Tuesday, 2 June 2020

जेष्ठ नागरिक आणि गुंतवणूक

#जेष्ठ_नागरिक_आणि_गुंतवणूक गेल्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2019 ला 'समृद्ध जीवन' या विषयावरील दोन दिवसांच्या कार्यशाळेत मी सहभागी झालो होतो. वृद्धकल्याणशास्त्र या विषयाच्या विदुषी डॉ रोहिणी पटवर्धन यांनी ही कार्यशाळा आयोजित केली होती. आता माझे वय 59 चालू असल्याने या दोन वर्षात माझीही गणना जेष्ठ नागरिकांत होईल. मला किंवा सर्वसाधारणपणे कुणालाच माहिती नसलेल्या अनेक विषयांची तेथे ओळख झाली. सन 1961 च्या जनगणनेच्या नुसार वृद्ध व्यक्तींचे प्रमाण लोकसंख्येच्या 5.6% होते तर सन 2011 नुसार ते 8.6% झाले असून अलीकडे ते 10% झाले असावे असा अंदाज आहे. त्यामुळे सध्या दर 10 व्यक्तिमधील 1 व्यक्ती वृद्ध आहे. लोकसंख्येच्या एवढया मोठया प्रमाणात असलेल्या लोकांच्या समस्या आणि त्याचे निवारण याचे ठोस राष्ट्रीय धोरण नाही. त्यांच्या अनेक समस्या आहेत त्यातही स्त्री पुरुष असमानता आहे. स्त्रियांची वयोमर्यादा अधिक असून त्यांच्यातील आजारपणाचे प्रमाण जास्त आहे. सन 2050 पर्यंत वृद्ध व्यक्तींचे प्रमाण 20% होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या समस्येत अधिकाधिक वाढ होण्याची शक्यता आहे. या लोकांना त्यांच्या संख्येच्या तुलनेत सामाजिक सुरक्षा योजनांचा अत्यल्प लाभ होतो. त्यामुळेच त्यांना 'आपल्यासाठी आपणच' हे ध्यानात ठेवून उपाययोजना करायच्या आहेत. यातही व्यक्ती व्यक्तीत भिन्नता असल्याने तसेच आपणास एवढे आयुष्य लाभेल याचा त्यांनी आधी विचार केलेला नसल्याने ते नेमके काय करावे याच्या शोधात आहेत. जे लोक आज 30 ते 50 या वयोगटात आहेत त्यांनी आपल्या निवृत्तीचा विचार करून त्यासाठी आधीच योजना बनवावी. जेष्ठ नागरिक हे नातेवाईक व शासन दोन्हीकडून उपेक्षित असल्याने त्यांच्याकडून मदत झालीच तर ठीक नाहीतर असलेल्या समस्यांना तोंड द्यायचे आहे. यातील विविध व्यक्तींच्या समस्या आणि त्यावरील उपाय यात भिन्नता असली तरी त्यांच्याकडे पैसा असेल तर जीवन सुसह्य होण्यास मदत होऊ शकते. यादृष्टीने त्यांनी तजवीज करणे आवश्यक आहे. हे सर्व करीत असताना अनेक बारीकसारीक गोष्टींचा सखोल विचार करणे गरजेचे आहे यावर सर्वांना लागू होणारा असा कोणताही ठोस उपाय नाही. तेव्हा आपले उर्वरित आयुष्य आनंदाने जगण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल-- *पेन्शन मिळते का असेल/नसेल तर नियमित उत्पनाचे साधन. *वाढती महागाई त्याला सुसंगत योजना/ पर्याय. *वैद्यकीय सोयी आपल्या किंवा मुलांच्या मालकांकडून मिळण्याची शक्यता. *गरज पडल्यास उपलब्ध मनुष्यबळ. *अंदाजे खर्च मूलभूत गरजांसाठी. *असलेले आजार त्यावरील औषधोपचार. *आपल्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती. *जोडीदार जाण्याने निर्माण होणारी पोकळी. *अन्यायाची जाणीव त्यावर मागायची दाद. *संपत्तीची वाटणी. *सामाजिक भान. ही यादी वाढवता येऊ शकेल. मला निश्चित खात्री आहे, आपल्या दीर्घ (साधारणपणे 25 वर्ष) अशा उत्तरार्धाकडे या सर्वच दृष्टिकोनातून अनेकांनी विचार केलेला असायची शक्यता कमी आहे. यातील अनेक गोष्टींचा संबध शेवटी पैशांशी जोडला जात असल्याने आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी कोणकोणते मार्ग आहेत ते पाहूयात. मला माहीत आहे की पैसा हे सर्वस्व नाही परंतू तो अनेक कारणासाठी लागत असतो ही वस्तुस्थिती आहे. *नियमित उत्पन्न देणाऱ्या योजना: 1.वरिष्ठ नागरिक बचत योजना: खाते पोस्ट बँक कुठेही काढता येते, जास्तीतजास्त गुंतवणूक 15 लाख, व्याज दर तिमाहीस, सध्याचा दर 7.4%प्रतिवर्षं, व्याज करपात्र, मुदत 5 वर्ष. 2.पोस्टाची मासिक प्राप्ती योजना: योजना फक्त  पोस्टातच, जोडीदारासह जास्तीत जास्त गुंतवणूक 9 लाख, व्याज दरमहा, सध्याचा दर 7.2% प्रतिवर्षं , व्याज करप्राप्त, मुदत 5 वर्ष. 3. प्रधानमंत्री वय वंदना योजना: एल आय सी चे ऑफिस, एका व्यक्तीस 15 लाख गुंतवणूक करता येते, व्याजदर 7.4% ते 7.66% व्याज करपात्र, मुदत 10 वर्ष. 4.आर बी आय बॉण्ड: व्याज दर सहा महिन्यांनी किंवा संचित, व्याजदर 7.75% व्याज करपात्र, किमान गुंतवणूक 10 हजार कमाल मर्यादा काहीही नाही. या योजनांतून नियमित उत्पन्न मिळू शकते. याशिवाय अनेक पेन्शन योजना असून त्यांचा परतावा 6 ते 7% आहे. याहून अधिक व्याज देणाऱ्या सहकारी बँका, पतसंस्था, कंपनी डिपॉझिट, हमखास मासिक 3 ते 5% परतावा देणाऱ्या योजना टाळा. आपले जुने पी पी एफ खाते किंवा इ एल एस एस योजनेत गुंतवणूक असेल तर अडीअडचणीत त्यातून पैसे काढता येऊ शकतील. सर्व सुरक्षित पर्यायातून मिळणारा परतावा हा 7% च्या आसपास असल्याने अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी थोडी जोखीम घेऊन अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी अल्प प्रमाणात थेट शेअर्स मध्ये एस आय पी करावे म्हणजे त्यातून दीर्घकाळात संपत्ती निर्माण होऊ शकेल. धाडसी लोकांनी या पर्यायाचा विचार करावा.या दोन्हीचा मध्यममार्ग म्हणजे म्युच्युअल फंडांच्या योजनेत गुंतवणूक करावी. आपल्या गरजेनुसार त्यांच्याकडे अनेक योजना आहेत ज्यातून मोजकीच जोखीम घेऊन अधिक परतावा मिळवू शकतो. ज्यांना नियमितपणे उत्पन्न हवे असेल त्यांना वार्षिक 10 ते 12% दराने मासिक परतावा मिळू शकेल अशा काही योजना आहेत. मात्र तो त्याच प्रमाणात कायम मिळेल याची कोणतीही हमी नाही. हा परतावा डिव्हिडंड स्वरूपात मिळत असल्याने तो करपात्र असून एका वर्षातील डिव्हिडंड 5 हजार रुपयांहून जास्त होत असल्यास त्यावर 10% दराने ( अलीकडे यात तात्पुरता बदल केल्याने 7.5% दराने) कर मुळातून कापून घेतला जातो आपले उत्पन्न करपात्र नसेल तर आयकर विवरणपत्र भरून तो परत मिळवता येईल. अशा प्रकारे अधिक उत्पन्न मिळून त्यातील काही भागाची गुंतवणूक करून जोखीम कमी करता येऊ शकते. ही झाली गुंतवणुकीची आर्थिक बाजू परंतू गुंतवणूक हा शब्द याहून अधिक व्यापक आहे. यादृष्टीने आवश्यक असल्यास आरोग्यविमा घेणे जरुरीचे आहे. याच वयात आजार होण्याची शक्यता अधिक असून त्यामुळे आपण अडचणीत येऊ शकतो. बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेदारांना निपॉन जनरल लाईफच्या सहकार्याने गृप मेडिक्लेम देऊ केला असून 5 लाखासाठी,45 हून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी , हे सुरक्षाकवच वार्षिक ₹11918/- मध्ये उपलब्ध आहे आणि ही पॉलिसी 80 वर्षापर्यंत उपलब्ध असून हा हफ्ता सर्वच वयोगटातील लोकांना एकच आहे. सर्वांना उपलब्ध तुलनेत अधिक किफायतशीर असा हा पर्याय आहे ज्यामुळे आपली वैद्यकीय गरज काही प्रमाणात पूर्ण होईल. याव्यतिरिक्त आधिक सुरक्षा हवी असेल तर "http://policyx.com/" किंवा "http://policybazaar. com येथून तुलनात्मक माहिती मिळवून निर्णय घ्यावा. या वयातील नागरिकांनी त्यांचे वैयक्तिक मत काही असले तरी प्रत्येक गोष्टीवर आपले मत अनाहूतपणे व्यक्त न करता केवळ मागितलेल्या गोष्टींवरच सल्ला द्यावा कारण अनेकदा या क्षुल्लक गोष्टी विसंवादाचे मूळ ठरतात. आजकाल तरुण पिढीस या गोष्टी आवडत नाहीत, मात्र कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी राहून आपण त्यांच्याबरोबर आहोत याचा दिलासा देण्याइतकी भावनिक गुंतवणूक यामध्ये असू द्यावी. ©उदय पिंगळे यात सुचवलेल्या योजना ही शिफारस नाही e वर्तमानपत्र लेख येथे २ जून २०२० रोजी पूर्वप्रकाशीत.