर ताबडतोब कमी करतात. आपल्याकडे महागाई कमी होत चालल्याचे संकेत मिळत असल्याने इतर देशांमध्ये वाढलेली महागाई आणि आपल्या इथे वाढलेली महागाई यात फरक आहे तेथे गेल्या 40 वर्षात झाली नव्हती एवढी महागाईवाढ झाली असल्याचे तेथील मागणी प्रचंड घटली आहे. आपल्याकडे मागणीत सातत्याने वाढ होत आहे यात आपल्या सणासुदीनी मोठा हातभार लावला आहे. यावर्षी प्रथमच कोणत्याही वाहननिर्माण कंपनीने वर्षाअखेर कोणतीही सवलत जाहीर केलेली नाही. कदाचित या कंपन्या पुढील वर्षी किमती वाढवणार असतील तर त्या तुलनेत 'वर्तमान भाव हीच सवलत' अशी त्यांची धारणा असेल. जे शेअरबाजारात इक्विटी म्युच्युअल फंड योजनांतून अप्रत्यक्ष गुंतवणूक करीत आहेत त्यानी आपले चित्त विचलित न होता आपली एसआयपी चालू ठेवावी. मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारण 5% पडझड झाल्यास शक्य असल्यास एकरकमी गुंतवणूक वाढवावी. जे लोक एसआयपी करू शकत नाहीत त्यांनीही आपली गुंतवणूक अशी तीनचार टप्यात करावी. बरेचदा गुंतवणूकदार बाजार वर असताना एकरकमी गुंतवणूक करतात आणि खाली आल्यावर काढून घेतात त्यामुळे अपेक्षित परतावा मिळत नाही. मात्र हा नियम एसआयपीसाठी नाही ती तुम्ही कधीही करू शकता. तेथे आपोआपच सरासरी गुंतवणूकभाव साधला जातो. त्यातही बाजार खाली आल्यावर युनिट टॉप अप करू शकता. आपले गुंतवणूक उद्दिष्ट नजीक आले असल्यास म्हणजे समजा - मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमा करीत असाल तर त्याला लागणारे पैसे हे त्याची बारावी पूर्ण होईल तेव्हा लागतील परंतु त्यावेळी बाजार कुठे असेल हे आपण सांगू शकत नाही तेव्हा सुरक्षितता म्हणून आपल्या गरजेच्या दोनतीन वर्ष आधी म्हणजे त्याची 9 वी किंवा 10 पूर्ण होत असेल त्यावेळी आपल्या ऍसेट मॅनेजमेंट कंपनीकडून मिळणाऱ्या स्टेटमेंटवर लक्ष ठेवावे यात आपल्याला किती परतावा मिळाला ते समजते. हा परतावा अपेक्षित असलेल्या परातव्याहून अधीक असेल / अनपेक्षित असेल कारण बाजारात अशा संधी कायम येत असतात तर - *जरुरी नसली तरी जमा युनिटमधील एक वर्ष मागे जाऊन असलेले सर्व युनिट रिडीम करून घ्यावेत. कदाचित 1 लाख रुपयांहून अधिक दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला तर त्यावर 10% या सवलतीच्या दराने कर आकारणी होईल. *हे पैसे आधीच चालू असलेल्या पीपीएफ /एनपीएस खात्यात किंवा डेट फंड योजना फिक्स डिपॉजीट यात पूर्ण किंवा विभागून टाकता येतील त्यातून ते जरुरीनुसार काढून घेता येतील, त्यामुळे जेव्हा पैशाची गरज असेल तेव्हा हमखास पैसे मिळतील याची निश्चिती राहील. हे करीत असताना एसआयपी चालूच ठेवावी ती बंद करू नये. जे थेट शेअर बाजारात गुंतवणूक करतात, त्यांना हे नक्की माहिती आहे की बाजार वरखाली होत असताना एकदम सर्व शेअर्स पडतही नाहीत आणि वाढतही नाहीत. याचा फायदा घेऊन आपण योजलेले शेअर्स खरेदी करावेत अथवा विकावेत. अगदी संधीसाधू व्हावे. (संधीसाधू शब्द थोडा खटकत असेल तर संधीशोधू व्हावे.) डे ट्रेडर्सच्या दृष्टीने बाजार असा वरखाली होत राहणे ही पर्वणीच आहे, यात अनेक संधी आहेत. साधारण 9 जानेवारीपासून कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षित असून ते उत्तम असल्यास, 31 जानेवारी 2023 पर्यंत नेहमीप्रमाणे बजेटपूर्व तेजी अपेक्षित आहे. तेव्हा यातील संधीचा शोध घ्या आणि समृद्ध व्हा. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेच्या कार्यकारणीचे सदस्य असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत) अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 30 डिसेंबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.

Saturday, 24 December 2022

करोडपती कसे व्हावे?

#करोडपती_कसे_व्हावे? माझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षांपूर्वी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती जसजसा काळ गेला आणि महागाई वाढली तसं 10 हजाराची जागा एक लाख रुपयांनी घेतली. मला आठवतंय सन 1992 मध्ये तत्कालीन आयडीबीआयने 25 वर्षांनी एक लाख रुपये मिळू शकतील असे डीप डिस्काउंट बॉण्ड बाजारात आणले होते जे गुंतवणूकदारांना ₹2700/- ला देऊ केले होते. यानंतर सरदार सरोवर नर्मदा निगम, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांनी आणि अनेकांनी 25 ते 35 वर्षे मुदतीचे जास्त व्याजदर असलेले बॉण्ड देऊ करून गुंतवणूकदारांना मोठ्या रकमेचे स्वप्न दाखवले होते. हे सर्वच बाँड त्यात असलेल्या बाहेर पडण्याच्या पर्यायांनुसार कमाल 5 ते 12 वर्षात बंद झाले कारण व्याजदर नंतर कमी कमी होत गेल्याने असे महागडे बॉण्ड चालू ठेवणे शक्य नव्हते. वित्तसंस्थाच्या दृष्टीने हा आतबट्याचा व्यवहार होता ती गोष्ट वेगळी पण अनेकांचे ते स्वप्न होते. आज तीच जागा एक कोटी रुपयांनी घेतली आहे ही रक्कम भविष्यात अपुरी पडू शकेल अनेक तज्ञांचे मत आहे. माझ्या एका स्नेह्यांच्या मते ही महागाई नव्हेच तर चलनाचे अवमूल्यन झाले आहे. प्रत्यक्षात जीवनावश्यक वस्तूचे भाव फारसे वाढले नाहीत तर तुलनेने कमी झाले आहेत परंतू आपल्या अन्य गरजा वाढल्या असल्याने खर्च वाढत असून आपले राहणीमान पूर्णपणे बदलले आहे. आपण त्याला ते उंचावले आहे असे समजतो आणि अनावश्यक खर्च वाढवत आहोत. आज अनेक व्यक्ती आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कदाचित काही रक्कम वाचवू शकतील ते जितकी जास्त रक्कम कमी वयात वाचवू शकतील त्यांचे हे स्वप्न बचतीने पुरं झालं तरी वर म्हटल्याप्रमाणे स्वप्न पाहिलेल्या एक कोटींची जागा 10 कोटींनी घेतली असेल. तेव्हा भविष्यात काय वाढलंय हे जाणून मोठं स्वप्न पाहायला हवं. बचत आणि गुंतवणूक करून काही शिस्त पाळली तर हे स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकतं. ₹ दहा हजार काही वर्षात जर एक कोटींमध्ये परावर्तित झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. यासाठी लवकरात लवकर सुरुवात करणे जेवढे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे या गुंतवणुकोचा कालावधी आणि सातत्याने उच्च परतावा मिळवून देऊ शकणारे साधन महत्वाचे आहे. नेहमी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून, तरुणांना लवकरात लवकर आपल्या उत्पन्नातील काही भाग हा बचतीकडे वळवण्याचा सल्ला दिला जातो. बहुदा अनेकजण जणू ते बहिरेच आहेत असं समजून ऐकलं न ऐकल्यासारखं करून त्याकडे दुर्लक्ष करतात. 30/ 35 वर्षानंतर येऊ शकणारा काळ कसा असेल आपलं जीवन कस असू शकेल याचा विचार करण्याएवढी प्रगल्भता त्याच्याकडे नसते. त्यामुळे आयफोन घेणे, महागडी कार घेणे अशा प्रकारची स्वप्ने पाहताना काहीच नाही तर गुंतवणूक म्हणून म्युच्युअल फंड योजनेची एसआयपी करायची तर इएमआयच्या चक्रात ते सापडतात. आपल्या करियरच्या सुरुवातीस थोडी बचत त्यातून काही गुंतवणूक अशी शिस्त लावूनच करायला हवी. 30 वय असलेल्या व्यक्तीचा किमान मासिक आवश्यकतावरील खर्च जर दरमहा ₹तीस हजार असेल तर 6% चलनवाढ धरून होणारा मूल्यऱ्हास विचारात घेता हाच मासिक खर्च त्याच्या 60 व्या वर्षी दरमहा 1 लाख 72 हजार असेल. तुम्ही नियोजनशून्य असाल तर खर्चात होणारी ही छुपी वाढ एकदम न होता हळू हळू होत असते हे लक्षातही येणार नाही. दरवर्षी मिळणारी पगारवाढ यामुळे मूल्यवाढीची फारशी झळ पोहोचत नाही फरक पडतो तो मिळणारे उत्पन्न अचानक बंद होते तेव्हा. याचा सर्वाधिक फटका बसतो तो तुम्ही आजारी पडल्यावर, तरुण असताना तसेच नोकरीत असतांना याचा फारसा फटका बसत नाही परंतु वयोमानानुसार आणि असाध्य रोग होण्याची शक्यता ही साठ वर्षांनंतर असल्याने यावर उपचार आणि नियंत्रण ठेवण्यासाठी तुमच्या मासिक खर्चाच्या 20% रक्कम खर्च होऊ शकते आणि मोठे आजारपण आले तर आप्तेष्टांकडे हात पसरण्याची वेळ येते. आताचा असणारा मासिक खर्च हा आपली सध्याची खर्चपद्धती कायम 30 वर्धात 30 हजारहून 1 लाख 72 हजार होईल हे आपण पाहिलं यात महागाई वाढ 6 % गृहीत धरली आहे. तेव्हा उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता नसल्यास तेव्हा उपलब्ध असणारी रक्कम कमीकमी होत जाऊन संपेल यासाठी आपल्याला उपलब्ध रक्कम ही 1 कोटी असून पुरणार नाही. ती अधिक लागेल कारण आपल्या निवृत्तीनंतर महागाई वाढतच राहणार याला फक्त जुन्या पद्धतीने पेन्शन मिळणारे लोक हेच अपवाद राहतील. नवीन पेन्शन धारकांना वाढीव पेन्शन देण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असले तरी याबाबत अजून सरकारी धोरण काय असेल यासंबंधी पुरेशी स्पष्टता नाही. त्यांना आता मिळत असलेल्या तुटपुंज्या पेन्शनमध्ये भरीव वाढ झाली तरी ती तिथेच स्थगित होत असल्याने तेही काही वर्षांनी उत्पन्न कमी आणि खर्च अधिक असे झाल्याने अपुरेच पडणार. निवृत्तीनंतर उपलब्ध फंड 1 कोटी असून त्यावर वार्षिक 8% दराने परतावा मिळाल्यास आणि खर्च 1 लाख 72 हजार असेल उपलब्ध रक्कम 5 वर्षात संपेल, 3 कोटीरुपयात 16 वर्ष तर 5 कोटी रुपयात 32 वर्षे काढता येतील. तेव्हा वाढलेली आयुर्मर्यादा विचारात घेऊन आपल्याला उपयोगी निवृत्ती योजना बनवायची असेल तर एक कोटी ऐवजी तुम्हाला 5 कोटींचे उद्दिष्ट ठेवावे लागेल दीर्घकाळ तुमची गरज भागवू शकेल असा परतावा आपल्याला भांडवल बाजारातील गुंतवणुकीतून मिळू शकतो आपले आर्थिक उद्दिष्ट ठरले की आपली योजना तुम्ही बनवू शकता. अल्पकाळात यातील गुंतवणूक बरीच धोकादायक वाटत असेल तरी 10, 20, 30 वर्षांनी त्याची तीव्रता कमी कमी होत जाते. अनेकजण भविष्यकालीन गुंतवणूक म्हणून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) हा पर्याय निवडतात यावर मिळणारा परतावा हा महागाईवर जेमतेम मात करतो. गेल्या 20 वर्षात पीपीएफ मधील गुंतवणुकीची तुलना सेन्सेक्स या निर्देशांकाशी केली असता 1 लाख रुपयांची गुंतवणूक पीपीएफमध्ये 30 वर्षांनी 5 लाख झाली तर सेन्सेक्समधील गुंतवणूक याच कालावधीत 24 लाख 21 हजार झाली तेव्हा केवळ सुरक्षितता यावर कितपत समाधान मानायचे याचाही विचार करायला हवा. पीपीएफ मधील सुरक्षितता आणि थेट भांडवल बाजारातील गुंतवणुकीस उपलब्ध असलेला इक्विटी म्युच्युअल फंडाच्या योजना हा मध्यममार्ग होऊ शकतो यातील गुंतवणूक ही स्वतः संशोधन करून गुंतवणूक करण्यापेक्षा तुलनेने सोपी आहे. *यात सहज योजना बदल करता येतो. *निवडीस अनेक पर्याय उपलब्ध असतात. *गुंतवणूक कमी अधिक करण्याची सुविधा. किमान गुंतवणूक अत्यंत कमी. *पारदर्शक आणि नियंत्रित त्यामुळे जोखीम कमी. *योजनेतील सहभाग कधीही काढून घेता येतो. याउलट थेट गुंतवणुकीच्या असणाऱ्या समभाग गुंतवणूक व्यवस्थापन योजनांत (पीएमएस) सध्याच्या नियमानुसार किमान ₹ 50 लाख गुंतवणूक करावी लागते. ती किमान निर्धारित काळ ठेवावी लागते. म्युच्युअल फंड योजनेतून काही वर्षानंतर लागणारी कोटींमधील रक्कम जमा करताना- *अपेक्षित परतावा निश्चित करा इंडेक्स फंडातून 14% परतावा मिळाला आहे. *आपल्याला किती रक्कम लागेल ते ध्येय निश्चित करा. *यासाठी लागणारा कालावधी ठरावा. *1 कोटी रक्कम 10 वर्षात जमा करायची असल्यास ₹30600/- दरमहा गुंतवावे लागतील पण हीच रक्कम 30 वर्षात जमा करायची असेल तर ₹1300/- दरमहा गुंतवावे लागतील. यात मिळणारा परतावा 10% दराने असल्याचे गृहीत धरले आहे. यातील कोणतीही गोष्ट बदलली तर उत्तर बदलेल. *तीन इक्विटी आधारित योजना निवडा. *आवश्यक रकमेचे एसआयपी करा. *त्यावर अधूनमधून लक्ष ठेवा. *यात बदल करणे आवश्यक असेल तर त्याचे कर या दृष्टीने होणारे परिणाम तपासून पहा. *श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र लक्षात ठेवा. *आवश्यक असेल तर फी आकारून सल्ला देणाऱ्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या लक्षात ठेवा इथे किंवा कुठेच काही फुकट मिळत नाही. अनेक गुंतवणूकदार बाजारात पडणाऱ्या फरकाने घाबरून जाउन चुकीच्या वेळी खरेदीविक्री करतात. आपल्या अनावश्यक गरजांसाठी गुंतवणूक काढून घेतात. सध्याचा गुंतवणूकदारांचा गुंतवणूक कालावधी सरासरी दोन वर्ष आहे त्यामुळे अनेकदा यातील फायदा अनुभवता येत नाही. केवळ हे टाळून थोडी डोळस गुंतवणूक केलीत तर नक्कीच करोडपती व्हाल. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (आकडेवारी संदर्भ व्हॅल्यूरिसर्च ऑनलाइन या संकेतस्थळावरून मिळवला आहे. लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेच्या कार्यकारणीचे सदस्य असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तीक आहेत) अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 23 डिसेंबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.

Friday, 16 December 2022

कोविड 19 पासून गुंतवणूकदारांनी घ्यायचा बोध

#कोविड_19_पासून_गुंतवणूकदारांनी_घ्यायचा_बोध कोविड 19 किंवा त्याचे भयंकर वारस भारतात आहेत असे वाटत नाही. सन 2020 चा मार्च महिना आठवा. लॉकडाऊन जाहीर झाला त्यानंतर सर्व सुरळीत होईल असं वाटत असताना तो पुन्हा पुन्हा वाढवावा लागला आणि सारे व्यवहार ठप्प झाले मग दुसरी लाट येईल म्हणून अधिक दक्षता बाळगली गेली त्याचा फारसा प्रभाव न झाल्याने येणाऱ्या पुढील लाटेकडे दुर्लक्ष झाले या काळात अनेकांचे प्रचंड नुकसान झाले. बऱ्याच जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. एकंदर घबराट माजली. अनेकांना कधी काळी असे संकट येईल असे स्वप्नातही वाटत नव्हते. आता जनजीवन पूर्वीसारखे सुरळीत झाले आहे. किंबहुना असे काही संकट आलं होतं हेच लोक विसरून गेले आहेत. तरीही आजपर्यंत जगभराचे जे काही नुकसान व्हायचे होते ते झालेच. चीनमध्ये अजून त्याचे अस्तीत्व आहे म्हणतात, खरंखोटं काय ते शी जिनपिंग जाणे! आपल्या दृष्टीने हा एक अत्यंत कसोटीचा काळ होता. सुरुवातीला त्याच्या तीव्रतेचा अंदाज आला नाही त्यावर उपाय योजना काय असावी याबाबत आपण चाचपडत होतो परंतु अत्यंत कमी कालावधीत त्यावर संशोधन करून लस काढली आणि ती विक्रमी कालावधीत सर्वांपर्यंत पोहोचवली. जगभरातील लोकांना उपलब्ध करून दिली. एक गुंतवणूकदार म्हणून आपण या मोठ्या संकटातून काय शिकलो अशा आशयाची एक पीपीटी व्हॅल्यू रिसर्च कंपनीकडून प्रसिद्ध झाली होती असता त्यातील महत्वाचे मुद्दे मी डायरीत लिहिले होते दोन दिवसांपूर्वी ते सहज वाचनात आले तेच या लेखातून सादर करीत आहे. आज जरी तो इतिहास असला तरी आपण हा विषय शिकण्याचे महत्वाचे एक प्रयोजन हे भूतकाळात घडलेल्या घटना, तेव्हा झालेल्या चुकांचा अभ्यास करून भविष्यात त्याच चुका पुन्हा न करणे हे आहे. ★सुरक्षेसाठी विविध मालमत्ता प्रकारात गुंतवणूक : जागतिक आरोग्य संघटनेने कोविड काळात सुरक्षेसाठी विविध थर असलेले मास्क वापरण्याचा सल्ला दिला होता यात जसे कापडाचे थर असतात त्यामुळे विषाणूपासून संरक्षण मिळते. त्याचप्रमाणे एकाच स्तरात केलेली गुंतवणूक ही अधिक धोकादायक असते. तेव्हा आपली गुंतवणूक ही विविध मालमत्ता प्रकारात विभागलेली हवी त्यामुळे जोखमीची तीव्रता कमी होते. ★एकच प्रकारच्या अनेक योजनांची भाऊगर्दी: ज्याप्रमाणे या संकट कालावधीत अधिकाधिक गर्दी करू नये असे सुचवण्यात आले होते त्याचप्रमाणे एकच प्रकारातील योजना टाळाव्यात विशेषतः म्युच्युअल फंडाच्या एकच प्रकारच्या अनेक योजना असतील तर त्यांचे व्यवस्थापन करणे त्रासदायक होते. ★दूरच्या लक्षाचा विचार: या कालावधीत आपण एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करत होतो. हाच अंतराचा मुद्दा शेअर्स किंवा त्यासंबंधी असलेल्या म्युच्युअल फंड योजना यामधील गुंतवणूक करताना वापरावा. त्या दीर्घ काळासाठीच आहेत याची जाणीव ठेवावी. त्यातून अपेक्षित परतावा मिळण्यासाठी 5 ते 8 वर्षाच्या कालावधी जावा लागतो हे लक्षात ठेवावे. ★फक्त बाजारातच कार्यरत : ज्याप्रमाणे या संकट काळात आपण स्वतःला आपल्या घरात डांबून ठेवले होते त्याचप्रमाणे बाजार तेजीत असो वा मंदीत, आपण त्यामधील गुंतवणूक संधी शोधत राहिलो तरच आणि तरच महागाईवर मात करणारा परतावा मिळू शकतो. त्यामुळे विचलित न होता सातत्याने बाजारात गुंतवणूक करीत राहावे. ★फक्त बाजारात पण कार्यरत: एकच गोष्ट करत असल्याचे काही दुष्परिणाम असतात त्यामुळे संकट काळात घरात राहून ज्याप्रमाणे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली त्याचप्रमाणे समतोल साधून वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करावी. ★मीडियावर अवलंबून न राहणे : घरात बसलेले लोक वेगवेगळ्या समाज माध्यमावर सक्रिय झाले. त्यावर येणारी मतमतांतरे आपले चित्त विचलित करू शकतात तेव्हा येणाऱ्या उलट सुलट बातम्या फार गांभीर्याने घेतल्यास त्याचा तुमच्या गुंतवणूक निर्णयावर विपरीत परिणाम होऊ शकेतो. तेव्हा मीडिया हवा पण त्यावर अवलंबून राहणे टाळावे. ★झटपट निर्णय घेऊ नका: गुंतवणूक अर्थपूर्ण होण्यासाठी पूर्ण विचार करूनच निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळी अल्पकाळ झटपट परिणामकारक पर्याय तुमच्यासमोर आले तर त्याला भुलून कोणतेही निर्णय घेऊ नका. संशोधन करून लस स्वीकारण्यासाठी काही किमान कालावधी गेलाच हे लक्षात ठेवा. ★अवाजवी अपेक्षा नकोत: कठीण प्रसंगात ज्याप्रमाणे आपण आवश्यक गोष्टींना प्राधान्य दिले आणि कोणत्याही अवाजवी अपेक्षा बाळगल्या नाहीत. त्याचप्रमाणे गुंतवणुकीतून मिळणारा परतावा हा वाजवी आहे ना एवढेच पहा. त्यापासून अवास्तव अपेक्षा करू नका. ★आपल्या गरजा मर्यादेत ठेवा: आपल्या गरजा वाढवणे म्हणजे अधिक पैसे खर्च करणे. संकटकाळात प्रत्येकाने अनावश्यक खर्च टाळला त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी अधिक रक्कम उपलब्ध झाली. वाजवी दरातील दर्जेदार वस्तूंचा शोध घ्या. ★डिजिटल माध्यमांचा वापर वाढवा: या काळात डिजिटल माध्यमाचा वापर, त्यास पर्याय नसल्याने वाढला. यापासून स्फूर्ती घेऊन,पुरेशी काळजी घेऊन डिजिटल माध्यमांचा वापर करणे हे पैसा आणि वेळ वाचवणारे आहे हे ओळखून त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो याचा अनुभव घ्या. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारणीचे सदस्य असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)

Friday, 9 December 2022

मार्केट कधी पडणार?

#मार्केट_कधी_पडणार? अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस बाजार निर्देशांक नवनवे उच्चांक करीत आहेत जून 22 च्या मध्यावर तो बर्यापैकी म्हणजे सर्वोच्च स्थानापासून 20% खाली आला होता. आता बाजार वाढणारच नाही, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्यावर हळूहळू वाढत तो 12 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर वरच्या स्तराला स्थिरावला आता बाजारास कोणी रोखू शकत नाही इथून वाढणारच अशी स्थिती झाली असताना तेथून खाली येऊन 29 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर खालच्या स्तरावर स्थिरावला. अनेक जणांनी या वर्षात बाजार रेकॉर्ड पार करेल अशी आशा सोडल्यावर वाढू लागला 1 डिसेंबरला त्याने नवा विक्रम प्रस्थापित केला. या पार्श्वभूमीवर मार्केट कधी पडणार? हा सर्वसामान्य प्रश्न आहे. खर तर या सर्वच काळात म्हणजे तेजी असो अथवा मंदी, गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध असतात परंतु बाजार खाली जायला लागल्यावर तो अजून खाली जाईल अशी शक्यता दिसू लागते त्यामुळे प्रत्येक जण अजून किती खाली जाणार याचा अंदाज, तर वर जात असताना वर किती जाईल याविषयी छातीठोकपणे अंदाज व्यक्त करीत असल्याने संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे व्यवहार केले जात नाहीत, त्यामुळे होणारा नफा नुकसान आभासीच राहते. तुम्ही अल्पकालीन किंवा दीर्घकालीन गुंतवणूकदार असलात, स्विंग ट्रेडिंग करत असाल किंवा एफएनओ तर या बाजारातून नफा मिळवणे हे तुमचे उद्दिष्ट असणारच तो नेमका किती असावा याचा तुम्ही नक्की विचार केलेला असला पाहिजे. या संदर्भात गुंतवणूक करण्याच्या विविध पद्धती तुम्हाला माहिती असायला हव्यात. तुमची स्वतःची एक पद्धत पद्धत (भले ती चुकीची का असेना) तुम्हाला निश्चितपणे सांगता यायला हवी. त्यावर ठरवल्याप्रमाणे त्वरित निर्णय घेता यायला हवा. ती पद्धत आपल्याला लागू पडते की नाही ते पाहावे. निश्चित कालावधी नंतर त्याचा आढावा घेऊन त्यात आवश्यक ते बदल करता आले पाहिजेत. आपले वय, उपलब्ध पैसे, जोखीम स्वीकारण्याची क्षमता, आपल्यावरील जबाबदाऱ्या, नजीकच्या काळात आवश्यक असलेले खर्च याचा विचार करून गुंतवणूक घोरण ठरवावे लागते. याचबरोबर आपला पुरेसा जीवन विमा, आरोग्यविमा आणि सेवानिवृत्ती विषयक धोरण ठरवाययलाच हवं यासाठी जितक्या लवकर सुरुवात कराल तितका त्याचा आर्थिक स्थैर्य येण्यास उपयोग होईल. याशिवाय आवश्यक असल्यास गरजेनुसार अन्य विमाप्रकार घेता येतील. ते जितके लवकर घेतले जातील तेवढा त्यासाठी येणारा खर्च कमी असेल. शेअरबाजारात गुंतवणूक करताना होणाऱ्या सर्वसामान्य चुका. ★फारशी माहिती नसलेल्या क्षेत्रात गुंतवणूक: आपल्याला माहिती नसलेल्या क्षेत्रात गुंतवणूक करू नये असे तज्ञ सांगतात. अनेकदा विशिष्ट व्यवसायात असलेल्या व्यक्तींना त्यातील खाचाखोचा माहिती असतात. त्यात होणारे बदल, नवनवीन कल्पना त्यांना आधी माहिती होतात. अशा कल्पेनेचे भवितव्य ओळखून त्यात सर्वात आधी गुंतवणूक केल्यास त्याचा सर्वाधिक फायदा त्यांना मिळण्याची शक्यता अधिक असते. ★एखाद्या कंपनी किंवा व्यवसायाबद्धल वाटणारे तीव्र प्रेम: काही लोक एकाच कंपनीत किंवा एकाच क्षेत्रात गुंतवणूक करतात. बाजारात येणाऱ्या आणि व्यवसायात यशस्वी ठरणाऱ्या कंपन्यांतील फक्त 3% कंपन्या व्यवसायातील सातत्य 50 वर्षाहून अधिक काळ टिकवू शकतात उरलेल्या 90% कंपन्या 15 वर्षांनंतर कालबाह्य ठरतात तर 7% कंपन्या 25 वर्षांनंतर कालबाह्य ठरतात. तेव्हा गुंतवणूक करताना एखादी कंपनी किंवा एखादे क्षेत्र याच्या फार प्रेमात असू नये. ★संयमाचा आभाव: अनेक व्यक्ती गुंतवणूक करतात परंतु गुंतवणूक मूल्य वाढले किंवा कमी झाले की त्याच्या त्यावरील प्रतिक्रिया तीव्र स्वरूपाच्या असतात त्यामुळे त्यांचे नुकसान होते. ★अत्यल्प फायद्यातील मोठे व्यवहार: अनेक जण खूप मोठे मोठे व्यवहार करून त्यातून अत्यल्प नफा मिळवतात. खरेदी विक्री केल्यावर मिळणारा फायद्यातील 50% हून अधिक भाग जर ब्रोकरेज, एक्सचेंजचे टर्न ओव्हर फी, जीएसटी, स्टॅम्प ड्युटी, एस टी टी या सारखे स्थिरखर्च म्हणून जात असल्यास मिळणारा, मिळणारा फायदा पुरेसा नसेल तर अशा नफ्याला काही अर्थ उरत नाही याशिवाय ब्रोकरेज व्यतिरिक्त मिळालेल्या नफ्यावर आयकर आकारणी होईल ते वेगळेच तेव्हा आपल्याला होऊ शकणाऱ्या खरोखरच्या निव्वळ नफ्याचा (ब्रेक इव्हन) विचार करूनच भावातील फरक मिळवावा. ★मोह: अनेकदा क्षणिक नफा मिळवण्याच्या नादात होऊ शकणारा मोठा नफा निसटून जातो. तेव्हा या मोहापासून दूर कसे राहता त्यावर होणाऱ्या नफा तोट्याचे प्रमाण बदलेल. ★वेळीच योग्य ते बदल न करणे: अनेकदा आपल्याला मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषणातून भविष्याचे संकेत मिळतात त्याप्रमाणे आपल्या गुंतवणूक घोरणात बदल करावा लागतो. ★भावना प्रधानता: भावना प्रधानता हा जीवनात चांगला गुणधर्म असला तरी गुंतवणूकीत तो दुर्गुण ठरतो. यावर मात करण्यासाठी- ★स्वतःची योजना बनवा: वर म्हटल्याप्रमाणे स्वतःची निश्चित अशी गुंतवणूक योजना हवी. त्याचा वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यक असल्यास त्यात बदल करावेत. ★ती आपोआप कार्यान्वित होईल ते पहा: गुगल शीट, एक्ससेल यांचा वापर करून किंवा काही ब्रोकर्सनी त्यांच्या अँपमध्ये पुरवलेल्या सवलतींचा वापर करून आपली गुंतवणूक अधिक स्मार्ट करता येईल. ★नवनवे प्रयोग करण्यासाठी काही फंड राखून ठेवा: आपल्या गुंतवणुकीतील अत्यल्प भाग यासाठी राखून ठेवा कोणत्याही परिस्थितीत असा फंड 5%हून अधिक नको. *यातील नुकसानमर्यादा गुंतवणूक प्रमाणात असावी याहून अधिक नुकसान झाल्यास त्याची भरपाई अन्य ठिकाणातून करावी लागेल. *कदाचित सर्व रक्कम गमवावी लागेल. *कुठे नेमके थांबावे ते ठरवावे लागेल. ★काही बंधने स्वतः पाळा: या सर्वच प्रवासात आपण स्वतःच काही नियम ठरवावे आणि त्यांचे कटाक्षाने पालन करावे. हे नियम असे असू शकतात- *गुंतवणुकीसाठी कर्ज न घेणे. *रोज एकच ट्रेड घेणे. *आपली नुकसान मर्यादा सांभाळणे (स्टॉप लॉस) असे किंवा या प्रमाणे नियम आपल्यावर स्वखुशीने लादून त्याचे पालन करावे. बाजार वरखाली होत राहिलंच आणि तो आज ना उद्या वाढणारच! बाजारात एक वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून आपले व्यवहार बाजारावर मोठा परिणाम करू शकत नाहीत पण अनेक गुंतवणूकदार एक दिशेस कार्यरत राहीले तर ते बाजार सावरू शकतात याचा अनुभव अलीकडच्या काळात आल्याने याची जाणीव ठेवून नेहमी विविध संधींचा शोध घेत राहावे. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारणीचे सदस्य असून लेखातील मते वैयक्तिक आहेत) अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 9 डिसेंबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत

Friday, 2 December 2022

ठेवींवरील वाढते व्याजदर

#ठेवींवरील_वाढते_व्याजदर मुदत ठेव हा बचतीचा लोकप्रिय प्रकार आहे. अल्प आणि मध्यम मुदतीच्या गरजांसाठी त्याचा निश्चित उपयोग होतो. रोख रकमेस पर्याय या दृष्टीने अडीअडचणीसाठी पैसे लागतात म्हणून सर्वच व्यक्ती सर्वप्रथम मुदत ठेवीस पसंती देतात. याची सुरक्षितता आणि निश्चित परतावा मिळण्याची खात्री यामुळे 95% लोक काहींना काही रक्कम मुदत ठेवीत ठेव म्हणून ठेवतातच. याला अन्य गुंतवणूक पर्याय असले तरी आपल्याकडे पैसे असतील तर ते बँक किंवा पोस्टात ठेवावेत असे पारंपरिक विचार करणाऱ्या लोकांना वाटते तर गुंतवणूक करण्यास बीजभांडवल म्हणून थोडी जास्त रक्कम हाताशी असेल तर चांगला उपयोग होतो. मुदत ठेवींचे वेगवेगळे प्रकार असून आपण त्या पोस्ट, बँक, वित्तीय संस्था, फायनान्स कंपन्या, इतर कंपन्या, बिगर बँकिंग संस्था, पतपेढ्या यात ठेऊ शकतो. ग्राहकांच्या सोयीसाठी अशा योजनांना कल्पकतेची जोड देऊन त्या अधिक आकर्षित केल्या जातात. यातील बँक, पोस्ट, पतपेढी यांची विनिमयक्षमता अतिशय चांगली असून गरज पडल्यास काही अटींवर किंवा अटींशिवाय पैसे त्वरित उपलब्ध होऊ शकतात. कर्ज उपलब्ध होऊ शकते. कंपन्यामध्ये ठेवलेले पैसेही गरजेनुसार मिळू शकतात पण त्याला थोडा जास्त कालावधी लागतो. ठेव योजनांचे प्रकार- ★मुदत ठेव: नावाप्रमाणेच त्यास ठराविक मुदत असते ती 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत असू शकते. कालावधीनुसार हे दर कमी, अधिक असतात. अत्यंत दीर्घ मुदतीच्चे सरकारी बॉण्ड उपलब्ध आहेत त्यांची मुदत 10 वर्षाहून अधिक ते 40 वर्षेपर्यत कितीही असू शकते. याचे व्यवहार दुय्यम बाजारात होत असले तरी विनिमय क्षमता कमी असते. अशा योजनांतील सर्वसाधारण व्याजाचा विचार करता, पोस्टात ते बँकेच्या तुलनेत जास्त असतात. काही ठिकाणी ते बाजारसापेक्ष आहेत. सरकारी बँकांहून सहकारी बँका, पतपेढ्या, इतर वित्तसंस्था, बिगर बँकिंग कंपन्या, सर्वसाधारण कंपन्या अधिक व्याज देऊ करतात, याशिवाय जेष्ठ नागरिक, महिला, शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्ती यांना नियमित दरापेक्षा थोडे अधिक व्याज देण्यात येते. एकरकमी रक्कम ठेवून ठराविक काळाने व्याज घेता येथे अथवा तिमाही वार्षिक व्याजाची अथवा वार्षिक व्याजाची पुनर्गवणूक करता येते आणि एकदम घेता येते. ★रिकरिंग डिपॉजिट - एक रकमी पैसे भरणे अनेकांना शक्य नसते तेव्हा हा पर्याय निवडला जातो याची मुदत 12 महिने ते 120 असू शकते. यामुळे दीर्घ काळात एकरकमी पैसे उपलब्ध होतात. यावर मिळणारे व्याज मुदत ठेवींवरील दराएवढे असते. त्याचप्रमाणे बँकेत / पोस्टात ठेवलेली मुदत ठेव आपल्या गरजेनुसार कधीही मोडता येते असे मुदतपूर्व विमोचन करताना काही दंड आकाराला जातो. अधिक दराने दिलेले व्याज कापून घेतले जाते. ★बदलत्या व्याजदाराच्या ठेवी- यावरील व्याजदर हे एका मार्गदर्शक व्याजदाराच्या प्रमाणात ठराविक अंतराने कमी/ अधिक होत असतात. ★टॅक्स सेव्हिंग डिपॉझिट- कर वाचवा यासाठी मुदत ठेव पाच वर्षे मुदतीने रक्कम ठेवता येते यावर सर्वसाधारण व्याजदाराहून थोडे अधिक व्याज मिळते हे व्याज नियमित अथवा एकरकमी घेण्याचे पर्याय ग्राहकांना आहेत. सर्वसाधारणपणे ठेव ठेवतांना- *उपलब्ध पर्याय, त्यांची सुरक्षितता यातील बँकेतील ठेवी 5 लाख रुपयांपर्यंत सुरक्षित आहेत तर अल्पबचत योजनांना सरकारी हमी असल्याने त्या अधिक सुरक्षित आहेत. कंपनी ठेवी तारणासह किंवा ताराणांशिवाय उपलब्ध असल्या तरी जर त्यांनी ठेव परत करण्यास नकार दिला तर ते परत मिळवून देणारी प्रभावी यंत्रणा नाही. *व्याजदर, किमान रक्कम, मुदत *व्याज /व्याजावर व्याज देण्याची पद्धत *पैसे मुदतपूर्ती पूर्वी अंशतः किंवा पूर्ण काढल्यास होणारे परिणाम, *करदेयता *मिळणाऱ्या अन्य सुविधा मुदत ठेवींचा सुरक्षितता यादृष्टीने उतरता क्रम लावायचा असल्यास पोस्ट ऑफिस, बँक, (येथील ठेवी 5 लाख रुपयांपर्यंत सुरक्षित आहेत) वित्तीय संस्था, उत्पादन कंपन्या, बिगर बँकिंग संस्था, पतपेढ्या असा क्रम लावता येईल असे असले तरी पोस्ट, बँक आणि पतसंस्था यांच्याकडे ठेव ठेवायचा लोकांचा कल आहे. सरकारी, सहकारी आणि खाजगी बँकांनी अधिकाधिक ग्राहक आपल्याकडे यावेत यासाठी काही मूल्यवर्धित सवलती दिल्या आहेत. *विशिष्ट रक्कम जमा झाल्यावर आपोआप मुदत ठेव निर्माण होणे. *मुदत ठेवीत असणारी रक्कम सर्वसाधारण खात्यात शिल्लक दाखवणे. *यातील 1 रुपयाच्या पटीत वापलेली रक्कम ही अंशतः मोडलेले डिपॉझिट समजून उरलेल्या रकमेवर देयदराने व्याज देणे. काही ठिकाणी अशी सोय नसते अशा ठिकाणी एकच मोठे डिपॉझिट न घेता ते विभागून घेतल्यास गरज लागल्यास आपल्याला आवश्यक तेवढी रक्कम काढून घेता येईल. बँक / पोस्ट येथे जेष्ठ नागरिकांना ठेवींवर आणि बचत खात्यावरील व्याज 50 हजार रुपयांपर्यंत करमुक्त आहे तर अन्य व्यक्तींना फक्त बचत खात्यावरील 10 हजार रुपयांचे व्याज करमुक्त आहे. सर्वसाधारण व्यक्तींच्या बाबतीत 40 हजार तर जेष्ठ नागरिकांना मिळणारे व्याज 50 हजाराहून जास्त असल्यास मुळातून करकपात केली जाते अन्य ठिकाणी 5 हजाराहून अधिक व्याज मिळत असल्यास मुळातून करकपात केली जाते. आवश्यकतेनुसार 15 जी किंवा एच फॉर्म देऊन ती टाळता येईल. एकेकाळी सर्वोच्चदराने मुदत ठेवींवर परतावा मिळत होता आणि एकंदरीत खर्चाच्या दृष्टीने विचार करता हे दर कमी असावेत अशी उद्योगांची मागणी होती सरकारलाही हे दर कमी असावेत असे वाटत असल्याने ते टप्याटप्याने खाली आणण्यात आले. कोविड 19 चा फायदा घेऊन अर्थव्यवस्थेस चालना मिळावी या हेतूने ते मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले. ते जवळपास किमान पातळीवर आले असताना गेले काही दिवस मात्र उलट अनुभव येत आहे. महागाईत वाढ होत असल्याने आणि जगभरातील बँका व्याजदर वाढवत असल्याने अपरिहार्य परिस्थिती म्हणून रिजर्व बँकेकडून कर्जावरील दर वाढवले जात आहेत. गेल्या वर्षभरात जवळपास 2% वाढ झाली. साहजिकच ठेवींवरील दर वाढण्याच्या अपेक्षा निर्माण झाल्या. वित्तसंस्था ज्या तत्परतेने कर्जावरील व्याजदर वाढवतात त्या प्रमाणात ठेवींवरील व्याजदर वाढवत नाहीत. कर्जावरील दर कमी झाल्यास ठेवींवरील व्याजदर तत्परतेने कमी करतात असे करणे हे त्यांच्या दृष्टीने अधिक फायद्याचे असते हे दर किती असावेत याबाबत वित्तसंस्थांना स्वातंत्र्य असल्याने, असमान परिस्थिती काही काळ दिसून येते. हे फार काळ चालत नाही. कुणीतरी एकाने व्याजदर वाढवण्यात पुढाकार घेतला की नाईलाजाने सर्वांना त्याची री ओढावी वाटते. या सर्व गोष्टींचा विचार करून व्याजदर आता वाढतच राहतील असे वाटते. 15 ऑगस्टपासून सध्या अनेकजण विविध नावाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव विशेष ठेव यासारख्या योजना राबवत असून त्यामध्ये ठेव ठेवल्यास नियमित व्याजदाराहून अर्धा ते एक टक्का अधिक व्याजदर देऊ करीत आहेत आणि अनेकजण त्याचा लाभ घेत आहेत या सर्वांनीच काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ★आपल्याला मिळणारे ठेवींवरील व्याज करपात्र असल्याने, तसेच हा व्याजदर महागाईवर मात करणारा परतावा देऊ शकणार नाही. यासाठी असलेल्या विविध पर्यायांचा विचार करायाला हवा. ★प्रत्येक पर्याय कमी अधिक प्रमाणात धोकादायक आहे आपली जोखीम स्वीकारण्याची पात्रता लक्षात घेऊन त्याप्रमाणे योग्य पर्यायाची निवड करावी. ★रकमेची सुयोग्य विभागणी करावी ताबडतोब रोख रकमेत रूपांतर करणाऱ्या पर्यायात, त्यावरील परताव्याचा विचार न करता आपल्या जरुरीएवढी रक्कम हवीच. ★बाजार जोखिमीशी संबंधित असलेले पर्याय टाळता येणे कठीण आहे जरी ते धोकादायक असले तरी त्यातून मिळू शकणारा परतावा महागाईवर मात करणारा आहे. याशिवाय अशा योजनांना करामध्ये असलेल्या सवलती पहाता त्या अधिक आकर्षक आहेत. ★अशा सर्व योजनांतील मूल्यांकन (Credit Ratings) आणि व्याजदर महत्वाचे असून त्याची निवड करताना रेट आणि रेटिंग विचारात घ्यावे. ©उदय पिंगळे (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारणीचे सदस्य असून लेखात व्यक्त केलेले मते अर्थ अभ्यासक म्हणून वैयक्तिक आहेत) अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 2 डिसेंबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.

Friday, 25 November 2022

खाजगी कौटुंबिक न्यास

खाजगी कौटुंबिक न्यास आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू अविभक्त कुटूंबाची (HUF) निर्मिती करण्यास प्राधान्य दिले जाते. परंपरागत मालमत्ता, असलेल्या मालमत्तेतून निर्माण झालेली संपत्ती, सदस्यांनी दिलेली मालमत्ता, देणगी यामुळे त्यात भर पडत असते असे असले तरी ही मालमत्ता व्यक्तीची नसून पूर्ण कुटुंबाची असते आणि त्यातील सर्व सदस्यांचा त्यावर अधिकार असतो. जन्म, लग्न आणि दत्तक विधान याद्वारे याचे सभासदत्व आपोआपच मिळते. या सर्व सदस्यांचे मालमत्तेत समान अधिकार असल्याचे अलीकडील न्यायालयीन आहेत. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्याने या रचनेस परंपरेचे अधिष्ठान आहे. हिंदू अविभक्त कुटुंवास कायद्याने स्वतंत्र अस्तीत्व असून ते व्यक्तीपेक्षा वेगळे आहे. यास स्वतंत्र व्यक्तिप्रमाणे कर आकारणी होऊन वेगळ्या करसवलती मिळतात. हिंदू अविभाज्य कुटुंब निर्माण करणे सोपे असले तरी ते रद्द करणे अत्यंत कठीण आहे. काळाच्या ओघात एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी होत चालली असल्याने, त्यातील सदस्यांचे राहणीमान, विचार करण्याची पद्धत बदलली आहे, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने यातील सदस्य विविध प्रांतात, देशात गेल्याने त्याच्या मालमत्ता तेथेही निर्माण झाल्या आहेत, तेथे असलेल्या कायदेशीर तरतुदी वेगवेगळ्या आहेत. या बदलाचा एकंदर कुटुंबाच्या कल्याणासाठी विचार करताना काळाबरोबर जाणारी एखादी पद्धत असावी असा विचार करून आपल्या विशेष हक्काची जपणूक करण्यासाठी विशेषतः त्यातील लाभार्थी, सदस्य, विवाहित स्त्री सभासदांचे हक्क यातून निर्माण होणारे वाद गैरसमज यावर मात करता येऊ शकेल का? याचा विचार करून आता काही लोक खाजगी कौटुंबिक न्यास (Private Family Trust) निर्माण करीत आहेत. बदलत्या मानसिकतेस अनुसरून आपल्या मर्जीनुसार याची रचना करता येते यात लाभार्थ्यांच्या स्वातंत्र्याची जपणूक होऊन यातील मालमत्तेचे कमी अधिक प्रमाणात लाभ मिळून त्यांच्या लाभार्थीना मिळून त्यात आवश्यक असल्यास गरजेनुसार बदल करता येतात. अशा (PFT) ट्रस्टचे व्यवस्थापन हे स्वतंत्र असते. या व्यवस्थापन मंडळात नातेवाईक, मित्र, कुटुंबातील अथवा परिचयातील वकील, सनदी लेखापाल यासारखी तज्ञ मंडळी व्यवस्थापक म्हणून असू शकतात. याची रचना त्यातील मालमत्तेचे व्यवस्थापन, लाभार्थींना मिळू शकणारा मोबदला याचे निश्चित धोरण स्वीकारता येईल. कुटुंबाची मालमत्ता व्यवसाय याची मालकी निश्चित हेतूने न्यासाकडे असेल यासाठी भारतीय न्यास कायदा (Indian Trust Act 1882) चा आधार घेता येईल. अशा ट्रस्टकडे आपली वैयक्तिक मालमत्ता हस्तांतरीत करून निर्माता म्हणून त्याचा वापर वैयक्तिक आणि निश्चित अशा कुटुंबातील व्यक्तींसाठी करू शकेल. याशिवाय मृत्युपत्राद्वारे ही मालमत्ता देता येईल यामुळे त्यांचे किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचे भवितव्य उज्वल होईल. असे ट्रस्ट दोन प्रकारचे असू शकतील विवेकाधिन (Discretionary) आणि विवेकाहीन (Non-Discretionary) यातील विवेकाधिन ट्रस्टचा निर्माता यातील आपल्या मनाप्रमाणे यातील मालमत्ता उत्पन्नाची विभागणी करेल तर विवेकाहीन ट्रस्टमध्ये त्यातील लाभार्थींचा निश्चित वाटा ठरवण्यात येईल. निर्माता ट्रस्टची मालमत्ता यातून मिळणारे उत्पन्न यांची विल्हेवाट कशी लावायची याचे नियोजन विश्वस्तांच्या मार्गदर्शनानुसार ठरवू शकेल. यातील लाभार्थींचे अधिकार जबाबदारी निश्चित असेल. या खाजगी कौटुंबिक न्यासामुळे - ★मालमत्तेचे रक्षण होईल. ट्रस्टकडे हस्तांतरण केलेल्या मालमत्तेस दोन वर्ष होऊन गेल्यावर त्यावर न्यायालयीन टाच आणता येणार नाही. ★सदस्यांमधील सामंजस्य राखले जाईल. ★कौटुंबिक परंपरा आणि मूल्यांची जोपासना होईल. ★बाहेरील व्यावसायिक मदतीने मूल्यवृद्धी होऊ शकते. ★अनावश्यक कायदेशीर लढाया थांबतील. यासारखे फायदे होऊ शकतात. करभार कमी करण्याचा कायदेशीर मार्ग म्हणून याचा वापर करता येईल. प्रचलित आयकर कायद्याच्या दृष्टीने व्यक्तीने आपली संपत्ती खाजगी कौटुंबिक न्यासास दिली तर त्यावर कोणताही कर द्यावा लागत नाही त्याचप्रमाणे न्यासकडून सभासदांना मिळालेली अंतिम वाटणी किंवा अंतरिम मोबदला यावरही कर द्यावा लागत नाही. न्यासाची रचना कशी असेल त्याप्रमाणे न्यासाचे उत्पन्न हे ट्रस्टकडे किंवा सभासदांना दिले जाईल यावर रचनेनुसार नियमाप्रमाणे लागू असलेला किमान समान कर अथवा उत्पन्नानुसार कर भरावा लागेल. मालमत्ता रक्ताच्या नातेवाईकांत हस्तांतर होणार असल्याने प्रत्येक राज्यात असलेल्या नियमांनुसार नोंदणी फी मध्ये सवलत मिळेल. यामुळे आपण योजलेल्या अपेक्षा पूर्ण होतील. मालमत्ता सुरक्षित ठेवता येईल, त्यात भर घालता येईल. आपल्या कुटुंबियांचे शिक्षण, आरोग्य, पर्यटन, लग्न या सारख्या गरजांची पूर्तता करण्यासाठी अप्रत्यक्षपणे हातभार लावून तो विसर्जित करता येईल. आपल्या मनातील अनेक गोष्टींची पूर्तता खाजगी कौटुंबिक न्यास स्थापून होत असेल तरी असा न्यास स्थापन करण्यापूर्वी तो स्थापन करण्यासाठी येणारा खर्च, त्याच्या व्यवस्थापनास लागणारा खर्च यांची तुलना ट्रस्टकडे उपलब्ध होणारी मालमत्ता आणि त्यातून मिळत असलेले किंवा मिळू शकणारे उत्पन्न याचा विचार करावा कारण अशा पद्धतीने न्यास निर्माण करणे हे थोडे खर्चाचे काम आहे. त्यात नियमितपणे करावा लागणाऱ्या संभाव्य खर्चाची जसे हिशोब, उत्पन्न आणि खर्च यांचे मूल्यांकन मूल्यमापन यासाठीची तरतूद या सर्वांचा विचार करायला हवा. असा न्यास निर्माण करताना यातील कायदेशीर बाबतीत तज्ञ विधिज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा. हा लेख हिंदू अविभाज्य कुटुंब या संकल्पनेला असलेल्या उपलब्ध पर्यायाची माहिती देण्याच्या शैक्षणिक हेतूने लिहिला असून तो कोणत्याही पर्यायाची शिफारस करत नाही याची नोंद घ्यावी. ©उदय पिंगळे (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारणीचे सदस्य असून या लेखातील व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे) अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 25 nov 2022 रोजी पूर्वप्रकाशीत

Friday, 18 November 2022

मुले आणि अर्थसाक्षरता

#मुले_आणि_अर्थसाक्षरता माझ्या माहितीत असलेल्या एका व्यक्तीचे अलीकडेच निधन झाले. त्यांचा मुलगा एका नामवंत कंपनीत उच्च पदावर आहे. आज त्याच्या वडिलांची गुंतवणूक विषयक कागदपत्रे कोणतीही कायदेशीर अडचण नसताना सुरळीतपणे करताना त्याला पावलोपावली अडचण येत आहे. याचे मुख्य कारण आहे अर्थसाक्षरतेचा अभाव. आपल्या राहणीमानात गेल्या काही वर्षात प्रचंड फरक पडला आहे त्यामुळे आपल्या जीवनाचे प्राधान्यक्रम पूर्णपणे बदलून गेले आहेत. अनेक नवीन गोष्टींचे सर्वाना आकर्षण आहे. त्याचप्रमाणे आर्थिक सुबत्ता आणि घरी दोन अथवा अलीकडे एकच मूल असल्याने त्याचे अनेक हट्ट सहज पुरवले जातात याशिवाय ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत त्या मुलांना मिळाव्यात असे पालकांना वाटत असते. आर्थिक क्षेत्रातील झपाट्याने होणारे बदल, वाढती महागाई आणि पालकांची बदललेली मानसिकता त्याचबरोबर अनेक पालकांना या बदलांना कसं सामोरे जायचं हेच माहिती नसल्याने त्याचाच अभाव मुलांमध्ये दिसतो. काहींचे पालक घरून काम करत असतात अनेकदा काही पालक मुलांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी नेतात, त्यामुळे मशीन मधून पैसे मिळतात असे त्यांना वाटत राहाते. या सर्वांचा एकच परिणाम म्हणजे चुकीच्या आर्थिक कल्पना डोक्यात फिट्ट बसतात. त्यात पालकही पूर्ण साक्षर नसल्याने त्याच्याही मनात काही चुकीच्या कल्पना ठाण धरून बसलेल्या असतात. अजून तरी शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक विषयाची फारशी माहिती दिली जात नाही. महाविद्यालयात जाणाऱ्या सर्व लोकांना हा विषय सक्तीचा नाही त्याचप्रमाणे ज्यांना तो सक्तीचा आहे त्यातील नेमका हाच महत्वाचा भाग त्यांनी कंटाळा येतो म्हणून अभ्यास न करता राखीव ठेवलेला असतो. खरं अलीकडील पिढी खूप हुशार आहे, जिज्ञासू आहे त्यामुळे त्यांनी मनावर घेऊन काही प्राथमिक गोष्टी शिकून घेतल्या तर त्या आयुष्यभर उपयोगी पडतील. अलीकडेच मी आर्थिक सल्लागार हितेन माळी याचे एक वेबिनारमध्ये सहभाग घेतला त्यांनी मुलांना आणि त्यांच्या पालकांना Money आणि Monkey यात असलेल्या K चे म्हणजेच Knowledge चे महत्व अधोरेखित केले ते जर आपल्यापाशी नसेल तर आपल्याकडील पैसा माकडाचेष्टा करायला लागेल. अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून पालक आणि मुले अर्थसाक्षर बनू शकतील यासाठी सहज करता येण्यासारख्या गोष्टी- ★अगदी लहान मुलांना पैशांची ओळख करून घ्या. आपण वस्तू आणि सेवेचा मोबदला अन्य व्यक्तीस देत असाल तर तो मुलांच्यामार्फत द्या आपल्याला मिळणाऱ्या वस्तू सेवेबद्धल जसे यांना पैसे मिळतात तसेच पैसे आपण नोकरी व्यवसाय करत असल्याने मिळतात फक्त ते रोख न मिळता आपल्या बँक खात्यात जातात जरूरीनुसार ते काढता येतात हे त्यांना समजून सांगा. ★हे पैसे तुम्ही बँकेतून एटीएममधून काढू कसे शकता इतरांना कसे पाठवू शकता ते त्यांना तेथे नेऊन दाखवा. अगदी छोटे व्यवहार त्यांच्याकडून करून घ्या. ★पालकांनी आपले उत्पन्न आणि खर्च लिहावा मुलांना त्यांच्या पॉकेटमनीचा हिशोब ठेवण्यास सांगावा. ठराविक अंतराने त्याचा आढावा घ्यावा यामुळे दोघांनाही आपले अनावश्यक खर्च कुठे होतात ते समजेल. याच वयात शाळेत सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज अभ्यासास आहे. यासंबंधात पालकांचे गणित कच्चे असल्यास मुलांबरोबर या संकल्पना समजून घ्या. आपला गुंतवणूक सल्लागार या विषयीची माहिती आपल्याला आनंदाने देईल. ★नवीन वर्षाचे सुरुवातीला या वर्षाचे आर्थिक संकल्प लिहावे त्यात मुलांना सहभागी करावे त्यांचे विचार जाणून घ्यावे न झेपणारे संकल्प बाजूस ठेवावेत. मुलांना ते समजून सांगावे भलते धाडस करण्याच्या भानगडीत पडू नये. ★अल्प काळात करता येतील असे छोटे व्यवसाय करायला मुलांना प्रोत्साहन द्यावे. कोणतंही काम हे काम असतं त्यात उच्च नीच काही नसतं ते काम दर्जा टिकवून करणं हे कौशल्याचं काम आहे. याची जाणीव बालपणापासून करून द्यावी घरात किंवा आजूबाजूला जेष्ठ नागरिक असतील तर त्यांचा सल्ला घ्यावा. व्यवसायाचा हिशोब शिकवावा झालेल्या नफ्याची अन्य ठिकाणी गुंतवणूक करण्यास मुलांना मार्गदर्शन करावे अथवा दोघांनीही मार्गदर्शकाकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा. ★अनेक पालकांना महागड्या वस्तूंचे आकर्षक असते त्यामुळे ते अशा वस्तूच खरेदी करतात तीच आवड मुलांकडे संक्रमित होते.ब्रॅण्डेड म्हणजे चांगलेच हा विचार पालकांनी डोक्यातून काढून टाकावा. या वस्तूंसाठी मोजलेली अधिकची किंमत ही जाहिरात खर्च आणि कंपनीच्या मोठ्या नफ्याचा आपला वाटा असतो. दर्जेदार वस्तू वाजवी भावात कशा आणि कुठे मिळतात याचा सातत्याने शोध घ्यावा पालक जर असा शोध घेतील तर मुलांनाही तशी सवय लागेल. ★आपले राहणीमान हे बचत गुंतवणूक आणि जोखीम व्यवस्थापन यावर कसे अवलंबून आहे ते स्वतः जाणून घ्या मुलांना सोप्या शब्दात समजावून घ्या. महागाई ही संकल्पना त्यांना समजावून द्या. यातही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर कार्टून चित्रमालिका आहे त्याचा योग्य वापर करता येईल. ★मुलांचे हट्ट पुरवणं आणि त्यांचे कौतुक करणं आपण वेगळ्या पद्धतीने कसे करू याचा सातत्याने विचार करा. गरज आणि आवश्यकता यातील फरक समजून द्या. ती जाणती झाल्यावर या गोष्टी कायम त्यांना आठवतील. ★आर्थिक घडामोडींची माहिती देणारे वृतांत दिवसभरातून काही काळ का होईना. नेहमीच्या रटाळ मालिका अनेक चुकीच्या गोष्टी ठसवत असतात त्या पाहणे टाळा. ★श्रीमंत असणं आणि श्रीमंत दिसणं यातील फरक समजून सांगा केवळ ज्ञान आणि त्याचा सुयोग्य वापर यामुळेच व्यक्ती श्रीमंत हाऊ शकते हे जाणून अधिकाधिक ज्ञान मिळावीत रहा. या यादीत भर टाकता येईल बालदिनाच्या सर्व बालकांना आणि त्यांच्या पालकांना आपली आर्थिक स्वप्न साकारण्यासाठी शुभेच्छा💐 ©उदय पिंगळे अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 18 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत

Friday, 11 November 2022

सीबीडीसी आणि ई रुपी

#सीबीडीसी_आणि_ई_रुपी सीबीडीसी आणि ई रूपी एकच असल्याच्या बातम्या समाज माध्यमात फिरत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या फिनटेक विभागाने काढलेल्या पत्रकात अनेक ठिकाणी सीबीडीसीचा उल्लेख डिजिटल रुपया करण्याबरोबर e₹ असाही केला आहे. त्यामुळे गोंधळाचे वातावरण आहे तेव्हा हे नक्की काय आहे ते पाहू. सीबीडीसी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) भारताच्या स्वत:च्या डिजिटल करन्सी-डिजिटल रुपयाच्या वापराची प्रायोगिक तत्वावर सुरूवात केली आहे 1 नोव्हेंबर 2022 च्या दुय्यम बाजारातील सरकारी रोख्यांच्या घाऊक व्यवहारांसाठी याचा वापर केला जाईल. 31 ऑक्टोबर 2022 रोजी राजपत्रात अधिसूचना काढून भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, यस बॅंक, आयडीएफसी प्रथम बँक आणि एचएसबीसीने घाऊक बाजारातील डिजिटल रुपयाच्या प्रायोगिक प्रकल्पात सहभागी होण्यास सांगितले. बँकेने डिजिटल रुपयाच्या वापर कसा केला जाईल याविषयी 7 ऑक्टोबर, 2022 रोजी पत्रक प्रकाशित केले असून ते केंद्रीय बँक डिजिटल चलन (सीबीडीसी) ही संकल्पना स्पष्ट करणारे असून लवकरच त्याचा घाऊक आणि किरकोळ व्यवहारांसाठी उपयोग केला जाईल असे घोषित केले होते त्यानुसार ही संकल्पना नेमकी काय ते समजून घेऊयात. डिजिटल रुपया म्हणजे काय? सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) ची व्याख्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेली कायदेशीर चलन असे करता येईल डिजिटल रुपया म्हणून ओळखले जाणारे, आरबीआयचे सीबीडीसी हे अन्य चलनासारखेच आहे आणि त्याचा चलनाच्या बरोबरीने किंवा एकमेकांत बदलण्यायोग्य आहे. डिजिटल रुपयाची वैशिष्ट्ये 1) CBDC एक सार्वभौम चलन आहे जे केंद्रीय बँकेने त्यांच्या चलनविषयक धोरणाचा भाग म्हणून मान्य केले आहे. 2) त्याची मध्यवर्ती बँकेच्या ताळेबंदावर दायित्व या सदरात होईल. 3) ते सर्व नागरिक, उपक्रम आणि सरकारी संस्थांद्वारे व्यवहारासाठी मान्य केले जाईल. 4) CBDC चे रूपांतर बँक पैसे भरणासाठी आणि रक्कम रोखीत मिळवण्यासाठी करता येईल. 5) CBDC ही एक सुलभ देवाणघेवाण होऊ शकणारे कायदेशीर चलन आहे ज्यासाठी त्याच्या धारकांकडे बँक खाते असणे आवश्यक नाही. हे चलन डिजिटल वॉलेट मध्ये सुरक्षित ठेवता येईल आणि त्याचा गरजेप्रमाणे यथायोग्य 6) CBDC मुळे पैसे जारी करण्याच्या, हाताळण्याचा आणि वापरास अयोग्य चलन बाजारातून काढून घेण्याच्या खर्चात कपात होणे अपेक्षित आहे. CBDC चे प्रकार सेंट्रल बँक डिजिटल चलन दोन प्रकारांमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकते - किरकोळ व्यवहार चलन (CBDC-R) आणि घाऊक व्यवहार चलन (CBDC-W). किरकोळ CBDC-R चा वापर खाजगी क्षेत्र, सर्वसाधारण ग्राहक आणि व्यवसायांसह सर्वांद्वारे केला जाऊ शकतो. CBDC-W या चलनाचा वापर निवडक वित्तीय संस्थांच्या दुय्यम बाजारातून रोखेखरेदी, अंतरबँक व्यवहार अशासारख्या विशिष्ट व्यवहारांसाठीच करता येईल. सीबीडीसी हे चलन सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या विद्यमान डिजिटल पैशापेक्षा वेगळे असेल कारण सीबीडीसीचे उत्तरदायित्व रिझर्व्ह बँकेशी आहे त्यास सरकारची हमी असल्याने ते अधिक सुरक्षित आहे तर इतर डिजिटल चलनाचे दायित्व संबंधित बँकेशी असते, सध्या बँकेतील पैशांची सुरक्षितता ₹ 5 लाख पर्यंत मर्यादित आहे. सीबीडीसीचा उद्देश आहे की, वर्तमान चलनाचा प्रकार बदलण्याऐवजी सर्वाना वापरण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देणे सध्या अस्तीत्वात चलनाबरोबर अशा चलनाचे व्यवहार वाढवणे ते अधिकाधिक प्रकारे याच चलनात होतील अशी वातावरण निर्मिती करणे आरबीआयचा असा विश्वास आहे की डिजिटल रुपया प्रणाली भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकट बनवेल अधिकाधिक व्यवहार नव्या डिजिटल रुपयाने होतील. त्यामुळे मनी लॉड्रिंग आणि दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा यास आळा बसेल. यात व्यवहार सुरक्षितता सर्वाधिक असेल क्रेप्टोकरन्सी प्रमाणे त्याची व्यवहार नोंद विविध ठिकाणी विभागून ठेवून मान्य केली जाईल यात फरक एवढाच की त्यावर अंतिमतः रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असेल. यामुळे त्याच्या मूल्यामध्ये रोख रक्कम किंवा बँकेतील रक्कम असा कोणताही फरक राहणार नाही. याच्या भावात तीव्र चढ उतार अपेक्षित नाहीत. अशा प्रकारे व्यवहार करता येऊ शकणारा रुपया CBDC-R येत्या महिन्याभरात प्रायोगिक तत्वावर उपलब्ध होईल. यातून येणारे अनुभव लक्षात घेऊन त्यात आवश्यक ते बदल केले जातील. ई रुपी 2 ऑगस्ट 2022 रोजी ई रुपी डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. *देशात कागद विरहित व्यवहारास चालना मिळावी हा याच्या निर्मितीमागील हेतू आहे. *विशिष्ट अशा उद्देशाने एकदाच वापरता येणारी स्पर्शराहित, रोखरहीत डिजिटल पावती आहे ज्यात रकमेचा भरणा आधीच केलेला असेल. *ज्याला ही पावती द्यायची आहे त्याला क्यू आर कोड किंवा एसएमएस स्वरूपात मोबाईलवर मिळेल. *जिथे ती स्वीकारली जाईल तेथून आवश्यकतेनुसार रोख रक्कम दिली जाईल किंवा वस्तूसेवांचा लाभ घेता घेईल. *उपयोग कर्ता तिचा वापर आपल्या साध्या फोनवरून इंटरनेट सुविधा नसलेल्या ठिकाणीही करू शकेल. यासाठी बँक खाते, क्रेडिट डेबिट कार्ड, मोबाईल अँप, नेटबँकिंगची गरज नसेल. *थेट लाभ हस्तांतरणास ही सुविधा उपयुक्त असल्याने व्यवहार अधिक पारदर्शक पद्धतीने होतील. *त्याप्रमाणे सरकारला आपल्या कर्मचाऱ्याच्या विशिष्ठ दवाखान्यातील विशिष्ट उपचारावरील खर्च उचलायचा असेल तर भागीदार बँकेच्या माध्यमातून त्याच्या नावे निश्चित रकमेची ई रूपी पावती जारी केली जाईल सदर पावती दाखवून उपचारांचे बिल त्यास समायोजित करता येईल. *ई रुपी सेवा प्रदात्यास अशी पावती म्हणजे निश्चित वेळी पैसे मिळण्याची हमी असेल. *ही पावती म्हणजे डिजिटल चलन नाही. सध्या 1 नोव्हेंबर 2022 रोजी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध असलेल्या डिजिटल रुपयाशी याचा काहीही संबंध नाही. * वित्तीय सेवा विभाग, आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NCPI) या डिजिटल व्यवहाराचा विकास आणि संशोधन करण्याऱ्या संस्थेमार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. *एनसिपीआयने ई रुपी व्यवहारांसाठी एक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन बँक, इंड्सइंड बँक, कोटक महिन्द्रा बँक, पंजाब नैशनल बँक, भारतीय स्टेट बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या 11 सरकारी व खाजगी बँकांबरोबर तसेच भारत पे, भीम बडोदा मर्चंट पे, पाईन लैब्स, पीएनबी मर्चंट पे आणि योनो बँक या 5 पेमेंट अँप्स बरोबर करार केला असून लवकरच अन्य बँका आणि पेमेंट अँप्स त्यात सहभागी होतील. *देशभरातील 1600 हून अधिक रुग्णालयात उपचारासाठी ही पावती वापरता येईल. एनसिपीआयने सदर रुग्णालयांशी तसा सामंजस्य करार केला आहे *आगामी काळात, ई-रुपीच्या वापरकर्त्यांची संख्या आणि व्याप्ती वाढणार आहे. त्यामुळे खाजगी संस्था आपल्या कर्मचाऱ्यापर्यंत लाभ पोचवण्यासाठी तसेच एमएसएमई क्षेत्र, व्यवसाय ते व्यवसाय (B2B) व्यवहारांसाठी त्याचा वापर करतील. ©उदय पिंगळे अर्थसाक्षर डॉट कॉमवर 11 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत

Friday, 4 November 2022

मध्यवर्ती बँकेचे पतधोरण आणि व्याजदारावरील परिणाम

मध्यवर्ती बँकेचे पतधोरण आणि व्याजदारावरील परिणाम पतधोरण म्हणजे पैशांविषयीचे धोरण.आपल्या देशात हे काम भारतीय रिझर्व्ह बँक करते. ही स्वतंत्र स्वायत्त संस्था असून तिचे उत्तरदायित्व संसदेशी आहे. लोकनियुक्त सरकार आपले आर्थिक ध्येयधोरण ठरवते त्यानुसार रिजर्व बँक त्यावर उपाययोजना करीत असते. सरकारचा निर्णय रिझर्व बँकेवर बंधनकारक नसला तरी बँकेस त्याचा निश्चित विचार करावा लागतो. निवडून आलेल्या कोणत्याही सरकारला बँकेने आपण सुचवू ते ऐकावे असे वाटत असल्याने अप्रत्यक्षपणे थोडाफार हस्तक्षेप केला जातो. रिझर्व बँक ही आपल्या देशातील बँकांची बँक असून यापूर्वी आपण तिचा इतिहास, कामकाज पद्धती आणि अर्थव्यवस्थेतील भूमिका याविषयी जाणून घेतले आहे. त्याची थोडक्यात उजळणी म्हणून आपण रिजर्व बँक करत असलेली पारंपरिक कार्ये, पर्यवेक्षक कार्ये आणि प्रवर्तनात्मक कार्ये यांचा थोडक्यात आढावा घेऊ म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने रिजर्व बँकेचे महत्व लक्षात येईल. ★पारंपरिक कार्ये *चलन निर्माण अनुपयुक्त नोटांची विल्हेवाट यांची मक्तेदारी *बँकांची बँक *सरकारची बँक *अंतिम संकटमोचक ऋणदाता *समाशोधन गृह व्यवस्था *पतनियंत्रण किंमत नियंत्रण *परकीयचलन नियंत्रण *विनिमयदर नियमन *अर्थविषयक आकडेवारी तयार करून प्रसिद्ध करणे ★पर्यवेक्षणात्मक (देखरेख आणि नियंत्रण) कार्ये *नव्या बँकांना परवाने *नव्या शाखांना परवानगी *बँकांची तपासणी *बँकांच्या कार्यपद्धतीवर, व्यवस्थापन, विलीनीकरण यावर नियंत्रण *पर्यवेक्षण मंडळाची निर्मिती करून वित्तीय पर्यवेक्षण. ★प्रवर्तनात्मक (विस्तार विषयक) कार्ये *खाजगी आणि सहकारी बँकांचे व्यवसाय प्रवर्तन *कृषी आणि ग्रामीण पतपुरवठा प्रवर्तन *औद्योगिक वित्तपुरवठ्याचे प्रवर्तन *निर्यात वित्तपुरवठ्याचे प्रवर्तन. आपण फक्त यातील पतनियंत्रण किंमत नियंत्रण यांचा विचार करूया. सर्व प्रकारच्या बँका, वित्तीय संस्था ठेवी स्वीकारून कर्ज देण्याचा व्यवसाय करतात यास पतनिर्मिती असे म्हणतात. अर्थव्यवस्थेसाठी ती आवश्यक असली तरी चलनवाढ किंवा भाववाढीसारखी स्थिती उद्भवते रिझर्व बँक पतपुरवठा नियंत्रण करीत असते याचा बँका आणि अर्थव्यवस्थेतील रोकड प्रमाणावरही होत असतो. त्यामुळे पतधोरणबरोबरच चलन धोरण स्पष्ट होते. पतपुरवठ्याचा प्रवाह बदलून चलन आणि पत किंवा कर्ज यांचा योग्य समतोल साधून आर्थिक विकासाला चालना दिली जाते देशातील पैसा आणि पतपैसा यांचा एकूण पुरवठा अर्थव्यवस्थेच्या गरजेच्या प्रमाणात ठेवण्याची जबाबदारी रिझव्‍‌र्ह बँकेवर आहे; तो गरजेच्या तुलनेत अधिक झाल्यास महागाईने आमंत्रण मिळते ज्यास आपण चलनवाढ म्हणतो त्याचप्रमाणे तो कमी होऊनही चालत नाही याचा समतोल साधण्यास पतपैशावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार रिझव्‍‌र्ह बँकेला कायदेशीर अधिकार आहे त्यातील तरतुदींनुसार संख्यात्मक आणि गुणात्मक पतनियंत्रण साधनांचा उपयोग रिझव्‍‌र्ह बँक ते करू शकते. याद्वारे पत्यक्ष चलन आणि पतपैसा याचे प्रमाण कमी अधिक करून त्यावर पर्यायाने महागाईवर नियंत्रण ठेवता येते. ■पतनियंत्रण साधने ★रेपोरेट म्हणजे रिझर्व्ह बँकेने पतनिर्मितीसाठी दिलेल्या अल्पमुदतीच्या कर्जावरील आकारण्यात येणारा व्याजदर, तो कमी झाल्यास बँका कमी दराने कर्ज देऊ करतील तर तो वाढल्यास कर्जावरील व्याजदर वाढेल. ★रिव्हर्स रेपोरेट म्हणजे बँका वित्तीयसंस्था यांच्याकडील अतिरिक्त रकमेवर अल्पमुदतीसाठी देण्यात येणारा व्याजदर. तो अधिक झाल्यास बँका वित्तसंस्था आपल्याकडील रक्कम रिझर्व्ह बँकेकडे ठेवत असल्याने बाजारातील उपलब्ध कर्जरक्कम कमी होते. त्यामुळे आपोआपच समतोल साधला जातो. आवश्यकतेनुसार हे प्रमाण कमी-जास्त करण्याचे कामरिव्हर्स रेपो रेट करत असतो. जेव्हा बाजारात अधिक पैसा असतो तेव्हा रिझर्व्ह बँका तरलता कमी करण्यासाठी रिव्हर्स रेपो रेट वाढविते, त्यामुळे जास्तीत जास्त व्याज मिळवण्यासाठी बँका स्वतःकडील निधी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात. ★रोख राखीव निधी गुणोत्तर (सीआरआर) सर्व बँका आणि वित्तीय संस्थाना स्वत:जवळ जमा झालेल्या एकूण ठेवींपैकी (मागणी ठेवी व मुदत ठेवी) काही प्रमाणात ठेवी रिझर्व्ह बँकेकडे रोख स्वरूपात ठेवाव्या लागतात, त्या प्रमाणाला रोख राखीव निधी म्हणतात. यात वाढ केल्यास रोख राखीव निधीच्या प्रमाणात वाढ केल्यास बँकांना जास्त निधी रिझर्व्ह बँकेकडे जमा करावा लागतो. त्यामुळे त्यांच्याकडील कर्ज देण्याजोगी रक्कम कमी झाल्याने त्यांची पतनिर्मितीची क्षमता घटते. त्याउलट रिझर्व्ह बँकेने रोख राखीव निधीचे प्रमाण कमी केल्यास बँकांकडे कर्ज देण्यासाठी अधिक रक्कम शिल्लक राहिल्याने बँकांची पतनिर्मितीची क्षमता वाढते. ■पतधोरण समिती रिझर्व्ह बँकेकडून सरकारी धोरणानुसार महागाई दराचे लक्ष्य निश्चित करण्यात येते. सध्या हा दर 4% असावा तो कमी अधिक 2% म्हणजेच किमान 2% ते कमाल 6% या मर्यादेत रहावा हे निश्चित करण्यात आले आहे. तो निर्धारित पातळीवर राखण्यासाठी आवश्यक असलेले व्याजदर धोरण पतधोरण समिती निश्चित करते. दर दोन महिन्यांनी त्याचा आढावा घेतला जातो. 29 सप्टेंबर 2016 मध्ये या समितीची स्थापना करण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या धोरणात सातत्य रहावे म्हणून मध्यवर्ती बँकेने पतधोरण समितीची स्थापना केली आहे. यात समितीमध्ये एकूण सहा सदस्य असूनर तीन सदस्य सरकारचे आणि तीन सदस्य रिझर्व्ह बँकेचे असतात. सहा सदस्यांमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर चलनविषयक धोरणाचे प्रभारी- पदसिद्ध सदस्य असतात. याशिवाय रिझर्व्ह बँकेतील आणखी एक अधिकारी केंद्रीय मंडळाद्वारे नामनिर्देशित केला जातो. याशिवाय सरकार नियुक्त तीन सदस्य हे अर्थतज्ज्ञ किंवा आर्थिक विषयातील जाणकार असतात. यांचा कार्यकाल चार वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी असेल तेवढा असतो. ■धोरण निश्चिती- सहाही सदस्य आपले मत नोंदवत असतात. यात बदल करण्यास सहापैकी किमान चार सदस्यांचे एकमत होणे आवश्यक असते. डिसेंबर 2021 पर्यंत पतधोरण विषयक जे निर्णय झाले ते फारसे वादग्रस्त ठरले नाहीत. तयामुळे कर्जदर व्याजदर खूपच खाली आले. यात केवळ निव्वळ व्याजावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचा अपवाद सोडल्यास फारसे वाद झाले नाहीत. यानंतर आपल्या चलनास समर्थ करण्याच्या उद्देशाने जे काही प्रयत्न केले गेले त्यामुळे महागाई वाढली त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाय योजना केल्या गेल्या तरीही जानेवारी 2022 ते आजतागायत आपण ठरवलेल्या जास्तीतजास्त महागाईदर मर्यादेहूनही महागाई सातत्याने वाढल्याने सार्वत्रिक टीका होऊ लागल्याने कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक अशी विशेष सभा 3 नोव्हेंबर 2022 रोजी प्रथमच होणार आहे त्यात महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात यावर चर्चा होईल. या सर्वाचा परिणाम सर्व कर्जदारांवर ताबडतोब होतो. रेपोरेट वाढल्यास दर झटकन वाढवले जातात त्यामुळे कर्जदारांच्या एकूण मासिक हप्त्यात वाढ होते. याविषयी रिझर्व्ह बँक वित्तीय संस्थाना फक्त दिशादिग्दर्शन करते याचा फायदा त्यांना व्याजदर वाढवल्याने अधिक होतो. असे दर कमी झाल्यास याच संस्था व्याजदर कमी करण्यास खूप वेळ लावतात. ठेवीदार म्हणजे वित्तीय संस्थांचे धनको त्यांची स्थिती याहून दयनीय आहे मे 2022 पासून रेपोरेट 140 बेसिस पॉईंटने वाढून ठेवींवरील व्याजदर त्यामानाने फारसे वाढत नाहीत. नॉन बँकिंग संस्थानी त्यांचे डिपॉजीटवरील व्याजदर वाढवण्यात तत्परता दाखवली असेल तरी याची सर्वाधिक झळ केवळ व्याजावर अवलंबून असलेल्या जेष्ठ नागरिकांना बसते. त्यांचा विश्वास बँकांवर आहे. सध्या जेष्ठ नागरिकांना फारच मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. यातील अल्पबचत योजनांतील वरीष्ठ नागरिक बचत योजनेचे व्याजदर 0.2% वाढला आहे. उपलब्ध सरकारी आकडेवारी नुसार महागाई 7.4% असली तरी प्रत्यक्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर आणि वैद्यकीय सेवा अधिक महाग होत असल्याने थोडेसे उदार होऊन त्यांच्यासाठी तरी एखाद्या नवीन योजनेची तातडीने गरज आहे. ©उदय पिंगळे अर्थ अभ्यासक

Friday, 28 October 2022

शेअरबाजारातील गुंतवणुकीचे फंडे

#शेअरबाजारातील_गुंतवणुकीचे_फंडे शेअरबाजारातूनच आपल्याला चांगला परतावा मिळेल असे वाटत असल्याने आज सामान्य गुंतवणूकदारांची टक्केवारी बऱ्यापैकी वाढली आहे. यातील काही लोक हे जुगारी प्रवृत्तीचेही आहेत त्यांना बाजाराने गेल्या अनेक वर्षात दिलेल्या वार्षिक परताव्याएवढा परतावा मासिक, पाक्षिक,साप्ताहिक मिळावा याहीपुढे जाऊन तो रोज मिळावा अशी अपेक्षा असते. यातील कितीही तज्ञ व्यक्ती असेल तरी सातत्याने अवास्तव परतावा मिळण्याची शक्यता नाही उलट अशी चाल अंगाशी येईन जे काही कमावले ते निघून जाऊन अधिक देयता कधी निर्माण होईल ते कळणारही नाही. तेव्हा असे बेधडकपणे फसवे दावे करणारे लोक जे काही सांगतात त्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका हे मी एवढ्या वर्षांच्या अनुभवातून निश्चित सांगू शकतो. माझ्या आर्थिक विषयांवर फेसबुक पेज आणि ब्लॉगमुळे अनेक व्यक्ती माझ्या संपर्कात आहेत. यातील काही जाणकार व्यक्तीशी त्यांची गुंतवणूक करण्याची पद्धत जाणून घेतल्यावर सर्वसाधारण गुंतवणूकदारांना उपयोगी पडतील अशा दोन पद्धती मला सापडल्या ज्या मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांना उपयोगी पडतील त्यावर मी स्वतंत्र लेख लिहिले असून ते आपण पुन्हा मुळातून वाचू शकता. या दोन पद्धती अशा- ★नितीन पोताडे सरांची पद्धत- यामध्ये आपण निवडलेल्या शेअर्समध्ये एकरकमी गुंतवणूक न करता 50% रक्कम गुंतवावी. भाव 5% खाली आले की 5% गुंतवणूक वाढवावी आणि 5% वाढल्यावर 5% गुंतवणूक काढून घ्यावी. जेव्हा बाजारभाव सातत्याने वरखाली होतात तेव्हा ही पद्धत अत्यंत उपयोगी आहे यामुळे बाजार वर जावो की खाली गुंतवणूकदार म्हणून आपल्याकडे कायम गुंतवणूक संधी उपलब्ध राहते समजा भाव त्याहून वर जाऊन कुठेतरी स्थिरावले तरीही हीच पद्धत वापरावी. ती पातळी हा मुळभाव पकडून त्या खालीवर खरेदी विक्री व्यवहार करावेत. ★पंकज कोटलवर सरांची पद्धत- यामध्ये निवडलेल्या शेअरपैकी ज्यांचे भाव वाढत आहेत त्याच कंपनीचे शेअर्स थोडे थोडे खरेदी करावेत यामुळे आपला फोलिओ सतत उत्कर्ष दाखवतो. ज्या शेअर्सचे भाव वाढत नाहीत त्यांचे शेअर्स तसेच ठेवावेत त्यात अधिक गुंतवणूक केल्याने मोठ्या प्रमाणात पैसे अडकण्याची शक्यता असते. या पद्धतीशिवाय गुंतवणूकदारांना सर्वमान्य असलेल्या पद्धती अशा- ★मार्केट लीडरमध्ये गुंतवणूक- प्रत्येक क्षेत्रात एक दोन दादा कंपन्या असतात आशा कंपन्या आपले बाजारातील स्थान टिकवण्याचा पर्यंत करीत असल्याने एक गुंतवणूकदार म्हणून त्या कंपन्या अपेक्षित कामगिरी करतात ना? एवढेच यावर लक्ष ठेवावे लागते. ★सरकारी कंपन्यांतील गुंतवणूक- सदर कंपन्यामधील गुंतवणूक सरकार हळू हळू काढून घेत आहे ही एक संथ प्रक्रिया आहे त्यामुळे या कंपन्यांच्या भावात त्यांचे खरे मूल्य दिसून येत नाही त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर मालमत्ता असल्याने खाजगीकरण झाल्याने त्याचा फायदा गुंतवणूकदारांना मिळू शकतो. ★भरपूर लाभांश देणाऱ्या कंपन्या- यात अनेक सरकारी काही खाजगी कंपन्या येतात या कंपन्या त्याच्या बाजारभावशी तुलना केली असता जो लाभांश देतात त्याचा उतारा हा मुदत ठेवींवरील व्याजाहून अधिक आहे त्यामुळे तुलनात्मकदृष्टीने यातून तोटा होण्याची शक्यता कमी असते त्याचप्रमाणे या शेअर्सच्या भावात 15 ते 20% भांडवलवृद्धीही होऊ शकते. ★म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाची गुंतवणूक- म्युच्युअल फंड योजनांच्या व्यवस्थापक कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतो ती वाढवतो अथवा कमी करतो याचा अहवाल जाहीर करीत असतो हा अहवाल अँफीच्या (सर्व म्युच्युअल फंड व्यवस्थापन कंपन्यांची संघटना) संकेतस्थळावर जाऊन कुणालाही पाहता येतो या पद्धतीने सर्वसाधारण माहिती मिळू शकते परंतु ती महिनाभरापूर्वीची असल्याने नंतर झालेल्या बद्दलबद्धल गुंतवणूकदार अनभिज्ञ राहतो. ★कॉफी कॅन पोर्टफोलिओ- या पद्धतीने जी गुंतवणूक केली जाते मागील 10 वर्षात सातत्याने नफ्यात 15% आणि उलाढालीत 10% सातत्याने वाढ दर्शविणाऱ्या कंपन्यांत केली जाते. अनेक वित्तीय संस्था, भांडवल व्यवस्थापन कंपन्या, मोठे गुंतवणूकदार दरवर्षी त्याचा या पद्धतीचा गुंतवणूक संच जाहीर करतात. त्याचा अभ्यास करून स्वतःचा गुंतवणूक संच तयार करता येणे शक्य आहे. ★स्मॉलकेस- ही म्युच्युअल फंडाच्या जवळपास जाणारी अलीकडे उदयास आलेली कल्पना आहे. यात कोणत्या शेअर्समध्ये किती प्रमाणात गुंतवणूक करायची ते आधीच ठरवले जाते. त्याप्रमाणे गुंतवणूकदारांच्या गरजेनुसार त्यांची निर्मिती केली जाते. यामुळे आपल्याला सूचनेनुसार गुंतवणूक करणे एवढाच पर्याय शिल्लक राहतो. या आणि अशा पद्धतीचा विचार करून आपले स्वतःचे असे गुंतवणूक धोरण ठरवता येऊ शकते. असे धोरण ठरवताना काही गोष्टी मनात निश्चित कराव्यात आणि त्यांची जाणिव ठेवावी. उदाहरणार्थ- *गुंतवणूक का? कशासाठी? *आपण किती जोखीम स्वीकारू शकतो. *आपली गुंतवणूक कमी होता कामा नये. *मिळणारा परतावा सर्वसाधारण मिळू शकणाऱ्या परताव्याहून अधिक असावा. *आपली गुंतवणूक पद्धत काय आहे ते आपल्याला ठामपणे सांगता येईल का? तरीही काही ठाम निर्णय घेता येत नसेल आणि किमान आठ वर्षे थांबायची तयारी असेल तर म्युच्युअल फंडाच्या इंडेक्स फंड योजना साधारणतः 12%, फ्लेक्सजी कॅप 15% च्या आसपास परतावा देतील तर ब्ल्यू चिप फंडाचा परतावा याच्याच आसपास असेल असे मागील 40 वर्षाचा इतिहास पाहून आपण सांगू शकतो. याहून अधिक परतावा मिळू शकणाऱ्या योजनांत जोखीम अधिक असल्याने त्या सर्वसामान्य लोकांसाठी नाहीत. दरमहा 5% तर जेष्ठांसाठी 8% मासिक परतावा देऊ करणाऱ्या योजनांच्या जाहीराती आघाडीच्या वृत्तपत्रातून रोज येत असल्या तरी असा परतावा सातत्याने मिळणे अशक्य आहे यात जोखिमही खूप जास्त असल्याने या सापळ्यात कोणी अडकू नये किंवा असा विचार आपले मित्र नातेवाईक करीत असल्यास त्यांना यापासून परावृत्त करावे. ©उदय पिंगळे अर्थसाक्षर डॉट कॉमवर 28 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.

Friday, 21 October 2022

झेरोधाच्या अनुचित व्यापारी प्रथा आणि सेवेतील त्रुटी

#झेरोधाच्या_अनुचित_व्यापारी_प्रथा_आणि_सेवेतील_त्रुटी ऑनलाइन व्यवहार करण्याशी माझा संबंध खऱ्या अर्थाने सन 2016 साली आला. मुंबई ग्राहक संघाच्या त्या वेळच्या शिक्षण विभागप्रमुख वसुंधराताई देवधर यांनी यूपीआयची माहिती असलेली एक लिंक पाठवून त्यावर एक लेख लिहून मागितला होता. या आधी ऑनलाइन काही हवं असल्यास ते मुलांना सांगितलं की तेच व्यवहार करायचे आणि वस्तू हातात यायची. यूपीआय ही क्रांतिकारी पेमेंट पद्धत तेव्हा नुकतीच सुरू झाली होती मी प्रत्यक्षात ऑनलाइन व्यवहार कधी केले नसले ते ते कसे करता येतील हे वाचले होते. यूपीआयवरील माहिती वाचल्यावर ही पध्दत आर्थिक बाबतीत क्रांतिकारी बदल घडवेल हे मी ओळखले. आता यावर लिहायचे तर त्यासाठी आवश्यक गोष्टी आपणच करून पहाव्यात तर त्याचे फायदे तोटे लोकांना सांगण्याचा नैतिक अधिकार आपल्याला असेल असे वाटल्याने त्यासाठी आवश्यक असणारा आभासी पत्ता (UPI address) तयार करून माझ्या भाच्याला ₹100/- पाठवून ते त्याला त्याच क्षणी मिळतात याची मी खात्री फोनवरून करून घेतली. त्या दिवसापासून आजतागायत जिथे जिथे ऑनलाइन व्यवहार होऊ शकतो तो मी ऑनलाइन पद्धतीनेच करत आहे. यातील तत्परता, सुलभता, व्यवहाराची होणारी नोंद आणि हे सर्व जवळपास विनामूल्य! या गोष्टींची कुणालाही निश्चित भुरळ पडेल असेच सारेकाही. या सर्वाचा प्रसार प्रचार पुरस्कार तेव्हापासून मी करीतच आहे. ज्यांना असे व्यवहार करायची भीती वाटते त्यांची भीती घालवण्याचे काम मी सातत्याने करीत आहे. आपण हे सारं सहज करू शकतो हे कळल्यावर आत्मविश्वासात वाढ होते. ब्रोकरकडे असणारे आपले खाते हे नेमके कोणत्या प्रकारच्या ब्रोकरकडे असावे याबाबत मार्गदर्शन करताना जे टेक्नोसॅव्ही आहेत त्यांनी डिस्काऊंट ब्रोकरकडे तर ज्यांना आपल्या परंपरागत पद्धतीने व्यवहार करायचे आहेत त्यांनी फुल फ्लेज ब्रोकर्सकडे आपले व्यवहार करावे असे माझे मत आहे. मध्यंतरी म्हणजे करोना कालखंडात मानवी हालचालींवर मर्यादा आल्याने बहुतेक फुल फ्लेज ब्रोकर्सनी आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी अँप विकसित केली त्यामुळे फोन करून व्यवहार करण्याऐवजी फोनमधून व्यवहार करता येणे शक्य झाले. अँप म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तो आपल्या गरजेनुरूप एक निश्चित केलेला कम्प्युटर प्रोग्राम आहे. याशिवाय सेबीने मार्जिन नियम बदलल्याने पूर्वीप्रमाणे एकाद्या खात्यास शब्दावर मार्जिन मिळणे बंद झाल्याने या दोन्ही ब्रोकर्सच्या कार्यपद्धतीत आता फारसा फरक राहिलेला नाही. माझ्या भावी आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने मी गेल्यावर्षी जे बाजार व्यवहार केले त्याचा तपशील आयकर विवरणपत्र भरताना भरपूर ब्रोकरेज गेल्याचे लक्षात आले हेच व्यवहार डिस्काउंट ब्रोकरमार्फत केले असते तर 95% ब्रोकरेज वाचले असते. आपलयाला जर ऑनलाइन व्यवहार करता येतात मग आपण डिस्काउंट ब्रोकरकडे असे खाते का उघडू नये असा विचार आला? असे खाते उघडताना त्याविषयी अधिक माहिती मिळवताना झेरोधाकडे खाते उघडुयात त्यांचे आयडीएफसी बँकेबरोबर 3 इन 1 खाते निर्माण करता येत असल्याचा करार झालेला असल्याने व्यवहाराच्या दृष्टीने सोईचे होईल म्हणून दोन्हीकडे खाते उघडण्याचा निर्णय मी घेतला याशिवाय असा निर्णय घेण्यामागे माझ्या जाणकार मित्राने झेरोधाचा इंटरफेस चांगला असून कस्टमर सर्व्हिस चांगली असल्याची केलेली शिफारस आणि हे खाते मुलगा वापरत असल्याने काही अडचण आल्यास त्याला विचारता येईल हा भरवसा होता. मित्राच्या शिफारशींमुळे ठाण्यातील झेरोधा प्रतिनिधीने माझ्याशी संपर्क साधून मार्गदर्शन केले आणि ऑनलाइन खाते उघडताना कुठे अडचण आल्यास त्वरित मार्गदर्शन करू असे सांगितले. माझी 3 इन 1 खात्याची गरज सांगितल्यावर त्यांनी प्रथम आयएफसीआय बँकेत खाते उघडून तो नंबर झेरोधाकडे द्यावा असे सुचवल्याने प्रथम आयडीएफसी बँकेत आणि नंतर झेरोधामध्ये मी खाते ओपन केले. हे खाते उघडण्यासाठी मोजून 20 मिनिटातून अधिक कालावधी लागला नाही. केवायसीही ऑनलाइन झाले हा एक सुखद आणि आपला आत्मविश्वास वाढवणारा अनुभव होता. या सर्व घटना 22 ते 24 सप्टेंबर या कालावधीत. यानंतर मी हे खाते 3 in 1 करण्यासाठी द्यावा लागणारे पीओए डॉक्युमेंट पोर्टलवर जाऊन प्रोसेस केले त्याचा प्रिंटआऊट घेऊन तो स्पीड पोस्टाने बंगलोर येथे 28 सप्टेंबर रोजी पाठवला. तो त्यांना 30 सप्टेंबरला मिळाला. या प्रत्येक टप्यावर मला वेळोवेळी मेलवरून स्थितीची माहिती वेळोवेळी मिळत राहिल्याने समाधान वाटत होते. हे समाधान अल्पकाळात नाहीसे झाले. 30 सप्टेंबरला मला संध्याकाळी मी पाठवलेला पीओए फॉर्म जुना असल्याने नाकारला असल्याचा मेल आला मी लगेच माझ्या संपर्कात असलेल्या सपोर्ट टीम मेम्बरशी संपर्क साधल्यावर त्यांनी मला वेगळी पीओए फॉर्मची लिंक पाठवली त्यातील फॉर्म आणि मी पोर्टलवरून घेतलेल्या फॉर्ममध्ये एका शब्दाचाही फरक नसल्याने तो फॉर्म पुन्हा पाठवण्यास मी नकार दिला. यानंतर सपोर्ट मेम्बरने त्यांच्या वरिष्ठांशी बोलून फॉर्म न पाठवता पीओए ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले त्याप्रमाणे केले असता ते नाकारण्यात आले याबाबत मी पोर्टलवर टिकेट जनरेट केले म्हणजे आपली तक्रार तेथे नोंदवली. त्याचे उत्तर मी पीओए फॉर्म पाठवलेला नसल्याने अर्ज नाकारण्यात आल्याचे कळवले. तेव्हापासून 14 ऑक्टोबरपर्यंत जिथे संपर्क साधला तेथून वेगवेगळे अनुभव आले. सपोर्ट करणारा वेगळे सांगणार, मेलचे उत्तर भलतेच, कस्टमर केअर तोंडाला पाणी पुसणारे आमची टीम तुमच्याशी 24 तासात संपर्क साधेल म्हणून सांगून वेळ मारून नेणार. यात नेमके काय करायला हवे कुणाचाच कुणाला मेळ नाही समस्या आहे तिथेच. ती सोडवायची सोडून तुम्ही नेट बँकिंगने, यूपीआयने पैसे पाठवून व्यवहार करू शकता किंवा आयडीएफसी बॅंकेला विचारून पहा सांगणार तर बँकवाले आमच्याकडून ओके आहे तुम्ही झेरोधाला विचारा सांगणार यातून मनस्ताप होण्याखेरीज काहीही झाले नाही. 14 ऑक्टोबर शुक्रवारी रात्री सपोर्ट टीमच्या मॅनेजरने 18 ऑक्टोबरपर्यंत प्राधान्याने तक्रार सोडवण्याचे आश्वासन दिले आहे एकंदरीत अनुभव पाहता त्यास यश येईल असे वाटले नाही, तोपर्यंत हा प्रश्न न सुटल्यास मी 19 ऑक्टोबर रोजी खाते बंद करणार म्हणून माझ्याकडून त्यांना मर्यादा घातली होती. सेवेतील त्रुटी आणि अनुचित व्यापारी प्रथा याबद्धल खाते काढताना भरलेले ₹200/- आणि मनस्ताप याबद्दल भरपाई मिळवू शकण्याचा पर्याय माझ्याकडे आहे. 19 ऑक्टोबर रोजी हा प्रश्न न सुटल्याने मी कंटाळून झेरोधा खाते बंद केले आहे. त्यांनीही तितक्याच तातडीने ते कोणताही विचारपूस न करता तत्परतेने बंद केले आहे. खाते रीतसर सुरू होण्यापूर्वी जर ही अवस्था असेल तर यानंतर उद्भवणाऱ्या तक्रारी मी कशा सोडवणार याबाबत मला वाटणारी काळजी रास्त आहे. आता अनधिकृतपणे झेरोधा आणि आयडीएफसी बॅंक यांच्यात काहीतरी नवीन करार होणार आहे असं समजतंय. ते सपोर्ट टीम,पोर्टल, कस्टमर केअर याना माहीत नसेल तर आपल्या पोर्टलवर आहे असे दाखवणे चूक आहे. मला आलेल्या मेलमध्ये असा करार नसल्याचे त्यांनी नाकारले नाही. उलट अपडेटेड फॉर्म पाठवा, फॉर्म आलेला नाही अशी कारणे दिली असून 24 तासात संपर्क केला जाईल सांगितले तरी तो कोणत्याही मार्गाने कधीच झाला नाही. मीच त्याचा वारंवार फॉलोअप घेत होतो प्रत्येक वेळी वेगवेगळ्या व्यक्तींना माझी तक्रार सुरुवातीपासून सांगत होतो. ऑनलाइन व्यवहार जितक्या सहज होतात तितक्या सहज या संबंधात उद्भवणारे प्रश्न अजूनही सहज सुटत नाहीत हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ज्या सुलभतेने खाते उघडले जाते किंवा बंद होते त्यावरून या सर्वानाच ग्राहक हवेत पण त्यांच्या तक्रारी नको आहेत किंवा त्याकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे आहे याची आस्था नाही, भले ते आपल्याला सोडून गेले तरी चालतील, हेच यातून अधोरेखित होत आहे. ©उदय पिंगळे अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 21 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.

Friday, 14 October 2022

टोकनायझेशन -ऑनलाइन कार्ड व्यवहारासाठी

#टोकनायझेशन_ऑनलाइन_कार्ड_व्यवहारासाठी एखादी वस्तू आणि सेवा यांची खरेदी ऑनलाईन करणं हे आता नवीन नाही. अशी खरेदी करताना कोणत्याही प्रकारच्या रोख रकमेची हाताळणी केली जात नाही कागदाचा वापर होत नाही. यासाठी पेमेंट करताना क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड याचा वापर करून, एईपीएस ही आधारद्वारे आपली ओळख पटवून, यूपीआय द्वारे, मोबाईल वॉलेटचा वापर करून, नेटबँकिंगद्वारे, विक्री ठिकाणी उपलब्ध पीओएस टर्मिनलवरून, मोबाईल बॅंकिंगने, पेयु पार्टनरच्या माध्यमातून हे व्यवहार सुरक्षित, जलद आणि विनामूल्य व्हावेत यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. ऑनलाइन पद्धतीने केल्या जाणाऱ्या सर्व व्यवहारातील 60% व्यवहार हे वेगवेगळ्या विक्री संस्थांच्या इ कॉमर्स पार्टलवरून होतात येथे विविध पेमेंट पद्धतीचे पर्याय उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणाहून ग्राहक वारंवार खरेदी करतात तेथे जर ते क्रेडिट/ डेबिट कार्ड वापरून व्यवहार करणार असतील तर पुन्हा व्यवहार करण्यास सोईच्या दृष्टीने कार्डची माहिती साठवून ग्राहकांना तात्काळ उपलब्ध केली जात होती. भारतीय रिझर्व बँकेने 1 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करत असताना ग्राहकांची महत्वपूर्ण माहिती म्हणजे कार्ड क्रमांक, सिविवी, कार्ड मुदत यासारखी महत्वाची माहिती साठवून ठेवण्यास व्यापारी संस्थाना मनाई केली आहे. त्याऐवजी त्याची आभासी ओळख म्हणजे टोकनायझेद्वारे ओळख सिद्ध करून ऑनलाइन व्यवहार करायची सवलत दिली आहे. ग्राहकांना यापुढे प्रत्येक वेळी व्यवहार केल्यावर कार्ड वापर करणार असेल तर त्याचा पूर्ण तपशील द्यावा लागेल तो इ कॉमर्सच्या पोर्टलवर नसेल किंवा आपल्या कार्डाचे टोकनायझेशन करून मिळालेला क्रमांक वापरून करता येईल. ★आता कार्डाचे टोकनायझेशन म्हणजे काय? ते पाहुयात. ■हा एक आपल्या कार्डास दिलेला पर्यायी क्रमांक म्हणजेच कोड आहे जो आपणास बँकेच्या संकेतस्थळ अथवा अँप वरून मिळेल हा टोकन क्रमांक आपणास कार्डवरील आवश्यक माहिती ऐवजी विक्रेत्याच्या संकेतस्थळावर साठवण्या ऐवजी या टोकन क्रमांकाने आपले भविष्यातील व्यवहार पूर्ण करता येतील या नवीन सुविधेमुळे कोणत्याही विक्रेत्यास यापुढे ग्राहकांचा कार्ड क्रमांक, सिविवी आणि कार्डची मुदतसमाप्तीची तारीख ही वैयक्तिक माहिती आता साठवता येणार नाही ★हे टोकन कुठे वापरता येईल? ■एकदा हा कोड तयार केला की जेथे कार्ड डिटेल्स द्यावी लागतात त्या सर्वच ठिकाणी कार्डाचा तपशील देण्याऐवजी टोकन नंबर दिल्यावर व्यवहार अन्य कोणतीही माहिती न देता पूर्ण करता येईल ★यापासून कोणकोणते फायदे होतील? ■अश्या प्रकारे कार्ड तपशील पोर्टलवर देऊन व्यवहार करण्यापेक्षा अधिक सुरक्षित आहे कारण या मध्ये ग्राहकांचा कोणताही तपशील व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांस कळत नाही. ★अधिक सुरक्षित असलेला हा टोकनायझेशन कोड कुठून घ्यायचा? ■यासाठी- *जेथे ऑनलाइन व्यवहार करणार तेथे खरेदी करून पे बिल येथपर्यंत येऊन तेथे असलेल्या पेमेंट गेटवेवर जा *यानंतर पेमेंट करण्याच्या पर्याय प्रकारातून क्रेडिट / डेबिट कार्ड ची निवड करा त्यात आपले सर्व डिटेल भरा *यानंतर secure your card किंवा save card as per RBI guidelines असा पर्याय येईल त्यास मान्यता द्या *तुमच्या बँके खात्याशी संलग्न असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका *तुमचे कार्ड सुरक्षित झाले असल्याचा संदेश येईल. ★ही क्रिया कशी पार पाडली जाईल? ■हा कोड मिळवताना कोणताही तयार तपशील मिळणार नाही तो स्वतःलाच भरावा लागेल. यास ग्राहकांची संमती मिळवताना ती त्यांनीच दिली आहे ना यासंबंधी पुरेशी काळजी घेऊन खात्री करूनच टोकन नंबर दिला जाईल. ★टोकनायझेशनची मार्गदर्शक तत्वे नक्की कोणत्या कार्डांसाठी? ■भारतात वापरल्या जाणाऱ्या रुपयात व्यवहार होत असलेल्या सर्व क्रेडिट/ डेबिट-कार्डाचे टोकनायझेशन होऊ शकते. ★ही मार्गदर्शक तत्वे नक्की कोणत्या व्यवहारासाठी? ■कार्डने होऊ शकणाऱ्या फक्त आंतरदेशीय व्यवहारासाठी उपयोगी. ★टोकनायझेशनचे व्यवस्थापन मी कसे करणार? ■आपल्या बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रास सांगून त्याचे व्यवस्थापन करता येईल. कार्डहोल्डर ज्याप्रमाणे टोकन मिळवू शकतो तसेच ते रद्द करू शकतो, स्थगित करू शकतो आपल्या गरजेनुसार पुन्हा पुन्हा वापरू शकतो. ★टोकनायझेशनचा पीओएस व्यवहारांवर परिणाम होईल का? ■नाही, ही कार्डचा थेट वापर करण्याहून अधिक सुरक्षित व्यवहार करण्यास उपलब्ध करण्यात आलेली ही सोय आहे. ★ही सेवा घेण्यास काही सेवाशुल्क द्यावे लागेल का? ■यासाठी ग्राहकास कोणतेही सेवाशुल्क द्यावे लागणार नाही. ★हा कोड देणे रद्द करणे नक्की कोण करणार? ■हे काम तुमची बँक किंवा त्यांनी मान्यता दिलेली विसा, मास्टरकार्ड, रूपे यासारखी पेमेंट यंत्रणा यांच्याकडूनच होईल. ★यामुळे कार्ड धारकाची माहिती सुरक्षित आहे का? ■ही माहिती सांकेतिक स्वरूपात अन्य सुरक्षित ठिकाणी साठवली जात असल्याने बँक किंवा त्यांनी मान्यता दिलेल्या लोकांपर्यंत ही माहिती जात नसल्याने अधिक सुरक्षित असल्याचे त्यांचे नियामक भारतीय रिजर्व बँकेचे मत आहे. विक्रेता, टोकनची मागणी करणारा ग्राहक, त्याची बँक आणि पेमेंट प्रणाली यांच्याकडे पूर्ण स्वरूपात ही माहिती साठवली जात नाही. ★ग्राहकाने टोकनायझेशन करणे सक्तीचे आहे का? नाही, टोकनायझेशन न करणाऱ्या ग्राहकांना कार्डने व्यवहार करताना त्यावरील तपशील म्हणजे कार्डाचा 16 अंकी पूर्ण क्रमांक, वैधतेचा महिना/ वर्ष, सीवीवी प्रत्येकवेळी भरावा लागेल. ★एक व्यक्ती किती कार्डचे टोकनायझेशन करू शकेल यावर काही मर्यादा आहे का? ■नाही, एक व्यक्ती तो वापरत असलेल्या कितीही कार्डांचे त्याच्या इच्छेनुसार टोकनायझेशन करू शकतो आणि त्यातील कोणते कार्ड कुठे वापरावे ते ठरवू शकतो. ★टोकनायझेशन झालेले कार्ड नेमके कोणते ते इकॉमर्स मंचावर कसे समजेल? ■या मंचावर कार्डाच्या जागी पूर्ण क्रमांक दिसण्याऐवजी ×××× ×××× ×××× 1234 या ठिकाणी अंतिम चार अंक दिसतील. ★टोकनायझेशन रद्द केल्यावर, कार्ड नवीन मिळाल्यावर किंवा त्याचा दर्जा उंचावल्यावर काय होईल? ■काही नाही, ग्राहकांना अशा प्रसंगी पुन्हा एकदा नव्या कार्डाचे टोकनायझेशन पूर्वीच्याच पद्धतीने एकदा करून घ्यावे लागेल. ★प्रत्येक इकॉमर्स मंचासाठी कार्डाचे वेगळे टोकनायझेशन करावे लागेल का? ■हो, कारण हा एक खास क्रमांक असेल जो सदर कार्डऐवजी त्याच मंचासाठी तयार केला जाईल. एकच कार्ड वेगवेगळ्या मंचावर वापरायचे असल्यास प्रत्येक ठिकाणी वेगळे टोकन घ्यावे लागेल. तर एकाच ठिकाणी तीन वेगवेगळी कार्ड वापरायची असतील तरीही प्रत्येक कार्डाचे टोकनायझेशन करून घ्यावे लागेल. कारण हा कोड हा संबंधित मंच आणि कार्ड याची ओळख दर्शवणारा खास क्रमांक असेल. ★कार्डनिर्माता एखाद्या ठिकाणी टोकनायझेशन करण्यास नकार देऊ शकतो का? ■हो, यातील जोखमीचा विचार करून कोणत्या व्यापाऱ्यांस कार्ड सुविधा द्यावी आणि कोणास देऊ नये हा त्यांचा अधिकार आहे. ©उदय पिंगळे अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 14 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.

Friday, 7 October 2022

वैद्यकीय इच्छापत्र एक निरवानिराव

#वैद्यकीय_इच्छापत्र_एक_निरवानिराव मरण अटळ असले तरी ते येत असताना, आपण परावलंबी आहोत नाकातोंडात नळ्या घातल्या आहेत आणि केवळ कृत्रिम उपकरणाच्या साहाय्याने जिवंत आहोत अशी स्वतःबद्दलची कल्पनाच कोणी करू शकत नाही. आपला शेवटचा दिस गोड व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असल्याने अश्या विषयावर चर्चा करणे म्हणजे काहीतरी अभद्र बोलणे असे समजले जाते. आपल्या माहितीत अशी काही उदाहरणे असतील ज्यांच्यावर त्यांच्या प्रिय व्यक्तींना केवळ भावनेच्या आहारी जाऊन असे फारसा उपयोग नसलेले उपचार करण्याची वेळ आली. यात ती व्यक्ती तर गेलीच पण त्याच्या कुटुंबियांना मानसिक त्रासातून जावे लागले, याशिवाय मोठे भरमसाठ बिल झाल्याने आर्थिक झटका बसला ते वेगळे. उपाय होत नाही, परवडत नाही किंवा काही उपायच नाहीत अशा प्रसंगात नंतर पेशंटला घरी नेऊन तो कधी जातो याकडे वाट पाहत बसावे लागते ते वेगळेच. अशी वेळ नक्की कोणावर कधी येईल हे सांगून येत नसेल तरी कोणतीही सुजाण व्यक्ती आपल्यामुळे भविष्यात आपल्या कुटुंबावर कदाचित अशी वेळ आली तर काय करायचे ? आपल्या आजारावर उपचार करून उपयोग होणार नसेलच तर खर्च करत राहायचा का? ज्याच्या सुखासाठी आपण आयुष्यभर धडपडलो त्या प्रिय व्यक्तींना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासात अडकवून ठेवावे का? कोणते उपचार करावेत करू नयेत याबद्दल आपली इच्छा व्यक्त करणारे इच्छापत्र आपण बनवू शकते यास लिव्हिंग विल असे म्हणतात. आपण यासंदर्भात निर्णय घेण्यास सक्षम नसू अशा वेळी कोणते उपचार करावेत आणि कोणते करू नयेत यासंबंधी आपल्या इच्छा त्यात व्यक्त करता येतील. थोडक्यात आपली इच्छा नसताना आपल्यावर कोणते उपचार केले जाऊ नयेत याविषयी आपल्या कुटुंबियांना केलेले हे मार्गदर्शन असते. त्यामुळे लोक काय म्हणतील सुचवलेले उपचार करावेत की नाही करावे यासंबंधी वेळेत निर्णय घेण्याचे मानसिक बळ त्यांना मिळेल. वैद्यकीय इच्छापत्राद्वारे आपण ते करू शकतो. कोणतेही निर्णय घेण्यास आपण असमर्थ असलो किंवा झालो तर आपल्यावर कोणत्या टप्यापर्यंत उपचार करावेत याविषयी आपले वारस किंवा जे कोणी काळजी घेणारे असतील त्यांना आणि आपल्यावर उपचार कारणारे कोणीही डॉक्टर ( अलीकडे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आता मोडीत निघाली आहे) यांना दिशादर्शन करणारा हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. उदा. मेंदू काम करेनासा झाल्यास कृत्रिम साधने लावू नयेत, अन्न जात नसल्यास नळीच्याद्वारे अन्न देऊ नये. श्वसनाचा त्रास होत असल्यास ऑक्सिजन लावू नये, व्हेंटिलेटरवर ठेऊ नये किंवा विशिष्ठ पॅथीचेच उपचार करावेत अथवा करू नयेत यासंबंधी आपण त्यात लिहू शकतो. याचबरोबर आपल्या मृत्यूपश्चात नेत्रदान, देहदान, अवयवदान करायचे असल्यास त्या संदर्भातील आपल्या इच्छा यात लिहिता येतील. यासंबंधी पूर्ण विचार करून आपल्या इच्छा लिहाव्यात आणि त्याचा तपशील एकत्रित करून ₹ 100/- च्या बॉण्डपेपरवर ते लिहून काढून त्यावर सही करावी साक्षीदार म्हणून जोडीदार मुले यांची सही घ्यावी याशिवाय या व्यक्तीची मानसिक स्थिती उत्तम असल्याचे डॉ तेथेच प्रमाणित करून सही करावी याशिवाय दोन विश्वासू व्यक्तीच्या सह्या घ्याव्या म्हणजे कठीण प्रसंगात घरचे लोक द्विधा मनस्थितीत असले तर त्यांचे ते अशा प्रसंगात योग्य निर्णय घेण्यात सहाय्य करतील. असे वैद्यकीय इच्छापत्र नोटराईजकरून त्याच्या प्रमाणित प्रति अधिक जास्तीची प्रत प्रत्येक संबंधितांना द्यावी. मृत्यपत्र आणि हे इच्छापत्र यातील महत्वाचा फरक हा की मृत्यूपत्राची अंमलबजावणी व्यक्तीच्या मृत्यूनंतर होते आणि तो आपल्या संपत्तीचे वाटप कसे व्हावे हे सांगणारा कायदेशीर दस्त आहे. त्यातील तरतुदींची माहिती वारसांना नसते. वैद्यकीय इच्छापत्रातील तरतुदी तुम्ही जेव्हा कोणतेही निर्णय घेण्यास अकार्यक्षम होता तेव्हाच उपयोगात आणण्याचा विचार केला जातो. मृत्युपत्रातील तरतुदी लाभार्थीना माहिती नसण्याची शक्यता जास्त असते. वैद्यकीय इच्छापत्रात त्यांना याची माहिती आधीच असल्याने ठोस निर्णय घेण्यास मदत होते. याचा अर्थ आपण असे इच्छापत्र केल्यास आपल्यावर उपचार होणार नाहीत असा नाही कारण जोपर्यंत व्यक्ती विचार करू शकते तोपर्यंत तिच्या इच्छेनेच त्यावर उपचार केले जातात जेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही अशा प्रसंगातच काय करावे याचे मार्गदर्शन तुम्हीच करून ठेवलेले असल्याने त्याचा नक्की सारासार विचार केला जातो त्यामुळे असे इच्छापत्र केले तर त्याप्रमाणे केले जाईल का? अशी शंका आपण बाळगू नये उलट आपली निश्चित इच्छा सांगून त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य बहाल करावे कारण आपल्या प्रिय व्यक्तीचे हाल झालेले पहात राहणे कोणताही संवेदनशील माणूस पसंत करणार नाही. डॉ मुरी या शास्त्रज्ञांनी त्यांच्या आयुष्यात राहिलेल्या इच्छांमध्ये (बकेट लिस्ट) जिवंतपणीच आपल्या मृत्यूनंतर होणाऱ्या शोकसभेत लोक काय म्हणतील ते ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्यांच्या विद्यार्थ्यांनी अशी शोकसभा आयोजित केली होती ज्यात ते स्वतः सहभागी झाले होते. याच संकल्पेनेच्या जवळपास जाणारी ही कल्पना आहे. तुलनेने नवी अशी ही संकल्पना असून ती कितपत पचनी पडते ते पाहावे लागेल याविषयी इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध असून वृद्धकल्याणशास्त्र या विषयातील डॉक्टरेट मिळवलेल्या विदुषी डॉ रोहिणी पटवर्धन आणि त्यांचे सहकारी याविषयी जागृती निर्माण करीत आहेत तेव्हा अधिक माहिती मिळवून तसेच काही शंका असल्यास त्यांच्याशी याविषयावर चर्चा करावी आणि एक पाऊल पुढे टाकावे त्याच्या 'आपल्यासाठी आपणच' या पुस्तकात दिलेला वैद्यकीय इच्छापत्राचा नमुना संदर्भासाठी जसाच्या तसा देत आहे वैद्यकीय इच्छापत्र नमुना माझे कुटुंबीय, माझ्या आरोग्याबाबत आस्था बाळगणारी मंडळी आणि माझे डॉक्टर यांच्यासाठी मी हे वैद्यकीय इच्छापत्र लिहून ठेवत आहे. 1) मी वय जन्मतारीख माझा पत्ता मी मृत्युशय्येवर असेन, लवकरच मरण्याची शक्यता दिसत असेल आणि मी बोलण्याच्या परिस्थितीत नसेन, अशा अवस्थेत माझ्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांसंदर्भात मी हे वैद्यकीय इच्छापत्र करून, माझी इच्छा स्पष्टपणे नोंदवून ठेवत आहे. 2) आपल्या राज्यघटनेत नमूद केलेला, जगण्याचा अधिकार, या संकल्पनेची, तसंच आविष्कारस्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची मल पूर्ण माहिती आहे. सन्मानाने जगणं आणि सन्मानाने मरणं य भूमिकेला माझा पूर्ण पाठिंबा आहे. 3) माझ्या आजारपणात, मला जगवण्यासाठी जे उपचार केले जाती त्यासंबंधीच्या स्पष्ट सूचना मी माझ्या संबंधितांसाठी पुढीलप्रमा लिहून ठेवत आहे : अ) मी मरणाच्या दारात असेन, किंवा गाढ बेशुद्धीत असेन, माझा मृत्यू लांबवण्याकरता काहीही उपचार करू नयेत. शरीरात सुया टोचून औषधोपचार करण्याचा किंवा कृत्रिम साधनांच्या मद मला जगवण्याचा प्रयत्न कृपया करू नये. कारण अशा अव आपल्या परावलंबनाचं ओझं इतरांवर टाकणं आणि जगत राह मला कीव करण्यासारखं आणि म्हणूनच घृणास्पद वाटतं. ब) अशा प्रकारे केवळ जगवण्यासाठी जर उपचार सुरू झाले असतील आणि तेही मला सन्मानाचं जिणं जगण्याच्या दृष्टीने ठरणार नसतील तर मला असं निरर्थक जीवन जगण्याची अजिबात इच्छा नाही. म्हणून हे उपचार ताबडतोब थांबवावेत अशी माझी आग्रहाची विनंती आहे.. क) मी असाध्य रोगाने आजारी आहे, एकूणच जगण्याच्या शक्यता मंदावल्या आहेत किंवा माझ्या बेशुद्धीतून मी बाहेर येण्याचीही आशा नाही, अशा अवस्थेत मला कृत्रिमरीत्या अन्नपाणी देऊन जगवण्याचा खटाटोप करू नये. मला पुन्हा आग्रहपूर्वक सांगायचं आहे की, मला अशा परिस्थितीत कृत्रिमरीत्या जिवंत ठेवणारे सारे उपचार मी नाकारू इच्छिते /इच्छितो. ड) मला माहीत आहे की, मी काहीही इच्छा नोंदवून ठेवली असली तरी इथे वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत, विचारविनिमय केला जाईल, पण मला ठामपणे म्हणायचं आहे की, या बाबतीतला कायदा असं स्पष्टपणे सांगतो की, अशा परिस्थितीत माणूस स्वत: बोलू शकत नसेल तर त्याच्या इच्छापत्राचं ऐकावं. म्हणूनच माझ्या बाबतीत या संदर्भातील निर्णयाची जबाबदारी घेणाऱ्या सर्वांना माझी पुनःपुन्हा विनंती आहे की, माझ्या वैद्यकीय इच्छापत्राचा मान राखला जावा. 4) माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझ्याविषयी आस्था बाळगणाऱ्या साऱ्यांसाठी या इच्छापत्रांतून मी सांगू बघत आहे की, ज्या वेळी कृत्रिम जीवनाधारांच्या मदतीनंतरही मी पुन्हा पहिल्यासारखं स्वावलंबी सहज जीवन जगू शकणार नाही, त्या वेळी तशा अवस्थेत जिवंत राहण्याची माझी इच्छा नाही. त्या वेळी मी सुदृढ मनाने निर्णय घेण्याच्या अवस्थेत नसेन, म्हणूनच इथे विचारात घेतलेल्या शक्यतांच्या पलीकडे तुम्हाला काही विचार करून निर्णय घेण्याची वेळ आलीच तर सन्मानाने जगणं आणि तसंच सन्मानाने मरणं या माझ्या ध्यासाची तुम्ही आठवण ठेवा. हे वैद्यकीय इच्छापत्र, मी कुणाच्याही दबावापोटी नव्हे, तर स्वतःच राजीखुषीने करत आहे. मी खालील साक्षीदारांसह दि. रोजी वैद्यकीय इच्छापत्रावर माझी सही करत आहे. नाव सही साक्षीदार क्र.1 नाव फोन / मोबाइल सही साक्षीदार क्र. 2 नाव फोन / मोबाइल सही यात जोडीदार मुले डॉक्टर (त्यांच्या टिपणीसह) आणि त्रयस्थ व्यक्ती अशी साक्षीदार संख्येत वाढ करता येईल. वैद्यकीय इच्छापत्र हे कायदेशीर कागदपत्र नसून सर्वांच्या सोयीसाठी त्यांच्याशी विचार विनिमय करून केलेली सोय असून ही एक प्रकारची निरवानिराव म्हणू शकतो ज्या योगे आपल्या प्रियजनाना आपण चुकीचे काही करत असल्याची खंत राहणार नाही. ते करण्याची मानसिक तयारी करण्यासाठीची कृती रोहिनीताईंच्याच शब्दात- ★दोन शब्द प्रत्यक्ष कृतीसाठी★ वैद्यकीय इच्छापत्र ही काळाची गरज आहे. आपले स्वत:चे आणि आपल्या प्रियजनांचे हाल वाचवण्याचा तोच एक मार्ग आहे. मरण अटळ आहे आणि ते सन्मानाने यावं यासाठीचा उपाय आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. मानसिक ताकदीने पुढचा विचार केला तर ते सर्वांच्या हिताचं ठरेल. स्वत:चं वैयक्तिक इच्छापत्र करण्यापूर्वी एखाद्या काल्पनिक केसचं इच्छापत्र तयार करा आणि फाडून टाका. मग स्वतःचं इच्छापत्र करून फाडून टाका. पुन्हा करा. जवळच्या मित्राला किंवा कुटुंबातल्या व्यक्तीला ते दाखवा. परत एकदा फाडून टाका आणि मग खरोखरी स्वतःचं वैद्यकीय इच्छापत्र करा. असं केल्याने आपली स्वत:ची मानसिक तयारी होईल. पहिल्या मसुद्यात असणारा भावनेचा कल्लोळ कमी होईल. कुटुंबाचीही थोडीफार मानसिकता तयार होईल आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा आपल्या जवळच्या लोकांना निर्णय घेण्याचा अधिकार मिळेल, मानसिक बळ मिळेल. असे बळ आपल्याला मिळून प्रत्यक्ष कृती आपल्या हातून घडल्यास लेखाचा हेतू सार्थकी लागेल. ©उदय पिंगळे (आधारित- पुस्तके-आमच्यासाठी आम्हीच, आनंदस्वर जेष्ठांसाठी डॉ रोहिणी पटवर्धन रोहन प्रकाशन) अर्थसाक्षर डॉट कॉमवर 07 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत

Friday, 30 September 2022

मृत्युपत्र अपरिहार्य आवश्यकता भाग 2

#मृत्युपत्र_अपरिहार्य_आवश्यकता भाग 2 याशिवाय- ★भारतीय करार कायदा कलम 17 नुसार त्याची नोंदणी करणे आवश्यक नसले तरी नोंदणी करणे केव्हाही चांगलेच आहे. ★मृत्युपत्र संयुक्तपणे बनवता येत असले तरी स्वतंत्र बनवावे. ★यासाठी यातील तज्ञ व्यक्ती आणि वकील या दोघांची मदत घ्यावी. तज्ञ व्यक्ती आपल्या अपेक्षा त्यात येतात की नाही याची काळजी घेण्यासाठी तर वकील आपल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून भविष्यात कोणत्या अडचणी येऊ शकतील यादृष्टीने त्यातील तरतुदी, वाक्यरचना कायदेशीरदृष्ट्या योग्य आहेत की नाही हे पाहण्यासाठी असावा. ★मृत्युपत्राचा निर्माता आणि 2 साक्षीदार यात एक डॉक्टर असेल तर उत्तम यांनी प्रत्येक पानावर सह्या कराव्यात. शक्यतो त्या एकाच वेळी एकमेकांसमोर केल्या तर ते केव्हाही चांगले. ★मृत्युपत्राची मुळप्रत सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये, आपल्या वकिलाकडे व्यवस्थापक नेमला असल्यास त्याच्याकडे किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. ★माहिती असल्यास किंवा नसल्यास अशी माहिती मिळवून त्यात अगदी थोडक्यात असा घराण्याचा इतिहास लिहावा. आयुष्यात उपयोगी पडलेल्या व्यक्तींचा उल्लेख कृथार्थथेने करावा. भविष्यात काही अडचण आल्यास कोणाकडून मार्गदर्शन घ्यावे याचा उल्लेख असावा. असे सुचवण्यामागे मनुष्य हा समाजप्रिय प्राणी असून त्यास समाज घटकांची उपयुक्तता पटवून द्यावी असा व्यापक हेतू आहे. असेच करायला हवे असे नाही. ★या संबंधातील वादविवादांच्यामध्ये संबंधित न्यायालयाने मृत व्यक्तीच्या स्थानी आपण आहोत असे समजून सारासार विचार करून या विषयी आपला निर्णय द्यावा अशी कायद्याची अपेक्षा आहे. मुंबई ग्राहक पंचायतीने या विषयावर एक छोटी पुस्तिका बनवली होती यात किमान प्राथमिक माहिती आणि संदर्भासाठी मृत्युपत्राचा एक नमुना दिला आहे सध्या या पुस्तिकेची छापील प्रत उपलब्ध नाही. याची सॉफ्ट कॉपी कुणाला हवी असल्यास माझ्याकडून मागून घ्यावी. त्याचाच आधार घेऊन पूर्वी सुचवलेल्या नमुन्यात कालानुरूप योग्य ते बदल करत मृत्युपत्राचा नमुना कसा असावा ते येथे देत आहे. मृत्युपत्र (नमुना) ★मी खाली सही करणार - नाव: ××× राहणार: ××× पूर्ण पत्ता: ××× व्यवसाय: ××× मोबाईल क्रमांक: ××× वय:××× वर्षे ★प्रास्ताविक: या भागात घराण्याचा इतिहास, आपल्या जडण जडणघडणीत /अडीअडचणीत मदत करणाऱ्या/ भविष्यात मार्गदर्शन होईल अशा व्यक्तींचा थोडक्यात कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा. असे न करताही मृत्युपत्र बनवता येईल. ★माझ्या पश्चात माझ्या संपत्तीचे वाटप विनातंटाबखेडा व सुलभरितीने व्हावे या हेतूने स्वखुशीने व संतुलित मानसिक अवस्थेत असताना माझ्या वाट्यास आलेल्या वंशपरंपरागत मालमत्तेचे / स्वकष्टार्जित मिळकतीचे मी स्वतःच्या इच्छेने खालीलप्रमाणे मृत्युपत्र (Will) करून ठेवीत आहे. ★मालमत्ता निर्मितीचे मार्ग: माझी सर्व मालमत्ता मला माझ्या वाट्यास आलेल्या वडिलोपार्जित मिळकतील भाग,माझ्या नोकरीच्या / व्यवसायाच्या उत्पन्नातून निर्माण झालेली आहे, पगार /मानधन / व्यवसायातील नफा/ गुंतवणुकीतून मिळणारे व्याज, लाभांश, भांडवली नफा, मिळणारे घरभाडे हे माझ्या उत्पन्नाचे साधन आहे या सर्व स्वकष्टार्जित आणि वारसाहक्काने माझ्या वाट्यास आलेल्या मालमत्तेची माझ्या मनाप्रमाणे विल्हेवाट करण्यास पूर्ण मुखत्यार आहे. ★मृत्यूपत्रातील लाभधिकारी: माझे कुटुंबातील खालील व्यक्ती या मृत्यूपत्राचे लाभाधिकारी आहेत. पत्नी: नाव ××× व्यवसाय; ××× वय: ××× पत्ता ××× मोठा मुलगा / मुलगी: नाव ××× वय ××× व्यवसाय ××× पत्ता ××× त्याच्या जोडीदारविषयी माहिती त्यांच्या अपत्यांची माहिती मुलगा/ मुलगी: नाव ××× वय ××× व्यवसाय ××× त्याच्या जोडीदाराची माहिती त्याच्या अपत्यांची माहिती मुलगा/ मुलगी: ××× याच्या सह/ शिवाय अन्य कुणा व्यक्तीस/ संस्थेस किंवा स्वतंत्रपणे निर्माण केलेल्या कौटुंबिक ज्ञासास मालमत्तेतील सर्व अथवा काही भाग द्यायचा असल्यास त्यांचा पूर्ण तपशील द्यावा त्याचप्रमाणे असे करण्याचे पटेल असे कारण त्याची शक्यतो कोणास वाईट वाटणार नाही अशा पद्धतीने मांडणी करून सांगावे किंवा कोणतेही कारण न देताही असे लिहू शकता. ★माझी स्थावर जंगम मिळकत खालीलप्रमाणे: स्थावर मालमत्ता 1)राहत्या जागेचा तपशील घर/ फ्लॅट 2)शेतजमीन/ फार्महाऊस संपूर्ण तपशील 3)पडीक जमीन तपशिलासह 4)अन्य घर/ फ्लॅट लीजने दिले असल्यास त्याचा तपशील 5)गोडाऊन/ ऑफिस/ व्यापारी गाळा याचा तपशील. 6)अन्य स्थावर मालमत्ता जंगम मालमत्ता 1. बँक/पतपेढी खाती तपशीलवार माहिती *बँकेचे नाव शाखा खाते प्रकार खातेक्रमांक IFSC विशिष्ट दिवशी शिल्लख असलेली रक्कम ₹ अन्य तपशील सहधारक नॉमिनी अन्य बँका पतपेढी यातील खात्याची वरील पद्धतीने माहिती. यातील कोणती खाती कशासाठी प्रामुख्याने वापरली जातात याचीही माहिती द्यावी. 2 शेअर्स: ★ब्रोकिंग फार्मचे नाव,पत्ता, ट्रेडिंग कोड ★डिपॉजीटरी / डिपॉजिटरी पार्टीसीपंटचे नाव, खाते क्र विशिष्ठ दिवशी खात्यात असलेल्या शेअर/ बॉण्ड/ इनवीट/ रिटस/ इटीएफ यासारख्या मालमत्तेचा तपशील, बाजारमूल्य. याचप्रकारचे अन्य खाते असल्यास त्याचा तपशील 3.मुदत ठेवी बँक/ पतपेढी/ कंपनी येथील मुदत ठेवींचा संपूर्ण तपशील शाखेचे नाव खाते क्रमांक/FDR No Amt मुदतपूर्ती दिनांक या सर्व गुंतवणुकीत त्याच्या व्यवहार्यतेनुसार तपशिलात बदल होऊ शकतो. याचा वर्षातून एकदा आढावा घेऊन 31 मार्च अखेरीस असलेला तपशील माझ्या वैयक्तिक डायरीत वेगळा लिहून ठेवीन. 4 सोने इतर मौल्यवान वस्तू: तपशील प्रकार, वजन, वस्तू कायम वापरात आहे की लॉकरमध्ये यातील तपशिलात फरक पडण्याची शक्यता आहे/ नाही तरीही 31 मार्च रोजी आढावा घेऊन लिहून ठेवीन. 5.अन्य गुंतवणूक त्याच्या तपशिलासह *पोस्टाच्या योजना (NSC, MIS, TD, SSY इ) *वरिष्ठ नागरिक योजना (SCSS) *प्रधानमंत्री वयवंदना योजना (PMVVY) *सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी योजना (PPF) *विमा संलग्न बचत योजना (ELSS) *खाजगी गुंतवणूक, अन्य योजना *राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS) *उधार म्हणून दिलेले पैसे *म्युच्युअल फंड योजना डी मॅट खाते वगळून योजनांची नावे फोलिओ क्र युनिट संख्या बाजारमूल्य *क्रेप्टो करन्सी मधील गुंतवणूक तपशील *कमोडिटी करन्सी यातील गुंतवणूक तपशील *या उल्लेख नसलेल्या अन्य योजनांचा तपशील भविष्यातील गरजा, गुंतवणूक प्राधान्य आणि कर नियोजनयानुसार आवश्यक बदल करून वर्षांतून त्यांचा आढावा घेऊन नोंद ठेवली जाईल. त्यामुळे जंगम मालमत्ता तपशिलात फरक पडेल यातील काही गोष्टी वगळण्यात येतील तर काही नव्याने केल्या जातील. ★या सर्व माझ्या नावावर अस्तीत्वात असलेल्या निर्माण होणाऱ्या सर्व स्थावर जंगम मालमत्ता माझ्या पश्चात माझी पत्नी (नाव)××× यांना मिळाव्यात दुर्दैवाने ती नसल्यास मुलगा/मुलगी (नाव) ××× आणि मुलगा/मुलगी (नाव) ××× यांना सम / विषम प्रमाणात मिळाव्यात अथवा याशिवाय अन्य व्यक्ती / संस्था (नाव) ××× याना संपूर्ण अथवा काही प्रमाणात मिळाव्या. यात लाभार्थींचा उल्लेख त्यांना मिळू शकणाऱ्या लाभासह / लाभशिवाय कारणासह करावा. सदर लाभार्थीनी आपल्या मर्जीनुसार त्याचा उपभोग घ्यावा. ★श्री. नाव ××× पत्ता ×××याना या मृत्युपत्राचे व्यवस्थापक म्हणून नेमले असून त्यांनी आणि / अथवा मृत्यूपत्राचे लाभार्थी म्हणजेच (त्यांची नावे) यांनी अथवा त्यांच्या वारसांनी यात व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचे संपूर्ण अधिकार मी त्यांना देत आहे. ★मी यापूर्वी मृत्यूपत्र केलेले नाही/ किंवा मी यापूर्वी ×××या तारखेस केलेले मृत्युपत्र रद्द करीत आहे सबब सदरचे मृत्युपत्र हे अखेरचे मृत्युपत्र समजण्यात यावे. मृत्युपत्र धारकाची सही पूर्ण नाव ××× स्थळ ××× दिनांक ××× आमचे देखत श्री (नाव) ×××यांनी त्यांच्या मृत्युपत्रावर सही केली असून त्यांचे देखत आम्ही साक्षीदार म्हणून 1(नाव) ××× आणि 2(नाव) ××× आमच्या सह्या केल्या आहेत. साक्षीदार 1.××× सही राहणार ××× साक्षीदार 2.××× सही राहणार ××× याप्रमाणे आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपले मृत्युपत्र बनवून यातील जाणकार आणि वकील यांचे त्यावरील मत घ्यावे. कायद्याने आवश्यक नसले तरी डॉ कडून वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे, नोंदणी करावी. याची प्रत नोंदणी अधिकारी/ व्यवस्थापक/ ट्रस्टी कंपनी यांच्याकडे अथवा स्वताकडे सुरक्षित ठेवावे मृत्यूपत्र हा महत्वाचा दस्त असून ते तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करणे केव्हाही चांगले!(संपूर्ण) ©उदय पिंगळे अर्थसाक्षर डॉट कॉमवर 30 सप्टेंबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत

Friday, 23 September 2022

मृत्युपत्र अपरिहार्य आवश्यकता भाग 1

#मृत्युपत्र_अपरिहार्य_आवश्यकता भाग 1 मृत्यु या विषयाची चर्चा लोक अजिबात करत नाहीत तर मृत्यपत्र बनवणं ही खूप दूरची गोष्ट झाली. वास्तविक जन्माला असलेला जीव एक ना एक दिवस मरणारच त्यामुळेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तो अपरिहार्य आहे परंतू याबाबत आपण अत्यंत बेफिकीर आहोत. मृत्युपत्र या शब्दाची तीव्रता कमी करण्यासाठी त्यास इच्छापत्र असे म्हणावे असे अनेकजण सुचवतात परंतु ते प्रत्यक्षात आपले मृत्यूपश्चात इच्छापत्र असते. इच्छा अनेक असू शकतात त्या पूर्ण होऊ शकतील नाही होणार पण मृत्यू अटळ असल्याने त्यास मृत्युपत्र असेच म्हणणे योग्य होईल वास्तविक आपल्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक जीवनात यावर सखोल चिंतन केलेले आहे असे असूनही आपण त्यावर चर्चा करणे टाळतो. ही एक अशुभ गोष्ट आहे अशी समजूत असल्याने त्यावर काही बोलले जात नाही. मृत्युपत्र म्हणजे अल्प जीवनास आमंत्रण असाही यामागे गैरसमज आहे. अज्ञान, भीती आणि स्वतःबद्दल फाजील आत्मविश्वास यामुळे अनेकदा ते करण्याचे टाळले जाते. योग्य प्रकारे केलेले मृत्युपत्र त्यात उल्लेखलेल्या संपत्तीचे सुयोग्य वाटप करण्याचे सर्वात सर्वात सोपे अधिकृत साधन आहे. मृत्युपत्र बनवणे त्याची नोंदणी करणे सक्तीचे नाही तरीही ते योग्य प्रकारे कायद्यास अपेक्षित तरतुदीनुसार केले असल्यास आणि नोंदणी केली असल्यास त्यातील लाभार्थीच्या नावे संपत्तीचे हसत्तांतरण सुलभ होते. अनेक मालमत्ता प्रकारात नॉमिनी नेमण्याची तरतूद आहे. यामुळे चल अचल संपत्तीवर नाव लागू शकते परंतु यातील नॉमिनी हाच त्या संपत्तीचा अधिकारी नसून तो केवळ विश्वस्त असतो जर मृत्यूपत्र बनवले नसेल तर त्यामुळे मृत व्यक्तीच्या कायदेशीर हक्कात कोणताही बदल नाही त्यामुळे त्याच्या वारसांचे हक्क अबाधित रहातात. यातील चल/अचल मालमत्ता हसत्तांतर करण्यास अडचण येत नाही मात्र अचल मालमत्ता विक्री च्या वेळी ती सर्व बाजूने कायदेशीर हक्क असलेली (क्लिअर टायटल) आहे ना? त्यात अन्य कुणाचे हितसंबंध आहेत का ते पाहावे लागते. अशा वेळी मृत्यूपत्र उपयोगी पडते. कायद्यानुसार नॉमिनी या संपत्तीचा फक्त विश्वस्त असतो जर मृत्युपत्र बनवून संपत्तीचे वाटप केले नसेल तर हिंदू वारसा कायद्यात असलेल्या तरतुदींनुसार मालमत्तेची वाटणी होते. भारतातील बहुतेक व्यक्तींना लागू होणारा हिंदू विवाह कायदा हा शीख, जैन आणि बौद्ध धर्मियांना लागू आहे यानुसार एखादी व्यक्ती मृत्युपत्र न करता निधन पावल्यास त्याची वाट्यास येऊ शकणारी परंपरागत मिळकत आणि स्वकष्टार्जित मिळकत असल्यास त्यावर निधन पावलेल्या व्यक्तीसाहित सर्वांचा सारखा हिस्सा असतो. पारंपरिक मिळकतीचा आपल्याला मिळालेल्या वाट्याचा आणि स्वकष्टार्जित मालमत्तेचा विनियोग व्यक्ती आपल्या मर्जीनुसार कमीअधिक करू शकते अन्यथा ती जोडीदार आणि मुले (यात मुलगा किंवा मुलगी, तसेच मुलीची विवाहित अविवाहित स्थिती, त्याचप्रमाणे औरस, अनौरस, दत्तक असा कोणताच भेदभाव न करता) यामध्ये समान विभागणी केली जाते. जर त्या व्यक्तीस जोडीदार/ मुले नसतील तर प्रथम भाऊ अगर त्यांच्या वारसास असे कोणी नसल्यास बहीण अगर बहिणीच्या मुलांना ही संपत्ती वारसाहक्काने मिळते. मृत्युपत्राद्वारे व्यक्ती त्याचा पूर्ण अधिकार असलेली वारसाहक्काने वाटप पूर्ण होऊन मिळालेली आणि स्वकष्टार्जित संपत्ती कशी वाटली जावी याबद्धल निर्देश देऊ शकतो. याची अंमलबजावणी मृत्यूनंतर होते. ती करण्याचे व्यवस्थापकीय अधिकार आपल्याला वारसास, त्रयस्थ व्यक्ती किंवा अशा प्रकारचे काम करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या कंपनीस देता येतात. त्यात ही संपत्ती किंवा तिचा भाग नेमका कुणाला आणि किती टक्के मिळावा यात काही कमीअधिक करायचे असेल किंवा एखाद्या संस्थेस द्यायचे असेल तर तशी तरतूद करता येते. वारस नसलेल्या अन्य त्रयस्थ व्यक्तीसही ही संपत्ती देता येईल किंवा स्वतंत्र कौटुंबिक न्यास स्थापन करून त्या न्यासासही देता येईल. मात्र संस्था किंवा न्यास यास संपत्ती देताना अशा मृत्यूपत्राची नोंदणी करणे सक्तीचे आहे. आपल्याला भविष्यात काय होईल ते माहिती नसल्याने शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम असतानाच ते बनवणे योग्य ठरते. त्यामुळे त्यात केलेल्या तरतुदी या वादाचे मुद्दे ठरण्याची शक्यता कमी राहाते. मृत्युपत्र बनवताना लक्षात ठेवायच्या गोष्टी - ★आपल्या हक्काची वारसा हक्काने मिळालेली, स्वकष्टार्जित संपत्ती यांचे वाटप कसे व्हावे याची व्यवस्था करता येते. व्यक्तीने निर्माण केलेल्या, व्यवसाय भागीदारी, एकल कंपनी, कंपनी, ट्रस्ट यांना स्वतंत्र अस्तीत्व असल्याने त्यातील तरतूदीनुसार त्याची व्यवस्था लावता येईल. ★विवाहित महिलेस लग्नात माहेर आणि सासरच्या लोकांनी केलेले नातेवाईकांकडून वेळोवेळी भेट मिळालेलेले दागिने हे कोणीही कितीही प्रमाणात दिले असले0 तरी त्यावरील सर्वार्थाने तिचीच मालकी असते त्यास स्त्रीधन असे म्हणतात, सदर महिलेशिवाय अन्य कोणीही म्हणजे तिचा नवरा, आईवडील अथवा मुले यांचा त्यावर कोणताही अधिकार नसल्याने त्याचे वाटप कसे करावे ते ठरवू शकत नाही. ★मृत्यूपत्राचा निश्चित असा नमुना नाही तरी त्यात कोणकोणत्या गोष्टीचा कसा उल्लेख करावा याचे नमुने उपलब्ध आहेत आपल्या वकीलाशी चर्चा करून त्याचा तपशील निश्चित करावा. स्थावर जंगम मालमत्तांचा तपशील व्यवस्थित लिहावा. ★आपण किंवा आपला जोडीदार यापैकी कुणाला तरी आधी जावे लागणार याचा विचार करून जोडीदाराची पुरेशी तरतूद करावी किंवा त्यास अधिक मालमत्ता द्यावी त्याचप्रमाणे त्याच्या निवासाची सोय करावी. ★मुलांपैकी कुणाला कमी अधिक संपत्ती द्यायची असेल त्याचे सुयोग्य कारण लिहावे. म्हणजे गैरसमज होणार नाहीत. अन्य व्यक्ती संस्था यांना काही द्यायचे असल्यास त्याचाही उल्लेख कारणासह करावा. वारसा व्यतिरिक्त कुणाला काही द्यायचे असल्यास होता होईतो आपल्या हयातीतच त्यांना द्यायच्या गोष्टी देऊन टाकाव्यात. यावरून काही वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. ★अविवाहित किंवा पुनर्विवाहित व्यक्तीने त्याच्या विवाहापूर्वी बनवलेले मृत्युपत्र विवाहानंतर आपोआपच रद्दबातल ठरते ★मृत्युपत्र बनवले आहे सांगावे आपले वारस हेच सर्व ठिकाणी नॉमिनी म्हणून असतील तर सोईचे होते परंतु त्यात काही बदल करायचा असल्यास आणि तो वारसाहक्काशी सुसंगत नसल्यास त्यातील तरतुदी जाहीर करू नयेत. ★मृत्युपत्र बनवण्याच्या दिवशी काही आजार असले आपली मानसिक स्थिती उत्तम असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरकडून घ्यावे. दोन साक्षीदार शक्यतो आपल्यापेक्षा वयाने लहान असलेले निवडून त्यांनी वाचून त्यावर साक्षीदार म्हणून सही केली आहे अशी अपेक्षा आहे. काही विवाद निर्माण झाल्यास साक्षीदारास न्यायालय साक्ष देण्यासाठी पाचारण करू शकते. ★जरी ते प्रथम करत असाल तरी त्यास अखेरचे मृत्युपत्र म्हणावे जर आधी बनवून त्यात बदल केला असल्यास सुधारित मृत्युपत्रावर अखेरचे मृत्युपत्र असे म्हणून आधीच्या पत्राचा उल्लेख करून चालू मृत्युपत्र हेच अंतिम मृत्यूपत्र असल्याचा उल्लेख करावा. ★यातील एखादा लाभार्थी आपल्या मृत्यूपूर्वी दुर्दैवाने मरण पावल्यास त्यास मिळणारी संपत्ती किती प्रमाणात कुणास देण्यात यावी याचा स्पष्ट करावा.(अपूर्ण) ©उदय पिंगळे

Saturday, 17 September 2022

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत 3

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3 ★असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे डाऊन पेमेंट देण्यासाठी पैसे नाहीत अशा परिस्थितीत आम्ही आमची गुंतवणूक मोडू का? ■नाही तुमच्याकडे डाऊन पेमेंट देण्यास पैसे नसतील तर घर घेण्याचा विचारही करू नका. माझी यासंबंधी निश्चित अशी मतं आहेत. *तुमच्या उभयतांच्या (नवरा बायको) वार्षिक उत्पन्नाच्या तिप्पट रकमेचे घर घ्या. *तुमच्याकडे घरच्या किमतीच्या 40% रक्कम स्वताकडे तयार असायला हवी *गृहकर्ज 20 वर्षाहून अधिक कालावधीचे नको. *सर्व प्रकारच्या कर्जाचा एकत्रित EMI कापून जाऊन हातात येणाऱ्या मासिक प्राप्तीच्या 30% हून अधिक नको. हे चारही निकष पूर्ण होत असतील तेव्हाच घर घेण्याचा विचार आपण करा अन्यथा भाड्याने राहा. ★कोविडनंतर मला मिळणारा निव्वळ परतावा बाजार पुरेसा वाढूनही अपेक्षित नाही, त्यामुळे मी नाखूष आहे मी काय करू? माझी सर्व गुंतवणूक इक्विटीमध्ये आहे दीर्घकाळ थांबायची माझी तयारी आहे. ■तुमची सर्व गुंतवणूक इक्विटीमध्ये आहे म्हणजे बाजारात व्यवहार होतात, कसे करायचे याची तुम्हाला माहिती आहे. अशी माहिती नसेल तर व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराची सेवा तुम्ही घेऊ शकता त्याला फी देऊ शकता. तुम्ही नाखूष आहात याचा अर्थ काय? तुम्हाला खुश करणं हे बाजाराचं काम नाही. बाजार आपली दिशा ठरवेल. नाखूष असायला अनेक कारणं कायम सापडतील. इंडेक्स 12% रिटर्न देतोय आणि तुमचा फोलिओ 11% च वाढला म्हणून तुम्ही नाखूष. इंडेक्स 12% वाढला आणि तुमचा फोलिओ 13 % वाढला पण तो 25% का वाढला नाही म्हणून तुम्ही नाखूष व्हाल, इंडेक्स 20% वाढला पण तुम्हाला 12% रिटर्न मिळाला तुम्ही अधिक नाराज व्हाल. अशी कारणं वेगवेगळी असू शकतील. तुमची खरेदी चुकीच्या वेळी झाली असेल. एवढं मात्र निश्चित की तुमचा परतावा चालू बाजार परातव्यातून खूप अधिक फारसा कधी असणार नाही. ★अशा वेळी सल्लागाराशी मदत घ्यावी किंवा त्याच्याशी चर्चा करावी का? ■तुम्ही स्वतःच व्यवस्थापन करत असाल तर अशी चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही त्याच्याशी किंवा एखाद्या योजनेशी तुलना करून पहा ना? तुम्हाला 12% परतावा मिळतोय आणि त्याला 18% मिळत असेल तर स्वतःच मॅनेज करण्यापेक्षा त्याच्याकडे जाऊ शकता. ★एका जेष्ठ नागरिकांनी इथे एक प्रश्न विचारला आहे की त्याचं वय 63 आहे. या वयात एक कोटी रुपये मिड कॅप, स्मॉल कॅप शेअरमध्ये मी गुंतवू का? हे पैसे मला पुढे किमान 10 वर्षतरी लागणार नाहीत. ■याचा विचार करतानाही तुमचं भांडवल किती तेही पाहिलं पाहिजे तुमचे येणारे उत्पन्न दरवर्षी 5 लाख असेल तर तुमच्या निवृत्तीच्या दृष्टीने दीड कोटीं मालमत्ता त्याच्याकडे असणे जरुरीचे आहे. तुमच्याकडे 10 कोटी असतील तर ही चैन परवडू शकेल. पण जर 2 कोटी असतील तर तुमची मालमत्ता तुम्हाला पुरेल एवढीच आहे मग हे धाडस तुम्ही करू नये त्याने कदाचित तुम्ही अडचणीत येऊ शकाल. आपण पहाल रतन टाटा, अजिझ प्रेमजी 80 च्या जवळपास आहेत त्यांची बहुतेक गुंतवणूक इक्विटीमध्ये आहे पण ती रक्कम प्रचंड असल्याने त्यात पडणाऱ्या भावातील फरकाने त्यांना काही फरक पडत नाही. वय महत्वाचं नाही असं मी म्हणत नाही पण एकूण किती पैसे आहेत ते अधिक महत्वाचं आहे. ★एक महत्त्वाचा प्रश्न आहे, की आपल्या गुंतवणूक संचाचे परीक्षण कधी करावं? त्याचे निकष नेमके काय असावेत. ■वर्षातून एकदा तरी परीक्षण केलेच पाहिजे. जेव्हा कधी मोठा खर्च जसे मुलीचे लग्न, परदेशी मिळालेली शिक्षक संधी अशा प्रसंगात खूप जास्त खर्च होतो त्यावेळी त्याचं परीक्षण करावं. मी नेहमी याची तुलना शाळेत घेत असलेल्या पालकसभेशी करतो. माझ्या मुलीच्या शाळेत अशी सभा असायची तेव्हा मी तिच्या क्लास टीचरना मी त्या सभेस यायलाच हवं का? विचारायचो ते नेहमीच तुम्ही नाही आलात तरी चालेल म्हणायचे. बहुदा त्यांच्या तिच्याविषयी तक्रारी नसाव्यात पण त्यांनी तुम्ही यायलाच हवं सांगितले असतं तर मला जावं लागलं असतं. वर्षातून एकदा आपल्या गुंतवणुकीवर नजर टाकून त्याच्याबद्धल तक्रारी आहेत अशा अपेक्षित परतावा न देणाऱ्या गुंतवणुकीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्य गुंतवणूक तशीच ठेवावी. एका निश्चित दिवशी वर्षभरात एकदा तरी असे करावे आणि त्याच तारखेचे पुढील वर्षी पालन करावे म्हणजे त्यात एकसमानता राहते. ★मुलांच्या उच्च शिक्षणाची तरतूद आपण कशी करू शकतो? ■तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची ही जबाबदारी आहे की त्यांनी तुम्हाला छोटी मुले असतील तर त्यांच्या उच्च शिक्षणासाठी एकादी योजना त्याचप्रमाणे तुमच्या निवृत्ती नियोजनासाठी एक तरी योजना सुचवायला हवी. किती वर्षांचा कालावधी आहे ते पाहून गुंतवणूक मालमत्तांची समभाग आणि कर्जरोखे यांची विभागणी सुचवावी. तुमच्या मुलांना त्याच्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचे पत्रक त्यात दाखवलेली वाढ ही कशी झाली समजावून सांगावे. त्यांच्या विचारांना चालना द्यावी. त्यांनी काही मागणी केली तर यातून पैसे काढून घेऊया का विचारावे. तो नक्कीच नको म्हणेल. तुम्ही जबाबदारीने वागत असाल तर तेही जबाबदारीने वागतील. आपोआपच तो अर्थसाक्षर होईल. सल्लागाराने योग्य अशी योजना बनवून आपल्याला समजावून द्यायला हवी. आपलं उद्दिष्ट मुलांचे उच्च शिक्षण त्यासाठी ही योजना आपल्या निवृत्तीसाठी एक योजना हवीच हवी. प्रत्येक कुटूंबाच्यासाठी त्याच्या आवश्यकतेनुसार ती वेगळी असेल यासाठी अमुक अमुक हा एकच पर्याय नसेल. आपल्या ऐपतीप्रमाणे गुंतवणूक केली जाईल, वाढवली जाईल आवश्यक असल्यास स्थगित केली जाईल पण काढून घेतली जाणार नाही. कर नियोजन करण्याच्या दृष्टीनेही हे आवश्यक आहे. ★मालमत्तेत वाढ होण्याच्या दृष्टीने एसआयपी करावी की एकरकमी गुंतवणूक करावी तसेच भविष्यात एसडब्लूपी करायची असेल तर त्यातून किती रक्कम काढून घ्यावी. ■मी काही जरी याबद्दल सांगितले तरी तुम्ही ऐपतीप्रमाणेच गुंतवणूक करणार. तुम्हाला दरमहा पगार मिळत असेल तर मासिक एसआयपी करायला हरकत नाही, पण जर एखादा शेतकरी असेल तर विशिष्ठ काळातच गुंतवणूक करता येईल तो एकरकमी गुंतवणूक करू शकेल व्यवसाय करीत असणारी व्यक्ती रोज काही पैसे बाजूला ठेऊ शकेल. प्रत्येक व्यक्तीनुसार गुंतवणूक पद्धत बदलावी लागेल. शेतकरी दररोज एसआयपी करू शकत नाही. ★विविध मालमत्तेत विभागणी कशी केली जावी? ■हे पण व्यक्तिव्यक्ती नुसार बदलेल. तुमचं उत्पन्न, उपलब्ध साधने,पर्याय, जबाबदाऱ्या या सर्वानुसार ही विभागणी बदलत राहील याचे एक ठोस उत्तर कुणालाच देता येणार नाही. ★एक अंतिम प्रश्न आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकेल अशी एखादी योजना आपल्याला सांगता येईल का? ■इंग्रजी rich आणि welth असे दोन शब्द आहेत त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. रिच खूप आहेत होतील पण त्यांचे मार्ग मर्यादित आहेत ते बंद झाले तर सगळंच डळमळीत होईल पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल जर welthy असाल तर उत्पन्नाचा एक मार्ग बंद झाला तर तुम्हाला चिंता वाटणार नाही त्याला तुम्ही पर्याय शोधू शकाल. तेव्हा तुम्ही कोण आहात, तुमचे उत्पन्न, गरजा, उदिष्ट, जबाबदाऱ्या याचा पूर्ण विचार करून योजना बनवणे आणि त्या पार पाडणं आणि welthy बनणं हेच तुमचं अंतिम उद्दिष्ट हवं. अतिशय रंगतदार झालेल्या या चर्चेत सरांनी बारीक बारीक गोष्टी विचारात घेऊन त्यावरील आपली मतं मांडली. स्वातंत्र्याच्या अमृतमोहोत्सवानिमित्त या मुलाखतीचे आयोजन इक्विटीवाला डॉट कॉम यांनी हा कार्यक्रम ऑगस्ट 2022 रोजी आयोजित केला होता यात व्यक्त करण्यात आलेल्या विचारापैकी घर हा विषय सोडून सर्वच विचारांशी मी सहमत आहे. घर घेण्याचा विचार करताना सर असे म्हणतात- *तुमच्या उभयतांच्या (नवरा बायको) वार्षिक उत्पन्नाच्या तिप्पट रकमेचे घर घ्या. *या किंमतीचे मुंबईत काय पण उपनगरात घर मिळणे अशक्य आहे. *तुमच्याकडे घरच्या किमतीच्या 40% रक्कम स्वताकडे तयार असायला हवी. *ही रक्कमही किमान 25 लाख होईल ते जमण्यास बराच कालावधी लागेल. *गृहकर्ज 20 वर्षाहून अधिक कालावधीचे नको. *जास्तीत जास्त रकमेचे आणि दीर्घ मुदतीचे कर्ज घ्यावे असे माझे ठाम मत आहे. यामुळे गृहकर्ज देणाऱ्यांना फायदा होत असला तरी हे सर्वात कमी दराने मिळणारे कर्ज असल्याने शिल्लक पैशाची स्मार्ट गुंतवणूक केल्यास भांडवल निर्माण होऊन कर्ज एकरकमी फेडताही येऊ शकते. ते कसे? हे मी वेगळ्या लेखातून समजावून दिले आहे. आधीच मोठ्या झालेल्या या लेखाच्या विस्तार भयामुळे अधिक लिहीत नाही. *सर्व प्रकारच्या कर्जाचा एकत्रित EMI कापून जाऊन हातात येणाऱ्या मासिक प्राप्तीच्या 30% हून अधिक नको. *कर्ज अधिक घेणार म्हणजे हातात उत्पन्न कमी येणार ते 40 ते 50% असावेत हे गृहकर्जाचे निकष आहेत त्यामुळे सुरवातीस थोडा त्रास झाला तरी नंतर ठीक होते असा अनुभव आहे. हे चारही निकष पूर्ण होत असतील तेव्हाच घर घेण्याचा विचार आपण करा अन्यथा भाड्याने राहा. असे ठरवले तर अनेक काळ भाड्याच्याच घरात राहावे लागेल. हे मुद्दे सोडले तर अतिशय उत्तम विचार असलेले व्याख्यान म्हणजे काय असा समृद्ध करणारा अनुभव मिळाला तो आपल्याला मिळावा त्या हेतूने या सर्व गोष्टी पूर्ण स्वातंत्र्य घेऊन तीन भागात लिहू शकलो. तूर्तास विराम घेतो.(संपूर्ण) ©उदय पिंगळे

Friday, 9 September 2022

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 2

#अर्थात #पी_व्ही_सुब्रमण्यम_यांच्याशी_बातचीत_भाग_2 ★आपण वेगवेगळे उत्पनाचे मार्ग कसे निर्माण करू शकतो. ■याचा संबंध आपल्या रोखता प्रवाहाशी आहे जर तुम्ही उत्पन्न मिळवत असाल तर भविष्याचा विचार संपत्ती निर्माण करूनच त्याद्वारे वेगवेगळे उत्पनाचे मार्ग निर्माण होऊ शकता. संपत्ती ही शेअर्समधून निर्माण होऊ शकेल त्यातून तुम्हाला कदाचित फारसा डिव्हिडंड मिळणार नाही पण त्यातून भविष्यात मूल्यवृद्धी झालेली दिसून येईल. याशिवाय एसआयपी करून त्यात वाढ करूनही आपल्या संपत्तीचे मूल्य वाढू शकेल काही कारणाने एसआयपी करणे जड जात असेल तर स्थगित करा पण पैसे काढून घ्यायचा विचारसुद्धा मनात आणू नका जमेल तशी त्यात वाढ करा तरच दीर्घकाळात संपत्तीत आणि त्यामुळे उत्पन्नातही वाढ होईल. ★आपली खर्च करण्याची पद्धत बदलूनही आपण बरीच बचत करू शकतो याबद्दल काय सांगाल? ■ हे तुमच्याशिवाय कोणी ठरवू शकत तुम्ही तरुण असाल तर कोणतीही जबाबदारी नसेल तर अधिक पैसे वाचवू शकाल आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करू शकाल तेव्हा या वयात अधिकाधिक शिल्लक कशी राहील यावर लक्ष केंद्रित करा जर निवृत्तीच्या जवळ आला असाल तर उपलब्ध साधनातून अधिकाधिक परतावा कसा मिळवू शकतो याचा विचार करा. हे सुद्धा व्यक्तीसापेक्ष आहे प्रत्येकाला आयुष्यात वेगवेगळ्या टप्यावर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्या सारख्याच नसतात. ★शेअरबाजार अशाश्वत आहे म्हणून लोक त्याकडे पाठ फिरवतात त्यांनी प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष बाजारात यावे म्हणून काय प्रयत्न करायला हवेत. ■अशाश्वतीच्या भीतीने तुम्ही बाजारापासून लांब रहात असाल तर महागाईवर मात करणारा परतावा आपण कधीच मिळवू शकणार नाहीत. तुम्हाला आयुष्यभर कष्टच करावे लागतील तुम्ही कधीही निवृत्तीचा विचार करू शकणार नाही. पारंपरिक गुंतवणूक तुम्हाला जोखिमरहित परतावा देईल पण त्यातून तुमच्या संपत्तीत वाढ होणार नाही. तुमच्याकडे प्रचंड पैसा असेल तर तुम्हाला ही चैन परवडेल अन्यथा बचत करून जमा झालेल्या पैशातून गुंतवणूक करावी लागेल जोखीम घ्यावीच लागेल. पूर्वी राजेशाही होती तेव्हा राजवाडा, अंतःपुर, सैन्य, खजिना राजाकडे असायचा यात बदल झाल्यावर गावातील एखादं दुसऱ्या श्रीमंत व्यक्तीकडे या गोष्टी असायच्या अनेकांना त्याचे आकर्षण वाटायचं याच अनुकरणातून चैनच्या गोष्टी आपल्याकडे आहेत म्हणजे आपण श्रीमंत झालो अशी भ्रामक कल्पना अनेकांच्या मनात रुजली आहे. आज जगात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक व्यक्ती अत्यंत साधेपणाने रहातात हे लक्षात घ्या वास्तविक ते इतकं कमावत आहेत की त्याच्या दृष्टीने आपण ज्याला चैन समजतो ती करणं ही अगदीच क्षुल्लक बाब आहे. बाजारात तुम्ही गुंतवणूक करणार तर कशी करणार, स्वतः करणार की कुणाची मदत घेणार प्रत्यक्ष करणार की अप्रत्यक्षपणे करणार यात बदल होऊ शकतो पण संपत्तीत वाढ करायची असल्यास अशी गुंतवणूक तुम्ही टाळू शकत नाही. ★आजकाल घोटाळे वाढत आहेत अशा परिस्थितीत चांगला सल्लागार कसा शोधावा? ■घोटाळे, फसवणूक, गैरव्यवहार आधीही होत होते आताही होतात फक्त आता ते जास्त रंगवून सांगितले जातात. या गोष्टी ताबडतोब फ्लॅश होतात, जगभर पसरतात त्याला मिठमसाला लावला जातो, त्यास कधी कधी जातीय रंगही दिला जातो. नकारात्मक गोष्टी पटकन मनाची पकड घेतात त्याच गोष्टी वारंवार फॉरवर्ड केल्या जातात अनेकदा अनेकांकडून पुनः पुन्हा त्या आपल्याकडे येत राहतात. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करावं तरीही एखादी कंपनी एखादा फंड संशयास्पद वाटत असेल तर त्यातून बाहेर पडावं आपल्या बाबतीत असं होणारच नाही का हे सांगता यायचं नाही फ्रेंक्लीन, अक्सिसमध्ये काही घोटाळे झाले जे झालं ते निश्चित चांगलं झालं म्हणता येणार नाही पण याचा अर्थ गुंतवणूकदारांचे सर्व पैसे घेऊन फंड मॅनेजर पळाले असा नाही. आपल्याला या बातम्यांनी ताण येत असल्यास बातम्या पाहू नका, समाज माध्यमापासून दूर राहा. नकारात्मक गोष्टीपासून दूर राहिलात की आपोआपच सर्व सकारात्मक होईल. ★शेअर आणि म्युच्युअल फंड याशिवाय अजून असे काही गुंतवणूक प्रकार आहेत का ज्यात गुंतवणूक केली जावी. ■असे अनेक पर्याय आहेत पण त्यात खूप गुंतवणूक करावी लागणार तुलनेत त्यातून फार परतावा मिळणार नाही त्यामुळे ते सामान्य लोकांसाठी नाहीत भरपूर संपत्ती असल्यास तुम्ही अनेक घरं घेऊ शकता त्यांची देखभाल करू शकता परतावा मिळण्यासाठी अतिदीर्घकाळ थांबू शकता. यासाठी खूप मोठी रक्कम लागते जी आपल्याकडे नसते तेव्हा एसआयपी करणे वाढवणे संयम बाळगणे शांत राहणे हेच आपल्यापुढे असलेले पर्याय आहेत. ★गुंतवणूक कधीही करावी असं म्हणतात तसच ती काढून कधी घ्यायची याबद्धलची एखादी योजना आपण सांगू शकाल. ■माझे यासंबंधीचे विचार वेगळे आहेत. अशी कोणती योजनाच असावी असे मला वाटत नाही, काही गुंतवणूक विशिष्ठ उद्देशाने केलेली असते ती चालूच ठेवावी बंद करू नये. या उद्दिष्ट ठेवलेल्या गरजा पूर्ण करणारा फंड वगळून बाजार चांगला आहे मिळणारा परतावा उत्तम आहे अशा परिस्थितीत काही पैसे काढून घेऊन आपल्या सुप्त इच्छा जसे वर्ड टूर, मोठा स्क्रीन असलेला टी व्ही अशासारखे खर्च करावेत म्हणजे घरच्यांचही समाधान होईल आणि खात्री होते की यातून काहीतरी मिळतंय फक्त असं करत असताना आपण फक्तच चैन करतोय अस होणार नाही याची काळजी घ्यावी. आर्थिक अडचणीत आहात, कोणी आजारी पडलंय यासाठी आपले पैसे काढण्याची वेळ आपल्यावर येऊ नये. यामुळे गुंतवणुकीचे मूळ उद्देश सफल होत नाहीत यासाठी आपल्याकडे इमर्जन्सी फंड हवा, मेडिकल इन्शुरन्स हवा. ★निवृत्तीसाठी गुंतवणूक करण्यास नेमकी कधी सुरुवात करावी. ■या प्रश्नामुळे मला निवृत्तीवर मी लिहिलेल्या पुस्तकाची आठवण झाली. त्यात मी एखाद्याला 40 व्या वर्षी निवृत्ती घ्यायची असल्यास त्याने 22 व्या वर्षांपासून रोज ₹40/- असे महिना ₹1200/- म्हणजेच वर्षाचे ₹14400/- वाचवून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता किंवा अमेरिकन मानांकनाप्रमाणे उत्पन्नाच्या 10% भागाची गुंतवणूक करायला हवी. ती दरवर्षी उत्पन्नाप्रमाणे वाढवत न्यावी ही रक्कम घर घेणं, लग्न करणं, शिक्षणासाठी वापरणं अशा कारणांसाठी वापरू नये. याची सुरुवात नियम म्हटला तर पहिल्या पगारापासून करावी परंतु अनेक कारणांनी नोकरी लागल्या लागल्या काही इच्छा पूर्ण करायच्या असतात त्यासाठी 3 / 4 महिने आपल्या प्रियजनांना भेटी देण्यात सर्व पगार असाच संपून जातो. हा कालावधी सोडून लगेच गुंतवणूक करण्यास सुरुवात झाली पाहिजे. ★मृत्यपत्र याविषयी आपलं काय मत आहे ते कधी बनवावं? ■अनेकजण अस समजतात की मी मृत्युपत्र बनवलं की मी लगेच मरेन मी माझं मृत्यूपत्र 20 वर्षांपूर्वी बनवलं मी न मेल्याने माझ्या घरातील नीलोकांचा कोणताही फायदा झाला नाही यातील गमतीचा भाग सोडला तर जेव्हा कधी तुम्ही स्थावर मालमत्ता घ्याल त्यानंतर लगेच बनवावे. कारण स्थावर मालमत्तेची विक्री सदर मालमत्ता टायटल क्लिअर असणे जरुरीचे असते. अन्य ठिकाणची इतर मालमत्ता काही अटींची पूर्तता केल्यावर नॉमिनीच्या नावावर वर्ग केली जाते. मात्र स्थावर मालमत्तेच्या संदर्भातील खरेदी विक्री व्यवहार त्यामुळे होऊ शकत नाहीत नाहीत त्यासाठी मृत्युपत्राचा उपयोग होतो. या अनुषंगानेच मृत्युपत्राच्या संबंधीत असलेल्या दाव्याची संख्या गेली अनेक वर्षे सातत्याने वाढत आहे. त्याच कारण ते योग्य रीतीने बनवलेल नाही. योग्य आर्थिक सल्लागार, वकील यांची मदत घेऊन ते रजिस्टर केल्यास सहसा कायदेशीर अडचणी येत नाहीत त्यासाठी येणारा जास्तीत जास्त खर्च फक्त ₹ 9000/- एवढाच येईल. तो वाजवी आहे. ★म्युच्युअल फंड गुंतवणूक थेट करावी की मध्यस्थाची मदत घेऊन? ■जर तुम्ही या गोष्टी स्वतः करता येत असतील तर करू शकता. तुम्ही गावी चालला आहात. जर तुम्ही फिट असाल तर आपली बॅग प्लॅटफॉर्मवरून स्वतः घेऊन जाऊ शकता पण समजा तुम्हाला ताप येईल असं वाटतंय तर तुम्ही अन्य कोणाची मदत घेऊ शकता अगदी तसच आहे हे त्यासाठी फार खर्च करावा लागत नाही. प्रत्येक वेळी सल्लागाराची जरूर असते असं नाही जेव्हा जरूर असेल तेव्हा सल्लागाराची मदत घ्यावी. तुमचा सल्लागार तुमच्यासाठी काय करतो तो तुम्हाला कसं मार्गदर्शन करतो तुमचा गुंतवणूक संच यथायोग्य बनवून देऊन तुमचा जीवन विमा, आरोग्यविमा, करदेयता याची काळजी घेतो का? या सर्वांवर याचे उत्तर अवलंबून आहे. (अपूर्ण) ©उदय पिंगळे अर्थसाक्षर.कॉम येथे 9 सप्टेंबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत. हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी- माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक, https://udaypingales.blogspot.com/?m=1 'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक, https://www.facebook.com/pingaleuday/