Friday, 28 October 2022

शेअरबाजारातील गुंतवणुकीचे फंडे

#शेअरबाजारातील_गुंतवणुकीचे_फंडे शेअरबाजारातूनच आपल्याला चांगला परतावा मिळेल असे वाटत असल्याने आज सामान्य गुंतवणूकदारांची टक्केवारी बऱ्यापैकी वाढली आहे. यातील काही लोक हे जुगारी प्रवृत्तीचेही आहेत त्यांना बाजाराने गेल्या अनेक वर्षात दिलेल्या वार्षिक परताव्याएवढा परतावा मासिक, पाक्षिक,साप्ताहिक मिळावा याहीपुढे जाऊन तो रोज मिळावा अशी अपेक्षा असते. यातील कितीही तज्ञ व्यक्ती असेल तरी सातत्याने अवास्तव परतावा मिळण्याची शक्यता नाही उलट अशी चाल अंगाशी येईन जे काही कमावले ते निघून जाऊन अधिक देयता कधी निर्माण होईल ते कळणारही नाही. तेव्हा असे बेधडकपणे फसवे दावे करणारे लोक जे काही सांगतात त्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका हे मी एवढ्या वर्षांच्या अनुभवातून निश्चित सांगू शकतो. माझ्या आर्थिक विषयांवर फेसबुक पेज आणि ब्लॉगमुळे अनेक व्यक्ती माझ्या संपर्कात आहेत. यातील काही जाणकार व्यक्तीशी त्यांची गुंतवणूक करण्याची पद्धत जाणून घेतल्यावर सर्वसाधारण गुंतवणूकदारांना उपयोगी पडतील अशा दोन पद्धती मला सापडल्या ज्या मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांना उपयोगी पडतील त्यावर मी स्वतंत्र लेख लिहिले असून ते आपण पुन्हा मुळातून वाचू शकता. या दोन पद्धती अशा- ★नितीन पोताडे सरांची पद्धत- यामध्ये आपण निवडलेल्या शेअर्समध्ये एकरकमी गुंतवणूक न करता 50% रक्कम गुंतवावी. भाव 5% खाली आले की 5% गुंतवणूक वाढवावी आणि 5% वाढल्यावर 5% गुंतवणूक काढून घ्यावी. जेव्हा बाजारभाव सातत्याने वरखाली होतात तेव्हा ही पद्धत अत्यंत उपयोगी आहे यामुळे बाजार वर जावो की खाली गुंतवणूकदार म्हणून आपल्याकडे कायम गुंतवणूक संधी उपलब्ध राहते समजा भाव त्याहून वर जाऊन कुठेतरी स्थिरावले तरीही हीच पद्धत वापरावी. ती पातळी हा मुळभाव पकडून त्या खालीवर खरेदी विक्री व्यवहार करावेत. ★पंकज कोटलवर सरांची पद्धत- यामध्ये निवडलेल्या शेअरपैकी ज्यांचे भाव वाढत आहेत त्याच कंपनीचे शेअर्स थोडे थोडे खरेदी करावेत यामुळे आपला फोलिओ सतत उत्कर्ष दाखवतो. ज्या शेअर्सचे भाव वाढत नाहीत त्यांचे शेअर्स तसेच ठेवावेत त्यात अधिक गुंतवणूक केल्याने मोठ्या प्रमाणात पैसे अडकण्याची शक्यता असते. या पद्धतीशिवाय गुंतवणूकदारांना सर्वमान्य असलेल्या पद्धती अशा- ★मार्केट लीडरमध्ये गुंतवणूक- प्रत्येक क्षेत्रात एक दोन दादा कंपन्या असतात आशा कंपन्या आपले बाजारातील स्थान टिकवण्याचा पर्यंत करीत असल्याने एक गुंतवणूकदार म्हणून त्या कंपन्या अपेक्षित कामगिरी करतात ना? एवढेच यावर लक्ष ठेवावे लागते. ★सरकारी कंपन्यांतील गुंतवणूक- सदर कंपन्यामधील गुंतवणूक सरकार हळू हळू काढून घेत आहे ही एक संथ प्रक्रिया आहे त्यामुळे या कंपन्यांच्या भावात त्यांचे खरे मूल्य दिसून येत नाही त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर मालमत्ता असल्याने खाजगीकरण झाल्याने त्याचा फायदा गुंतवणूकदारांना मिळू शकतो. ★भरपूर लाभांश देणाऱ्या कंपन्या- यात अनेक सरकारी काही खाजगी कंपन्या येतात या कंपन्या त्याच्या बाजारभावशी तुलना केली असता जो लाभांश देतात त्याचा उतारा हा मुदत ठेवींवरील व्याजाहून अधिक आहे त्यामुळे तुलनात्मकदृष्टीने यातून तोटा होण्याची शक्यता कमी असते त्याचप्रमाणे या शेअर्सच्या भावात 15 ते 20% भांडवलवृद्धीही होऊ शकते. ★म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाची गुंतवणूक- म्युच्युअल फंड योजनांच्या व्यवस्थापक कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतो ती वाढवतो अथवा कमी करतो याचा अहवाल जाहीर करीत असतो हा अहवाल अँफीच्या (सर्व म्युच्युअल फंड व्यवस्थापन कंपन्यांची संघटना) संकेतस्थळावर जाऊन कुणालाही पाहता येतो या पद्धतीने सर्वसाधारण माहिती मिळू शकते परंतु ती महिनाभरापूर्वीची असल्याने नंतर झालेल्या बद्दलबद्धल गुंतवणूकदार अनभिज्ञ राहतो. ★कॉफी कॅन पोर्टफोलिओ- या पद्धतीने जी गुंतवणूक केली जाते मागील 10 वर्षात सातत्याने नफ्यात 15% आणि उलाढालीत 10% सातत्याने वाढ दर्शविणाऱ्या कंपन्यांत केली जाते. अनेक वित्तीय संस्था, भांडवल व्यवस्थापन कंपन्या, मोठे गुंतवणूकदार दरवर्षी त्याचा या पद्धतीचा गुंतवणूक संच जाहीर करतात. त्याचा अभ्यास करून स्वतःचा गुंतवणूक संच तयार करता येणे शक्य आहे. ★स्मॉलकेस- ही म्युच्युअल फंडाच्या जवळपास जाणारी अलीकडे उदयास आलेली कल्पना आहे. यात कोणत्या शेअर्समध्ये किती प्रमाणात गुंतवणूक करायची ते आधीच ठरवले जाते. त्याप्रमाणे गुंतवणूकदारांच्या गरजेनुसार त्यांची निर्मिती केली जाते. यामुळे आपल्याला सूचनेनुसार गुंतवणूक करणे एवढाच पर्याय शिल्लक राहतो. या आणि अशा पद्धतीचा विचार करून आपले स्वतःचे असे गुंतवणूक धोरण ठरवता येऊ शकते. असे धोरण ठरवताना काही गोष्टी मनात निश्चित कराव्यात आणि त्यांची जाणिव ठेवावी. उदाहरणार्थ- *गुंतवणूक का? कशासाठी? *आपण किती जोखीम स्वीकारू शकतो. *आपली गुंतवणूक कमी होता कामा नये. *मिळणारा परतावा सर्वसाधारण मिळू शकणाऱ्या परताव्याहून अधिक असावा. *आपली गुंतवणूक पद्धत काय आहे ते आपल्याला ठामपणे सांगता येईल का? तरीही काही ठाम निर्णय घेता येत नसेल आणि किमान आठ वर्षे थांबायची तयारी असेल तर म्युच्युअल फंडाच्या इंडेक्स फंड योजना साधारणतः 12%, फ्लेक्सजी कॅप 15% च्या आसपास परतावा देतील तर ब्ल्यू चिप फंडाचा परतावा याच्याच आसपास असेल असे मागील 40 वर्षाचा इतिहास पाहून आपण सांगू शकतो. याहून अधिक परतावा मिळू शकणाऱ्या योजनांत जोखीम अधिक असल्याने त्या सर्वसामान्य लोकांसाठी नाहीत. दरमहा 5% तर जेष्ठांसाठी 8% मासिक परतावा देऊ करणाऱ्या योजनांच्या जाहीराती आघाडीच्या वृत्तपत्रातून रोज येत असल्या तरी असा परतावा सातत्याने मिळणे अशक्य आहे यात जोखिमही खूप जास्त असल्याने या सापळ्यात कोणी अडकू नये किंवा असा विचार आपले मित्र नातेवाईक करीत असल्यास त्यांना यापासून परावृत्त करावे. ©उदय पिंगळे अर्थसाक्षर डॉट कॉमवर 28 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.

Friday, 21 October 2022

झेरोधाच्या अनुचित व्यापारी प्रथा आणि सेवेतील त्रुटी

#झेरोधाच्या_अनुचित_व्यापारी_प्रथा_आणि_सेवेतील_त्रुटी ऑनलाइन व्यवहार करण्याशी माझा संबंध खऱ्या अर्थाने सन 2016 साली आला. मुंबई ग्राहक संघाच्या त्या वेळच्या शिक्षण विभागप्रमुख वसुंधराताई देवधर यांनी यूपीआयची माहिती असलेली एक लिंक पाठवून त्यावर एक लेख लिहून मागितला होता. या आधी ऑनलाइन काही हवं असल्यास ते मुलांना सांगितलं की तेच व्यवहार करायचे आणि वस्तू हातात यायची. यूपीआय ही क्रांतिकारी पेमेंट पद्धत तेव्हा नुकतीच सुरू झाली होती मी प्रत्यक्षात ऑनलाइन व्यवहार कधी केले नसले ते ते कसे करता येतील हे वाचले होते. यूपीआयवरील माहिती वाचल्यावर ही पध्दत आर्थिक बाबतीत क्रांतिकारी बदल घडवेल हे मी ओळखले. आता यावर लिहायचे तर त्यासाठी आवश्यक गोष्टी आपणच करून पहाव्यात तर त्याचे फायदे तोटे लोकांना सांगण्याचा नैतिक अधिकार आपल्याला असेल असे वाटल्याने त्यासाठी आवश्यक असणारा आभासी पत्ता (UPI address) तयार करून माझ्या भाच्याला ₹100/- पाठवून ते त्याला त्याच क्षणी मिळतात याची मी खात्री फोनवरून करून घेतली. त्या दिवसापासून आजतागायत जिथे जिथे ऑनलाइन व्यवहार होऊ शकतो तो मी ऑनलाइन पद्धतीनेच करत आहे. यातील तत्परता, सुलभता, व्यवहाराची होणारी नोंद आणि हे सर्व जवळपास विनामूल्य! या गोष्टींची कुणालाही निश्चित भुरळ पडेल असेच सारेकाही. या सर्वाचा प्रसार प्रचार पुरस्कार तेव्हापासून मी करीतच आहे. ज्यांना असे व्यवहार करायची भीती वाटते त्यांची भीती घालवण्याचे काम मी सातत्याने करीत आहे. आपण हे सारं सहज करू शकतो हे कळल्यावर आत्मविश्वासात वाढ होते. ब्रोकरकडे असणारे आपले खाते हे नेमके कोणत्या प्रकारच्या ब्रोकरकडे असावे याबाबत मार्गदर्शन करताना जे टेक्नोसॅव्ही आहेत त्यांनी डिस्काऊंट ब्रोकरकडे तर ज्यांना आपल्या परंपरागत पद्धतीने व्यवहार करायचे आहेत त्यांनी फुल फ्लेज ब्रोकर्सकडे आपले व्यवहार करावे असे माझे मत आहे. मध्यंतरी म्हणजे करोना कालखंडात मानवी हालचालींवर मर्यादा आल्याने बहुतेक फुल फ्लेज ब्रोकर्सनी आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी अँप विकसित केली त्यामुळे फोन करून व्यवहार करण्याऐवजी फोनमधून व्यवहार करता येणे शक्य झाले. अँप म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तो आपल्या गरजेनुरूप एक निश्चित केलेला कम्प्युटर प्रोग्राम आहे. याशिवाय सेबीने मार्जिन नियम बदलल्याने पूर्वीप्रमाणे एकाद्या खात्यास शब्दावर मार्जिन मिळणे बंद झाल्याने या दोन्ही ब्रोकर्सच्या कार्यपद्धतीत आता फारसा फरक राहिलेला नाही. माझ्या भावी आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने मी गेल्यावर्षी जे बाजार व्यवहार केले त्याचा तपशील आयकर विवरणपत्र भरताना भरपूर ब्रोकरेज गेल्याचे लक्षात आले हेच व्यवहार डिस्काउंट ब्रोकरमार्फत केले असते तर 95% ब्रोकरेज वाचले असते. आपलयाला जर ऑनलाइन व्यवहार करता येतात मग आपण डिस्काउंट ब्रोकरकडे असे खाते का उघडू नये असा विचार आला? असे खाते उघडताना त्याविषयी अधिक माहिती मिळवताना झेरोधाकडे खाते उघडुयात त्यांचे आयडीएफसी बँकेबरोबर 3 इन 1 खाते निर्माण करता येत असल्याचा करार झालेला असल्याने व्यवहाराच्या दृष्टीने सोईचे होईल म्हणून दोन्हीकडे खाते उघडण्याचा निर्णय मी घेतला याशिवाय असा निर्णय घेण्यामागे माझ्या जाणकार मित्राने झेरोधाचा इंटरफेस चांगला असून कस्टमर सर्व्हिस चांगली असल्याची केलेली शिफारस आणि हे खाते मुलगा वापरत असल्याने काही अडचण आल्यास त्याला विचारता येईल हा भरवसा होता. मित्राच्या शिफारशींमुळे ठाण्यातील झेरोधा प्रतिनिधीने माझ्याशी संपर्क साधून मार्गदर्शन केले आणि ऑनलाइन खाते उघडताना कुठे अडचण आल्यास त्वरित मार्गदर्शन करू असे सांगितले. माझी 3 इन 1 खात्याची गरज सांगितल्यावर त्यांनी प्रथम आयएफसीआय बँकेत खाते उघडून तो नंबर झेरोधाकडे द्यावा असे सुचवल्याने प्रथम आयडीएफसी बँकेत आणि नंतर झेरोधामध्ये मी खाते ओपन केले. हे खाते उघडण्यासाठी मोजून 20 मिनिटातून अधिक कालावधी लागला नाही. केवायसीही ऑनलाइन झाले हा एक सुखद आणि आपला आत्मविश्वास वाढवणारा अनुभव होता. या सर्व घटना 22 ते 24 सप्टेंबर या कालावधीत. यानंतर मी हे खाते 3 in 1 करण्यासाठी द्यावा लागणारे पीओए डॉक्युमेंट पोर्टलवर जाऊन प्रोसेस केले त्याचा प्रिंटआऊट घेऊन तो स्पीड पोस्टाने बंगलोर येथे 28 सप्टेंबर रोजी पाठवला. तो त्यांना 30 सप्टेंबरला मिळाला. या प्रत्येक टप्यावर मला वेळोवेळी मेलवरून स्थितीची माहिती वेळोवेळी मिळत राहिल्याने समाधान वाटत होते. हे समाधान अल्पकाळात नाहीसे झाले. 30 सप्टेंबरला मला संध्याकाळी मी पाठवलेला पीओए फॉर्म जुना असल्याने नाकारला असल्याचा मेल आला मी लगेच माझ्या संपर्कात असलेल्या सपोर्ट टीम मेम्बरशी संपर्क साधल्यावर त्यांनी मला वेगळी पीओए फॉर्मची लिंक पाठवली त्यातील फॉर्म आणि मी पोर्टलवरून घेतलेल्या फॉर्ममध्ये एका शब्दाचाही फरक नसल्याने तो फॉर्म पुन्हा पाठवण्यास मी नकार दिला. यानंतर सपोर्ट मेम्बरने त्यांच्या वरिष्ठांशी बोलून फॉर्म न पाठवता पीओए ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले त्याप्रमाणे केले असता ते नाकारण्यात आले याबाबत मी पोर्टलवर टिकेट जनरेट केले म्हणजे आपली तक्रार तेथे नोंदवली. त्याचे उत्तर मी पीओए फॉर्म पाठवलेला नसल्याने अर्ज नाकारण्यात आल्याचे कळवले. तेव्हापासून 14 ऑक्टोबरपर्यंत जिथे संपर्क साधला तेथून वेगवेगळे अनुभव आले. सपोर्ट करणारा वेगळे सांगणार, मेलचे उत्तर भलतेच, कस्टमर केअर तोंडाला पाणी पुसणारे आमची टीम तुमच्याशी 24 तासात संपर्क साधेल म्हणून सांगून वेळ मारून नेणार. यात नेमके काय करायला हवे कुणाचाच कुणाला मेळ नाही समस्या आहे तिथेच. ती सोडवायची सोडून तुम्ही नेट बँकिंगने, यूपीआयने पैसे पाठवून व्यवहार करू शकता किंवा आयडीएफसी बॅंकेला विचारून पहा सांगणार तर बँकवाले आमच्याकडून ओके आहे तुम्ही झेरोधाला विचारा सांगणार यातून मनस्ताप होण्याखेरीज काहीही झाले नाही. 14 ऑक्टोबर शुक्रवारी रात्री सपोर्ट टीमच्या मॅनेजरने 18 ऑक्टोबरपर्यंत प्राधान्याने तक्रार सोडवण्याचे आश्वासन दिले आहे एकंदरीत अनुभव पाहता त्यास यश येईल असे वाटले नाही, तोपर्यंत हा प्रश्न न सुटल्यास मी 19 ऑक्टोबर रोजी खाते बंद करणार म्हणून माझ्याकडून त्यांना मर्यादा घातली होती. सेवेतील त्रुटी आणि अनुचित व्यापारी प्रथा याबद्धल खाते काढताना भरलेले ₹200/- आणि मनस्ताप याबद्दल भरपाई मिळवू शकण्याचा पर्याय माझ्याकडे आहे. 19 ऑक्टोबर रोजी हा प्रश्न न सुटल्याने मी कंटाळून झेरोधा खाते बंद केले आहे. त्यांनीही तितक्याच तातडीने ते कोणताही विचारपूस न करता तत्परतेने बंद केले आहे. खाते रीतसर सुरू होण्यापूर्वी जर ही अवस्था असेल तर यानंतर उद्भवणाऱ्या तक्रारी मी कशा सोडवणार याबाबत मला वाटणारी काळजी रास्त आहे. आता अनधिकृतपणे झेरोधा आणि आयडीएफसी बॅंक यांच्यात काहीतरी नवीन करार होणार आहे असं समजतंय. ते सपोर्ट टीम,पोर्टल, कस्टमर केअर याना माहीत नसेल तर आपल्या पोर्टलवर आहे असे दाखवणे चूक आहे. मला आलेल्या मेलमध्ये असा करार नसल्याचे त्यांनी नाकारले नाही. उलट अपडेटेड फॉर्म पाठवा, फॉर्म आलेला नाही अशी कारणे दिली असून 24 तासात संपर्क केला जाईल सांगितले तरी तो कोणत्याही मार्गाने कधीच झाला नाही. मीच त्याचा वारंवार फॉलोअप घेत होतो प्रत्येक वेळी वेगवेगळ्या व्यक्तींना माझी तक्रार सुरुवातीपासून सांगत होतो. ऑनलाइन व्यवहार जितक्या सहज होतात तितक्या सहज या संबंधात उद्भवणारे प्रश्न अजूनही सहज सुटत नाहीत हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ज्या सुलभतेने खाते उघडले जाते किंवा बंद होते त्यावरून या सर्वानाच ग्राहक हवेत पण त्यांच्या तक्रारी नको आहेत किंवा त्याकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे आहे याची आस्था नाही, भले ते आपल्याला सोडून गेले तरी चालतील, हेच यातून अधोरेखित होत आहे. ©उदय पिंगळे अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 21 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.

Friday, 14 October 2022

टोकनायझेशन -ऑनलाइन कार्ड व्यवहारासाठी

#टोकनायझेशन_ऑनलाइन_कार्ड_व्यवहारासाठी एखादी वस्तू आणि सेवा यांची खरेदी ऑनलाईन करणं हे आता नवीन नाही. अशी खरेदी करताना कोणत्याही प्रकारच्या रोख रकमेची हाताळणी केली जात नाही कागदाचा वापर होत नाही. यासाठी पेमेंट करताना क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड याचा वापर करून, एईपीएस ही आधारद्वारे आपली ओळख पटवून, यूपीआय द्वारे, मोबाईल वॉलेटचा वापर करून, नेटबँकिंगद्वारे, विक्री ठिकाणी उपलब्ध पीओएस टर्मिनलवरून, मोबाईल बॅंकिंगने, पेयु पार्टनरच्या माध्यमातून हे व्यवहार सुरक्षित, जलद आणि विनामूल्य व्हावेत यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. ऑनलाइन पद्धतीने केल्या जाणाऱ्या सर्व व्यवहारातील 60% व्यवहार हे वेगवेगळ्या विक्री संस्थांच्या इ कॉमर्स पार्टलवरून होतात येथे विविध पेमेंट पद्धतीचे पर्याय उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणाहून ग्राहक वारंवार खरेदी करतात तेथे जर ते क्रेडिट/ डेबिट कार्ड वापरून व्यवहार करणार असतील तर पुन्हा व्यवहार करण्यास सोईच्या दृष्टीने कार्डची माहिती साठवून ग्राहकांना तात्काळ उपलब्ध केली जात होती. भारतीय रिझर्व बँकेने 1 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करत असताना ग्राहकांची महत्वपूर्ण माहिती म्हणजे कार्ड क्रमांक, सिविवी, कार्ड मुदत यासारखी महत्वाची माहिती साठवून ठेवण्यास व्यापारी संस्थाना मनाई केली आहे. त्याऐवजी त्याची आभासी ओळख म्हणजे टोकनायझेद्वारे ओळख सिद्ध करून ऑनलाइन व्यवहार करायची सवलत दिली आहे. ग्राहकांना यापुढे प्रत्येक वेळी व्यवहार केल्यावर कार्ड वापर करणार असेल तर त्याचा पूर्ण तपशील द्यावा लागेल तो इ कॉमर्सच्या पोर्टलवर नसेल किंवा आपल्या कार्डाचे टोकनायझेशन करून मिळालेला क्रमांक वापरून करता येईल. ★आता कार्डाचे टोकनायझेशन म्हणजे काय? ते पाहुयात. ■हा एक आपल्या कार्डास दिलेला पर्यायी क्रमांक म्हणजेच कोड आहे जो आपणास बँकेच्या संकेतस्थळ अथवा अँप वरून मिळेल हा टोकन क्रमांक आपणास कार्डवरील आवश्यक माहिती ऐवजी विक्रेत्याच्या संकेतस्थळावर साठवण्या ऐवजी या टोकन क्रमांकाने आपले भविष्यातील व्यवहार पूर्ण करता येतील या नवीन सुविधेमुळे कोणत्याही विक्रेत्यास यापुढे ग्राहकांचा कार्ड क्रमांक, सिविवी आणि कार्डची मुदतसमाप्तीची तारीख ही वैयक्तिक माहिती आता साठवता येणार नाही ★हे टोकन कुठे वापरता येईल? ■एकदा हा कोड तयार केला की जेथे कार्ड डिटेल्स द्यावी लागतात त्या सर्वच ठिकाणी कार्डाचा तपशील देण्याऐवजी टोकन नंबर दिल्यावर व्यवहार अन्य कोणतीही माहिती न देता पूर्ण करता येईल ★यापासून कोणकोणते फायदे होतील? ■अश्या प्रकारे कार्ड तपशील पोर्टलवर देऊन व्यवहार करण्यापेक्षा अधिक सुरक्षित आहे कारण या मध्ये ग्राहकांचा कोणताही तपशील व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांस कळत नाही. ★अधिक सुरक्षित असलेला हा टोकनायझेशन कोड कुठून घ्यायचा? ■यासाठी- *जेथे ऑनलाइन व्यवहार करणार तेथे खरेदी करून पे बिल येथपर्यंत येऊन तेथे असलेल्या पेमेंट गेटवेवर जा *यानंतर पेमेंट करण्याच्या पर्याय प्रकारातून क्रेडिट / डेबिट कार्ड ची निवड करा त्यात आपले सर्व डिटेल भरा *यानंतर secure your card किंवा save card as per RBI guidelines असा पर्याय येईल त्यास मान्यता द्या *तुमच्या बँके खात्याशी संलग्न असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका *तुमचे कार्ड सुरक्षित झाले असल्याचा संदेश येईल. ★ही क्रिया कशी पार पाडली जाईल? ■हा कोड मिळवताना कोणताही तयार तपशील मिळणार नाही तो स्वतःलाच भरावा लागेल. यास ग्राहकांची संमती मिळवताना ती त्यांनीच दिली आहे ना यासंबंधी पुरेशी काळजी घेऊन खात्री करूनच टोकन नंबर दिला जाईल. ★टोकनायझेशनची मार्गदर्शक तत्वे नक्की कोणत्या कार्डांसाठी? ■भारतात वापरल्या जाणाऱ्या रुपयात व्यवहार होत असलेल्या सर्व क्रेडिट/ डेबिट-कार्डाचे टोकनायझेशन होऊ शकते. ★ही मार्गदर्शक तत्वे नक्की कोणत्या व्यवहारासाठी? ■कार्डने होऊ शकणाऱ्या फक्त आंतरदेशीय व्यवहारासाठी उपयोगी. ★टोकनायझेशनचे व्यवस्थापन मी कसे करणार? ■आपल्या बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रास सांगून त्याचे व्यवस्थापन करता येईल. कार्डहोल्डर ज्याप्रमाणे टोकन मिळवू शकतो तसेच ते रद्द करू शकतो, स्थगित करू शकतो आपल्या गरजेनुसार पुन्हा पुन्हा वापरू शकतो. ★टोकनायझेशनचा पीओएस व्यवहारांवर परिणाम होईल का? ■नाही, ही कार्डचा थेट वापर करण्याहून अधिक सुरक्षित व्यवहार करण्यास उपलब्ध करण्यात आलेली ही सोय आहे. ★ही सेवा घेण्यास काही सेवाशुल्क द्यावे लागेल का? ■यासाठी ग्राहकास कोणतेही सेवाशुल्क द्यावे लागणार नाही. ★हा कोड देणे रद्द करणे नक्की कोण करणार? ■हे काम तुमची बँक किंवा त्यांनी मान्यता दिलेली विसा, मास्टरकार्ड, रूपे यासारखी पेमेंट यंत्रणा यांच्याकडूनच होईल. ★यामुळे कार्ड धारकाची माहिती सुरक्षित आहे का? ■ही माहिती सांकेतिक स्वरूपात अन्य सुरक्षित ठिकाणी साठवली जात असल्याने बँक किंवा त्यांनी मान्यता दिलेल्या लोकांपर्यंत ही माहिती जात नसल्याने अधिक सुरक्षित असल्याचे त्यांचे नियामक भारतीय रिजर्व बँकेचे मत आहे. विक्रेता, टोकनची मागणी करणारा ग्राहक, त्याची बँक आणि पेमेंट प्रणाली यांच्याकडे पूर्ण स्वरूपात ही माहिती साठवली जात नाही. ★ग्राहकाने टोकनायझेशन करणे सक्तीचे आहे का? नाही, टोकनायझेशन न करणाऱ्या ग्राहकांना कार्डने व्यवहार करताना त्यावरील तपशील म्हणजे कार्डाचा 16 अंकी पूर्ण क्रमांक, वैधतेचा महिना/ वर्ष, सीवीवी प्रत्येकवेळी भरावा लागेल. ★एक व्यक्ती किती कार्डचे टोकनायझेशन करू शकेल यावर काही मर्यादा आहे का? ■नाही, एक व्यक्ती तो वापरत असलेल्या कितीही कार्डांचे त्याच्या इच्छेनुसार टोकनायझेशन करू शकतो आणि त्यातील कोणते कार्ड कुठे वापरावे ते ठरवू शकतो. ★टोकनायझेशन झालेले कार्ड नेमके कोणते ते इकॉमर्स मंचावर कसे समजेल? ■या मंचावर कार्डाच्या जागी पूर्ण क्रमांक दिसण्याऐवजी ×××× ×××× ×××× 1234 या ठिकाणी अंतिम चार अंक दिसतील. ★टोकनायझेशन रद्द केल्यावर, कार्ड नवीन मिळाल्यावर किंवा त्याचा दर्जा उंचावल्यावर काय होईल? ■काही नाही, ग्राहकांना अशा प्रसंगी पुन्हा एकदा नव्या कार्डाचे टोकनायझेशन पूर्वीच्याच पद्धतीने एकदा करून घ्यावे लागेल. ★प्रत्येक इकॉमर्स मंचासाठी कार्डाचे वेगळे टोकनायझेशन करावे लागेल का? ■हो, कारण हा एक खास क्रमांक असेल जो सदर कार्डऐवजी त्याच मंचासाठी तयार केला जाईल. एकच कार्ड वेगवेगळ्या मंचावर वापरायचे असल्यास प्रत्येक ठिकाणी वेगळे टोकन घ्यावे लागेल. तर एकाच ठिकाणी तीन वेगवेगळी कार्ड वापरायची असतील तरीही प्रत्येक कार्डाचे टोकनायझेशन करून घ्यावे लागेल. कारण हा कोड हा संबंधित मंच आणि कार्ड याची ओळख दर्शवणारा खास क्रमांक असेल. ★कार्डनिर्माता एखाद्या ठिकाणी टोकनायझेशन करण्यास नकार देऊ शकतो का? ■हो, यातील जोखमीचा विचार करून कोणत्या व्यापाऱ्यांस कार्ड सुविधा द्यावी आणि कोणास देऊ नये हा त्यांचा अधिकार आहे. ©उदय पिंगळे अर्थसाक्षर डॉट कॉम येथे 14 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत.

Friday, 7 October 2022

वैद्यकीय इच्छापत्र एक निरवानिराव

#वैद्यकीय_इच्छापत्र_एक_निरवानिराव मरण अटळ असले तरी ते येत असताना, आपण परावलंबी आहोत नाकातोंडात नळ्या घातल्या आहेत आणि केवळ कृत्रिम उपकरणाच्या साहाय्याने जिवंत आहोत अशी स्वतःबद्दलची कल्पनाच कोणी करू शकत नाही. आपला शेवटचा दिस गोड व्हावा ही प्रत्येकाची इच्छा असल्याने अश्या विषयावर चर्चा करणे म्हणजे काहीतरी अभद्र बोलणे असे समजले जाते. आपल्या माहितीत अशी काही उदाहरणे असतील ज्यांच्यावर त्यांच्या प्रिय व्यक्तींना केवळ भावनेच्या आहारी जाऊन असे फारसा उपयोग नसलेले उपचार करण्याची वेळ आली. यात ती व्यक्ती तर गेलीच पण त्याच्या कुटुंबियांना मानसिक त्रासातून जावे लागले, याशिवाय मोठे भरमसाठ बिल झाल्याने आर्थिक झटका बसला ते वेगळे. उपाय होत नाही, परवडत नाही किंवा काही उपायच नाहीत अशा प्रसंगात नंतर पेशंटला घरी नेऊन तो कधी जातो याकडे वाट पाहत बसावे लागते ते वेगळेच. अशी वेळ नक्की कोणावर कधी येईल हे सांगून येत नसेल तरी कोणतीही सुजाण व्यक्ती आपल्यामुळे भविष्यात आपल्या कुटुंबावर कदाचित अशी वेळ आली तर काय करायचे ? आपल्या आजारावर उपचार करून उपयोग होणार नसेलच तर खर्च करत राहायचा का? ज्याच्या सुखासाठी आपण आयुष्यभर धडपडलो त्या प्रिय व्यक्तींना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासात अडकवून ठेवावे का? कोणते उपचार करावेत करू नयेत याबद्दल आपली इच्छा व्यक्त करणारे इच्छापत्र आपण बनवू शकते यास लिव्हिंग विल असे म्हणतात. आपण यासंदर्भात निर्णय घेण्यास सक्षम नसू अशा वेळी कोणते उपचार करावेत आणि कोणते करू नयेत यासंबंधी आपल्या इच्छा त्यात व्यक्त करता येतील. थोडक्यात आपली इच्छा नसताना आपल्यावर कोणते उपचार केले जाऊ नयेत याविषयी आपल्या कुटुंबियांना केलेले हे मार्गदर्शन असते. त्यामुळे लोक काय म्हणतील सुचवलेले उपचार करावेत की नाही करावे यासंबंधी वेळेत निर्णय घेण्याचे मानसिक बळ त्यांना मिळेल. वैद्यकीय इच्छापत्राद्वारे आपण ते करू शकतो. कोणतेही निर्णय घेण्यास आपण असमर्थ असलो किंवा झालो तर आपल्यावर कोणत्या टप्यापर्यंत उपचार करावेत याविषयी आपले वारस किंवा जे कोणी काळजी घेणारे असतील त्यांना आणि आपल्यावर उपचार कारणारे कोणीही डॉक्टर ( अलीकडे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आता मोडीत निघाली आहे) यांना दिशादर्शन करणारा हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. उदा. मेंदू काम करेनासा झाल्यास कृत्रिम साधने लावू नयेत, अन्न जात नसल्यास नळीच्याद्वारे अन्न देऊ नये. श्वसनाचा त्रास होत असल्यास ऑक्सिजन लावू नये, व्हेंटिलेटरवर ठेऊ नये किंवा विशिष्ठ पॅथीचेच उपचार करावेत अथवा करू नयेत यासंबंधी आपण त्यात लिहू शकतो. याचबरोबर आपल्या मृत्यूपश्चात नेत्रदान, देहदान, अवयवदान करायचे असल्यास त्या संदर्भातील आपल्या इच्छा यात लिहिता येतील. यासंबंधी पूर्ण विचार करून आपल्या इच्छा लिहाव्यात आणि त्याचा तपशील एकत्रित करून ₹ 100/- च्या बॉण्डपेपरवर ते लिहून काढून त्यावर सही करावी साक्षीदार म्हणून जोडीदार मुले यांची सही घ्यावी याशिवाय या व्यक्तीची मानसिक स्थिती उत्तम असल्याचे डॉ तेथेच प्रमाणित करून सही करावी याशिवाय दोन विश्वासू व्यक्तीच्या सह्या घ्याव्या म्हणजे कठीण प्रसंगात घरचे लोक द्विधा मनस्थितीत असले तर त्यांचे ते अशा प्रसंगात योग्य निर्णय घेण्यात सहाय्य करतील. असे वैद्यकीय इच्छापत्र नोटराईजकरून त्याच्या प्रमाणित प्रति अधिक जास्तीची प्रत प्रत्येक संबंधितांना द्यावी. मृत्यपत्र आणि हे इच्छापत्र यातील महत्वाचा फरक हा की मृत्यूपत्राची अंमलबजावणी व्यक्तीच्या मृत्यूनंतर होते आणि तो आपल्या संपत्तीचे वाटप कसे व्हावे हे सांगणारा कायदेशीर दस्त आहे. त्यातील तरतुदींची माहिती वारसांना नसते. वैद्यकीय इच्छापत्रातील तरतुदी तुम्ही जेव्हा कोणतेही निर्णय घेण्यास अकार्यक्षम होता तेव्हाच उपयोगात आणण्याचा विचार केला जातो. मृत्युपत्रातील तरतुदी लाभार्थीना माहिती नसण्याची शक्यता जास्त असते. वैद्यकीय इच्छापत्रात त्यांना याची माहिती आधीच असल्याने ठोस निर्णय घेण्यास मदत होते. याचा अर्थ आपण असे इच्छापत्र केल्यास आपल्यावर उपचार होणार नाहीत असा नाही कारण जोपर्यंत व्यक्ती विचार करू शकते तोपर्यंत तिच्या इच्छेनेच त्यावर उपचार केले जातात जेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही अशा प्रसंगातच काय करावे याचे मार्गदर्शन तुम्हीच करून ठेवलेले असल्याने त्याचा नक्की सारासार विचार केला जातो त्यामुळे असे इच्छापत्र केले तर त्याप्रमाणे केले जाईल का? अशी शंका आपण बाळगू नये उलट आपली निश्चित इच्छा सांगून त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य बहाल करावे कारण आपल्या प्रिय व्यक्तीचे हाल झालेले पहात राहणे कोणताही संवेदनशील माणूस पसंत करणार नाही. डॉ मुरी या शास्त्रज्ञांनी त्यांच्या आयुष्यात राहिलेल्या इच्छांमध्ये (बकेट लिस्ट) जिवंतपणीच आपल्या मृत्यूनंतर होणाऱ्या शोकसभेत लोक काय म्हणतील ते ऐकण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्यांच्या विद्यार्थ्यांनी अशी शोकसभा आयोजित केली होती ज्यात ते स्वतः सहभागी झाले होते. याच संकल्पेनेच्या जवळपास जाणारी ही कल्पना आहे. तुलनेने नवी अशी ही संकल्पना असून ती कितपत पचनी पडते ते पाहावे लागेल याविषयी इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध असून वृद्धकल्याणशास्त्र या विषयातील डॉक्टरेट मिळवलेल्या विदुषी डॉ रोहिणी पटवर्धन आणि त्यांचे सहकारी याविषयी जागृती निर्माण करीत आहेत तेव्हा अधिक माहिती मिळवून तसेच काही शंका असल्यास त्यांच्याशी याविषयावर चर्चा करावी आणि एक पाऊल पुढे टाकावे त्याच्या 'आपल्यासाठी आपणच' या पुस्तकात दिलेला वैद्यकीय इच्छापत्राचा नमुना संदर्भासाठी जसाच्या तसा देत आहे वैद्यकीय इच्छापत्र नमुना माझे कुटुंबीय, माझ्या आरोग्याबाबत आस्था बाळगणारी मंडळी आणि माझे डॉक्टर यांच्यासाठी मी हे वैद्यकीय इच्छापत्र लिहून ठेवत आहे. 1) मी वय जन्मतारीख माझा पत्ता मी मृत्युशय्येवर असेन, लवकरच मरण्याची शक्यता दिसत असेल आणि मी बोलण्याच्या परिस्थितीत नसेन, अशा अवस्थेत माझ्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांसंदर्भात मी हे वैद्यकीय इच्छापत्र करून, माझी इच्छा स्पष्टपणे नोंदवून ठेवत आहे. 2) आपल्या राज्यघटनेत नमूद केलेला, जगण्याचा अधिकार, या संकल्पनेची, तसंच आविष्कारस्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची मल पूर्ण माहिती आहे. सन्मानाने जगणं आणि सन्मानाने मरणं य भूमिकेला माझा पूर्ण पाठिंबा आहे. 3) माझ्या आजारपणात, मला जगवण्यासाठी जे उपचार केले जाती त्यासंबंधीच्या स्पष्ट सूचना मी माझ्या संबंधितांसाठी पुढीलप्रमा लिहून ठेवत आहे : अ) मी मरणाच्या दारात असेन, किंवा गाढ बेशुद्धीत असेन, माझा मृत्यू लांबवण्याकरता काहीही उपचार करू नयेत. शरीरात सुया टोचून औषधोपचार करण्याचा किंवा कृत्रिम साधनांच्या मद मला जगवण्याचा प्रयत्न कृपया करू नये. कारण अशा अव आपल्या परावलंबनाचं ओझं इतरांवर टाकणं आणि जगत राह मला कीव करण्यासारखं आणि म्हणूनच घृणास्पद वाटतं. ब) अशा प्रकारे केवळ जगवण्यासाठी जर उपचार सुरू झाले असतील आणि तेही मला सन्मानाचं जिणं जगण्याच्या दृष्टीने ठरणार नसतील तर मला असं निरर्थक जीवन जगण्याची अजिबात इच्छा नाही. म्हणून हे उपचार ताबडतोब थांबवावेत अशी माझी आग्रहाची विनंती आहे.. क) मी असाध्य रोगाने आजारी आहे, एकूणच जगण्याच्या शक्यता मंदावल्या आहेत किंवा माझ्या बेशुद्धीतून मी बाहेर येण्याचीही आशा नाही, अशा अवस्थेत मला कृत्रिमरीत्या अन्नपाणी देऊन जगवण्याचा खटाटोप करू नये. मला पुन्हा आग्रहपूर्वक सांगायचं आहे की, मला अशा परिस्थितीत कृत्रिमरीत्या जिवंत ठेवणारे सारे उपचार मी नाकारू इच्छिते /इच्छितो. ड) मला माहीत आहे की, मी काहीही इच्छा नोंदवून ठेवली असली तरी इथे वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत, विचारविनिमय केला जाईल, पण मला ठामपणे म्हणायचं आहे की, या बाबतीतला कायदा असं स्पष्टपणे सांगतो की, अशा परिस्थितीत माणूस स्वत: बोलू शकत नसेल तर त्याच्या इच्छापत्राचं ऐकावं. म्हणूनच माझ्या बाबतीत या संदर्भातील निर्णयाची जबाबदारी घेणाऱ्या सर्वांना माझी पुनःपुन्हा विनंती आहे की, माझ्या वैद्यकीय इच्छापत्राचा मान राखला जावा. 4) माझ्यावर प्रेम करणाऱ्या, माझ्याविषयी आस्था बाळगणाऱ्या साऱ्यांसाठी या इच्छापत्रांतून मी सांगू बघत आहे की, ज्या वेळी कृत्रिम जीवनाधारांच्या मदतीनंतरही मी पुन्हा पहिल्यासारखं स्वावलंबी सहज जीवन जगू शकणार नाही, त्या वेळी तशा अवस्थेत जिवंत राहण्याची माझी इच्छा नाही. त्या वेळी मी सुदृढ मनाने निर्णय घेण्याच्या अवस्थेत नसेन, म्हणूनच इथे विचारात घेतलेल्या शक्यतांच्या पलीकडे तुम्हाला काही विचार करून निर्णय घेण्याची वेळ आलीच तर सन्मानाने जगणं आणि तसंच सन्मानाने मरणं या माझ्या ध्यासाची तुम्ही आठवण ठेवा. हे वैद्यकीय इच्छापत्र, मी कुणाच्याही दबावापोटी नव्हे, तर स्वतःच राजीखुषीने करत आहे. मी खालील साक्षीदारांसह दि. रोजी वैद्यकीय इच्छापत्रावर माझी सही करत आहे. नाव सही साक्षीदार क्र.1 नाव फोन / मोबाइल सही साक्षीदार क्र. 2 नाव फोन / मोबाइल सही यात जोडीदार मुले डॉक्टर (त्यांच्या टिपणीसह) आणि त्रयस्थ व्यक्ती अशी साक्षीदार संख्येत वाढ करता येईल. वैद्यकीय इच्छापत्र हे कायदेशीर कागदपत्र नसून सर्वांच्या सोयीसाठी त्यांच्याशी विचार विनिमय करून केलेली सोय असून ही एक प्रकारची निरवानिराव म्हणू शकतो ज्या योगे आपल्या प्रियजनाना आपण चुकीचे काही करत असल्याची खंत राहणार नाही. ते करण्याची मानसिक तयारी करण्यासाठीची कृती रोहिनीताईंच्याच शब्दात- ★दोन शब्द प्रत्यक्ष कृतीसाठी★ वैद्यकीय इच्छापत्र ही काळाची गरज आहे. आपले स्वत:चे आणि आपल्या प्रियजनांचे हाल वाचवण्याचा तोच एक मार्ग आहे. मरण अटळ आहे आणि ते सन्मानाने यावं यासाठीचा उपाय आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. मानसिक ताकदीने पुढचा विचार केला तर ते सर्वांच्या हिताचं ठरेल. स्वत:चं वैयक्तिक इच्छापत्र करण्यापूर्वी एखाद्या काल्पनिक केसचं इच्छापत्र तयार करा आणि फाडून टाका. मग स्वतःचं इच्छापत्र करून फाडून टाका. पुन्हा करा. जवळच्या मित्राला किंवा कुटुंबातल्या व्यक्तीला ते दाखवा. परत एकदा फाडून टाका आणि मग खरोखरी स्वतःचं वैद्यकीय इच्छापत्र करा. असं केल्याने आपली स्वत:ची मानसिक तयारी होईल. पहिल्या मसुद्यात असणारा भावनेचा कल्लोळ कमी होईल. कुटुंबाचीही थोडीफार मानसिकता तयार होईल आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा आपल्या जवळच्या लोकांना निर्णय घेण्याचा अधिकार मिळेल, मानसिक बळ मिळेल. असे बळ आपल्याला मिळून प्रत्यक्ष कृती आपल्या हातून घडल्यास लेखाचा हेतू सार्थकी लागेल. ©उदय पिंगळे (आधारित- पुस्तके-आमच्यासाठी आम्हीच, आनंदस्वर जेष्ठांसाठी डॉ रोहिणी पटवर्धन रोहन प्रकाशन) अर्थसाक्षर डॉट कॉमवर 07 ऑक्टोबर 2022 रोजी पूर्वप्रकाशीत